Pages

Tuesday, March 21, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि उपसंहार

कुलंग प्रस्तरारोहणाच्या माझ्या पहिल्यावाहिल्या expeditionची गोष्ट जवळजवळ संपूर्ण झालीच आहे. हा भाग फोटोत्सुक वाचकांसाठी आणि समारोपाच्या दोन पॅरासाठी.

आम्ही तिघे दुपारी मुक्कामापासून निघाल्यापासून नऊ तासांनी झापापाशी पोचलो, त्याची गोष्ट तुम्ही वाचलीच आहे. त्या दिवशी सूरजने सहाशेपैकी अडीचशे फुटांची चढाई केली. सूरज आणि संजय बेस कँपवर खाली उतरले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. त्या दिवशी संध्याकाळी एक महत्त्वाचा निर्णय झाला, तो म्हणजे, जरी कुलंगची वॉल पूर्ण चढायच्या हेतूने आलो होतो, तरी मोहिमेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी अजून वर चढून न जाता, जेवढ्या उंचीपर्यंत आज चढाई पूर्ण झाली आहे तिथपर्यंत उद्या टीममधल्या प्रत्येकाला चढाई करण्याची संधी द्यायची. थोडक्यात, कुलंग व्हर्जिन वॉलच्या पहिल्या प्रयत्नात अडीचशे फुटांची चढाई हेच अंतिम ध्येय मान्य झालं. टीमवर्कच्या दृष्टीने बघता, प्राप्त परिस्थितीमधला हा एक नि:संशय अप्रतिम निर्णय होता. त्याप्रमाणे सर्वचजण (अगदी मास्टरशेफ मंदारसुद्धा) सूरज-संजयने गाठलेल्या अडीचशे फूटांवरती दुसर्‍या दिवशी आपापली पावले उमटवून आले.

कुलंगची पहिली मोहिम संपली. उतरताना प्रत्येकाकडेच भरपूर म्हणजे भरपूरच ओझे होते. त्यात मी माझं काही सामान तिथेच विसरून आलो होतो. ते तिथल्यापैकी कुणाचंच नसल्यामुळे ते सॅकमध्ये घेणं तर सोडाच, पण हातामध्येसुद्धा घ्यायला कुणीही तयार नव्हते असे मला मागाहून कळले. मग बिचार्‍या संजयने ते ओझे स्वतःकडे घेतले आणि पुण्यात मला सुखरूप आणून दिले.

श्वेताचा पाय अजूनही बरा झालेला नाही. उपचार चालू आहेत असे कळते.

पुढच्या मोहिमेचे प्लॅन आखून तयार आहेत.

प्रिय वाचकहो, आणि आता शेवटचे. सह्याद्रीमध्ये अशा प्रकारच्या मोहिमा अनेकांकडून होतात. त्यात आम्हाला जे अनुभव आले त्याहून बिकट, वाईट, चांगले, खडतर अनुभव त्या त्या वेळी येतात. सगळेच काही कागदावर उमटत नाहीत. ह्याचे मुख्य कारण म्हणजे, ह्या अस्सल ट्रेकर्सची अशा प्रकारच्या अनुभवांसाठी मानसिकता कायमच तयार असते. त्यामुळे, आठ तास उतरायला लागणे किंवा दुखापत झालेली असतानाही मोहिम पूर्ण करणे ह्या गोष्टी सहज घडून जातात. इच्छाशक्तीच्या जोरावर अशा अनेक मोहिमा आजवर पूर्ण झाल्या आहेत, आणि होत राहतील. अशा एका मोहिमेत मला सहभागी व्हायला मिळालं आणि असा भन्नाट अनुभव प्रत्यक्ष घेता आला हेच काय ते माझं भाग्य! बाकी सब - सह्याद्रीबाबा के हवाले! अशा सर्वच मोहिमांमध्ये एक गोष्ट कॉमन असते - ती म्हणजे सुरक्षिततेची घेतलेली काळजी. सुरक्षेचे सर्व उपाय करूनच अशी साहसे केली जातात. ह्या मोहिमांमध्ये सहभागी होताना आपणसुद्धा सुरक्षिततेसंदर्भात काय काय आयोजन आहे ह्याची माहिती घ्यायला हवी.

ह्या भागात फोटो आहेत, पण आधीच्या सर्व भागातलं फोटोशिवाय उभं केलेलं शब्दचित्र एवढ्या चिकाटीने तुम्ही वाचलंत ह्यात निर्विवादपणे तुमचं कौतुक आहे. त्याबद्दल मनापासून आभार.पुन्हा भेटूच!

आता सुरू करूया फोटो सफर - (आधी वर्णन आणि नंतर फोटो असा क्रम आहे. I hope फोटोतले संदर्भ तुम्ही आधीच्या भागात वाचले असल्यामुळे आठवतील)

equipment, इतर सामान. मागे आडवा पसरलेला अलंग आणि त्याच्या उजवीकडचा उंचवटा म्हणजे मदन. (फोटो - रोहन मालुसरे)

उजवीकडचा आडवा कुलंग. त्याच्या डावीकडे कमी उंचीचा एक डोंगर आहे. दोघांच्या मधल्या खिंडीत पोचण्याचे पहिल्या दिवशीचे ध्येय होते. कुलंगची डावी धार चढून जाण्याची मोहीम होती. डावीकडचा उंचवटा मदन.

या फोटोत कुलंग, त्याची डावी भिंत, खिंड आणि खिंडीच्या डावीकडचा डोंगर नीट दिसतोय. त्या डाव्या डोंगराच्या पोटात कपारी आहेत, जिथे आम्ही मुक्काम केला. खिंडीच्या 'V' चे खालचे टोक जिथे आहे, तिथपासून डावीकडे कपारींकडे पायवाट जाते, तर उजवीकडे कुलंगला खेटून पायर्‍यांकडे पायवाट जाते.

६०० फूट भिंत अजून झूम करून. भिंतीच्या उन्हात असलेल्या धारेवरून चढाई झाली.

निघालो! मागे मदन ते कुलंग! (फोटो - रोहन मालुसरे)

वाटेवर एके ठिकाणाहून दिसणारे मदनगडाचे नेढे

कळसुबाई

मुक्कामाची जागा

मुक्कामाच्या जागेवरून दिसणारा नजारा. उजवीकडे उंचीवर जो हिरवी झाडे असलेला डोंगर दिसतोय, त्याच्यापलिकडे खालच्या बाजूला झाप होता, जिथून सुरूवात केली. तसंच सरळ पुढे गेलं की आंबेवाडी.

कुलंगच्या पायर्‍यांवरून घेतलेला मदनगडापर्यंतचा फोटो. कुलंगनंतरच्या पहिल्याच डोंगराच्या पोटात मुक्कामाची जागा.

कुलंगच्या पायर्‍यांवरूनच मदनच्या सुळक्यांचा फोटो. सगळ्यात उजवीकडच्या डोंगराच्या पोटात पांढुरकं आणि त्याच्या लगेचच खाली एक भेग दिसतेय, exactly तीच मुक्कामाची कपार.

सगळ्यात उजवीकडे मदनगड, सगळ्यात डावीकडे कळसुबाई

कुलंगच्या पायर्‍यांची एक झलक

कुलंगवरून दिसणारा परिसर

Good Morning from the nest in the mountains

बेस स्टेशन

खिंडीतून पलिकडचा नजारा. सर्वात डावीकडे दिसतेय ती अलंगची लिंगी. तिच्या उजवीकडे रतनगड धुरकट दिसतोय.

अरूण सर in लीड क्लाईंबिंग


पहिले सत्तर-एक फूट सरांनी लीड क्लाईंब केलं. Now its Suraj to go next. फोटोत डावीकडून सर, संजय आणि सूरज

ओव्हरहँगच्या खाली सूरज. संजय बिले देताना.

त्याच पॅचवर अजून एक फोटो


 सूरज अजून वर पोचला, बिले पोझिशनवर संजय आणि रूपेश


तिसर्‍या दिवशीची चढाई - Its a team reaching the destination! (फोटो - मिलिंद कुलकर्णी)

अडीचशे फुटांवरचा ग्रूप फोटो. मागच्या भिंतीचं सर्वोच्च टोक म्हणजे कुलंगचा माथा. (फोटो - मिलिंद कुलकर्णी)


हा ह्या ठिकाणावरून घेतला गेलेला पहिला फोटो. कारण अजूनपर्यंत इथे कुणीच पोचलं नव्हतं. फोटोत मदनगड आणि आम्ही राहिलो त्या कपारींच्या डोंगराचा टॉप दिसतोय. डावीकडे मागे कळसूबाई. (फोटो -
मिलिंद कुलकर्णी)



फायनली पुण्यात सुखरूप पोचलो. उजवीकडून रोहित, श्वेता आणि मी. (फोटो - रोहित सिंगर)

हॅट्स ऑफ टीम. (फोटो - रोहन मालुसरे). सागर आणि मालतेश ह्या फोटोत नाहीयेत. ते रात्री मुक्कामाला आले होते.


(समाप्त)
नचिकेत जोशी





Monday, March 20, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट

छत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात होते का याबद्दल मी तरी कुठेच वाचलेले नाही. जवळ असलेला पट्टा किल्ला (विश्रामगड) स्वराज्यात होता, इतकेच नव्हे तर शिवाजी महाराज मुक्कामालाही पट्ट्यावर आले होते. पण तसं कुलंगरांगेतल्या किल्ल्यांबद्दल सापडत नाही. आदल्या दिवशी कुलंगवर पाणी आणायला जाताना तिथल्या पायर्‍या बघून हाच विचार मनात येत होता. ह्याचं उत्तर इतिहासालाच माहित!

साडेतीन वाजता संजय आणि सूरज जागे झाले आणि वॉकीची बॅटरी रात्रीच केव्हातरी डाऊन झालेली पाहून चांगलेच काळजीत पडले. सागर कुठपर्यंत आलाय हे कळायला काहीच मार्ग नव्हता. अरूण सरांनी त्यांना खिंडीपर्यंत पाठवून हाका मारून यायला सांगितलं. हाकांना प्रतिसाद आलाच नाही. सागर हा अरूण सरांच्या हाताखाली तयार झालेला गडी असल्यामुळे संपर्क झाला नाही तरी सागर आणि मालतेश सुरक्षित असतील ह्याबद्दल शंका नव्हती. पण communication नसल्यामुळे तो नेमका कुठपर्यंत आलाय हे समजू शकणार नव्हते आणि मुख्य म्हणजे वॉकीची बॅटरी डाऊन झाल्यामुळे हा सगळा घोळ झालाय हे त्याला उद्या सकाळपर्यंत कळू शकणार नव्हते. हा उलगडा सकाळीच झाला आणि मजेदारपणे झाला.  त्याचं झालं असं की सागर आणि मालतेश पहाटे अडीच वाजता कपारींपाशी येऊन पोचले. वॉकीवर प्रयत्न केला पण रिप्लाय आला नाही, मग शिट्ट्या वाजवल्या (व्हिसलब्लो) त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. चुलीजवळ भांड्यांची खुडखुड करून जेवण वाढून घेतलं (तरीही कुणाला जाग आली नाही) आणि आवरून ते दोघे तीन वाजता झोपलेही. माझ्या पलिकडेच त्यांनी स्लिपिंग बॅग अंथरली तरी मलाही जाग आली नाही. आणि मग एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी संजय-सूरजला साडेतीन वाजता जाग आली आणि त्यांनी एक तास सागरच्या शोधात घालवला. सागर वर येऊन पोचलाही असेल ही शक्यता त्यांनी हुकवली हे केवळ दुर्दैवच!

सकाळी स्लिपिंगबॅगमधून डोळे उघडून पाहिले तर आकाशात केशरी रंगाचा एक पट्टा क्षितिजरेषेवर पसरलेला दिसला. मुक्कामाची जागा बरीच उंचावर असल्यामुळे झोपल्या झोपल्याही क्षितिजरेषेवरही आकाशच दिसत होतं. मग यथावकाश सगळे उठले आणि शेफ मंदारने भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेला शिरा समोर ठेवला. आणि सांगितलं की, "आपापल्या प्लेट्स आणा आणि व्हा सुरू!" श्वेताचा पाय दुखत होताच. त्यामुळे मी 'आपण अकरा-साडेअकरापर्यंत निघूयाच म्हणजे झापापाशी पोचायला सहा वाजतील आणि पुढे ड्राईव्ह करत पुण्यात रात्री बारापर्यंत तरी पोचू' असं सुचवलं. हे अरूण सरांनी अर्ध्यातच उडवून लावलं. "छे! चार वाजता निघा, चार तासात खाली जाल.". मला मात्र कुठेतरी आत खात्री होती की आपल्याला खाली पोचायला कमीत कमी पाच ते साडेपाच तास लागणार आहेत. त्यात श्वेताचा पाय दुखत असेल तर वेग आणखी कमी होईल.

अखेर ज्या कामासाठी आलो होतो त्याला सुरूवात झाली. कुठले क्लाइंबिंग शूज कोणी घालायचे ह्यावर सूरज-संजयमध्ये चर्चा झाली. मला तर ड्रेसिंगरूममध्ये क्रिकेटपटू समोर पडलेल्या पाच-सात बॅट्सपैकी आज कुठली न्यायची ह्यावर असंच डिस्कस करत असतील असं वाटून गेलं. मीही मागच्याच महिन्यात नवीन हार्नेस-डिसेन्डर-़कॅरॅबिनर घेतले होते. आमच्या मायबोली ट्रेक ग्रूपच्या लिंगाणा ट्रेकमध्ये त्यांचं उद्घाटनही केलं होतं. पण actual क्लाईंबिंगसाठी त्यांचा उपयोग आज होणार होता. पण आधी लीड क्लाईंबर जाणार, मग सेकंड लीड, मग बाकीचे क्लाईंब करणार असल्यामुळे आम्ही निघायच्या आत मला क्लाईंब करायला मिळेल की नाही याबद्दल मी थोडा साशंक होतो. म्हणून मी काही हार्नेस लगेचच चढवला नाही. हळूहळू क्लाईंबिंगचे सर्व सामान खिंडीत पोचवले गेले. चढाईसाठीचा पहिला बोल्ट अरूण सरांनी मारला, तेव्हा अकरा वाजायला आले होते. पहिली सत्तर-एक फूटांची चढाई अरूण सरांनी केली. आणि ते खाली उतरले. पुढची चढाई सूरज करणार होता आणि संजय बिले देणार होता. आता टीम विभागली गेली. श्वेता आणि मंदार दुपारच्या जेवणाचं बघू लागले. रोहित, रोहन, मालतेश, सागर यादव, मिनेश पाणी आणायला पुन्हा कुलंगवर गेले. मी, सागर आणि मिलिंद खालून चढाई बघू लागलो. हे उत्तम शिक्षण होते. क्लाईंबर्स कसे चढतात हे खाली उभं राहून बघायलाही मजा येते. आपापल्या कुवतीनुसार शिकायला मिळतं. संजय बिले कसा देतोय हे बघायला त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. संजयने 'हेल्मेट घातलं आहेस का' हे नजरेनेच तपासून घेतलं आणि तो बिले देण्यात मग्न झाला. सूरजचं क्लाईंब बघत असतानाच वरून एक दगड सुटला. सूरजचा लाऊड कॉल ऐकताक्षणी डोकं खाली केलं आणि कातळाला चिकटायच्या आधीच तो दगड अस्मादिकांच्या हेल्मेटवर आपटून बाजूला पडता झाला. "हेल्मेट नसतं तर?" एवढाच प्रश्न तेव्हा मनात येऊन गेला, एवढंच!

क्लाईंबिंग हे काळजीपूर्वक आणि म्हणून सावकाश करायचं काम आहे. शंभर एक फूटांवर सूरजला छोटा ओव्हरहँग लागला. म्हणून तिथपर्यंत संजयने वर चढावं आणि तिथून सूरजला बिले द्यावा असं ठरलं. संजय तिथपर्यंत पोचला आणि नंतर सूरज तो ओव्हरहँग चढून वर गेला. हे सगळं होईपर्यंत दोन वाजून गेले. आता आपण खाली उतरायला प्राधान्य द्यायचं असं ठरवून 'क्लाईंबिंग पुढच्या वेळी' असं म्हणून मी मुक्कामाच्या जागी परत आलो.

रोहित पाणी घेऊन अजून आला नव्हता. पण श्वेताला पावले टाकायला वेळ लागत होता त्यामुळे 'आपण पुढे होऊया, रोहित मागून येऊन आपल्याला जॉईन करेल' असे ठरवले. एकूण टीमपैकी तीन जण कमी होणार होतो, त्यामुळे तिघांची equipment खाली न्यायचे ठरले. उरलेल्या टीमला उद्या उरलेले सामान घेऊन खाली उतरायला चिकार कष्ट होणार होते, कारण सामान भरपूरच होते. त्यामुळे जेवढं नेता येईल तेवढे आम्ही खाली नेणार होतो. Equipment (हार्नेस-हेल्मेट) शिवाय चार जादाचे रोप्सही सरांनी आमच्याकडे दिले. आता मला खाली पोचायला पाच ऐवजी सात तास लागणार असे वाटू लागले. आधीच अडीच वाजून गेलेले, त्यात आम्ही फक्त तिघे, त्यात श्वेताचा दुखरा पाय, त्यात उतरताना अंधार पडणार हे नक्की! पण काल सागर आणि मालतेश दोघेच मध्यरात्री चढून आले होते, त्यामुळे (त्यात काय?) आपणही जाऊ शकू असं मनाला समजावलं.

कुठल्या वाटेने उतरावं ह्यावर काल बरीच चर्चा झाली होती. त्यानुसार आम्ही पाणी आणायला गेलो त्या ट्रॅवर्सने जाऊन कुलंगच्या मुख्य पायवाटेला लागणार होतो आणि तिथून प्रचलित वाटेने आंबेवाडीकडे उतरणार होतो. आमच्यासोबत मिलिंदसुद्धा रविवारीच पुण्याला निघणार होते पण क्लाईंबिंग सुरू झाल्यावर त्यांनी 'ज्यासाठी एवढं आलोय ते आता समोर दिसतंय (क्लाईंब). तर आता ते करूनच (क्लाईंब) पुण्याला जाईन' अशी प्रतिज्ञा त्या खिंडींत केली. आता फायनली आम्ही तिघेच उरलो. अरुण सरांनी श्वेतालाही थांबवायचा गमतीत प्रयत्न करून पाहिला, पण तिने काही दाद दिली नाही. मग तिचा दुखरा पाय बघून सरांनीही तिला आणि रोहितला जायची परवानगी दिली. तिला सुखरूप खाली नेऊ शकेल असा एकच पुरूष त्यावेळी पृथ्वीतलावर (आयमीन कुलंगवर) मौजूद होता, तो म्हणजे रोहित. रोहितवर माझी एक्स्ट्रा जबाबदारी पडू नये ह्याची काळजी घेत खाली उतरणे एवढाच काय तो माझा रोल होता. ते दोघे थांबले असते तर मग मलाही थांबावेच लागले असते. इतक्या गहन जंगलातून आणि कातळांवरून एकटाच उतरून अंधारात आंबेवाडीकडे जाण्याइतकी हिरकणीची हिम्मत माझ्यात नव्हती. त्यापेक्षा मी ऑफिसला सुट्टी मारणं पत्करलं असतं. (ती अखेर मारावीच लागली, त्याची गोष्ट पुढे येईलच.)

पाणी-टीमला यायला दोनपेक्षा जास्त तास लागले. त्याचं कारण त्यांनी आल्यावर सांगितलं. कुलंगमाथ्यावर कुण्या आगाऊ मुलांनी आग लावून दिली होती. गवताने पेट घेतला होता. ती आग पसरू नये म्हणून आमच्या पाणी-टीमने भरलेले कॅन तिथे वापरले. (कौतुक म्हणजे त्या मुलांनाही आग विझवायला लावली). मग पुन्हा कॅन भरून ते खाली आले. कालच्यापेक्षा त्यांच्याकडे जादाची अशी ४० लिटरची एक प्लॅस्टिकची पाण्याची बॅग होती. अर्धी निम्मी भरलेली ती बॅग पाठीवर घेऊन रोहित खाली आला आणि त्याला पाहिल्यावर आम्हाला हायसं वाटलं. (आता लगेच निघू शकू! - हाऊ सेल्फिश!) त्या बिचार्‍याने उभ्या उभ्याच जेवून घेतलं आणि फायनली फायनली आम्ही तिघे निघालो.

ट्रॅवर्स न मारता, आलो त्याच वाटेने - नाळ उतरून मदनगडाकडे जाणारा ट्रॅवर्स गाठणे आणि तिथून कुलंगच्या प्रचलित वाटेला लागून झाप गाठणे (exactly ज्या वाटेने चढलो तीच वाट) हे ठरले. श्वेताला सोपं पडावं म्हणून सरांनी खिंडीतून उतरताना नाळेच्या सुरूवातीला रोप लावून दिला. (त्या रोपचा उपयोग करून सर्वात आधी मी उतरलो.) आणि त्या रोपच्या शेवटी लावायला आणखी एक रोप दिला. त्याचसोबत गावात पोचवायला अजून तीन एक्स्ट्रा रोप्स दिले. अखेर आमचे स्वत:चे सामान आणि ते रोप्स घेऊन आमची वरात नाळेत शिरली तेव्हा साडेतीन वाजले होते. आता आमचा लीडर रोहित होता. तो सांगेल तसं उतरायचं हे मी स्वत:ला सांगितलं तरी त्याला अनेक प्रश्न विचारणं काही सोडलं नाही. माझं हे असंच होतं. तर ते असो. सरांनी लावलेला पहिला रोप संपल्यानंतर योग्य अशा झाडाला सरांनी दिलेला दुसरा रोप बांधून रोहित श्वेताला न्यायला पुन्हा वर आला. मी त्या दुसर्‍या रोपवरून फ्री-रॅपल करत खाली उतरलो. मला तसं उतरताना बघून बहुधा रोहितच्या डोक्यात एक आयडीया आली आणि तिने आमचे अंदाजे तीन तास वाचवले.

एव्हाना साडेचार वाजून गेले होते. पूर्ण वाट झाडोर्‍यातून आणि दगडांमधून होती. त्यामुळे खाली मोकळ्या प्रदेशात उजेड रेंगाळणार असला तरी आम्ही नाळेच्या वाटेवर असतानाच काळोख होणार होता. सरांनी आमच्याकडे तीन एक्स्ट्रा रोप्स दिले होते. ते असेही तसेही खालीच न्यायचे होते, मग 'जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत त्यांवरून रॅपल करतच खाली जाऊ' ही ती आयडीया. आणि खरोख्खर यामुळे उतरण्याचा वेग वाढला आणि पूर्ण काळोख पडला तोपर्यंत आम्ही मदनगडाच्या ट्रॅवर्सच्या दिशेने बरेच अंतर जाऊ शकलो. तीन ते चार वेळा रोप्स लावता आला. चौथ्या वेळी वरचा रोप रोहित काढून आणत असताना खाली दुसरा रोप नुसताच हातात धरून उभं राहण्यापेक्षा मी तो अँकर करण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्यासाठी शिकण्याची याहून सुवर्णसंधी दुसरी कुठलीच नव्हती. अँकर जमलाय की नाही हे रोहितने सांगितले असते. आणि अँकर केलेल्या त्या रोपवरून पहिला मीच उतरणार असल्यामुळे पहिला प्रयोग माझ्यावरच झाला असता.  हे मला आधी का नाही सुचले असे वाटून मला विलक्षण म्हणजे विलक्षण खिन्नता आली. पण त्याला काही इलाज नव्हता. 'पुढच्या वेळी अशा गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, शिकण्याच्या अशा संधी हातून सुटतातच कशा?' वगैरे स्वगते मी बोलून घेतली.

श्वेताचा पाय कमालीचा दुखत होता. उजवा पाय फोल्ड करायची सोय नव्हती. उतरताना डावा पाय आधी टाकला तर मागे राहिलेला उजवा पाय फोल्ड होत होताच. त्यामुळे प्रत्येक वेळी उजवाच पाय आधी टाकावा लागत होता. आणि हे अगदी लक्षात ठेवून करावे लागत होते. पहिले काही पॅचेस दगडांतून आणि कातळांवरून होते. पण तीन-चार वेळा रॅपल करून झाल्यावर वाट झाडीत शिरली आणि नेमका तेव्हाच अंधार पडू लागला. मुकाट्याने रोप्स कॉईल केले, सॅकवर टाकले आणि हातात काठ्या घेऊन एकामागोमाग एक निघालो. सर्वात पुढे रोहित, त्यानंतर श्वेता आणि सगळ्यात शेवटी मी हा क्रम पार रान संपवून रात्री मोकळ्यावर आलो तरी सोडला नाही.

कसे कुणास ठाऊक, पण त्या नाळेच्या वाटेने आम्ही इतके सरळ खाली गेलो की थेट एका दरीच्या तोंडाशी जाऊन थांबलो. वाटेत मदनगडाकडे जाणारा ट्रॅवर्स क्रॉस झाला होता. आता घड्याळात आकाशात नुकताच उगवलेला चंद्र, घड्याळात सातवर पोचलेला छोटा काटा आणि अखेर चुकलेली वाट. शप्पथ सांगतो, तेव्हा मला ज्जाम टेंशन आले होते. झाप अजून कितीतरी दूर होता. तो अजूनही त्या डोंगराच्या आडच होता. फरक इतकाच होता, की आम्ही ऑलमोस्ट त्या डोंगराच्या उंचीपर्यंत खाली उतरलो होतो. मोबाईलला रेंज नव्हती. आमच्याकडे पुरेसे पाणी होते असे वाटत होते. आणखी पाणी आता आंबेवाडीशिवाय कुठेही नव्हते. त्यात समोर दरी. कालपासून जो काही इथला भूगोल पाहिला होता, त्यावरून एवढे कळले होते, की हे काम साधेसुधे नाही. सह्याद्री ज्या बेलाग, उत्तुंग कडेकपार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे, त्या इथे मुबलक आहेत. जरा पाय घसरला तर प्रकरण महागात जाणार एवढे नक्की. त्याचे एक जिवंत उदाहरण माझ्या आणि रोहितच्या मधून वाट उतरत होतेच. वाट सापडल्यावर कमीत कमी तीन तास खाली उतरायला लागणार होते. अशी सगळी गुंतागुंत डोक्यात सुरू होती. माझी ह्या भागात पहिलीच खेप असल्यामुळे मला ब्रॉड लेव्हलला दिशांचा अंदाज सोडला तर पायवाटांचे बारकावे अजिबात माहित नव्हते. अखेर शेवटचा अ‍ॅरो दिसला ती जागा फारशी दूर नसल्यामुळे आलो त्याच वाटेने माघारी फिरलो. पाच-सात मिनिटात वाट सापडली आणि काल दुपारी जिथे जेवलो होतो, त्या वाटेवर आलो. खरंतर अवघा पंधरा-वीस मिनिटांत हे सगळं घडलं. पण त्या क्षणी डोक्यात चाललेलं सगळं रामायण आत्ता या क्षणीही ठळकपणे आठवतं.

मोकळी जागा बघून सॅक आणि रोप्स खाली उतरवले आणि थोडं खाऊन घेतलं. रेंज आली म्हणून घरी फोन लावला आणि बायकोला वेळेची कल्पना दिली. 'सुखरूप आहे' हे तिला सांगण्यामागचं कारण तिला माहित नसलं मला नुकतंच पटलं होतं. खाली दूरवर गावातून ढोल आणि टिमक्यांचा आवाज येत होता. आज होळीपौर्णिमा! यंदाची ही होळी माझ्यासाठी अभूतपूर्व असा भटकंतीचं दान घेऊन आली होती. आपण ओंजळ पुढे करायची आणि दान स्वीकारायचं. रोहितने मोबाईलवर गाणी लावली आणि अचानक आम्हा तिघांनाही आजूबाजूचं वातावरण भरून गेल्यासारखं वाटलं. आतापर्यंत भवतालची किर्र शांतता ऐकून झाल्यानंतर हा चेंज खूप सुखद होता. वरून कपारीच्या जागेतून आमचे लोक टॉर्च मारत होते. त्यांना आमचे टॉर्चेस दिसत असल्यामुळे आम्ही कुठे आहोत हे त्यांना समजत होते. असा दूरचा आधार त्या क्षणी महत्त्वाचा वाटत होता. पुन्हा सॅक उचलल्या आणि निघालो. सॅक उचलताना खालून काही चिकटलं नाहीये ना, रोपच्या गुंडाळीत काही शिरलं नाहीये ना हे बघायला विसरलो नाही. जेमतेम वीसएक पावले चाललो असू, आणि फांद्या टाकून वाट बंद केलेली आढळली. तरी माहितगार रोहितने त्या फांद्या ओलांडून पुढे जाऊन वाट तपासली. वाट बरोबर होती. त्या फांद्या कुणी आणि का टाकल्या हे काही कळलं नाही. मग थोड्याच वेळात कुलंगची आंबेवाडीतून येणारी प्रचलित वाट लागली आणि मी मनातल्या मनात हुश्श! केलं.

एव्हाना पूर्ण अंधार पडला होताच आणि वाटही आता झाडीतून चालली होती. आधारासाठी मी हातात काठी घेतली होती. कुलंगचा प्रदेश म्हणजे अनेक प्रकारच्या सरपटणार्‍या जीवांचं निवासस्थान आहे. त्यामुळे 'आधारासाठी आता कुठल्याही झाडाला किंवा फांदीला हात लावायचा नाही' अशी सक्त ताकीद रोहितने देऊन ठेवली होती आणि त्याची तो वारंवार आठवण करून देत होता. श्वेताचं प्रत्येक पाऊल तिच्या इच्छाशक्तीचं दर्शन घडवत होतं. वाटेत काल ज्या पायरीवरून तिचा पाय घसरला आणि जो दगड तिच्या गुडघ्यावर घासला गेला, ती जागा आली. तिथे दोन मिनिटे शांत उभे राहिलो. कालच्या त्या दु:खद क्षणांना श्रद्धांजली व्हायला नव्हे, तर आता हे नीट कसं उतरून जाता येईल ते बघायला. श्वेताची जिद्द आणि हिम्मत यांना मी मनातल्या मनात केव्हाच साष्टांग घातले होते. तो पॅचही उतरून पुढे झालो.  वाटेत एके ठिकाणी मोकळी आणि डोक्यावर उघडी जागा मिळाली, तिथे ब्रेक घेतला. नऊ वाजून गेले होते. ज्या गतीने चालत होतो ते बघता 'झापापाशी पोचायला अजून कमीत कमी तीन तास लागतील' अशी एक मनाशी नोंद करून ठेवली. कपारीमधून अजूनही टॉर्च येत होते. त्यांना प्रतिसादाचा सिग्नल दिला आणि पुढे निघालो.

वाटेत एक कोरडा धबधबा लागला आणि फायनली सर्व मोठे उतार संपले. इथून पुढे अजून बरंच अंतर चालायचं होतं, पण ते मोस्टली सपाटीवरून होतं. झाडी तर होतीच. झाडीचा तो शेवटचा टप्पा संपता संपेना. अखेर पुन्हा 'आपण वाट तर चुकलो नाही ना' अशी भीती वाटायला लागली. दर दहा पावलांना तिघे एकमेकांना विचारत होतो, की 'अजून किती चालायचंय? अजून हा पट्टा संपला कसा नाही? येताना तर अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला नव्हता, मग आत्ता का एवढा वेळ लागतोय?' शेवटी आपला वेगच इतका कमी आहे की त्यामुळे एवढा वेळ लागणारच यावर एकमत झाले. घड्याळात अकरा वाजायला आले होते. आजूबाजूला गर्द झाडी, किर्र रात्र, त्यात पौर्णिमा, त्यात बाराची वेळ... मग माझ्या मनात भलतेसलते विचार यायला लागले. 'मागून कोणी हाक मारली तर?', 'किंवा कसला आवाज आला तर?' आणि काय सांगू? असा विचार येत असतानाच माझ्याच पायाखाली काटकी मोडली आणि आवाज झाला. त्या क्षणी काळजात जे धस्स झालंय त्याला तोड नाही! एवढा दचकलो की जागीच थांबून गेलो. 'भीती ही पूर्ण मानसिक असते' ह्यावर त्या अनुभवाने शिक्काच मारला. मन खंबीर असेल तर हे क्षण सहज झेलले जातात. अखेर चार-पाच तास चाललो असं वाटल्यावर (प्रत्यक्षात अर्धा तास चाललो असू) एकदाचा तो टप्पा संपला. मोकळ्यावर आलो आणि माझ्या पुढे चालत असलेल्या श्वेताला चक्कर आली.

श्वेताच्या शारिरिक कष्टांची सर्व परिसीमा केव्हाच ओलांडली गेली होती. गुडघा तर दुखत होताच, पण आता घोट्यावरही भार येऊन तोही दुखायला लागला होता. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर एखादी व्यक्ती कायकाय करू शकते, त्याचं जिवंत उदाहरण गेल्या काही तासांमध्ये मी बघत होतो. ती जे काही चालत होती, त्यासाठी लागणारी एनर्जी कुठून येत होती हे तिलाच माहित! पण म्हणजे याचा अर्थ असाही होऊ शकतो, की आपण आपल्यावर मर्यादा घालून घेतो आणि जगत असतो. त्या कधीतरी मोडून जगलं की आपलं आपल्यालाही समजू शकतं की आपण किती उंच झेप घेऊ शकतो! एव्हाना माझाही खांदा दुखायला लागला होता. पण श्वेताच्या दुखापतीपुढे इतका वेळ त्याच्याकडे लक्षच गेलं नव्हतं. खरं सांगायचं तर आम्ही तिघेही केवळ एकमेकांसाठी आणि एकमेकांना प्रेरित करत चालत होतो. म्हणून केवळ गरजेपुरतंच थांबत इथपर्यंत येऊ शकलो होतो. आमच्यापैकी एक जण (मग तो कुणीही असो) जरी थांबला असता, किंवा हरला असता तर तिघांचं मनोबल खचलं असतं. सुदैवानं तसं काही झालं नाही.

वाट मोकळ्यावर आली असली तरी झाला तेवढा नाईट-ट्रेक पुरे झाला असं बहुतेक सह्याद्रीदेवाला वाटत नव्हतं. झापाच्या अलिकडे एक कोरडी नदी ओलांडायची होती. ती आम्ही इतकी अलिकडे ओलांडली, की तब्बल एक टेकडी अलिकडच्या शेतात उतरलो (हे तेव्हा कळलं नाही). आता हे वाचताना तुमच्या डोळ्यासमोर येत नसलं तरी माझ्या आत्ताही डोळ्यासमोर येतंय. आम्हाला तर हेही कळत नव्हतं की झाप नेमका कुठल्या दिशेला आहे! सुदैवाने (आणि केवळ सुदैवानेच) पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चंद्रप्रकाश भरपूर होता आणि त्यामुळे आजूबाजूला थोड्या अंतरावरच्या गोष्टी दिसत होत्या. झाडी संपवून मोकळ्या वावरात आलो होतो हेही एक बरं होतं. कपारीतून दिसणारे टॉर्च अजूनही दिसत होते. बिचारे बारा वाजले तरी आमचे लोक्स जागे होते! कारण आमचे टॉर्च दिसत होते, म्हणजे आम्ही पोचलेलो नाही हे त्यांना समजत होतं. 'झापापासून कपार दिसत नाही. आपल्याला टॉर्च दिसताहेत याचाच अर्थ अजून आपण झापापाशी आलेलो नाही', एवढं कळत होतं. दिशांचा अंदाज आजूबाजूला बघून येत नव्हता मग माझ्या डोक्यात एक आयडीया आली. मी सरळ कुलंगकडे बघितलं. आंबेवाडीकडे पाठ करून झापाजवळ उभं राहिलं की कुलंग उजव्या हाताला extended दिसत होता. आत्ता वावरात उभे राहून कुलंगकडे बघितलं तर कुलंग डावीकडे extended दिसत होता. याचाच अर्थ आम्हाला कुलंगकडे पाठ करून अजून उजवीकडे समांतर चालत जायचं होतं. झापाची तीच दिशा होती. तेव्हा कळलं की आपण एक टेकडी अलिकडे उतरलो आहोत. आता ती टेकडी पार कशी करायची ह्यावर विचार सुरू झाला. आणि नशीबाने हात दिला! टॉर्च इकडे तिकडे मारत असताना एका बोर्डवर गेला. बोर्ड? म्हणजे रस्ता असणार हा! आणि उभे होतो तिथून खरंच शंभर फुटांवर रस्ता जात होता. रात्रीच्या वेळी तो दिसलाच नाही. आंबेवाडीकडून इगतपुरीकडे जाणारा एक शॉर्टकट डांबरी रस्ता बांधला गेलाय, तोच हा रस्ता. डांबरी रस्ता लागल्यावर जे सुटल्याचे फिलींग आले ना, त्याची तुलना पेटार्‍यातून निसटल्याच्या फिलींगशीच होऊ शकेल. त्या रस्त्याने आंबेवाडीच्या दिशेला अंदाजे २ किमी चालल्यावर झापाकडे जाणारा कच्चा रस्ता लागला. त्या रस्त्याने झापापाशी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते! कपारीपासून निघाल्यापासून नऊ तासांनी डेस्टिनेशनला पोचलो होतो! आता ताबडतोब पुण्याकडे निघावं की गाडीतच झोपावं हे ठरत नव्हतं. शेवटी 'आंबेवाडीत भोरूकडे सामान पोचतं करू आणि मग ठरवू' असं ठरवलं. तिथे गेल्यावर सगळंच ठरून गेलं.

आंबेवाडीत भोरूकडे रोहित एकटाच गेला आणि भोरूला घेऊन आला. 'सागर सरांचा फोन आला होता. तुम्हाला पोचायला उशीर होणार म्हणून त्यांनी तुमच्यासाठी जेवण बनवायला सांगितलं आहे. आता चला आणि जेवून घ्या.' हे ऐकून फार भारी वाटलं. ह्याला म्हणतात टीममेट्सची काळजी! आणि आम्ही इतकी तंगडतोड करून आलो होतो, की भुकेची इच्छाही विसरलो होतो. त्यामुळे ही बातमी गिफ्टसारखीच वाटली. (सागरला मनातल्या मनात किती वेळा सॅल्यूट मारला असेल याची गणतीच नाही!) भोरूच्या घरी चुलीच्या खोलीत पानं मांडली. चवदार डाळ-भात, भजी आणि पुरणाची पोळी! होळी अशा प्रकारे साजरी झाली! भोरूच्या गृहलक्ष्मीने डाळीमध्ये कशाची फोडणी घातली असेल याचा काही अंदाज लावू शकता? हां... बोला बोला.... तीन ट्राय! उत्तर आहे - दगडाची! नदीपात्रातल्या दगडाची. i was amazed and shocked! मी आयुष्यात पहिल्यांदा दगडाची फोडणी दिलेली डाळ खाल्ली. पण चवीला छान झाली होती. तर इतकं स्वादिष्ट जेवण झाल्यावर लगेच गाडी काढून पुण्यात येणं अशक्यच होतं. चुलीच्या उबेत पथार्‍या पसरल्या आणि झोपलो. दुसर्‍या दिवशी, सोमवारी सकाळी साडेसहाला स्टार्टर मारला आणि राजूर-कोतूळ-ब्राह्मणवाडा-बोटा रस्ता केवळ दुसर्‍यांदाच उजेडात पाहिला. काही प्रवास अटळ असतात, हेच खरं! पुण्यात पोचायला बारा वाजले. ऑफिसला सुट्टी झाली.

माझ्या पहिल्यावाहिल्या expeditionची ही गोष्ट इथे संपते. सह्याद्रीचं आणि टीमवर्कचं हे आगळंवेगळं रूप ह्या दोन दिवसात बघायला मिळालं. टीममधल्या प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं असतं. ते तसं या मोहिमेतही होतं. उतरण्याचा अनुभव दोन गोष्टींमुळे लक्षात राहिल - पहिली, श्वेताची हिम्मत आणि जिद्द आणि दुसरी - रोहितची कमाल. उतरायला सुरूवात केल्यापासून थोड्याच वेळात नाळेच्या वाटेवर रोहित एके ठिकाणी पायाखालचा दगड सटकल्यामुळे ढुं*** वर जोरदार आपटला होता ही गोष्ट त्याने आम्हाला आम्ही खाली मोकळ्यावर येईपर्यंत सांगितलीच नाही. त्याच्या वेदना त्याने आम्हाला सांगितल्या तर नाहीतच, पण जाणवूही दिल्या नाहीत. श्वेताला सुखरूप खाली आणण्याची मोठी जबाबदारी त्याने अतिशय चोखपणे पार पाडली.

ही भटकंतीची गोष्ट माझ्या चिरकाळ लक्षात राहिलंच, पण साठी ओलांडल्यावर (जिवंत असलो तर) कलत्या उजेडात दिवेलागणीला किंवा रात्री झोपताना माझी नातवंडे (नशिबात असली तर) जेव्हा भोवती चिवचिवाट करतील, तेव्हा त्यांनाही सांगेन आणि हे क्षण पुन्हा जगून घेईन. तर दोस्तहो, पुन्हा भेटूच अशाच कुठल्यातरी कडे-कपार्‍यांमध्ये, कातळवाटेवर किंवा घळीत किंवा घाटवाटेवर. तोपर्यंत, have a safe trekking!
शुभास्ते पन्थानः सन्तु |

(क्रमशः)
- नचिकेत जोशी
टीपः चौथा भाग - फोटो आणि उपसंहार.


Friday, March 17, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग!

अलंग-मदन-कुलंग हे सह्याद्रीतलं एक वेगळंच प्रकरण आहे. कळसुबाईच्या सान्निध्यातलं हे त्रिकूट तिच्यासारखंच बेलाग, उंच आणि अवघड आहे. कळसूबाईच्या रांगेतली सगळीच शिखरं कमीअधिक तेवढ्याच उंचीची आणि कस पाहणारी आहेत. कळसूबाई हा सपाट प्रदेशातून आकाशात घुसलेला सुळका नसून, सारख्याच उंचीच्या डोंगरसमूहातलं एक सर्वात उंच शिखर आहे. माणसांचंही असंच असतं की! एखाद्या कर्तृत्त्ववान, यशस्वी, कीर्तीमान माणसाच्या संगतीत कमी-अधिक त्यासारखीच माणसे असतात (असावी लागतात). हे माणूस आणि त्याच्याभोवतीची माणसं याबद्दल झालं. पण हे एकाच माणसातील विविध गुणांबद्दलही खरं असू शकतं. म्हणजे एकाच माणसात अनेक उत्तम गुण थोड्याफार समप्रमाणात असतात आणि त्यातलाच एखादा गुण सर्वोत्तम असतो. म्हणजे कसं, की आशाबाईंचा गाणं हा सर्वोत्तम गुण आहे पण स्वैपाककलाही त्यांना उत्तम येते. सुमन कल्याणपूर गायकीसाठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याच बरोबर लोकरीचे विणकाम, स्वयंपाककला असे इतरही अनेक गुण त्यांच्यात आहेत. तर असो. अ‍ॅनॉलॉजी फारच झाली. मुद्दा हा, की जसा माणूस तशी त्याच्याभोवतीची माणसं. जसं कळसूबाई शिखर, तसे अलंग-मदन-कुलंग.

कुलंगची चढाई सह्याद्रीतली सर्वात मोठी चढाई का आहे ह्याचा पुरेपूर अनुभव त्या दिवशी मी घेतला. त्यात आमची वाट पूर्णपणे कुलंगच्या माथ्याकडे जाणारी प्रचलित वाट नव्हती. अर्धा कुलंग आंबेवाडीतून जाणार्‍या प्रचलित वाटेने चढल्यावर एके ठिकाणी दोन वाटा फुटतात. डावीकडे मदनगडाकडे जाणारा ट्रॅवर्स लागतो आणि उजवीकडे कुलंगची वाट आहे. आता आमच्या लोकल गाईडने, चंदरने, आम्ही लहानपणापासून कुलंगच्याच प्रदेशात वाढले असून दर उन्हाळ्याच्या सुटीत कुलंगला वनभोजन करायला जात असू त्यामुळे आम्हाला कुलंगच्या डोंगरावरच्या सगळ्या वाटा तोंडपाठ आहेत अशी समजूत करून घेतली असावी. कारण स्वत:च्याही खांदा-पाठीवर भरपूर ओझं असून हा कधी भराभर चढून सगळ्यांच्या खूप पुढे जात होता तर कधी सगळ्यांच्या मागे राहत होता. आणि थकला की "लई सामान हाय" असं काहीतरी बडबडत होता. त्या वर सांगितलेल्या फाट्यावर साहेब कुलंगच्या वाटेला लागले तेव्हा अरूण सरांना कसलीतरी शंका आली आणि त्याला सरांनी थांबवले. चार-पाच उलट सुलट प्रश्न विचारल्यावर हे कळलं की चंदरला आम्हाला कुठे घेऊन जायचं आहे तेच कळलेलं नाही. आणि मग पुढची पाच-दहा मिनिटे हातातल्या काठीने त्या पाऊलवाटेवरच सरांनी आडव्या उभ्या रेघा मारून आपल्या त्या कुलंग आणि शेजारच्या डोंगराच्या मधल्या खिंडीत जायचं आहे हे समजावून दिलं. मी 'सर बोलतात कसे, काय काय सांगतात' ह्याचं बारकाईनं निरिक्षण करत होतो. सरांनी अगदी बालवाडीतल्या मुलाला समजावून सांगावं तसं त्याला समजावून सांगितलं. आणि हे सांगतानाही त्याला सतत इकडून तिकडून प्रश्न विचारून खात्री करून घेतली की त्याला नेमकं कळलंय कुठल्या खिंडीत जायचंय ते! याला म्हणतात अनुभव. तर मग मागे येऊन पुन्हा मदनगडाच्या दिशेने ट्रॅव्हर्सवरून आम्ही निघालो.

आता इथे घटना सांगितली पाहिजे, जिचा पुढे येणार्‍या गोष्टीशी खूप जवळचा संबंध आहे. ट्रेक-मोहिमांमध्ये दुखापती या नित्याच्या नसल्या तरी त्यांच्या शक्यता गृहीत धराव्याच लागतात. मागून येणार्‍या श्वेताचा पाय एका पायरीवरून घसरला आणि ती जवळपास सहा-एक फूट खाली घसरली. तिच्या मागेच असणार्‍या रोहनने प्रसंगावधान दाखवून तिला आधार दिला (नाहीतर तिच्या मते फॉल नक्की होता!). पण घसरत असताना पायरीतून बाहेर आलेल्या एक मजबूत आणि टोकदार दगडावर तिचा गुडघा घासत खाली गेला. गुडघा फाटला नाही तरी जबरदस्त मुका मार लागला. एवढं घडल्यावर मी असतो, तर चूपचाप कुणाचंही न ऐकता तिथूनच गावात खाली गेलो असतो. पण आपण नक्की कशाचे बनलेलो आहोत हे सिद्ध करणार्‍या काही वेळा नशिबात लिहिलेल्या असतात. श्वेताच्या नशिबात ती वेळ त्या दिवशी लिहिलेली असावी. तिने तरीही वर येण्याचा निर्णय घेतला आणि रोहित आणि रोहन (बिचारे) तिला शेवटपर्यंत वर घेऊन आले.

मदनगडाच्या ट्रॅव्हर्सला लागल्यावर मग लगेचच एका सुकलेल्या धबधब्याच्या पात्रात जेवायला थांबलो. एक वाजून गेला होता. शनिवारच्या दुपारचं जेवण घरूनच आणायला सांगण्यात आलं होतं. जवळजवळ तासभर जेवल्यानंतर मग पलटण पुढे निघाली. या तासाभरात जेवणाव्यतिरिक्त सागरला, जो संध्याकाळी पुण्यातून निघून रात्रीच मुक्कामाला पोचणार होता, त्याला वाटेबद्दल सूचना देऊन झाल्या. जेवणाच्या ठिकाणापासून काही अंतरावर वाट थेट नाळेत शिरली. आणि इथून पुढचे तीनएक तास आम्ही अंदाजे साठ अंशात फक्त चढत होतो. दगड, कातळ, माती, फांद्या, रॉकपॅच, पाय ठेवायला जागा असू दे अथवा नसू दे, एकच ध्येय - वर जाणे! त्यात पाठीवर ओझे! सॅकच्या वरून टाकलेले रोप्स. चढताना गुडघा फोल्ड व्हायचा. त्या रोप्सची वेटोळी कधी उजव्या गुडघ्यात तर कधी डाव्या गुडघ्यात अडकत होती. गुडघा सरळ व्हायच्या आत ती दिसली तर ठीक, नाहीतर मग झटका बसणार. थोडक्यात, एकाग्रतेचा आणि मानसिक खंबीर बनवणारा लाईव्ह कोर्स करत करत ती चढण चढत होतो. अरूण सर, सूरज, संजय खडूने बाण काढत पुढे जात होते. वाट एकच आणि वरच जाणारी होती हे त्यातल्या त्यात बरे होते. खिंड साधारण दोनशे फूट राहिली असेल. आणि एका ठिकाणी अडकलो. बाणवाले डाव्या बाजूने वर गेले होते आणि आम्हालाही 'आमच्याच वाटेने या' असा दम देऊन गेले होते. चंदर आमच्यासोबत होता आणि त्याने उजवी वाट पकडली. आमच्या मनात डावे-उजवे सुरू झाले. तसा मी तरी कुठल्याच बाजूला झुकलेला नसल्यामुळे लीडरची वाट तीच आपली वाट हे ठरवून डाव्या बाजूने वर निघालो. कारवीची झाडे चिक्कार होती आणि त्यांनीच आधार देऊन मला सुखरूप वर पोचवलं असं म्हटलं तरी चालेल. इकडे उजव्यावाटेने निघालेला चंदर पंधरावीस मिनिटात खिंडीत पोचलासुद्धा. आम्ही मात्र अर्ध्यातच अडकलो होतो. 'चंदरला बाणवाल्यांसोबत न राहता मागे रहायला कुणी सांगितलं होतं?' असं मी मनातल्या मनात म्हणालो. (आम्ही कायम मनातच म्हणायचं असं हक्काचं वाक्य आहे ना आमचं!)

अखेर बरीच धडपड आणि रोप्स वगैरे लावून खिंड गाठली तेव्हा साडेचार वाजले होते. सकाळी साडेनवाला सुरूवात करून इप्सित खिंड गाठायला एवढा वेळ लागला होता. ज्या झापापासून सुरूवात केली होती, तो एका डोंगराच्या आड गेला होता, तो डोंगर चांगलाच दूर आणि खालच्या बाजूला दिसत होता, तर झाप आणखी दूर असणार! आंबेवाडी तर कैच्याकै दूरवर दिसत होती. कुलंगचा ट्रेक जनरली आंबेवाडीपासून ट्रेक सुरू होतो. तिथपासून ते कुलंगचा माथा एवढं अंतर ही चढाई मानली तर ही नि:संशय सह्याद्रीतली सर्वात दीर्घ चढाई आहे.

आंबेवाडीच्या बाजूने बघताना कुलंगच्या डाव्या हाताला एक डोंगर आहे. त्याच्या पोटात काही नैसर्गिक कपारी आहेत. ह्या कपारी हीच आमची मुक्कामाची जागा असणार होती. जागा प्रशस्त आणि हवेशीर होती. भरपूर उजेड, खेळतं वारं, समोर अप्रतिम नजारा होता आणि कामाच्या ठिकाणाहून तीन मिनिटाच्या अंतरावर होती - अजून काय हवं असतं निवार्‍यासाठी? श्वेता-रोहित-रोहन-सूरज सोडून सगळे पोचले होते. राहण्याचा प्रश्न सुटला होता. आता पुढचा प्रश्न होता पाण्याचा. पाणी आणणं मस्ट होतं. पाणी मिळण्याची एकच जागा होती - कुलंगच्या माथ्यावरची टाकी. लगेच आम्ही सहा जण तयार झालो. प्रत्येकाने पाण्याचा ५ लिटरचा एक कॅन आणि दोन-तीन बाटल्या एवढं पाणी आणायचं नक्की झालं. तेवढं सगळं मिळून पन्नासएक लिटर पाणी आणता आलं असतं, जे चौदा आणि रात्री येणारे दोघे अशा सोळा जणांना उद्यापर्यंत पुरलं असतं.

पावणेपाच वाजता कपारीपासून सुरूवात केली. सुरूवातीचा टप्पा सोपा होता. कारण खिंडीपासून सरळ कुलंगला ट्रॅवर्स मारून जायचं होतं. झाडी-कातळात लपलेली पण स्पष्ट अशी एक पायवाट पार करून जायला आम्हाला फक्त पंधरा मिनिटे लागली. लागणारच! सकाळपासून पहिल्यांदाच आमच्या खांद्यावर रिकाम्या बॅग्स होत्या, त्यामुळे सगळी एनर्जी चालण्यावर वापरता आली. ट्रॅवर्स पार केला की ती पायवाट कुलंगच्या प्रचलित वाटेला मिळते आणि मग पुढे दोन्ही पायवाटा पायर्‍या चढू लागतात. ह्या ठिकाणापासूनसुद्धा कुलंगचा माथा बराच उंच दिसतो. असं वाटतं की आपण काहीच चढून आलेलो नाही. अजून एवढं उंच जायचंय हे बघितल्यावर माझा जागीच डॉबरमॅन झाला. (डॉबरमॅन होणे - दम लागल्यामुळे जीभ बाहेर येणे). हे कमी होतं म्हणून की काय, कुलंगच्या पायर्‍या एक एक फूट उंच आहेत. आणि ज्या एक फुटापेक्षा कमी उंच आहेत, त्यांच्या एका बाजूला कडा आणि दुसर्‍या बाजूला exposure आणि फॉल आहे. 'उतरताना कसं होणार' हाच विचार करत मी एकदाचा वर पोचलो. आणि काय सांगू महाराजा! सगळा शिणवटा निघून गेला. जोरदार पश्चिमेचं वारं आणि डोळे सुखावणारा आसमंत! कळसूबाईच्या रांगेतला कुलंग हा शेवटचा डोंगर असल्यामुळे कळसूबाई-अलंग बाजू सोडली तर इतर सर्व दिशांना दूरदूरपर्यंत नजारच नजारा आहे! कुलंगवरून बघताना रतनगड तर 'तासाभरात संपवण्यासारखा' डोंगर वाटतो. लांबवरचा आजोबा, घोटी-इगतपुरी बाजू, पट्टा-औंढ्याकडच्या पवनचक्क्या, खुद्द कुलंगचं पठार आणि दिवसभराची ड्यूटी संपवून मावळतीला निघालेले भास्करशेठ! (ड्यूटी आणि शेठ हे जरा ऑड काँम्बो आहे, मान्य आहे!)

'दिवसभराचा घामेजलेला चेहरा, हातपाय सगळं अर्धी-अंघोळ करून धुवून टाकावं' ह्या प्रेरणेमुळे मी कुलंगच्या पायर्‍या चढून वर आलो होतो. तो विचार टाक्यातलं पाणी ओंजळीत घेतल्याबरोब्बर गारठला. पाणी एवढं थंड होतं की विचारता सोय नाही! त्यात सूर्यदेवांनी जाता जाता सुस्कारे म्हणून गार वारे धाडायला सुरूवात केली होती. मला क्षणभर कळेच ना की मार्च आहे की डिसेंबर? पण कुठलाही महिना असला तरी हेच पाणी भरून घ्यायचं होतं आणि खाली उतरायचं होतं. श्वेताला सुखरूप पोचवून रोहित आणि रोहन लगेचच पाणी आणायला कुलंगवर आले. (काय स्टॅमिना बाप रे!) तासभर तिथे घालवल्यावर मग सगळेच उतरायला लागलो. माझा एक विचित्र प्रॉब्लेम आहे - तुम्हाला म्हणून सांगतो, कुणाला सांगू नका. दरी किंवा exposure डाव्या हाताला असलं की मी निर्धास्त असतो. ते उजव्या हाताला आलं की माझी जाम तंतरते. आता उतरताना ते उजव्या हाताला होतं. म्हणून मग मी मागे रूपेशला थांबवून ठेवलं. आणि प्रत्येक पायरीवर स्वामींचं नामस्मरण करत शेवटी त्या पायर्‍या उतरून आलो. ट्रॅवर्स सुरू झाला तेव्हा अंधार पडला होता. शुद्ध पक्षातल्या चतुर्दशीचा चंद्र मोठ्या आत्मविश्वासाने आकाशातली वाट चालायला सज्ज झाला होता. कपारींपाशी आलो तेव्हा पूर्ण काळोख झाला होता. मी चंद्राकडे खूप निरखून पाहिलं पण 'चौदहवी का चांद'ची एक्स्ट्रा खूबसूरती काही मला दिसली नाही. मग मी त्याच्याकडे टक लावून पाहणं थांबवलं. आम्ही पाणी आणायला गेलो तेवढ्या वेळात किचन डिपार्टमेंटच्या लोकांनी पाण्याच्या शोधासाठी सगळ्यांच्या बॅगा उघडल्या होत्या. तेव्हा त्यांना माझ्या बॅगमध्ये सव्वा लिटरची (इमर्जन्सीसाठी लपवून ठेवलेली) बाटली सापडली होती. और उसकी बदौलत हम सबको शेव बटाटा पुरी नसीब हुई. त्यावर ताव मारला आणि मग बॅग आणि झोपण्याची व्यवस्था लावायला गेलो. मास्टरशेफ मंदारने अप्रतिम चवीचा मसालेभात, आणि फ्लॉवर-बटाटा भाजी बनवली. जेवत असताना सागरचा वॉकीवर कॉल आला. तो आणि मालतेश झापापाशी आले होते. त्यांना अरूणसर आणि सूरजने वाट समजावून दिली. फक्त प्रॉब्लेम असा झाला की एकाने झापापासून आणि दुसर्‍याने कपारीपासून सांगितली. त्यामुळे सगळे उजवे-डावे संदर्भ उलट सुलट झाले. शेवटी संजय मध्ये पडला आणि त्याने (सूरजला) थांबवले. वॉकी ऑन ठेवायचे वायदे झाले. 'ओव्हर अँड आऊट' करून सगळे आपापल्या स्लिपिंग बॅग्जमध्ये शिरले. चिक्क्कार थंडी होती. उन्हाळा असेल या समजूतीने फार काही कपडे आणले नव्हते. पण काय ऑप्शन नव्हता. तरी अरूण सरांनी त्यांच्याकडचा एक्स्ट्रा टी-शर्ट मला दिला म्हणून थोडीफार थंडी कमी झाली.

मोहीम सोमवारपर्यंत चालणार असली तरी मला रविवारीच निघणं गरजेचं होतं. माझ्यासोबत श्वेता आणि रोहितही निघणार होते. श्वेताचा पाय चांगलाच ठणकत होता. हा असाच राहिला तर आलो त्याच्यापेक्षा जास्त वेळ उद्या उतरायला लागणार होता. आजच्या दिवसभरात फक्त बेसकॅंप लागला होता. चढाईचा पहिला बोल्टसुद्धा अजून ठोकायचा बाकी होता. सगळी परिस्थिती बघता मला क्लाईंब करायला मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. ध्यानीमनी नसताना कुलंग किल्ला चढून झाला होता. त्यामुळे या मोहिमेतून क्लाईंब नाही तरी 'टेक अवे' मिळालंच होतं. पहिल्यांदाच टीममध्ये सिलेक्ट झालेल्या खेळाडूला मैदानावर फिल्डींग करायचीही संधी मिळण्यासारखंच हे होतं. आणि त्या घडीला दोनच गोष्टी प्राधान्यावर होत्या - उद्या रात्री कितीही उशीर झाला तरी पुण्यात पोचणे आणि श्वेताला सुखरूप खाली पोचवणे. उद्याचं उद्या बघू असं म्हणून जेवण झाल्यावर कॉम्बिफ्लॅम घेऊन टाकली. आणि देवाचं नाव घेऊन स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी



Thursday, March 16, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....

काही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळा (कारच्या चाकांखाली) तुडवलाय, त्यातल्या फक्त एकदाच तो दिवसाउजेडी केलाय. बाकी सगळ्या वेळी रात्री एक ते तीन हीच वेळ ह्या प्रवासाबद्दल नियतीने माझ्यासाठी राखून ठेवली आहे. बोटा सोडलं की धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याशेजारून जाणारा रस्ता, मग ब्राह्मणवाड्यानंतरचा पाडाळणे आणि भोजदरी गावांना जोडणारा घाट, कोतूळ गावातले एकेकाळचे जगात वाईट आणि आता कमालीचे तुळतुळीत रस्ते, मग राजूरच्या अलिकडचा आणखी एक घाट, घाट संपल्यानंतर एका मंदिराला ऑलमोस्ट खेटून वळणारा अरूंद रस्ता हे सगळं आता पाठ झालंय. दरवर्षी जायंट स्विंगला नेणारा आणि आणणारा हाच तो रस्ता. मागच्या आठवड्यात गेलो तेव्हा मात्र यापैकी बराच रस्ता खूप सुधारल्याचं जाणवलं. राजूर गेलं आणि घोटी रस्त्याने बारी गाव पार केलं. उतार उतरून वासळी फाट्यावरून गाडी आंबेवाडीकडे वळवली तेव्हा आसमंत थंडगार पडला होता. तशी थंडी बोटापासूनच सुरू झाली होती. कारमध्ये होतो म्हणून आम्ही सुरक्षित होतो. संजय आणि रोहित बाईकवरून येत होते, त्यांची मात्र हालत खराब झाली होती. त्यात रोहित एक दिवस आधी तापाने आजारी होता हेही कळलं. संजयने 'मी बाईकवर येणार नाही' हा निश्चय याहीवेळी मोडला होता. (ट्रेकरलोक्स इतके उपद्व्याप का करतात हा तुमच्या मनातला प्रश्न! - पोचला मला. पण त्याला उत्तर नाही. )

आंबेवाडीच्या पुढे तीन किमीवर पांडुरंगच्या झापापाशी पोचलो तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. शुद्ध पक्षातल्या त्रयोदशीचा चंद्र आकाशात केव्हाच आला होता. त्याच्या प्रकाशात कुलंग-मदन-अलंगच्या रांगेची किनार दिसत होती. अरूण सरांच्या प्लॅननुसार आम्ही झापापाशी पोचल्या पोचल्याच सामान घेऊन कुलंगच्या दिशेने चढायला सुरूवात करणार होतो. ह्यामुळे दुसर्‍या दिवशीची चढाई कमी झाली असती. पण पुण्याहून आधीच २०० किमी ड्राईव्ह करून आलो होतो, आणि मुंबईहून आलेले सगळे ताडपत्री अंथरून त्यावर केव्हाच स्लीपींग बॅगमध्ये विलीन झाले होते. त्यामुळे अरूण सरांनीही मग 'दोन-एकतास झोपून सहा वाजता उठून चालायला लागू' असं सांगितल्यावर आम्हीही झोपेच्या वाटेने निघालो. मार्चमध्येही हवेत गारठा होता. त्यात मला थंडी हे प्रकरण मुळीच झेपत नसल्यामुळे माझी थडथड सुरू व्हायच्या बेतात होती. बाहेर झोपण्यापेक्षा मी गाडीतच झोपणं पसंत केलं.  जी काही दोन-तीन तास झोप झाली, त्यात रात्रभर 'इन्ना सोणा रब ने बनाया' हीच एक ओळ सारखी मनात वाजत होती. त्याचं कारण आजपर्यंत कळलेलं नाहीये. मीच मग त्या ओळीतलं 'सोणा' हे 'सोना-झोपणे' या अर्थी असेल, म्हणजे एवढीच झोप रबने नशिबात ठेवली असेल अशी समजूत करून घेतली.

बरोब्बर सहा वाजता अरूण सरांनी काचेवर टकटक करायला सुरूवात केली. (देवा! जरा झोपू देत नाहीत). जायंट स्विंगच्या वेळी तर बरोब्बर साडेपाचला हाका मारायला सुरूवात करतात. कुणी उठलं नाही, तर मग टेंटच्या झिप उघडून ठेवतात. (घ्या, डिसेंबरातल्या पहाटेचा वारा खात झोपा!) पण हा माणूस सह्याद्रीत आडवाटांचे ट्रेक करण्यासाठीच जन्माला आला आहे. त्यांच्यासाठी हे थंडी-पाऊस वगैरे निसर्गाचे खेळ किरकोळ आहेत. तर ते असो. मी तरी पंधरा मिनिटे झोपून घेतलं. माझी सरांबरोबरची आयुष्यातली ही पहिलीच expedition होती. त्यामुळे मी काय क्रिकेट टीममध्ये पहिल्यांदाच सिलेक्शन झालेल्या होतकरू खेळाडूसारखा होतो. बाकीचे बरेच जण सरावलेले होते.

उजाडलं तेव्हा कुलंगचा माथा काळसर ढगात बुडाला होता. ते बघून माझ्याही मनावर शंकेचे काळे ढग जमा झाले. थंडी झेपत नाही, त्यात आता पाऊसही! वेधशाळेने दोनच दिवसांपूर्वी 'पुण्यात येत्या तीन-चार दिवसात गडगडाटी पाऊस पडेल' असा अंदाज दिला होता. पण पावसाचे ढग कुलंगच्या प्रदेशातून येतील हे काही सांगितलं नव्हतं! 'वेधशाळेची कार्यपद्धत अजून आधुनिक करायची गरज आहे' असा एक प्रातःस्मरणीय विचार डोक्यात शिरताच मग प्रसन्न वाटून गेलं. मीही पावसाची शंका बोलून दाखवताच रोहितने "बाबा! ('बाबा' हे 'येड्या भो***' अशा अर्थी घ्यायचं) इथल्या भागातल्या गारा खाल्यात! पावसाचं नाव काढू नकोस!" असं सुनावलं. घ्या! आता थंडी-पाऊस पुरेसे नव्हते की काय, म्हणून गारा! मी शेवटी तो विचारच झटकून टाकला. मग गरमागरम चहा तयार झाला. त्यासोबत कुणी कुणी काय काय आणलं होतं, ते खाऊन झालं. मी उकडलेली अंडी नेली होती, ती वाटून टाकली. (तेवढंच ५०-१०० ग्रॅम वजन कमी झालं आणि सकाळी सकाळी प्रोटिन्सही मिळाली).

मग सॅक भरायला सुरूवात झाली. क्लाईंबिंगसाठी आणलेलं सगळं हार्डवेअर, equipment, बेसकँपचं सगळं सामान ताडपत्रीवर अंथरण्यात आलं. ते इतकं जास्त दिसत होतं, की हे एवढं वर न्यायचं आहे हे मला आधी खरंच वाटलं नाही. मग सूरजने परिस्थितीचा ताबा घेतला. त्याचे सॅक भरण्याचे बेसिक-अ‍ॅडव्हान्स सगळे कोर्सेस झालेले असावेत. त्याने हुकूम सोडला - "प्रत्येकाने आपापल्या सॅक दाखवा. त्यात हे सामान कसं बसवायचं ते मी सांगतो". मी 'हीच ती वेळ, हाच तो क्षण' साधून माझी सॅ़क त्याच्याकडून भरून घेतली. हा आनंद क्षणभरच टिकला. कारण आता सॅकच्या वरच्या भागात बरीच जागा रिकामी झाली होती. त्यामध्ये सूरजने बरंच काय काय भरलं. सॅकची extended जागाही वापरून झाली. माझी सॅक पूर्ण भरल्यावर जमिनीपासून माझ्या कंबरेपर्यंत येते ह्याचा साक्षात्कार त्या दिवशी मला झाला. असेच काही साक्षात्कार इतरांनाही झाले असावेत. पूर्ण भरून झालेली सॅक मोठ्या डौलात मातीत उभी होती. ही आपल्याला पाठीवर घेऊन चालायचं आहे, हे जाणवताच माझा डौल मावळला. आंबेवाडी सोडलं तर थेट कुलंगच्या माथ्यावर पाणी आहे. ही चढाई 'सह्याद्रीतली सर्वात मोठी चढाई' आहे असं घाबरवणारं काहीतरी मी नेटवर वाचलं होतं. त्यामुळे तब्बल साडेचार लिटर पाणी घेऊन निघालो होतो. एवढं ओझं मी आजपर्यंत क्वचित घेतलं असेल. त्यात कारमधून ट्रेकला जाणे सुरू झाल्यापासून तर सॅक भरण्याचं कौशल्य तर विसरूनच गेलो होतो आणि आळशीपणाच वाढला होता.

सगळ्यांच्या सॅक भरेपर्यंत साडेआठ केव्हाच वाजून गेले. इकडे ताडपत्रीवर अंथरलेलं सगळं सामान कुणाच्या ना कुणाच्या सॅकमध्ये गुडूप झालं होतं. हे सगळं करण्यात वेळ चालला होता. एरवी जायंट स्विंगच्या वेळी वेळेबाबत कमालीचे दक्ष असणारे अरूण सर ह्यावेळी काहीच बोलत नव्हते. मला कळेना की आजच्या दिवसाचा प्लॅन नक्की काय आहे? मी तसं एकदोनदा विचारूनही पाहिलं. पण कुणी काय खबर लागू दिली नाही. (त्यांनाही प्लॅन माहित नसेल, दुसरं काय!) आणि मुख्य म्हणजे ही मोहीम होती, कमर्शिअल ट्रेक नव्हता. आजपर्यंत कुणीही सर न केलेली कुलंगच्या पूर्वेकडची सहाशे फूट उंच भिंत (कडा) चढून जाण्याचं ध्येय होतं. त्याला क्लाईंबर्सच्या भाषेत virgin wall किंवा cliff म्हणतात. (काय परफेक्ट शब्द आहे ना!) पूर्ण जमली नाही तर जितकी जमेल तितकी चढून सुरक्षितपणे खाली येण्याला प्राधान्य होतं. 'मला विजयाचा हट्ट धरण्यापेक्षा वेळ बघून माघार घेण्यातलं समाधानही तितकंच आवडतं' - इति अरूण सर. ह्यातले सगळे सहभागी लोक्स चांगले ट्रेकर्स आणि उत्तम दमाचे होते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत थोडेफार पुढेमागे चालणारच होते. अखेर, आंबेवाडीतल्या चंदरला - आमच्या वाटाड्याला, घेऊन सगळी पलटण निघाली तेव्हा साडेनऊ वाजले होते. रात्रीच चढून जाणारे आम्ही 'निघू निघू' म्हणता म्हणता अखेर सकाळी उन्हात चढणार होतो. पण झापापासून निघून पुन्हा झापापर्यंत येण्याच्या पुढच्या एकोणचाळीस तासामध्ये जे काही भाग्यात अनुभवायला मिळालं त्याचं वर्णन 'अवर्णनीय' या एकाच शब्दात करता येईल. जी वॉल चढायची होती, त्या वॉलच्या खाली एक खिंड होती, त्या खिंडीपासून चढाईला सुरूवात होणार होती. पण आपण चढून नेमकं कुठे जायचं आहे आणि आज रात्रीचा मुक्काम कुठे करायचा आहे, हे अरूण सर सोडून कोणालाच माहित नव्हतं.


(क्रमशः)
- नचिकेत जोशी



Tuesday, March 7, 2017

वसिमचाचा

परवाचीच गोष्ट!

वाशी नाक्यापासून बरोब्बर बाराव्या मिनिटाला कॅब एक्स्प्रेस हायवेला लागली आणि मी (मनातल्या मनात) पांढर्‍या दाढीवर आणि सुरकुतलेल्या हातांवर घेतलेली शंका अगदीच फिजूल होती, हे (मनातल्या मनात) कबूल केलं. त्याचं असं झालं -

वेळ दुपारची साडेचारची. वाशी हायवेच्या शिवनेरी आणि तमाम एसटी बसेसच्या स्टॉपवर उभा होतो, तेव्हा निळ्या (की मोरपंखी हो? माझं रंगांचं अज्ञान अगदीच गडद आहे) रंगाची कॅब चालवत एक पांढरी दाढी, टोपी, पांढरट असावी अशी शेरवानी टाईप झब्बा घातलेला एक वयस्कर त्या स्टॉपवर आला. कॅबचा स्पीड म्हणाल तर 'वयाला साजेसा' होता. त्याला तिथल्या दांडग्या एजंटने काहीतरी बोलून पिटाळलं. (त्या एजंटची तिथे 'मक्तेदारी' चालते असं नंतर कळलं). ती कॅब जातानाही जेमतेम दहा-वीसच्या स्पीडने गेल्यावर 'ही पुण्यात पोचणार केव्हा' अशी माझी नेहमीसारखी (निष्कारण) जगाची चिंता करून झाली. मलाही त्यातल्या एक-दोन एजंटनी (लांबून) घोळात घ्यायचे प्रयत्न करून पाहिले. त्यामुळे ते पुणे स्टेशन-शिवाजीनगर यापैकीच ठिकाणी नेणार ह्याची खात्री झाल्यावर मी 'स्वारगेट'लाच जायचंय, असं ठाम सांगून टाकलं. मग ते काही पुन्हा विचारायला आले नाहीत. एकतर त्यांचं रुपडं बघूनच माझी त्यांच्या आणि त्यांच्या कनेक्शनच्या कॅबमध्ये बघायची हिंमत होत नव्हती. तर ते असो. मग यथावकाश मुंबई-कराड एसटीचं येणं, तिच्या कंडक्टरचं वारज्याजवळ सोडण्याला होकार देणं, मग मी एसटीमध्ये चढणं, आणि आत बसायला रिकामी सीटच नसल्याचा साक्षात्कार होणं आणि कंडक्टरने दयाळूपणे बेल मारणं, ड्रायवरने वैतागून ब्रेक मारणं आणि एसटी थांबवताना मला झटका बसणं, या सर्व गोष्टी विधिलिखित असल्याप्रमाणे पार पडल्या आणि मी तो सर्व्हिस रोड संपता संपता खाली उतरलो. जेमतेम ३००-४०० मीटर पुढे आलो होतो, म्हणून पुन्हा एसटी स्टॉपच्या दिशेने निघालो.

तेवढ्यात ती मगाशी गेलेली निळी (की मोरपंखी?) कॅब आणि ती चालवणारे ते शुभ्र दाढीधारी मागून येताना दिसले. मग 'पुण्याला सोडतो, शिवाजीनगरला सोडतो, तिकडून स्वारगेटला जा, पैसेही शिवनेरीपेक्षा कमी घेईन' असं काय काय त्यांनी सांगितलं आणि कसं ते माहित नाही, (पण त्या कमी पैशाच्या मुद्द्यामुळे असावं) पण बसलो. एकजण आधीच बसला होता. माझ्यापाठोपाठ अजून एक जण बसला. आणि तिथपासून बाराव्या मिनिटाला कॅब एक्स्प्रेस हायवेला लागली. वाटेत सगळे खड्डे-वनवे, बसस्टॉप दाढीधारींना पाठ होते. बसल्या बसल्याच "गेली चाळीस वर्षं या रूटला गाडी चालवतोय. सेवण्टी टू ला पहिल्यांदा चालवायला लागलो." (मी लगेच मॅथ्स लावून २०१७ मायनस १९७२ हे उत्तर चाळीसच्या आसपास येतंय का ते चेक केलं. काय करणार? Professional hazards!) ''दिवसाच्या कुठल्याही वेळेला इथून गाडी चालवलीये त्यामुळे सगळे खड्डे माहित झालेत." बेलापूर अंडरग्राऊंड रोडच्या अलिकडे उजव्या बाजूने ओव्हरटेक करणे शक्य असूनही त्यांनी एका 'बेस्ट' बसला डाव्या बाजूने ओव्हरटेक ज्या सफाईने केलं, त्याला तोड नाही. "ती बस खाली जाईल बेलापूरकडे, आपल्याला डावी बाजू क्लिअर मिळते मग" - हे न विचारताच स्पष्टीकरण!

मग ओळखपाळख झाली. माझ्याव्यतिरिक्त अजून चार जण कॅबमध्ये होते. त्यातला एक खंडाळा फाटा, आणि तिघे तळेगाव फाट्यावर उतरणार होते. म्हणजे पुण्यापर्यंत जाणारा मी एकटाच होतो. तळेगाववाल्यांपैकी दोघे चाकण रोडवरच्या शोरूममधून टाटाचे डंपर न्यायला चालले होते. ते गेल्यापावली डंपर घेऊन चालवत निघणार होते. त्यामुळे अक्षरश: अंगावरच्या कपड्यानिशी होते. (आणि खिशात तलफदायी चूर्ण असेल, तेवढंच) आता चाकण रोडवर जाणार्‍या त्या दोघांना एक्स्प्रेस हायवेवरून जाणार्‍या कॅबमध्ये यायची बुद्धी का झाली ते तेव्हा काही मला कळलं नाही. वास्तविक, व्हाया तळेगाव एसटी स्टँड जाणार्‍या गाड्या त्यांना जास्त उपयोगी होत्या. तर ते असो. मग शुभ्र दाढीधारींनी स्वतःचीही ओळख सांगितली. "वसिमभाई म्हणतात मला". (मला हे स्वतःच्या नावापुढे राव, ताई, भाई, सर, दादा ह्या उपाध्या आपणहून जोडणार्‍यांची कीव येते. वसिमचाचांची गोष्ट वेगळी होती, म्हातारा छान होता!) आणि लगेच लिमलेटसारख्या दिसणार्‍या गोळ्या प्रत्येकाला दिल्या. मग, वडिलांचा व्यवसाय काय होता, माझा व्यवसाय काय आहे, मुलाला हा धंदा आवडत नाही, त्याला आयटीतच आवडतं हे सांगितलं.

ह्या गतीने आपण साडेसहा वाजताच घरी पोचू वगैरे स्वप्न रंगवायला मी सुरूवात केली. आता स्वप्न डोळे उघडे ठेवून बघता येणार नसल्यामुळे मग मी डोळे मिटून घेतले.  मग काही वेळ सगळेच गप्प बसले. घाट चढून कॅब खंडाळ्याकडे आली आणि तो लोणावळानिवासी पॅसेंजर उतरला. त्याने चाचांना पैसे दिले आणि त्यांनाच "मला दहा रूपये द्या हो जरा" म्हणाला. चाचांनीही काहीच न बोलता त्याल दहाची नोट काढून दिली. मग कॅब पुढे निघाल्यावर म्हणाले, "त्याला शेअरऑटोसाठी हवे असणार. दिले. मला त्या दहा रूपयांनी काय फायदा होणारे? मी फक्त रिटर्नचा टोल सुटावा म्हणून शीटा भरून घेऊन चाललोय."

मला वसिमचाचांची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे, 'कागदपत्रं क्लिअर, लायसेंस व्हॅलिड आणि इमानेतबारे गाडी चालवण्याची सवय'. पूर्वी त्या काळ्यापिवळ्या गाड्या होत्या, तेव्हापासून ते ड्रायविंग करत आहेत. आणि पुढे लोणावळ्यात कुसगाव एक्झिटनंतरच्या शार्प आणि तरीही लांब वळणावर जेव्हा त्यांनी शंभरच्या स्पीडला कॅब वळवली, तेव्हा मी तरी थक्क झालो. हे खायचं काम नाही! मी विचारलं, "का हो चाचा? हा एवढा लांबचा वळसा आपल्या त्या ह्या ABCDEFGH सुपरस्टारची जमीन वाचावी म्हणून ठेवलाय ना हायवेला?" (मला हे पक्कं माहित झालं होतं की चाचांकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे, फक्त विचारणारा पाहिजे!)

का कुणास ठाऊक, वसिमचाचांबद्दल मला आदर वाटायला लागला.

तळेगाव टोलनाक्यावर ट्राफिक पोलिसाने अडवलं. (मी मनात म्हटलं, वसिमचाचांकडे कागदपत्रे आहेतच, आता बघूया काय मजा येतेय!)
"काय चाचा? कसे आहात?" - पोलिस
"काही नाही, पॅसेंजर सोडला तळेगाव फाट्याला". - चाचा
"हो.. मी नेहमी बघतो तुम्हाला" - पोलिस (मी थक्क!)
"चला.. येऊ का?" - चाचा
"हो हो.. या... नीट जा" - पोलिस (मी स्पीचलेस!)

मग पुण्यापर्यंत कॅबमध्ये मी एकटाच होतो. त्यामुळे पिलिअन सीटवर जाऊन बसलो.
"काय चाचा? तुम्हाला तर पोलिसही ओळखतात की!"
"अरे भाऊ, आपण नीट नियम पाळत गाडी चालवतो. पेपर क्लिअर असतात, हे पोलिसांनाही माहितेय. आज बघ, गाडीत पाच पॅसेंजर होते. हे अलाऊड नाहीये. पण पोलिसांनाही माहित असतं की हा बाबा नेहमी नेहमी असं करत नाही, कधीतरीच जास्त पॅसेंजर भरून नेतो. त्यामुळे तेही काही म्हणत नाहीत. सध्या जे नवीन तरूण रक्त आलंय ना ह्या धंद्यात, त्यांचं पोलिसांशी कायम वाजतं कारण ते नियम न पाळता गाडी चालवतात, जास्त शीटा भरतात".

मग गहुंजेच्या स्टेडियमच्या समोर लोढाची टोलेजंग खुराडी बघून चाचा म्हणाले, "कोण येणारे इथे राहायला?". मी चाचांना म्हटलं, "अहो चाचा, पुढच्या दहा वर्षांनी हाच एरिया शिल्लक असेल. हिंजवडी-वाकड तर भरलंच आता. त्यामुळे इकडच्या जागांनाच भाव येणार". "असंय काय? बरोबर आहे मग" - चाचा.

चाचा एक अतिशय skilled आणि फास्ट ड्रायव्हर होते, यात शंकाच नाही. मग चाचांचा नंबर घेतला. नंबर देतानाही 'वसिमभाय' म्हणून सेव्ह करा असं सांगितलं. अर्थात चाचांची मुंबई-पुणे कॅब मलातरी परवडणारी नाही. त्या दिवशी केवळ टोलखर्च सुटावा म्हणून त्यांनी माझ्यासारख्याला गाडीत जागा दिली, हे माझं भाग्यच! त्यांचे कस्टमर्स हे श्रीमंत असतात, चाचांसाठी चिकार पैसे मोजायला तयार असतात हे कळलं. "ते आपले PQRST आहेत ना, त्यांनी घरी माणूस पाठवला होता मला बोलवायला. चाचा, तुम्हीच या, पंचवीस हजार पगार देतो. हे केव्हा? दहा वर्षांपूर्वी! मी हात जोडून म्हटलं, नको साहेब! माझी ही गाडीच मला बरी आहे!"

"चाचा, बिल द्याल का? ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे."
"बिल? हो.. देईन की! एकोणीसशे पन्नासचं देऊ?"
माझ्या डोळ्यासमोर मी 'वाशी ते पुणे' या वनवे प्रवासासाठी एकोणीसशे रूपये खर्च केल्याचं बिल वाचणारा माझा बॉस आला! मग माझी ऑफिस कन्व्हेयन्सची कॅटॅगरीही आठवली. मुळात एवढे पैसे लागलेच नसताना ते क्लेम करणे मलाही पटत नव्हतं.
"अहो चाचा! एवढे बिल नेऊन काय करू? त्यापेक्षा जेवढे घेणार तेवढेच द्या."
"तेवढ्याची पावती देता येणार नाही. ऑफिशिअल पावती जेवढी आहे तेवढीच देईन".
"मग जाऊ द्या. मी बिलाशिवायच क्लेम करेन. कारण एवढा खर्च झालेला नसताना क्लेम करणं मला पटत नाहीये".
माझ्या डोळ्यासमोर पावती नसतानाही विश्वासाने बिल अप्रूव्ह करणारा माझा बॉस आला. हे चित्र अधिक वास्तववादी आणि शक्य कोटीतलं होतं.

उतरताना चाचांना म्हटलं, "चाचा! छान वाटलं तुम्हाल भेटून!", तर खळखळून हसले आणि म्हणाले, "अरे खुदा मेहरबान है! फिर मिलेंगे!"

वसिमचाचा! अगदी परवाचीच गोष्ट!

- नचिकेत जोशी (७/३/२०१७)

Monday, February 20, 2017

समर्पण

जेव्हा विचार आला, दोघांस चिमुकलीचा
त्यांनाच विसर पडला कोर्टातल्या सहीचा!

झाला असा चुकीचा भलताच बोलबाला
दोघातल्या खर्‍या पण -  स्वप्नातल्या मिठीचा

प्रत्यक्ष सांगण्याची हिंमत कधीच नव्हती
वायाच जन्म गेला, त्याच्यातल्या कवीचा

बिलगून वाट जावी, माझ्यातुझ्या ठशांना
रानास भास व्हावा आजन्म सोबतीचा

प्रेमी कुणी बुडाला, खळबळ तिच्या तळाला!
अवघा प्रवाह गेला बदलून मग नदीचा

व्हावे असे समर्पण, की श्वास संथ व्हावा!
लवलेशही नसावा प्रेमात घुसमटीचा

- नचिकेत जोशी (३/२/२०१७)

Tuesday, February 7, 2017

प्रामाणिक

मी असे नाही म्हणत की, प्रेम हे वैश्विक असू दे
प्रेम कुठलेही असू दे - फक्त प्रामाणिक असू दे

पूर्ण मेसेज् वाचण्याचे कष्ट वाचावेत माझे -
तर तुझ्या नाकारण्याला एक प्रास्ताविक असू दे

एकमेकांना दिला होकार पण, तेव्हाच ठरले -
या नव्या लिव्ह-इनमध्येही सर्व तात्कालिक असू दे

नेमक्या वाक्यात निर्माता गरज सांगून गेला
'गोष्ट कौटुंबिक असू दे फायदा आर्थिक असू दे'

आत जाताना तुझा दर्जा मुळी विसरून जा तू
आर्जवे कर, शक्य तितका चेहरा अगतिक असू दे

तो कवी अन्, ती समीक्षक! वादळी चर्चा बिछानी!
"आपला शृंगारही का गहन वैचारिक असू दे?"

थेट बोलू आणि मिटवू आपल्यामधला दुरावा
यापुढे अंतर तुझ्यामाझ्यात भौगोलिक असू दे

एवढे झेलून धोके, मी तुझ्या दारात आलो
आज शेवटचीच इच्छा - घाव प्राणांतिक असू दे!

- नचिकेत जोशी (७/२/२०१७)

Friday, February 3, 2017

पेशा

ह्या रेषेच्या पुढे मनाची सत्ता नाही
ह्या रेषेच्या आत मनाची इच्छा नाही

कोण ठरवते, कुणी कुणावर प्रेम करावे?
नियतीही मुक्काम ठरवते - रस्ता नाही!

तुला वाटते त्यापेक्षा हे सुंदर आहे
होकाराची ह्या वाक्यास अपेक्षा नाही!

आकाशाचेही आंदण पिल्लास मिळाले
अजून त्याच्या पंखांचाही पत्ता नाही

सहनशीलता म्हणू यास की हतबल जगणे?
प्रश्न जागतिक आहे, माझ्यापुरता नाही

आपण करतो बंद आपले स्वप्नझरोके
मर्यादांना कुठलीही मर्यादा नाही

नाते विश्वासू आहे, पण नको भेटणे -
तुला भेटल्यावर माझाच भरवसा नाही

जरी चेहरे चिकार येथे, बघू कशाला?
नटलेले सारेच, एकही हसरा नाही

कधीतरीही लिहून फिटते हौस जिवाची
आणि तसेही, लिहिणे माझा पेशा नाही!

- नचिकेत जोशी (२/२/२०१७)

Thursday, February 2, 2017

कहाणी

पूर्वी जनता भले शहाणी नव्हती
सध्याइतकी तरी अडाणी नव्हती

त्या काळी ही असली गाणी नव्हती
बाजारीही खोटी नाणी नव्हती

बालपणी पक्षीही दोस्तच होते
चिमणीसुद्धा माणुसघाणी नव्हती

रबराइतके लवचिक होते नाते
तुटण्याइतकी ताणाताणी नव्हती

रस्ते होते शोधत रस्ता अपुला
त्या गावाला जुनी कहाणी नव्हती

माघारीची आज्ञा कुठून आली?
हरण्याची कुठलीच निशाणी नव्हती

तो सार्‍या विश्वाचा राजा होता
ती तर गावाचीही राणी नव्हती

- नचिकेत जोशी (२/१०/२०१४, अश्विन शुद्ध अष्टमी)