Pages

Monday, December 21, 2009

COEP सोडताना...

संध्याकाळची वेळ...
BC वरचा तोच कट्टा, तीच पायरी..
श्वासात भिनलेला तोच वारा
आणि दूरवर चमकणारा तोच तारा...
अशा त्याच वातावरणात अवचित झालेली पानगळ
आणि भैरवीत पोचलेल्या मैफलीला यावी तशी आलेली मरगळ...
अशातच मग सुरू होतात त्याच गप्पा..
मी मात्र अबोलच. स्वत:शीही बोलत नाही.
इतक्यात समोरुनच आवाज येतो आणि मी वास्तवाच्या जगात येतो.
"अरे, तूही सांग, काय वाटतं आता COEP सोडताना?"..
हं.... प्रश्न एकच, पण उत्तर?

नदीकाठी वसलाय माझ्या आठवणींचा गाव
त्याचं COEP हे नाव..
या गावात खूप भटकलोय,
रात्री-अपरात्री, उन्हापावसांत खूप हुंदडलोय
चार घटका विसावलो, आता निघायला हवं
भरली झोळी खांद्यावर टाकून पुढचं गाव गाठायला हवं
मधले दिवस हरवून जातात इथले हिशेब मांडताना
कसं सांगू काय वाटतं COEP सोडताना..

चांगलं-वाईट, भलं-बुरं सगळं आत भरवत गेलो
तरुणाईच्या सळसळत्या गर्दीत इथे स्वत:ला हरवत गेलो
आणि त्याच वेळी कदाचित मीच मला शोधत गेलो
आता कुठे स्वत:ला सापडतोय इथून बाहेर पडताना
खूप खूप जड वाटतंय COEP सोडताना..

येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे माझं एवढंच मागणं होतं
"कडकडून भेटून जा" एवढंच सांगणं होतं
आज निरोप घेताना जाणवलं
त्यानं उत्तर म्हणून तर तुम्हाला पाठवलं
आता भेटलो नाही तरी हे चेहरे लक्षात राहतील
उंच उडणाऱ्या प्रत्येकाला त्याच कौतुकाने पाहतील...

आठवतंय?
आपण असे बऱ्याचदा जमलो होतो..
एकमेकांना सांभाळत नकळत रमलो होतो
त्या meetings, त्या स्पर्धा,
त्या पार्ट्या,ती मस्ती,
तो कल्ला, तो धिंगाणा,
ते events, ती presents,
तो जोष, तो हरवलेला होश...
...सगळं काही भरभरून जगलो होतो
आणि काही विशिष्ट प्रसंगी मात्र
अगदी शहाण्यासारखं वागलो होतो...
रिझल्टच्या दिवशी हसलो होतो
आणि "पुढच्या वेळी नक्की Disti हं?" असं म्हणून
पुन्हा तिथंच गप्पा मारत बसलो होतो...
आता कसलीच खंत नाही
तरी मुक्या वेदनेला अंत नाही..
असं एक एक आठवायचं म्हटलं तर काहीच आठवत नाही
आणि साठवायचं म्हटलं तर ही ओंजळच पुरत नाही
म्हणून मग मी अबोल होतो या वळणावर चालताना
मागे फक्त वळून पाहतो COEP सोडताना...

इथं मिळालेलं हे सगळं नक्की उपयोगी पडेल
मला नाही वाटत आमचं पाऊल आता संकटांशी अडेल
स्वप्नं पेरायला इथं शिकलो
आणि ती मिळवण्यासाठी पेटायला इथेच शिकलो
स्वप्नं पाहणं आता मनात रुजलंय
मला खुणावणारं आकाश आता आणखीनच सजलंय
सगळं पुन्हा जिवंत झालंय तुमच्यासमोर मांडताना
खूप काही माझं झालंय COEP सोडताना
खूप काही... माझं झालंय... COEP सोडताना

-नचिकेत जोशी (९-५-२००६)
B.E.(Computers)

Wednesday, September 2, 2009

मनोगत

आपण दोघे स्वत:स चोरून हळूच कोठे निसटून जाऊ
पुन्हा एकदा मंतरलेले क्षण ते सारे जगून घेऊ

आठवते का?- रानामध्ये आपण दोघे चुकलो होतो
वारा होऊन संध्याकाळी पानातुन भिरभिरलो होतो
सूर्य नेमका जाता जाता पाणवठ्यावर आला होता
मोजत आपण श्वास आपुले काठावरती बसलो होतो
कातरवेळी जाळीमधुनी शीळ अनामिक घुमली होती
भिती तुझी अन्‌ चेहऱ्यावरती माझ्या दाटून आली होती
पानांमधुनी दुधी चांदणे चंद्र धरेवर शिंपत होता
त्या वाटेवर तुझी नि माझी ओळख पुरती पटली होती
झुळूक होऊन पुन्हा एकदा रानातुन त्या फिरून येऊ
पुन्हा एकदा क्षण ते सारे तुझे नि माझे जगून घेऊ १

आठवतंय - त्या दिवसांमध्ये एक कहाणी जुळली होती
सरळ होती वाट अचानक, वळणे घेऊन गेली होती
वाट चालता प्रवास अवघा नवीन गाणे देऊन गेला
कवितेमधली न कळलेली ओळ पुरेपुर कळली होती...
आठवते ना? चुकार पाऊस अपुल्या सोबत भिजला होता
अपुल्या नकळत डोळ्यांमध्ये हळूच येऊन निजला होता...
बालपणी त्या जत्रेमध्ये आपण दोघे चुकलो होतो
गर्दी पाहून अनोळखी अन्‌ भेदरलो, बावरलो होतो... २

आज भोवती दोघांच्याही आठवणींचीच गर्दी आहे
जरा मोकळा श्वास घ्यायची जणू अघोषित बंदी आहे
आठवती त्या गोष्टी साऱ्या म्हातारीपरी उडून गेल्या
आपण आता केवळ सोबत, इच्छा साऱ्या विरून गेल्या
हाक मारता कुणी आजही धावत जातो दोघे आपण
तशी साद पण परस्परांना घालत नाही दोघे आपण
ओळख पुरती मिटण्याआधी नवीन ओळख करून घेऊ
पुन्हा एकदा मंतरलेले क्षण ते सारे जगून घेऊ ३

नचिकेत (३/१२/२००८)

Wednesday, August 26, 2009

हर शाम...उनके नाम!

काल मैत्रीण भेटली, हट्टून बसली - म्हणे माझ्यावरही एक कविता कर!
मी क्षणभर गोंधळलो, विचारात पडलो -
"चालत्या-बोलत्या कवितेवर कसली कविता करायची?" असं काहीसं साहित्यिक वगैरे पुटपुटलो...
एकवेळ गर्लफ्रेंडची समजूत काढणं सोपे आहे,
हे इतरांच्या अनुभवावरून माहित होतं..
पण हिची समजूत कशी काढायची?
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे -
या मैत्रीला वय नाही, त्यामुळे चढ-उतारांचं भय नाही.
इथे आहे फक्त नितळता आणि निखळता..
ती कशी मोजायची?
पण म्हटलं - ’बघुया शोधून आतमध्ये, काही सापडतंय का?’

मग शिलकीत साठलेलं एक एक सापडायला लागलं...
मग आठवले चहाचे कप, फाटक्या नोटा,
हरवलेलं गिफ़्ट, विसरलेले बर्थडे,
चुकलेले रस्ते, संपलेलं पेट्रोल,
बोलण्यातले हट्ट, अर्धवट गप्पा,
मिस न करताही उगाच मिस कॉल्स,
आणि कुठली स्कीम नसतानाही एका तासातले ६० मेसेजेस्, मग त्यावरून भांडण!
पण नाकावरचा राग नाकावरच रहायचा,
कितीही भांडलो तरी एकमेकांवरच निघायचा...
कदाचित मैत्री व्याख्येच्या बंधनात तेव्हा अडकली नव्हती
"स्वत:ची स्पेस" नावाची पोकळी आयुष्यात तोपर्यंत शिरली नव्हती..
बरेचदा संध्याकाळ अंगावरून मोरपीसासारखी निघून जायची...
खिसे रिकामे पण मनं भरलेली असायची...
हां.. आषाढवयात एकमेकांना एकमेकांबद्दल
कधीतरी काही वेगळं वाटलंही होतं - पण तेवढ्यापुरतंच.
त्या आषाढातलं ते वादळ सहज पेलल्यामुळे
नातं श्रावणासारखं टवटवीत झालं होतं...

आठवल्या मग खूपशा पुसलेल्या रेघा - वहीमधल्या, पाटीवरच्या, वाळुवरच्य़ा...
ती हातावरची रेघ मात्र पुसून हवी तिथे नाही काढता आली कधी...
यालाच नियती म्हणतात हे तेव्हा गावीही नव्हतं...
आणि आता नातं तर व्याख्येपलीकडे पोहोचलेलं.
भाग्याचा स्पर्श, सहवासाचं कोंदण,
ओंजळभर तहान, ढगभरून दान!
अजून काय हवं?

शेवटी आठवला -
तिचं लग्न ठरल्यावर सगळ्यांत आधी मला आलेला फोन.
फोनवर तिच्यापेक्षा मीच जास्त एक्साईट झालो होतो..
आणि फोन ठेवताना दोघांच्या तोंडून एकदम आलेलं वाक्य -
"तो? आजसे हर शाम, उनके नाम, हं?"...

मग खूप वर्षांनंतर काल भेटली ती! आणि हट्टून बसली -
म्हणे, माझ्यावरही एक कविता कर!

नचिकेत (१३/५/२००९)