Pages

Wednesday, November 16, 2016

हर शाम.. उनके नाम - Revisit

एखादी कविता नशीब घेऊन येते हेच खरं!

पाचएक महिन्यांपूर्वीची गोष्ट. फेसबुकवर तिची फ्रेंड-रिक्वेस्ट आली. आणि सोबत मेसेजही आला - 'मी २००९ ला, तुम्ही लिहिलेली 'हर शाम उनके नाम' कविता वाचली होती. प्रचंड आवडली होती. माझ्या जगण्याशी मॅच होत गेली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा वाचनात आली. त्यातलं नाविन्य माझ्यासाठी अजूनही ओसरलेलं नाही... ती कविता मायबोलीवर वाचली तेव्हापासून तुम्हाला शोधत होते आणि आज फेसबुकवर सापडलात!....' आणि मग पुढे माझ्या कौतुकाचे काही शब्द होते. मी थक्क! - ('that poem! once again!' - मी मनात.)

मी मग तिला गमतीत म्हटलं -
"तुमच्या जगण्याशी मॅच झाली हे वाचून आनंद झाला आणि दु:खही झालं".
"दु:ख का?" - ती.
"अहो, त्या कवितेसारखा शेवट झाला असेल तुमच्या आयुष्यात म्हणून दु:ख झालं". - मी.
तिचा रिप्लाय अमेझिंग होता.
"काही नाती मैत्रीच्या पलिकडे न जाणं हेच खूप छान असतं आणि या कवितेतून दु:ख होण्यापेक्षा आपण समजूतदार झालोय याचेच पुरावे मिळतात". - ती.
मग पुढे तुम्ही काय करता, आम्ही काय करतो (पोटापाण्यासाठी) असं जुजबी बोलणं झालं.

चॅटिंग संपलं आणि मग मी आपले माझे नेहमीचे सोपस्कार पार पाडून ती फ्रेंड रिक्वेस्टही स्वीकारली. ती मूळची कोल्हापूरची. कोल्हापूर म्हणजे माय फेवरिट!

तिच्याशी झालेल्या ह्या अनपेक्षित चॅटने मी बराच थक्क, खूश वगैरे झालो होतो. आणि भारंभार लाईक्स, कमेंट्स, लोकप्रियता याची काहीच सवय नसल्यामुळे आणि ते मिळवण्यासाठी आवश्यक कलागुणही अंगी नसल्यामुळे हे असे विरळ प्रसंग मला नेहमीच धीर आणि उत्साह देऊन जातात. त्या चॅटनंतर मग पुढे फारसा काहीच काँटॅक्ट झाला नाही. गेल्या महिन्यातली गोष्ट. तिचा पुन्हा मेसेज आला.

"मला व माझ्या मित्राला तुमची भेट घ्यायची आहे. मिळू शकेल का?" - ती.
"अहो आयेम जस्ट अ कॉमन मॅन. एवढी फॉर्मॅलिटी कशाला? भेटूया की." - मी . (मला तर 'गटणे'च आठवला).
"मला भेटायचंच आहे आणि मी ज्या मुलाशी लग्न करणार आहे त्यानेही तुम्हाला भेटावं अशी माझी इच्छा आहे". - ती.
('अच्छा! तर असं आहे होय!' - मी आपलं मनात.)

मग एका रविवारी दोघे भेटायला आली. तिच्यापेक्षा त्याच्याशीच जास्त गप्पा झाल्या. तो कविता-गझल-काव्यक्षेत्रातला नाहीये तरी कलेशी त्याचाही खूप जवळून संबंध आहे. त्यामुळे विषयांना तोटा नव्हता. ती पहिला तासभर आमचं बोलणं नुसतं ऐकतच होती. मग गाडी कवितांवर आली. 'हर शाम..' वर ती पुन्हा खुलून बोलली. मग माझ्या इतर काही कविता त्याच्या मोबाईलमध्ये तिच्यासाठी रेकॉर्ड करून दिल्या. तिच्या चेहर्‍यावरचा आनंद ही  माझ्यासारख्या एका सामान्य कवीसाठी बहुमोल गोष्ट होती. त्या दोन तासाच्या भेटीमध्ये मला दोन खूप हसरे, आनंदी, उत्साही मित्र-मैत्रिणी मिळाले. (घरून निघताना पद्मजाला सांगितलं की येतो तासाभरात जाऊन, त्यावर तिने लगेच सांगितलं, 'तू कसला तासाभरात येतोयंस? कमीत कमी दोन तास धर!' खरंच होतं तिचं.)

'हर शाम.. उनके नाम' या कवितेचं माझ्यावर खूप ऋण आहे. ते कधीही न फिटणारं आहे. (आणि ते फेडायची मला इच्छाही नाही.) ही कविता जितकी मला आवडते तितकीच आवडलेले अनेक जण सापडले, अजूनही 'ती'च्या सारखे सापडतात. दिवस सार्थकी लागल्याची भावना येते. अगदी कालपर्यंत अनोळखी असलेले आज खूप छान ओळखीचे होऊन गेलेत, ही त्या कवितेची किमया. एखादी कविता नशीब घेऊन येते हेच खरं. साहिर लिहून गेलाय - 'मै पल दो पल का शायर हूं'. म्हणूनच ह्या अशा गोष्टी भाग्याच्या खात्यात मांडलेल्या बर्‍या असतात.

आणि आता शेवटी तिचं नाव! नावात काय आहे? त्या दोघांच्या खुद्द स्वतःच्या घरी अजून त्यांनी लग्नाचं सांगितलं नाहीये. गोष्टी सर्वकाही सुखरूप, सुरळीत पार पडल्या (त्या पडतीलच) की मग सांगेनच तिचं नाव! तोपर्यंत, 'हर शाम उनके नाम'ची ही भेट अशीच कायम हसत राहूदे ही प्रार्थना आणि दोघांना उदंड शुभेच्छा!

- नचिकेत जोशी

Tuesday, November 8, 2016

घुसमट

समोर आला रस्ता म्हणुनी निघून गेलो
जन्माला आलो होतो मग जगून गेलो

तिला मिळाल्या फुटक्या काचा, भग्न आरसे
तुकड्या-तुकड्यांमधे तिला सापडून गेलो

प्रेम दिले तेव्हाही झाली घुसमट माझी
प्रेम मिळाले तेव्हाही गुदमरून गेलो

हरेक जन्मी साथ द्यायला तयार झालो
एका जन्माच्या अर्ध्यातच दमून गेलो

वार्‍यावरती फडफडणारे पानच होतो
सुगंध आला नशिबी अन् दरवळून गेलो

- नचिकेत जोशी (४/११/२०१६)