Pages

Thursday, February 23, 2012

झाडपण

सकाळ-संध्याकाळ-रात्र
तेव्हा गात्रांमध्ये एकच गाणं असायचं...
तू नव्हतीस कधीच,
कारण येण्याआधीच तुझं नेहमी जाणं असायचं...

मागे उरायचे फक्त आभास...
सावल्यांवर स्वार होणार्‍या काही
काळोखी पोकळ्या...
आणि अंधारात लागणारे
उजेडाचे चकवे
आयुष्य असतेच गं असे फसवे...

दरवेळी उरामधलं ओझं हलकंच वाटत राहिलं
माझ्याच अनुभवांचं गाव माझ्यासाठीही परकंच राहिलं

तरी तू दरवेळी कधी ठामपणे
तर कधी संभ्रमाने सांगायचीस -
"तुझं झाडपण शाश्वत असेलही रे,
पण प्रेमासाठी सरणावर चढायची
माझीच तयारी झाली नाहीये अजून!"

मला तेव्हाच कळायला हवं होतं!
तुला तुझ्या ऐन बहरामध्ये
माझं झाडपण हवं होतं,
सावली हवी होती, झोके हवे होते...
पण हे एवढंच हवं होतं...
माझी त्यापुढेही शेवटपर्यंत साथ
नकोच होती तुला!
एकदातरी ऐकलं असतं तुझं तर?
मीही असा उन्हात वाळून गेलो नसतो
आणि तुलाही दरवेळी समाधान मिळालं असतं - प्रेम केल्याचं!

- नचिकेत जोशी (१७/२/२०१२)

Thursday, February 16, 2012

वार्‍यामागे पळतो आहे

वार्‍यामागे पळतो आहे, क्षणभर उसंत नाही
वारा कोठे नेतो हा मुद्दाही ज्वलंत नाही

हवाहवासा एक विसावा मला मिळाला आहे
उन्हात सरलेल्या वाटांची कसलीच खंत नाही

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही

तुला मिळविणे हाती नाही, गमावणेही नाही
यांच्यामधल्या प्रवासासही कोठेच अंत नाही

अमुचे नाते तार्‍यांना सोपवून यावे म्हणतो
मीही आता थकलो आहे, तीही जिवंत नाही

- नचिकेत जोशी((२५/११/२०११)

******************
लेकीच्या लग्नाची त्यांना फार काळजी आहे
(गाडी, बंगलाही नसणारा मुलगा पसंत नाही!)

Tuesday, February 14, 2012

प्रेमासाठी

(एक वर्षापूर्वी सुचलेली ही कविता. आत्ता इथे टाकतोय)

प्रेमासाठी दिवस-रात्र जागायचो तेव्हाची गोष्ट.
एकदा असंच प्रेम आणायला सकाळी सकाळीच निघालो.
"किती लागतील" ते माहित नव्हतं म्हणून एटीएममध्ये शिरलो.
बाहेर पडलो तर कोपर्‍यावर एक फूलवाला दिसला.
त्याला म्हणालो, "प्रेमाचे फूल द्या हो दादा."
तर तो म्हणाला, "घ्या की - पन्नासला दोन देतो!"
- घेऊन टाकली!

मग तसाच पुढे गेलो.
वाटलं, शुभेच्छापत्रात प्रेम नक्की मिळेल.
दुकानात शिरलो आणि काउंटरपलिकडच्या सुंदर शुभेच्छापत्रिकेला म्हणालो -
"मला प्रेमाचं ग्रीटींग हवंय..."
ती समजली आणि खपवण्याच्या शुभेच्छेने म्हणाली -
"यापैकी घ्या... पन्नासला एक, पण होकाराची गॅरेंण्टी!"
- घेऊन टाकलं!

मग रस्त्यावरून भटकत सुटलो.
बागा, कोपऱ्यातल्या जागा,
पब्लिक बस, हॉटेल्स, कॉफीहाऊस,
कॉलेजचे कट्टे, नेहमीचे अड्डे,
मॉलमधली गर्दी, मल्टिप्लेक्समधल्या 'त्या' दोन खुर्च्या...
सगळीकडे शोधलं..
पण सगळ्याच गोष्टी देव नसलेल्या देवळाप्रमाणे
आपल्याच स्थायी स्वभावात हरवल्या होत्या.

शेवटी भूक लागली म्हणून प्रेम-बिम विसरून
एका घरगुती खानावळीत शिरलो.
तर तिथेही लिहिलं होतं -
अगदी घरी जेवल्याचा भास
मायेची, चविष्ट थाळी फक्त रू पन्नास!

बराच वेळ गेला..
माझ्या या शोधात सकाळपासून ज्याला
मी गृहीत धरलं, तो माझा जुना मित्रही आता
आकाशातून उग्र होऊ लागला होता!
मी मात्र माझ्याच धुंदीत..

झगमगत्या नेकलेस, इअरिंग्ज, हॅण्डबॅग्ज,
गॉगल्स, घड्याळं,
क्लासिकल डीव्हीडी कलेक्शन..
- नाही घेतलं काहीच!
फक्त भिरभिरलो..
आणि शेवटी प्रेमाचा हट्ट सोडून परत निघालो.

येताना एका आजीबाईंना आणि एका अंध मुलीला रस्ता ओलांडून दिला,
त्यांचे आशीर्वाद आणि थॅक्स अगदी जपून खिशात ठेवून दिले.
मंद झुळूक यायला लागली होती.
दुपारपासूनची तगमग कमी व्हायला लागली होती...
गल्लीमध्ये बांधकाम चालू होतं,
तिथे मुलांबरोबर आंधळी-कोशिंबीर खेळलो..
घरी आलो तेव्हा उशीर झाला होता.
बाबा केर काढत होते, आई बेसिनजवळ भांडी घासत होती.
बाबांना म्हणालो, "द्या इकडे, मी काढतो.
मी आलोय आता, तुम्ही आराम करा.."
आतून बेसिनमधला नळाचा आवाज तेवढा वाढलेला ऐकला मी!
बाबा म्हणाले, "आजीने खास तुझ्यासाठी लाडू पाठवलेत,
मामा एसटीमध्ये रात्रभर उभा राहून घेऊन आलाय, खाऊन घे.
आणि जेवायला सगळे थांबलो आहोत तुझ्यासाठी!"

खूप वर्षं झाली या गोष्टीला.
कधीकाळी प्रेमासाठी दिवसभर भिरभिरलो होतो,
आणि
ती पन्नासची दोन फुलं आजीला आणि
होकाराची गॅरेण्टी मिळालेलं ग्रीटींग मामाला देऊन
स्वतःशीच जरासा विसावलो होतो
एवढंच आठवतं आता...

- नचिकेत जोशी (८/२/२०११)

Wednesday, February 8, 2012

साक्षात्कार

ऐकली माझी व्यथा, वरवर दिला आधार त्यांनी
आणि नंतर त्या व्यथेचा मांडला बाजार त्यांनी

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो
छाटले आहेत सारे वृक्ष डेरेदार त्यांनी

राहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला
धाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी

आज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला
छेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी

आतमध्ये साचलेले कागदावर मांडले मी
ते कुठे कळले? जरी केली समीक्षा फार त्यांनी

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!

तो म्हणाल्यावर निघाले पालखी घेऊन सारे
तो म्हणाला आणि केला सामुहिक धिक्कार त्यांनी

'मी खरा त्यांच्या कृपेने येथवर सुखरूप आलो'
घडवला सरणावरीही हाच साक्षात्कार त्यांनी

- नचिकेत जोशी (८/२/२०१२)

Thursday, February 2, 2012

रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)

रतनवाडी! सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव! अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ अप्रतिम पुष्करणी, एकीकडे भंडारदरा धरणाच्या जलाशयाची सोबत तर दुसरीकडे डोंगररांगांचा शेजार!
गावातून दिसणारा रतनगड आणि खुट्टा -


खुट्टा क्लोजअप -


अमृतेश्वराचे मंदिर -


पुष्करणी -


थंडी इतकी होती की सकाळी झाडाला पाणी घातले तरी त्याची आपोआप वाफ होत होती! सकाळी पावणेआठ वाजता चालायला सुरुवात केली तेव्हा लवकरात लवकर म्हणजे अंधार पडायच्या आत गुहेरीच्या दारातून कोकणात उतरणे एवढेच उद्दिष्ट होते. रतनगडाची वाट सुंदर जंगलातून जाते. वाटेत एकच नदी तीन-चार वेळा ओलांडून जावे लागते. पलीकडच्या काठावर पुढे गेलेली वाट दिसली, की नदी ओलांडायची, एवढंच समजलं मला! थोडंस पुढे गेल्यावर रानडुकरांची शिकार करण्यासाठी रान उठवायला निघालेले तीन-चार गावकरी दिसले. आणि थोड्या वेळाने मग वाटेत आजूबाजूच्या जंगलातून खसखस ऐकू येत राहिली. (रानडुकरे असावीत).

पण काहीही म्हणा, हा सगळाच टापू अतिशय सुंदर आहे! रतनगड-भंडारदरा-पाबरगड-घनचक्कर-मुडा-सांदण दरी-कळसुबाई-अलंग-कुलंग-मंडण हे दोस्त, पायथ्याशी चित्रात शोभतील अशी छोटी गावं आणि वन्य श्वापदांचा वावर असलेलं देखणं जंगल! कुठल्याही ऋतूत जा, आपल्यासाठी काही ना काही खास असणारच!
रतनगड -


उन्हात चमकणारे कात्राबाई डोंगराचे कडे -


झूम करून -


एका सपाटीवर ब्रेकफास्ट ब्रेक घेतला आणि पुढे निघालो. साधारण दहा वाजता रतनगड-कात्राबाई फाट्याजवळ पोचलो. इथे दोन वाटा फुटतात - उजवीकडची गडाकडे जाते आणि सरळ वाट कात्राबाईच्या डोंगराच्या दिशेने जाते. आम्हाला या दुसर्‍या वाटेने जाऊन अग्निबाण सुळक्याला वळसा घालायचा होता. त्या फाट्यावर रात्री गडावर गेलेल्या ग्रुपला खाली आणायला निघालेले दोन गावकरी भेटले. त्यांच्याकडून कुमशेतपर्यंतच्या मार्गाची खातरजमा करून घेतली. तसेच आजूबाजूच्या जंगलातले श्वापदांबद्दलही विचारून घेतलं.
डाव्या कडेला अग्निबाण सुळका -


इथून पुढची वाट झाडीतून जाते. काही ठिकाणी पायाखालची वाट दिसत नाही, इतकी कारवी आहे. वाटेवर दोन-तीन ठिकाणी जमीन उकरल्याच्या खुणा दिसल्या. एका बिबट्याच्या बछड्याच्या पावलांचे ठसे दिसले. थोडंसं पुढे गेल्यावर एके ठिकाणी मोठ्या बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्या. ते पाहून आजतरी बिबट्याने दर्शन द्यावे असं फार वाटायला लागलं! मला एकदा या सगळ्या जंगलच्या अनभिषिक्त रहिवाशांना त्यांच्याच मुलुखात मोकळेपणे पाहायची फार इच्छा आहे! फक्त त्यांनी फार सलगी दाखवली नाही तर मला पुढच्या वेळी उरलेल्या इच्छा सांगण्याची संधीही मिळेल! असो.
बिबट्याचे ठसे - (वर्तुळ बिबट्याने काढलेले नाही!)


तर रतनगडाला उजव्या हाताला ठेवून ही वाट अग्निबाण सुळक्याच्या दिशेने सरकते. रतनगड आणि खुट्टा -


बराच वेळ चालल्यावर एके ठिकाणी जंगलात एक इमर्जन्सी ब्रेक घेतला. तिथे घालवलेली १०-१५ मिनिटे या ट्रेकमधला सुखद काळ म्हणावा लागेल. कारण त्या जंगलात दगडाची उशी करून, कातळाला पाठ टेकवून, झाडाच्या छोट्या सावलीत, बिबट्या वगैरेंची जराही फिकीर न करता पक्ष्यांचे आवाज ऐकत उरलेल्या शांततेत मी चक्क एक डुलकी काढली. बाकीचे लोक बोलत बसले होते पण त्यांच्या गप्पाही जरा वेळाने ऐकू येईनाशा झाल्या.

भटक्यांसाठी महत्त्वाचे म्हणजे, याच वाटेवर पुढे एके ठिकाणी चुकण्याची शक्यता आहे. एक वाट सरळ जाते, तर एक झाडीत वळून उजवीकडे जाते. आपल्याला या दुसर्‍या वाटेने कात्राबाई खिंडीकडे जायचे आहे. तो फाटा लक्षात ठेवायची सोपी खूण म्हणजे त्या फाट्याच्या पुढचे अर्ध्यात वाटेकडे झुकलेले एक झाड. हा फाटा जर लक्षात आला नाही, तर चुकणे अटळ!


कात्राबाई ही रतनगडाच्या दक्षिण-नैऋत्येला पसरलेली एक डोंगररांग. या रांगेच्या एका टोकाला अग्निबाण सुळका (लिंगी) तर दुसर्‍या टोकाला पायथ्याशी कुमशेत गावच्या वाड्यावस्त्या. पश्चिमेकडे आजोबा डोंगर. कात्राबाई खिंडीतून सह्याद्रीच्या रांगांचे अप्रतिम दृश्य दिसते. एका बाजूला हरिश्चंद्रगड, कलाडगड, वाकडी सुळका, कुमशेतचा कोंबडा, मागे नानाचा अंगठा, नाणेघाट तर विरूद्ध बाजूला रतनवाडी गाव, भंडारदरा जलाशय, कळसूबाई रांग आणि अलंगचा माथा असा विस्तीर्ण प्रदेश दिसतो.




डावीकडे मागे आडवा हरिश्चंद्रगड -


वाकडी सुळका आणि कुमशेत गाव - (उजवीकडचा डोंगर बहुतेक कुमशेतचा कोंबडा असावा)


खिंड उतरून आलो आणि आपण कुठून आलो ते एकदा पाहून घेतले - (डावीकडे कात्राबाई डोंगर)


पुढे वाटेवर ब्रिटीशकालीन मैलाचे दगड सापडले. जुन्या काळात हा पाचनई आणि साम्रदकडे जाणारा हा व्यापारी मार्ग होता.




कुमशेत हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक छोटेसे गाव. आम्हाला गावात न जाता उजवीकडे वळून गुहेरीकडे जायचे होते. रतनवाडी ते कुमशेत असा नियमित ट्रेकही आहे. पण आम्ही गुहेरीच्या दाराने उतरणार असल्यामुळे आमचा खरा 'ऑफबीट' ट्रेक आता सुरू होणार होता. एव्हाना दीड वाजून गेला होता. आम्ही सकाळपासून कुठेही उगाचच अवांतर वेळ घालवला नव्हता, तरीही, त्यामानाने सावकाश चालल्यामुळे वेळेच्या दीडएक तास मागे होतो. कुमशेत गावातल्या बाळूदादाशी ओळख होती. त्याच्याकडे जाऊन मग गुहेरीच्या दाराने उतरायची वाट माहित करून घ्यायची होती.

कुमशेतच्या ठाकरवाडीतून उजव्या हाताला वळलं की एक ऐसपैस वाट आजोबाच्या दिशेने जाते. तिथून कोकणात उतरायला तीन वाटा आहेत - एक गुहेरीच्या दाराने , दुसरी - पाथराघाटाने आणि तिसरी सीतेच्या पाळण्यापासून. त्यापैकी तिसरी वाट खूपच अवघड आहे. पाथराघाटाच्या वाटेमध्ये एके ठिकाणी अवघड पॅच आहे, तिथे कदाचित रोपची गरजही लागू शकते. आमच्याकडे रोपही नव्हता आणि तेवढा वेळही नव्हता. त्यामुळे पुढच्या वेळी पाथराघाटाने उतरू असे म्हणून आम्ही गुहेरीकडे मोर्चा वळवला.

डावीकडे आजोबा डोंगर, मध्यभागी कात्राबाई रांग -


गुहेरीच्या माळावर बाळूच्या छोट्याशा घरट्यामध्ये क्षणभर विसावलो, तीन दिवस इतके वय असलेल्या शेळीच्या कोकरांमध्ये आणि टुणटुणत धावणार्‍या कोंबडीच्या ओंजळीएवढ्या पिलांमध्ये बसून जेवलो, आणि बाळूला घेऊन पुढे निघालो. एव्हाना सव्वाचार झाले होते.


डावीकडचा डोंगर आजोबा. मधल्या V आकाराच्या पट्ट्यात गुहेरीचे दार आहे.


गुहेरीच्या माथ्यावर पोचलो आणि खाली दूरवर डेहेणे गावाकडे जाणारा रस्ता दिसला. हा आजच्या ट्रेकमधला शेवटचा उतार. पाच वाजले होते. सातपर्यंत खाली उतरून साडेआठ पर्यंत आसनगाव असे ध्येय होते.


ही वाट 'अशक्य' आहे. यापेक्षा गायदरा घाट परवडला. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणार्‍या सगळ्याच वाटा थोड्याफार फरकाने सारख्याच असल्या तरी ही वाट फारशी वापरात नसल्यामुळे थोडी अवघड आहे! अवाढव्य बोल्डर, अनियमीत उंचीचे सपाट, टोकदार दगड, अरूंद घळीतून जाणार्‍या वाटा, काही ठिकाणी ८-१० फूट उंचीचे चढ-उतार इत्यादी इत्यादी!




तो पॅच उतरण्याइतपत करावा म्हणून कुणा सहृदय गावकरी/भटक्याने ठेवलेल लाकडी खांब -




आमच्यापैकी कुणीही या वाटेने यापूर्वी भटकलं नव्हतं. अगदी निवडकच लोकांना विचारण्यामागे हे मुख्य कारण होते! मी आणि जीवनबाबू यांनी वाट काढत मागच्यांची चाहूल घेत पुढे निघायचं आणि खाली पठारावर पोचायचं ठरवलं. अर्थात एकच वाट असल्यामुळे जोपर्यंत खालीच उतरणारी नाळेची वाट सोडून जंगलात शिरत नाही (तसे करायचे काही कारणही नव्हते), तोपर्यंत चुकण्याची शक्यता नव्हती.

आमच्या डाव्या हाताला आजोबा डोंगराचा कडा आणि सरळ खाली उतरत गेलेली सोंड, उजव्या हाताला तसाच दुसर्‍या डोंगराचा कडा व त्याला लागून असलेली सोंड. आजोबाच्या आड पश्चिम दिशा. अंधार पडायच्या आत ती सोंड क्लिअर झाली असती तर उजेड अजून थोडा वेळ मिळाला असता. परंतु, सव्वा सहाच्या सुमारास 'आपण अंधार पडेपर्यंत पूर्ण खाली जाऊ शकणार नाही' असं लक्षात आलं. मग बर्‍यापैकी उजेडाची जागा बघून बाकीच्यांची वाट पाहायचे ठरवले. बरोब्बर अंधार पडत असतांना उरलेले चार वीर आले. कॅमेरा बॅगेमध्ये गेला आणि आता फक्त उतरण्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं. आता मी मागे राहिलो आणि प्रीती आणि जीवनबाबू वाट काढायला पुढे गेले.

जेमतेम १० मिनिटे झाली असतील. आम्ही १०-१५ फुटांच्या एका थेट फॉलपाशी येऊन अडकलो. पूर्ण अंधार पडला होता. वाट थांबली होती. आजूबाजूच्या झाडीमुळे चंद्रप्रकाशाचाही फारसा उपयोग नव्हता. ११ तासांच्या सुरळीत वाटचालीनंतर नेमकी आता अंतिम टप्प्यातच वाट हरवली होती. दोन मिनिटे शांत बसलो आणि मोबाईलची रेंज तपासली. बाळूचे दोन्ही फोन बंद होते पण कुणालचा फोन लागला. त्याने पूर्वी या वाटेने चढाई केली होती. त्याच्याकडून ढोबळमानाने वाट समजून घेतली. आणि बाकीच्या तिघांना जागीच थांबवून प्रीती, राजस आणि मी मागे आलो. एके ठिकाणी डाव्या काठावर (चढताना डाव्या)काहीशी बुजलेली एक वाट कारवीत शिरलेली होती. ते दोघे तिकडे गेले आणि मी नाळेमध्येच त्यांची वाट बघत थांबलो.

काय हवीहवीशी शांतता होती तिथे! समोर - जिथून उतरत आलो ती नाळेची वाट, तिच्या दोन्ही बाजूला पार खालपर्यंत गेलेले डोंगर, त्यावर कारवीचं रान, अंधारात चिडीचूप झालेलं जंगल, काळी झाडं, आकाशात झगमगणार्‍या चांदण्या, पूर्ण उगवलेली चंद्रकोर, त्या प्रकाशात चमकणारे नाळेमधले ओबडधोबड खडक, मागच्या बाजूला काळोखात हरवलेली गावाची वाट आणि हे सर्व शांतपणे समजून घ्यायचा प्रयत्न करणारा मी!

पाचएक मिनिटात ते दोघे माघारी आले. एक वाट सापडली होती. त्याच वाटेने प्रयत्न करणे हा पर्याय होता. नाहीतर, पुन्हा होतो तिथे येऊन मुक्कामाची तयारी करणे हा पर्याय होता. ती जागा मुक्कामाला तशी बरी होती. थोडंसं खाली वाटेवरच पाणी होते, बाजूला शेकोटीसाठी सुकी लाकडे होती. दोन्ही बाजूला डोंगर असल्यामुळे त्या काहीशा अरुंद जागेत थंडी कमी वाजली असती. अखेर, 'वाट सापडू दे' म्हणून बाप्पाची प्रार्थना केली आणि सात वाजता नाळ सोडून त्या कारवीच्या जंगलात शिरलो. मी सर्वात शेवटी चालत होतो. ही वाट अजिबात मळलेली नव्हती. शिकारी किंवा लाकूडतोडे वापरत असावेत. खडा उतार, स्क्री, गच्च कारवी, पायात अडकणारी मुळं-झुडुपं, पावलांमुळे सळसळत वाजणारा पाचोळा आणि केवळ टॉर्चच्या प्रकाशात दिसणारं जंगल! मला तर बाजूच्या नाळेतल्या झाडीतूनही सळसळ ऐकू येत होती. इथे कुठेही बिबट्याला दर्शनसुद्धा द्यायची बुद्धी होऊ नये असं वाटत होतं.

एक गोष्ट मात्र सांगितलीच पाहिजे, वाट नक्की योग्य आहे की नाही हे माहित नसतांनाही कुठलाही गोंधळ, गडबड, घाई होत नव्हती. भीती मुक्कामाची नव्हती, अंधाराची नव्हती, तर पुन्हा वाट चुकलो तर परत मागे चालावं लागेल, त्या अंतराची धास्ती होती. त्यामुळे थोडं अंतर पुढे जाऊन प्रीती-राजसने सिग्नल दिला कीच आम्ही पुढे जात होतो. दिशा बरोबर होती, वाट बरोबर वाटत होती आणि आम्ही पाय भरभर उचलत होतो. जीवनबाबू आणि मी उजेड असतानाच न थांबता पुढे चालत राहिलो असतो तर तो फॉल आम्हाला दिवसाउजेडीच कळला असता, असंही वाटलं. पण हीच वाट असावी असं वाटून उपजत उत्साहाने तो पॅच कसातरी उतरूनही गेलो असतो आणि अंधारात दोघेच खाली फसलो असतो, हीही शक्यता होती! कारण अंधार पडल्यावर जेमतेम १० मिनिटात आम्ही त्या फॉलपाशी पोचलो होतो. अखेर, आपण थांबून सर्वांबरोबर राहण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता याची खातरी स्वतःला पटवून दिली. तासाभराने अखेर कुठेतरी अगदी खर्‍या वाटेला लागलो आणि अखेर डोंगराच्या कुशीतून उघड्यावर आलो. एव्हाना नऊ वाजून गेले होते.

खाली आलो असलो, तरी गावाचा मागमूसही नव्हता. आता डावीकडे आजोबाला वळसा घालून अजून दोन एक किमी चालायचे होते. पण सपाटीवरून चालायचे असल्यामुळे गुडघ्यांचे हाल थांबले होते. पावणेदहा वाजता - डेहेणे! रतनवाडी सोडल्यानंतर तब्बल चौदा तासांनी आम्ही डेस्टीनेशनला पोचलो होतो. आता आसनगावहून सव्वा अकराची शेवटची ट्रेन होती, ती चुकली असती तर स्टेशनबाहेरच्या मंदिरात मुक्काम करण्याचे ठरवले होते. डेहेणेमध्ये एक जीप मिळाली. त्या बहाद्दराने जेमतेम पाऊण तासात आसनगावला पोचवले. मग स्लो ट्रेन, अर्धवट झोप, मध्येमध्ये एकेकाला उठवत त्याचे स्टेशन आल्याची जाणीव करून देणे आणि मध्यरात्री एक वाजता दादर! हात-पाय चिकारच दुखत होते. इतका अनोखा अनुभव त्यांनाही अपेक्षित नसावा!

एक अतिशय अप्रतिम ट्रेक! १४ तास, १६ ते १८ किमी! अक्षरशः कस पाहणारा, वाट हरवलेला, पण त्याच वेळी वाट शोधण्यातली मजाही पुरेपूर अनुभवू देणारा! आता या ट्रेकमधल्या वाट चुकण्याची पावती जुन्या लौकिकामुळे माझ्या नावावर फाडत असलेली माझी काही प्रेमळ मित्रमंडळी तुम्हाला भेटतील! त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका! कारण पुढच्या ट्रेकला हेच दोस्त सोबत असतील. आम्ही वाटही चुकू आणि त्याचा आनंदही घेऊ! तर असा हा आडवाटांमध्ये लपलेला सह्याद्री आणि असे हे अनुभव!

पुन्हा भेटूच!

(समाप्त)
- नचिकेत जोशी

Wednesday, February 1, 2012

रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग १

तुम्ही जर मुरलेले भटके असाल, तर शीर्षक वाचताक्षणीच समजायचं ते समजून गेला असाल. आणि नसाल तर, तुम्हाला सांगताना मला विलक्षण आनंद होतोय - ही एक सह्याद्रीमधल्या फारशी प्रसिद्ध नसलेल्या आणि कदाचित म्हणूनच अप्रतिम आडवाटांमधली, भ्रमंती आहे! पार रतनवाडीपासून कात्राबाईला वळसा घालत, आजूबाजूचा अप्रतिम नजारा डोळ्यांत साठवत, कातळ-कपार्‍यांतून चालत, अगदी गुहेरीच्या दारापर्यंत आणि पुढेही थेट कोकणात उतरणारी ही वाट दिवस पूर्ण सार्थकी करते.

तर, त्याचं असं झालं -

शुक्रवार, २७ जानेवारीला प्रीतीचा समस आला - 'रतनवाडी ते आजोबा पायथा व्हाया कात्राबाई घाट. उद्या रात्री निघून परवा रात्री परत. कोण कोण इंटरेस्टेड आहे?'. प्रीती-राजस-सुन्या म्हणजे 'ऑफबीटसह्याद्री'! नो टेंशन! भैरवगडच्या ट्रेकनंतर मी 'ऑफबीट'बरोबर ट्रेक केला नव्हता. या निमित्ताने जुने दोस्त भेटणार होते. मी काहीही अधिक माहिती न विचारताच होकार कळवून टाकला. शनिवारी 'यो'ला बोहल्यावर बघून आलो आणि ट्रेकची इच्छा अधिकच प्रब़ळ झाली.

रात्री ९ वाजता दादरहून कसारा फास्ट ट्रेन पकडायची होती. (अनुभवी मुंबईकरांना सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं असेल.) ट्रेन यायच्या आधी मी प्लॅटफॉर्मवर पेपरस्टॉलवरती पेपर चाळत होतो. त्या विक्रेत्याने आपणहून 'हा घ्या, यात वाचायला बरंच असतं' असं सुचवलं. "वाचायचा नाहीये, त्यावर झोपायचं आहे" - मी. त्याने एकदा मला 'पाहून' घेतलं आणि निमूटपणे TOI हातात दिला. ते जाडजूड धूड मला जेवताना-झोपताना खाली अंथरायला दोन दिवस आरामात पुरलं असतं. प्रीती-राजस मुलुंडहून चढणार होते. ही ट्रेन चुकली असती तर ट्रेक चुकला असता. मी पाठीवर मोठी सॅक असल्यामुळे सामानाच्या डब्यात (लगेज म्हणायचंय मला, 'सामान' नाही!) चढायचं ठरवलं आणि कसाबसा यशस्वीही झालो.

कुर्ला येईपर्यंत केवळ कुठेही दुखत नाही म्हणून अंग शाबूत होतं असं म्हणायला हरकत नव्हती. कारण त्या गर्दीमध्ये माझे स्वत:चे हातही मला दिसत नव्हते. मी मनुष्यमात्रांच्या सागरातील अर्धा थेंब वगैरे असल्याचा भास तेवढ्यात होऊन गेला. ज्याच्या आधारावर स्वस्थ होतो तो पुढच्या माणसाचा खांदा होता, हे ही बर्‍याच वेळाने समजलं. त्यात माझ्या मागच्या वीरमनुष्याला कुर्ल्याला उतरायचं होतं! मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. ठाणे आणि कल्याण ट्रेनने जायचं सोडून हे महाशय चक्क कसारा ट्रेनमध्ये शिरले होते आणि तेही फक्त ५-७ मिनिटांत विरुद्ध बाजूला उतरण्यासाठी! पण ट्रेनमध्ये घुसलात की बाहेर पडायचं ज्ञानही आपोआप मिळतंच. तद्वत, कुर्ल्याला त्याला उतरायला कशीतरी जागाही मिळाली.

बाजूच्या कोपर्‍यात भजन रंगायला लागलं होतं. अशी चालत्या गाडीतली भजने अनेकवेळा प्लॅटफॉर्मवरून ऐकली होती. आज प्रत्यक्ष बघायला मिळाली असती. म्हणून मग हळूहळू त्या दिशेने वळायचा प्रयत्न करायला सुरूवात केली. कुर्ल्याला जsssरा जागा मिळाली आणि त्या बैठेकर्‍यांच्या दिशेने घुसलो. काहीही म्हणा, महाराष्ट्रामध्ये झांज-तबला-चिपळ्या आणि अभंग ऐकले आणि मनात ताल सुरू झाला नाही हे होणारच! आजूबाजूची गर्दी विसरून मीही अगदी रंगून गेलो. ते हातांनी ठेका-बिका देणं बघून त्यांच्यातल्या एकाने 'काँगो वाजवणार का' (इथे तबला नव्हता, काँगो होता) असं विचारलंही. एका अभंगासाठी मी मग झांज वाजवायची हौस भागवून घेतली. काय सुंदर अभंग-गवळणी होत्या! व्वाह!! तास कसा गेला कळलंही नाही. कल्याणला ती 'सेवा' थांबली आणि एकमेकांच्या पाया पडून ते क्षणिक 'वारकरी' आपापल्या वाटेने निघून गेले. आम्हीही सगळे मग एकाच डब्यात एकत्र आलो.

कसार्‍याला उतरलो तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा झाले होते. इथून आम्हाला रतनवाडी (रतनगडाच्या पायथ्याचे गाव) गाठायचे होते. या वेळी आम्ही सहाच जण होतो. कुठल्याही ट्रेकसाठी ६ ते ८ जण हा अगदी योग्य संख्या! जास्त जण असले की गर्दी होते आणि कमी असले की कंटाळा येतो! एक जीप सांगून ठेवली होती. रतनवाडीकडे येताना रस्त्यावर जीवनबाबूला एका तरसाने दर्शन दिले (आम्ही सगळे बसल्या बसल्या झोपलो होतो). रतनवाडीला पोचलो तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. कमालीची म्हणजे कमालीची थंडी पडली होती. 'या ट्रेकमध्ये चाल खूप आहे' असे ओझरते ऐकले होते. त्यामुळे मुक्काम करण्याऐवजी रात्रीच रतनगडाच्या दिशेने निघावे आणि मध्येच कुठेतरी उघड्यावर योग्य जागा बघून शेकोटी करून मुक्काम करावा असा विचार आला आणि ६ जण निघालोही.

जेमतेम १५-२० पावले गेल्यावर कुणालातरी रतनगड-भंडारदरा हा बिबट्यांच्या हालचालींसाठी ओळखला जाणारा भाग असल्याचं आठवलं आणि मुकाट परत फिरलो. रतनवाडीमध्ये भगवानदादांच्या अंगणात पथार्‍या पसरल्या. कडाक्याच्या थंडींमुळे स्लीपिंगबॅगमध्ये बर्फ ठेवले आहेत की काय अशी शंका येत होती. झोप माझ्यासकट कुणालाच लागली नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर बाकीचे मला 'किती घोरत होतास रात्रभर' वगैरे काहीबाही म्हणत होते, पण ते खरं नाही! तसं म्हणायची पद्धत आहे(या जगाची!). आता दिवसभर इतके काबाडकष्ट केल्यावर थोडेसे आवाज घशातून आलेही असतील! मी जागा होतो हे मात्र खरं! अपवाद म्हणून मला 'थंडीमुळे हात-पाय आखडून गेले आहेत, आणि त्यामुळे ट्रेक अर्धवट सोडून मागे फिरावे लागले आहे, मी भजने म्हणतोय तरी एकाही गावकरी मला वाट दाखवत नाहीये' अशी एकदोन स्वप्ने पडली. अखेर थंडी असह्य झाली आणि साडेपाचला दादांचे दार वाजवून 'घोंगडी देता का' असं विचारलं. तर त्या मावशींनी बाजूच्या खोलीतच झोपायला सांगितलं. अर्थात तिथेही झोप स्वस्थ लागली नाहीच, पण बरीच बरी सोय झाली. सात वाजता उठलो, आणि मावशींनी पातेलंभर गरम पाणी आणून दिलं! क्या बात! सुख याला म्हणत असावेत! या सुखाची व्याख्या उद्या विस्तारणार आहे, हे आम्हाला तेव्हा ठाऊकच नव्हतं!

(क्रमशः)
- नचिकेत जोशी