Pages

Friday, October 18, 2013

'संहिता' प्रीमिअर सोहळा

'संहिता'च्या प्रीमिअरला येण्याची संधी दिल्याबद्दल मायबोली, चिनूक्स आणि साजिरा दोघांचे मनापासून धन्यवाद.  चित्रपटाबद्दल सर्वांनी भरभरून लिहिलंय. मी थोड्या सवडीने लिहेन. सध्या फक्त फोटो टाकतोय. सगळ्याच माबोकरांना (पौर्णिमा व हर्षल सोडून) पहिल्यांदाच भेटलो. खूप छान वाटलं.





























- नचिकेत जोशी

Wednesday, October 16, 2013

नाही विसरता येत...

नाही विसरता येत इतक्या सहज -
गुंतून राहिलेले श्वास,
अडून राहिलेलं आयुष्य
न मागताही दिलेली स्वाधीनता
आणि बदल्यात मिळालेली अगतिकता

नाही विसरता येत - 
संवाद टिकवण्यावरची भाषणं
अर्धवट सोडलेली संभाषणं,
सोयीस्करपणे बदललेल्या अपेक्षा
बेमालूमपणे झिडकारलेली नाती,
उच्च कळस बघताना खुपणारी
पायातली भुसभुशीत माती
ही संगती, ही विसंगती
ही तटस्थता, ही त्रयस्थता,
ही धुंदी, ही बेपर्वाई
आणि या सर्वांमागे लपवलेली चतुराई...

प्रश्नांच्या भोवर्‍यात प्राण घुसमटतानाही
धडपडत तिथेच घट्टपणे फिरत राहण्याचा हट्ट
आणि कुठल्याशा भव्य, उदात्त स्वप्नाचा हव्यास
मला खेचत नेतोय अनिश्चिततेच्या खोल गर्तेत...

एकटेपणाची सार्वत्रिक खंत आठवून देते
सक्तीने अंधारात बसून बघावी लागलेली रोषणाई
मधूनच बेसावध क्षणी कुणीतरी झगमग आवेशात
अंधारात मारलेला दिव्याचा झोत,
त्यातून आलेलं क्षणिक आंधळेपण
आणि मग
पूर्वीपेक्षा अधिक जवळ करावासा वाटलेला अंधार...

नाही विसरता येत...

- नचिकेत जोशी (१४/१०/२०१३)

Wednesday, October 9, 2013

मांजरसुंभा गड - एक अगदीच short but sweet भटकंती

अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम-उत्तर सीमा सोडल्या, तर बहुतांश जिल्हा सपाटच आहे. पण तरी जिल्ह्यात आडवाटेवर काही परिचित नसलेले डोंगर आहेत. त्यांची उंची इतकी छोटी आहे की, त्यांना डोंगर म्हणणेही धाडसाचेच ठरावे. अशाच एका अपरिचित डोंगर कम किल्ल्याला भेट द्यायचा योग नुकताच आला. सोबतीला होता - 'ट्रेकक्षितीज' संस्थेचा संस्थापक अमित बोरोले व त्याची चारचाकी.

पुण्यातून भल्या पहाटे सहाला निघालो आणि नगर हायवेवर एका ठिकाणी (हट्टाने) मिसळ मागवून तोंडाचा जाळ करून घेतला. कितीतरी महिन्यांनी ट्रेकला निघालो असल्यामुळे सवयी मोडल्याची खात्री पटत चालली होती. अखेर अहमदनगर सोडून औरंगाबादच्या दिशेने जायला लागल्यावर दहा-एक किमीवर वांबोरी फाट्यावरून गाडी डाव्या हाताला आत मारली. मांजरसुंबा गड विचारत विचारत जात होतो, तेवढ्यात गड दिसला.


खूप दिवसात हा प्रवास घडला नाहीये, हे जाणवलंच -


या कमानीपाशी येऊन पोचलो.


पायथ्यापासून गडाचा छोटेखानी आवाका सहज जाणवतो -




पंधरा मिनिटात चढून ऐसपैस अशा मुख्य दरवाजापाशी आलो -




निजामपूर्व काळातील हे बांधकाम असावे (इति अमित) इतकी विस्तृत बांधणी आहे -








गडावर फिरायला फारसे काहीच नाही. गडाचा इतिहास, महत्त्व यांचा शोध सुरू आहे. तो पूर्ण झाला की इथे भर घालेनच. या गडाला स्थानिक लोक दावलमलिक या नावानेही ओळखतात. (गडावर पीरस्थान आहे म्हणून हे नाव).




गडावरील काही अवशेष.




अतिविशाल टाके - (हे पाहून मुल्हेरगडावरील अशाच टाक्याची आठवण ताजी झाली)


गडाच्या एका टोकावरचा हा 'हवामहाल' (हा महालच असावा. कड्याच्या अगदीच टोकाला असल्याने हवामहाल वाटतोय)




गडाच्या पश्चिम दिशेकडे अजून एक दरवाजा आहे.




त्यातून खाली डोकावून पाहिले असता पडक्या पण ठीकठाक पायर्‍या दिसल्या. ट्रेक केल्याचे जराही समाधान वाटत नसल्याने, या पायर्‍यांनी खाली उतरून तेवढेच समाधान मिळवू असा विचार करून खाली उतरू लागलो. थोड्याच वेळात एक पायवाट गडाला चिकटून गेलेली दिसली. त्या वाटेने गेले असता, गडाच्या पोटात एका रांगेत लेणी-टाकी सापडली.






पाणी चवीला उत्तम होते.


सरते शेवटी ती वाट गडाला अर्धी प्रदक्षिणा पूर्ण करून जुन्या वाटेला येऊन मिळाली. जेमतेम दीड तासात सर्व भटकंती संपवून गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालीही..


- नचिकेत जोशी