Pages

Wednesday, January 25, 2012

मनातली 'शाळा'

तो नववीत आहे. आपणही नववीतच आहोत. त्याचा वर्ग, मुख्याध्यापक अप्पा, बेंद्रीण बाई, परांजपे बाई, मांजरेकर सर, घंटा देणारा शिपाई असं सगळं कंटा़ळवाणं विश्व आहे. आपलंही असणार! सुर्‍या, फावड्या, चित्र्या हे जानी दोस्त आणि मिसाळ, बिबिकर, सुकडी, आंबेकर असे ठळक नमुने! हे सगळेही आपलेच! त्याची टिपिकल आई, अंबाबाई, पोराला चक्क समजून घेणारे वडील, त्याचा लाडका नरूमामा - हे तर आपलेच सगे! पण.... त्याला वर्गातली एक मुलगी ज्ज्जाम आवडते. ही गोष्ट तो सगळ्यांपासून लपवतो. मित्रांमध्ये, मामाबरोबर बोलताना प्रेमाबिमाचा विषय निघाला की विषयच बदलतो किंवा निघून जातो, तिच्यासाठी आपल्या दोस्तांनाही बरोबर 'वापरून' घेतो - असं काय काय करतो. पण वेळ येते तेव्हा मात्र तिला थेट सांगतो. आपण केलं होतं असं? आणि ते ही शाळेत असतांना? अर्थात, आता आपण एकमेकांजवळ कबूल करायला हरकत नाही - हो! अनेकदा केलं होतं, पण मनात! कारण मुख्य प्रॉब्लेम हा होता, की 'हे' नक्की काय वाटतंय हे तेव्हा आपल्याला कळलंच नव्हतं! ही मनात जपलेली, आणि काळाच्या ओघात पुसट झालेली 'शाळा' घेऊन दिग्दर्शक सुजय डहाके आपल्याला भेटायला आलाय!

मिलिंद बोकीलांच्या प्रसिद्ध "शाळा" या कादंबरीवर आधारित 'मधल्या सुटी'सह दोन तासांचा 'शाळा' हा चित्रपट म्हणजे गतकाळाची सुंदर सफर आहे. चित्रपटाला कथानक असं विशेष नाही. जे कादंबरीत आहे तेच, पण थोडक्यात आणि प्रभावीपणे! शाळकरी वयातलं भावविश्व, मनात फुलणारे वसंत, अधमुर्‍या वयातली हिरवळ... असं सगळं सगळं चित्रपटात खूप सुंदर टिपलंय! मुकुंद जोशी (अंशुमन जोशी) या मुलाभोवती फिरणारा हा चित्रपट! पहिल्या परिच्छेदातला 'तो' म्हणजेच हा मुक्या! मग त्याचे दोस्त, त्या प्रत्येकाचं 'सामान', जणू 'त्या' एका मंजिलसाठी जगायच्या इच्छा - अगदी आपल्याही जिव्हाळ्याचं विश्व! शिरोडकर (केतकी माटेगावकर) ही मुक्याची 'लाईन'!

अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर ही निवड अत्यंत अचूक झाली आहे. त्या दोघांचे सीन्स, त्या वयातील भावना, ती उर्मी, लज्जा, एकंदरीत वागणं - केवळ लाजवाब! सर्वात कौतुक म्हणजे, त्या धडधडत्या भावना संवादातून बाहेर येताना कुठेही थिल्लरपणा, उथळपणा झालेला नाही! अत्यंत संयमित तरीही थेट पोचणारा अभिनय करून घेण्यात दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी गुण! एक-दोन ठिकाणी केतकी थोडी भूमिका सोडून बाहेर आल्यासारखी वाटते, पण इट्स ओकेच! ती खूप फ्रेश आणि सुंदरही दिसली आहे! इंटर्वलच्या आधी त्याला 'लाईन' क्लिअर असल्याचं सांगताना, 'चेस'स्पर्धेच्या वेळी 'आता जिंकून टाक' हे सुचवताना तिने दिलेले 'सिग्नल' पाहून थेटर 'खल्लास' होतं हे 'त्या' सरलेल्या वयाचे स्मरणे! अंशुमनचा चेहरा पूर्ण चित्रपटभर छान बोलतो. मुळात त्यांचं खरं वय लक्षात घेतलं तर अभिनयातले अगदी बारकावे माफ करावेसे वाटतात. सुर्‍या, चित्र्या, फावड्या - एकदम झक्कास! 'चष्मा लावणार्‍या ढासू मुलांमुळे देशाचं काहीही होत नाही, ते होतं ते या असल्या मुलांमुळेच!' हे सांगणारा नरूमामा (जितेंद्र जोशी) आपल्यालाही हवा होता एवढं वाटतं, ते पुरेच आहे! मुक्याच्या वडिलांच्या भूमिकेत नंदू माधव अगदी मस्त - अगदी समजूतदार बाप! मुख्याध्यापक अप्पा (दिलीप प्रभावळकर), बेंद्रे बाई (देविका दफ्तरदार) ठीक. मांजरेकर सर (संतोष जुवेकर) म्हणजे 'आपले' सर वाटतात. बाकी अमृता खानविलकर का आहे याचं उत्तर बहुधा पहिल्याच प्रसंगात दडलेलं असावं! (तात्पर्य सुरूवात चुकवू नका!)

भाज्यांचे भाव, पात्रांचे वेष, जुनी घड्याळं यातून १९७५ चा काळ छान उभा राहिला आहे. छायाचित्रण, संगीत - ठीकठाक. मुळात चित्रपटाचा प्राण हा त्या वयातलं विश्व असल्यामुळे फोकस तिथेच ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

बाकी अजून सांगण्यासारखं विशेष काही नाही! तुम्ही कादंबरी आधी वाचून नंतर चित्रपट बघायला जात असाल तर उत्तम आणि न वाचता जात असाल तर अति-उत्तम! पण तुम्ही कुठल्याही प्रकारातले असा, अल्लड वयातल्या नागमोडी आणि बहुधा अव्यक वळणांवर भरलेली ही 'शाळा' एकदा नक्कीच बघण्यासारखी आहे!


- नचिकेत जोशी

Friday, January 20, 2012

बंद पडलेल्या घड्याळासारखं...

असं वाटतं, बंद पडलेल्या घड्याळासारखं आयुष्य कायमचं थांबून जावं!

धावणार्‍या काट्यांसारखे एकमेकांसोबत क्वचित,
पण एकमेकांमागे नेहमीच आपण फिरत असतो...
जरा दम घ्यावा म्हटलं तर तिसरा लाल काटा
जणू क्षणांची जमावबंदी असल्याप्रमाणे पळवत असतो...

सगळे व्याप, ताप, भोग, रोग,
जखमा, औषधं, रंगत, संगत,
याच फिरण्यामध्ये बसवायचं असतं!
आणि वेळ चुकली की दरवेळी न बोलता
घड्याळ पुन्हा वेळेप्रमाणे लावायचं असतं!

कमवलेला पैसा आणि जमवलेली माणसं
मात्र संकटांचे गजर होतानांच नेमके हरवतात - काटे निखळावेत तसे!
काटे जोडणं सोपं असतं, नाती कशी जोडणार पुन्हा?

बिनकाट्यांची चिरंतन घड्याळं आणि बिनधाग्यांची शाश्वत नाती
जर शक्यच नसतील – तर आयुष्य बंद पडलेलंच बरं!

- नचिकेत जोशी (१८/१/२०१२)

Wednesday, January 18, 2012

देहरीचा गोरखगड



पावसाळ्यापासून देहरीचा गोरखगड बोलावत होता. कातळ हिरवटले, रानवाटा गच्च झाल्या, ओढे फुफाटत घाटावरून खाली उड्या मारायला लागले तरी गोरखडाची भेट पावसासारखीच वाहून जात होती. अखेर पावसाळाही संपला आणि गोरखवरून दिसणारं पावसाळ्यातलं विलोभनीय दृश्यही एका वर्षाकरता पुढं निघून गेलं. सह्यांकनमध्येही गोरखगड तीन-चारवेळा दूरूनच आठवण करून देता झाला. अखेर गेल्या आठवड्यात १५ जानेवारीचा रविवार कुठे 'सत्कारणी' लावावा हे ठरत नसताना अचानक पुण्याहून माझा सर्वात जुना ट्रेकमेट मयूरचा फोन आला. 'तू कुठेही ठरव, मी येतो' एवढ्या पाच शब्दांत त्याने काम करून टाकलं.

सुशील त्या रविवारी ट्रेक न करण्याच्या मूडमध्ये होता. मग शेवटी मी आणि मयूरनेच जायचं ठरवलं आणि एकदाही नेट न धुंडाळता गड ठरवला - न भेटलेला जुना दोस्त - गोरखगड! ओळखीच्या जवळजवळ सगळ्या ट्रेकमेट्सने गोरखगड याआधीच केला होता. न केलेला बहुधा असा मी एकटाच होतो.

शनिवारी देहरीमधल्या हमीदभाईला फोन करून 'आम्ही येतोय, चहा-नाष्टा-जेवण' याची सोय होईल ना?' असं विचारून ठेवलं. मी मुंबईतून आणि मयूर पुण्यातून येणार असल्यामुळे कल्याण-मुरबाड-म्हसामार्गे जाण्याऐवजी कर्जत-म्हसामार्गे जायचं ठरवलं. (दोन्हीकडून तिकीट साधारण तेवढंच आहे).

कर्जतहून सव्वाआठला म्हसाची एसटी आहे. त्या एसटीने म्हसाला पोचलो. तिथे संक्रातीनिमित्त म्हसोबाची आठवडाभराची जत्रा होती. आम्ही म्हसामध्ये पोचलो तेव्हा पावणेदहा झाले होते. जत्रेतले स्टॉल्स त्यांच्या मालकांप्रमाणेच झोपेत असावेत. 'जत्रेमध्ये येताना फिरू' असा विचार करून म्हसाहून देहरीला जाणार्‍या रस्त्यावर लागलो. ह्या रस्त्यावर समोरच एक सुंदर डोंगर दिसत होता. धुकेजलेल्या हवेमुळे तो ओळखता आला नाही (याबद्दल मी स्वतःला नंतर भरपूर दोष दिला). डावीकडे गोरख-मच्छिंद्रगडाचे दोन सुळके दिसत होते. 'छोटाच दिसतोय गड. होईल लवकर बघून' आम्ही मनात हिशेब मांडला. म्हसोबा यात्रेमुळे 'रापम'ची मिनिबस सेवा तासातासाला सुरू होती. त्या बसने देहरी गाठले.

हमीदभाईंच्या घरी गेलो. चहा-नाष्टा केला. त्याच्या व्हरांडा कम ओटी कम फरसबंदी अंगणात एक मातबर वाटणारे गृहस्थ बसले होते. त्यांच्याशी गप्पा मारता मारता देहरीचा इतिहास समजला. त्यांच्या मते, इसवीसनाच्या बाराव्या शतकात, त्या गावाचे नाव "उंबर" असे होते. महसूलकार्यालयात अजूनही देहरीचा उल्लेख उंबर असाच सापडतो. ­घाटावरून खाली उतरण्याचे अनेक मार्ग तत्कालिन उंबरगावाच्या आसपास होते. नंतरच्या काळात त्या घाटवाटा लुप्त झाल्या. त्या वाटा कोकणात उतरल्यावर लागणारे साडेतीन लाख चुला (चुला = चूल किंवा घरे या अर्थी) असलेले हे गाव होते. तेराव्या शतकात उत्तरेकडून मुसलमानी आक्रमणांत गावाचे नाव बदलून दहलीज (उंबर्‍याला उर्दू प्रतिशब्द) झाले आणि त्याचा अपभ्रंश होऊन देहरी झाले. त्या काळात देहरीमध्ये साडेदहा लाख वस्ती होती (साडेतीन गुणिले तीन - नवरा,बायको आणि एक अपत्य या हिशेबाने) याचंच मला नवल वाटत होतं. "एवढी लोकसंख्या सध्याच्या कल्याणचीही नाहीये" - ते मातब्बर गृहस्थ म्हणाले. "आता आम्ही इथले जुने, त्यामुळे आम्हाला माहित आहे गावची. मी सरपंच आहे या गावचा आणि (हमीदकडे बोट दाखवून) हे उपसरपंच!". मी मनातल्या मनात जागीच उभा राहिलो! हायला! गावच्या चक्क सरपंच-उपसरपंचांची ओळख झाली आणि तीही गावात शिरल्या शिरल्या!

मग त्यांची परवानगी वगैरे घेऊन गडाकडे निघालो. थोडंसं अलिकडे येऊन डाव्या हाताला एक वाट मंदिराकडे जाते.




तिथून एक ठसठशीत पायवाट मधलं एक टेपाड चढून पलिकडे थोडंसं गोरखगडाच्या पायथ्याला खाली उतरते. दुपारी अकराच्या उन्हात सुरू केल्यामुळे अर्ध्याच तासात माझा आणि मयूरचा 'डॉबरमॅन झाला'. (डॉबरमॅन होणे - दमल्यामुळे जीभ बाहेर काढून श्वास घेणे). पण वाट अगदी सोपी आहे. "हे दोघे ट्रेकमध्ये असले की हमखास वाट चुकते" असा लौकिक असलेले आम्ही दोघेच या ट्रेकमध्ये असूनही एकदाही वाट चुकलो नाही, इतकी वाट सोपी आहे! गडाच्या दिशेने चालत रहायचं मात्र!






टेपाड उतरून पलिकडच्या सोंडेवर उतरून गडाच्या दिशेने वीस-एक मिनीटं चाललं की एक पणती येते. तिथून डावीकडे वरच्या दिशेने गोरखगडाकडे वाट जाते. तर सरळ वाट समोरच्या डोंगराच्या कुशीतल्या भवानी मंदिराकडे जाते. जाताना दिसलेला सुंदर सिद्धगड आणि त्याच्या अलिकडे साखरमाची डोंगराची सोंड -


कातळामध्ये कोरलेल्या पायर्‍यांचा पहिला चाळीस एक फुटांचा भाग आहे. त्या भागाच्या शेवटी गोरखगडाचा छोटा पण सुंदर दरवाजा आहे.




आम्ही त्या दरवाजात फोटो काढत असताना गावातून देवाला नारळ वहायला चाललेली दोन तरूण मुले आली - दिनू आणि प्रशांत. आणि मग खाली उतरपर्यंत आम्ही एकत्रच होतो. तिथून वर गेलं की गुहा लागतात. नवनाथांपैकी गोरक्षनाथांनी इथे समाधी घेतली अशी आख्यायिका सरपंचांनी सांगितली होती. म्हणून हा गोरखगड! गुहा प्रशस्त आणि शांत असून आत मुक्कामाची, स्वयंपाकाचीही सोय होते.




गुहेतून दिसणारा मच्छिंद्रगड -


गडाच्या माथ्यावर जाण्यापूर्वी आम्ही गडाला प्रदक्षिणा मारायचं ठरवलं. मागच्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन छोटेखानी गुहा आहेत. (ही 'कपलगृहे' असावीत - इति प्रशांत!) ती गुहा साधारण १०-१२ फूट उंचीवर असल्यामुळे मयूर-दिनू-प्रशांत यांनी प्रस्तरारोहणाची हौस भागवून घेतली. धडपडत, पाय रोवत वगैरे चढले आणि उतरताना तीच कसरत करून सुखरूप खाली आले. मला कंटाळा आल्यामुळे मी खालूनच त्यांची मजा बघत बसलो होतो.





त्यानंतर पुन्हा आम्ही गुहेपासून वर जाणार्‍या पायर्‍यांपाशी आलो. गोरखगडाचा अवघड म्हणता येईल असा पॅच इथून सुरू होतो. सरळसोट कातळामध्ये खड्या पायर्‍या आहेत.


मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, कातळातच कोरून काढलेल्या पूर्ण वर्तुळाकार खाचा! सर्वसाधारणपणे, चार बोटांची पेरे मावतील, इतक्या खाचा बघितल्या होत्या. इथे मात्र, एक छोटा अँकरही आरामात बसेल इतक्या आकाराच्या खाचा पाहिल्या.


चढताना पाठीमागे थेट दरी असली तरीही या खाचांच्या आधारे हा पॅच कोरड्या ऋतूमध्ये अगदी सोपा आहे. पावसाळ्यात त्या पायर्‍यांवर पाणी वाहत असल्यामुळे आणि कातळ गुळगुळीत होत असल्यामुळे गुहेपासून वर जाता येत नाही, असे ऐकले. (आता पावसाळ्यात गोरखगड करायचा आहे!)

वर गोरक्षनाथांचे छोटेसे मंदिर आहे. गडाचा माथा साधारण बाराशे ते पंधराशे स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा (इतकाच) आहे. आजूबाजूचा नजारा केवळ अप्रतिम! डावीकडे नानाचा अंगठा दिसल्यावर तर मी एकदम उत्तेजितच झालो. कारण सह्यांकन २०११ च्या वेळी याच भागात चार दिवस पायपीट झाली होती. आणि गोरखगडावरून काही क्षणात पुन्हा 'सह्यांकन' फिरून आलो. डावीकडून नाणेघाट, अलिकडे जीवधन-वानरलिंगी, पायथ्याचं सिंगापूर गाव (अंदाजाने), आंबोली घाटाची खाच, सर्वात उंच दिसणारा ढाकोबा डोंगर (दुर्ग दिसला नाही), त्याच रेषेत अहुप्याचा कडा, अहुपे पठाराचा माथा, त्याच्या अलिकडच्या डोंगरावर आत भट्टीचं रान, साखरमाचीचा पुढे आलेली सोंड, दमदम्या, राजाची लिंगी, सिद्धगड! सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून काहीसा अलग असल्यामुळे गोरखगडावरून ही रांग नुसत्या डोळ्यांनीही दिसते.




पायथ्याचे, जिथून वाट सुरू होते, ते मंदिर -


मच्छिंद्रगड -


मच्छिंद्रगड आणि मागे खोपिवली गाव -


पंधरा-वीस मिनिटे थांबून खाली उतरलो. आता दरी समोर होती -


दोन केव्हाच वाजून गेले होते. झपाझप उतरून तासाभरात पायथा गाठला. हमीदभाईंकडे गेल्यावर भात-भाकरी-रस्सा-कांदा-पापड असं फर्मास पान समोर आल्यावर 'आता न जेवता निघू, नाहीतर मयूरला पुण्याची ट्रेन गाठायला उशीर होईल' हा आधी केलेला विचार विसरूनच गेलो.

मिनिबसने म्हसाकडे येताना मी सिद्धगडच बघत बसलो होतो. मला गड बघतच बसावं वाटत होतं!सिद्धगडाला वळसा घालून रस्ता असल्यामुळे गडाची चतकोर प्रदक्षिणा झाली.


म्हसाच्या अलिकडे, सिद्धगडाचा डोंगर बाजूला झाला आणि थेट दूरवर नजर गेली - पदरगड! आह!! "नानाचा अंगठा-नाणेघाट-जीवधन-ढाकोबा-अहुपे टोक-साखरमाची-दमदम्या-सिद्धगड-भीमाशंकर-पदरगड-" असला विस्तीर्ण नजारा एका रेषेत दिसला. अजून काय हवं?

म्हसाच्या जत्रेमध्ये गर्दी व्हायला लागली होती. मी फोटो काढत, स्टॉल पाहत चाललो होतो. उंच पाळणा बघून त्यात बसण्याची बालइच्छा जागी झाली! मयूरने "कर्जतहून प्रगती नाही निदान डेक्कन क्वीन तरी मिळू दे" असं विनवत ती इच्छा मोडून टाकली! एके ठिकाणी उसाचा रस प्यायलो आणि त्या रसवाल्या जोडप्याचा फोटो काढला. तो त्यांना दाखवल्यावर त्यांच्या फर्माईशीनुसार त्या मावशी मयूरला रस देतानाचा एक फोटो काढला. आणि मग त्यांनी आमच्याकडून रसाचे पैसे घ्यायलाच नकार दिला! मग त्यांची समजूत काढली आणि पैसे दिले.


पुढे एके ठिकाणी तसबिरीचा फोटो घेतल्यावर त्या विक्रेत्याने त्याच्यासकट सोबतच्या तिघांचा फोटो घ्यायला सांगितलं. पण इथे मामला वेगळाच होता! कारण फोटो घेतल्यावर त्या बाईने 'उद्या पेपरात येईल ना हा फोटो?' असं विचारलं.

म्हसाहून मयूर कर्जतला गेला (त्याची डेक्कन क्वीन चुकली आणि त्यानंतर 'हात दाखवा ट्रेन थांबवा' उर्फ सह्याद्री एक्प्रेसने त्याला घरी पोचायला पावणेअकरा झाले) आणि मी म्हसा-मुरबाड-कल्याणमार्गे मुंबईत आलो.

फॉर अ चेंज, वाटा न चुकताही ट्रेक करावा! असे ट्रेकही आनंद देतातच की! आता एकदा गोरखगड ते सिद्धगड असा मुक्कामी ट्रेक करायचा आहे!

- नचिकेत जोशी

Wednesday, January 11, 2012

सह्यांकन २०११ - भाग ६ (अंतिम) : पदरगड आणि निरोप

आयुष्यात जपून ठेवावे असे क्षण अधूनमधूनच का येतात? सुरूवातीला वाटलेल्या 'पाच दिवसांचा एवढा मोठा ट्रेक जमेल का' या धाकधुकीचं 'मोहीम अजून एखादा दिवस सुरू राहिली तर किती छान होईल?' अशा दिलासा देणार्‍या आत्मविश्वासात रूपांतर कधी झालं? उद्या सकाळी जाग येईल तेव्हा काय वाटेल? इतके मोकळे श्वास पुन्हा कधी घ्यायला मिळतील? एंडलेस क्वेश्चन्स.... जाग आली तेव्हा बाहेरही अंधार होता, आणि आतही हिरमुसलेली सावली पडली होती. कारण काहीच नाही, रानवाटांच्या सोबतीची सवय झाली की मग पुन्हा शहरी 'विराण'वाटांत शिरताना जीव हुरहुरतो.

बल्लूने पीटीला सुटी दिलेली असूनही आम्ही न सांगता, न बोलावता आपणहून पीटीसाठी जमलो. पूर्ण दिवसाच्या भ्रमंतीकरिता शरीराला हलका व्यायाम आवश्यक असतो हे पटल्यामुळे असेल किंवा उद्यापासून हे करणार नाही, हे जाणवल्यामुळेही असेल. सकाळी विद्या'काकू' व त्यांचा भाचा जय (उर्फ यत्ता आठवी) पुण्याला निघून गेले. आता आम्ही केवळ १५ (लीडर्ससह) जण उरलो होतो.

वेळापत्रकानुसार दोनवेळा चहा, मिसळ-पावचा नाष्टा, पॅक-लंच घेऊन बरोब्बर साडेसातला निघालो. आजच्या वेळापत्रकात होते - पदरगड उर्फ कलावंतिणीचा महाल व गणेश घाटाने उतरून खांडस येथे सांगता. खांडसच्याही पुढे जिथपर्यंत रस्ता येतो, तिथे चार वाजता परतीची बस येणार होती. त्यामुळे पदरगड बघून तीन वाजता उतरायला सुरूवात केली असती तरी गणेश घाटाने वेळेत पोचलो असतो.


भीमाशंकर सोडून जंगलात घुसल्यावर सकाळचे सर्व भावनिक विचार नाहीसे झाले आणि जणू काही मोहिमेचा पहिला दिवस असल्याप्रमाणेच वाटचाल सुरू झाली. नागफणीचा डोंगर डाव्या हाताला ठेवून एक वाट वळसा घालत खाली उतरते. फार सुंदर वाट आहे ही! तास-दीड तास चालून आम्ही एका पठारावर आंब्याखाली आलो. हा आंबा खूप प्रसिद्ध आहे. कारण तिथून तीन वाटा फुटतात. उजवीकडची पदरवाडी गावात जाते. मधली शिडी घाटाकडे जाते आणि सर्वात डावीकडची पठार ओलांडून पदरगडाकडे व तशीच पुढे गणेश घाटाकडे जाते.






पदरगडाकडची वाट सुंदर आहेच. कसा निघाला माहित नाही, पण गप्पांचा विषय होता, 'मधुबाला, स्मिता पाटील आणि इतर जुन्या हिंदी अभिनेत्री'! त्यामुळे वाट अधिकच सुंदर झाली हे सांगायला नकोच! मग ओघानेच मराठी चित्रपटांबद्दलही एकमेकांत ज्ञानवितरण झाले. लांबा आणि बल्लू पुढे चालत होते. त्यांनी शेकरू (भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी उडती खार) पाहिली आणि फोटॉसाठी मला हाका मारल्या. त्या शेकरूनेही त्या हाका ऐकल्या असाव्यात आणि फोटॉच्या भीतीने धूम ठोकली असावी! माझी मात्र प्राणी टिपण्याची संधी हुकली! कारण संपूर्ण मोहिमेत माकड वगळता एकाही दोन अथवा चार पायांच्या, चालत्या अथवा सरपटत्या प्राण्याने आम्हाला दर्शन दिले नव्हते.



पठार ओलांडत तासभर चालल्यावर एका विहीरीपाशी आलो. तिथून एक वाट डावीकडे पदरगडाकडे जाते. बल्लू इथे आमच्या सॅक्सवर 'पहारा' देत थांबणार होता. पदरगडाची चढाई आम्ही सुळका चढणार नसल्यामुळे खरंतर टेक्निकल नव्हती. पण सेफ्टी म्हणून सर्वांना बोलाईन बांधण्यात आली. पहिल्या दिवशी दिलेल्या स्लिंगचा अखेर बोलाईनच्या निमित्ताने सदुपयोग झाला. अहुप्याच्या कँपवर अनिकेतने बोलाईन कशी मारावी ते आपणहून दाखवून सुद्धा मला गाठी मारता येत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले! लोक कुठले दोर कुठून कुठून काढून-घालून शेवटी एक फस्क्लास न सुटणारी गाठ बांधतात याचं मला नेहमीच कौतुक वाटतं! असो. १-२ पिट्टू सॅक्स घेतल्या आणि प्रसादच्या मागून निघालो. प्रसाद म्हात्रे हा टेक्निकलसाठी खास बोलावलेला पाहुणा होता. माझी रॉकपॅचेस मधला वावर बघून 'तयार वाटतोस! एकदा ये बोरिवलीला, एकत्र क्लाईंबिग करू' असे आमंत्रण देऊन गेला. कातळ पाहिले की मला एकदम आपलं वाटायला लागतं, नसलेल्या बारीक बारीक खाचाही दिसायला लागतात आणि हा चिरंतन वृद्ध, प्रेमळ सह्याद्रीबाबा मला स्वतःच्या अंगावर मायेने खेळू देईल, असं काय काय वाटायला लागतं...

वीस एक मिनिटे चालल्यावर जिथे चढ सुरू होणार होता, तिथल्या एका मोठ्या कातळावर नारळ फोडला आणि 'ही चढाई-उतराई यशस्वी होऊ दे' असे डोंगरबाबाला साकडे घातले. सर्व भटके लोक डोंगरापुढे मान झुकवून स्तब्ध उभे होते हे दृश्य मला तरी फार भावले.




पुढचे दोन तास हे संपूर्ण मोहिमेमधले सर्वात थरारक क्षण समजायला हरकत नाही. जेवणाच्या शेवटी पेशल डिश असावी तसा हा अनुभव होता. सरळसोट चढ, एका बाजूला एक्स्पोजर, त्यात स्क्री असा मामला होता. (पण मी मागे भैरवगडावर जाऊन आल्यामुळे मला तरी चौथीची परीक्षा पास झाल्यावर बालवाडीत बसल्यासारखं झालं होतं!)

२०२० फूट उंचीच्या पदरगडाचे वैशिष्ट्य म्हणजे वाटेमध्ये एक चिमणी लागते. हा एक अरूंद घळीचा प्रकार आहे. चिमणीतून जाताना पाठ मागच्या कातळाला आणि गुडघे दुमडून पावले समोरच्या कातळाला टेकवायची आणि एकदा पाठ-एकदा पाऊल असे सरकवत वर चढायचे किंवा खाली उतरायचे.






बॅचमधल्या सर्वांचा विचार करून लीडर्सलोकांनी त्या चिमणीमध्ये एक कृत्रिम शिडी लावून टाकली आणि चिमणी त्यातल्या त्यात सोपी केली. मी चढताना शिडीवरून गेलो आणि उतरताना मात्र (लांबा जवळपास नाही हे पाहून) मागेपुढे घासटत उतरलो. अर्थात माझ्यापुढे आमच्यासोबत असलेला स्थानिक गावकरी होताच.


पदरगडावर बघायला काहीच उरलेले नाही. पण एक अतिशय मोक्याच्या जागी असलेला राखणदार म्हणून पदरगड बघता येईल. पदरगडावर एक सुंदर गुहा आहे. त्यात मुक्काम करता येऊ शकतो. जवळच पाण्याचे टाके आहे.


वर पोचलो.


त्या सुळक्याच्या डावीकडून -


गुहेकडे जाणारी वाट -


गुहेमध्ये शंतनु आणि सचिन - (समोर खाली दिसणार्‍या झाडीत शिडी घाट आहे)


पदरगडावरून दिसणारा शिडी घाट -


भीमाशंकर-नागफणीचे डोंगर -


अतिशय सुंदर, रांगडी वाट येंजॉय करत पदरगड उतरलो तेव्हा फक्त पावणेदोन वाजले होते. म्हणजे आम्ही वेळापत्रकाच्या पुढेच होतो. (आता जेवायला निवांत वेळ मिळाला असता!) विहीरीपाशी पंगत मांडली.


ताक विकायला आलेला एक गावकरी भेटला आणि काही क्षणांत त्याची ताकाची कळशी रिकामी झाली! इथे लीडर बल्लूने आमचा निरोप घेतला. आमचा बॅच लीडर आता पुढचे चार दिवस भीमाशंकरचा कँपलीडर म्हणून काम करणार होता. स्लिंग्स 'चक्रम'च्या आयोजकांना परत दिल्या आणि अडीच वाजता आम्ही 'सह्यांकन २०११' मधला शेवटचा उतार उतरायला सुरूवात केली.

गणेश घाटाची वाट आजच्या आतापर्यंतच्या वाटांच्या तुलनेत प्रशस्त होती. पदरगडाच्या पठारावरून गडाला मागे ठेऊन वळणं घेत वाट उतरते.


वाटेत डोंगरांच्या कुशीत गणपतीचे एक मंदिर आहे. तिथे थोडावेळ थांबलो.


तिथून उतरताना डबल बोअर बंदुका घेऊन जंगलात प्राणी मारायला चाललेले पाच-सहा जण दिसले. त्यांना पाहून मला गणेश घाटामध्ये संध्याकाळच्या वेळी घडलेल्या लूटमारीच्या ऐकलेल्या कहाण्या आठवल्या. लांबाला त्याबद्दल विचारल्यावर 'ट्रेकर म्हणवणार्‍या माणसाला सूर्य मावळल्यावर या वाटेने उतरू नये हे कळण्याइतकी अक्कल पाहिजे ' असं लांबाष्टाईल उत्तर देऊन सगळेच प्रश्न संपवून टाकले.

मग अर्धा पाऊण तास उतरलो असू. बसपर्यंत पोहोचण्यासाठी अजून किती चालावे लागेल असा विचार करत असतानाच पुढ्यातली वाट अचानक उघडली आणि ध्यानीमनी नसताना समोर रस्ता आणि बस दिसली! संपूर्ण मोहिमेमधला तो सर्वात सुखद धक्का होता! अगदी अगदी खरं सांगायचं, तर गेले पाच दिवस इतके फिरलो, भटकलो, दरवेळी पुढे जायची ओढ असायची. पण ती बस दिसल्यावर मात्र तिथपर्यंतची पन्नास पावले अजिबात टाकू नयेत, असं फार फार वाटून गेलं...यथावकाश सर्व १३ लोक्स व लांबा बशीपाशी पोचले व एक लास्ट ग्रुप फोटोसाठी सर्वांना उभे केले.




मग खांडसमध्ये चहा-वडापाव, तिथून निघाल्यावर बसमध्ये एकमेकांचे इमेलपत्ते घेणे, घरी पोचल्यावर तासभर आंघोळ करण्याच्या गप्पा, फोटो पाठवण्याचे, गटग करण्याचे वायदे, आणि क्षणाक्षणाने निरोप घ्यायची जवळ येणारी वेळ...... बाकी काहीच नाही!

डोंगरदर्‍यांमधला क्षणिक मुक्कामानंतर बिनपंखांच्या पक्ष्यांचा प्रवास आता पुन्हा आपापल्या घरट्यांच्या दिशेने सुरू झाला होता...

आजचा हिशेबः
२४ डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे ८ ते ९ किमी
वैशिष्ट्ये - सलग तिसर्‍या वर्षी योगायोगाने तोच दिनांक (२४ डिसेंबर) ट्रेकमध्ये घालवल्याचं एक समाधान वगैरे! पदरगडाची सुंदर चिमणी, रॉकपॅच. तेवढा चढ सोडला, तर नुसता उतारायचा प्रवास. 'सह्यांकन' संपताना मनात केलेल्या हिशेबात उरलेली केवळ - 'जमा'! 'खर्च' नगण्यच!

**************

एक आनंदयात्रा संपली. हा शब्दशः ट्रेक नव्हता. उत्कृष्ट संयोजनामुळे सुसह्य ठरलेली ही एक मोहिम होती. हाही अनुभव मोलाचाच! शिखराकडे पोचण्याची घाई करण्यापेक्षाही वाटेवर मिळणारी अनुभवांची शिदोरी बांधून घेण्याचे हे दिवस आहेत! 'मी'ला मान मिळण्याआधी त्याचा दर्जा वाढावा यासाठी सुरू असलेली ही प्रामाणिक मेहनत आहे. सांगण्यासारखं, लिहिण्यासारखं जे जे होतं, ते सांगून झालंय. तुम्ही इतक्या चिकाटीने हे सगळं वाचलंत, त्याबद्दल, प्रिय वाचकहो, मनापासून आभार! दरवेळी तुमचा "पुढचा भाग कधी?" हा प्रश्न दडपण आणणारा असला तरी हवाहवासा असाच होता. 'सह्यांकन २०११' मध्ये जितकं फिरलो, जगलो, ते वाचकाच्या डोळ्यापुढे उभं राहिल इतपत तरी लिहावं हा एकमेव प्रयत्न यामागे होता. संपूर्ण मोहिमेमध्ये आम्ही एकमेकांची व संयोजकांचीही जी यथेच्छ थट्टा केली, त्यातला काहीकाही भाग इथे प्रसंगोचित वाटला आणि मोहिमेइतकंच जड आणि दीर्घ लिखाण हलकंफुलकं व्हावं म्हणून लिहीला गेला. एखादा शब्द भरीचा झाला असल्यास क्षमा! गांभीर्याचं वातावरण असेल तर अशा लांबलचक मोहिमा कंटाळवाण्या होतात. 'सह्यांकन २०११' त्याला पूर्ण अपवाद होती!

साडेतीन हातांच्या मर्यादेमध्येही अमर्याद शक्ती लपलेली असते आणि ती सोबत्यांना देत-घेत पुढे जाण्यात प्रवासाची खरी मजा असते हे पुन्हा उमजलं. मिळालेला वेळ (सोप्या शब्दात त्याला 'आयुष्य' म्हणतात) सार्थकी घालवणं म्हणजे काय करणं, याची नवी उत्तरे मिळाली. 'कुठलीही वाट चुकीची नसते, ध्येयाकडे जाणार्‍या वाटेला जाऊन मिळणं हे सगळ्यात महत्वाचं' हे डोंगरातल्या चुकलेल्या वाटांनीच किती सहजपणे शिकवलंय! हे सारं संचित आता मनाच्या असंख्य वाटांनी बाहेर यायला उत्सुक असलं तरी माझ्या शब्दांमध्ये मावणारं नाही! भरभरून सांगावं, उलगडून दाखवावं आणि दरवेळी नवीन शिकत राहावं असं बरंच काही या प्रेमळ सह्याद्रीबाबाच्या घाटा-वाटांमध्ये लपलंय. ते अनुभवण्यासाठी पुढच्या वेळी अशाच कुठल्यातरी कड्या-कातळावर, सांदी-कपारीखाली, ओढ्या-नाल्यांमध्ये भेटू!

तोपर्यंत... शुभास्ते पन्थानः सन्तु |

(समाप्त)
- नचिकेत जोशी


Tuesday, January 10, 2012

सह्यांकन २०११ - भाग ५ : सिद्धगडमाची ते मुक्काम भीमाशंकर व्हाया भट्टीचे रान

आजूबाजूला कितीही 'घोरासूर' पसरलेले असले तरी मोहिमेत सुदैवाने त्यांच्यामुळे एकदाही माझी झोपमोड झाली नाही. बरोब्बर पाच वाजता आपोआप जाग यायची आणि उठायचा सर्वप्रथम प्रचंड कंटाळा यायचा. मग कालचा दिवस कसा गेला, आज किती चाल आहे हे आठवून हळूहळू प्रोसेसिंग सुरू व्हायचं. एकवेळ बेड-टी मिळाला नाही तरी चालेल पण 'साडेसहाच्या आत शूज घालून आणि सॅक पॅक करून तयार असलेलं बरं' या निर्णयाला पोचलो की मग आपोआप स्लीपिंग बॅग उघडली जायची आणि आतून अस्मादिकांचा देह बाहेर पडायचा. थोडक्यात, तीन दिवसांत एक मस्त रूटीन बसलं होतं.

आदल्या दिवशी झोपण्यापूर्वी, मुक्कामाची व्यायामशाळा कँपच्या मुख्य ठिकाणापासून बाजूला असल्यामुळे, 'सर्वांना साडेपाच वाजता तिकडे घेऊन ये' अशी आज्ञा बल्लूने मला दिली होती. त्यामुळे लीडर- को लिडर नंतर लीडर इन प्लेस म्हणून त्या दिवसापुरता मी को को लीडर उर्फ कोको झालो होतो. सर्व मोठ्यांना चहासाठी उठवण्याचे सबुरीचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर मग मात्र मी थेट पद्धत स्वीकारली आणि चहाची किटलीच कँपातून उचलून व्यायामशाळेत आणून ठेवली! (सगळे खूश झाले हे लिहायला हवंच का?)

अचानक, डाव्या गुडघ्याच्या डाव्या बाजूचा स्नायू दोन वर्षांपूर्वीच्या तोरणा-रायगडमध्ये जसा मधूनच दुखायला लागला होता त्याचे पूर्वसंकेत देऊ लागला आणि मी टेन्शनफुल झालो! अजून दोन पूर्ण दिवस बाकी होते! भट्टीच्या रानातील सपाटीचे टेंशन नसले तरी त्याआधी गायदरा घाट चढायचा होता. गुडघा आत्ता दुखत नसला तरी तो केव्हाही दुखू शकत होता या शक्यतेमुळे गायदर्‍यापर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकणे हाच एकमेव उपाय होता.

उपमा खाऊन आणि पॅकलंच घेऊन बरोब्बर साडेसातच्या ठोक्याला सिद्धगडमाचीचा निरोप घेतला. जिथे जिथे एखाद्या मोठ्या पायरीइतकी उंची चढायची अथवा उतरायची असेल, तिथे तिथे त्याच्या आसपासच्या छोट्या दगडांचा आधार घेत ती उंची कमी करायची आणि मग पाऊल टाकायचे, अशी सोपी, नेहमीची पद्धत मी वापरली. गायदर्‍याच्या पायथ्यापर्यंत तर मी इतका काळजीने चालत होतो, की ते स्टेपींग माझ्या मागून चालणार्‍या आठवलेकाकांच्याही लक्षात आले. आणि त्यांनी, 'काय पायाची काळजी घेतोयस का?' असं विचारून टाकलं! ('मी तुझी सॅक घेऊ का' असं मात्र पूर्ण मोहीमभर कुणीही कुणालाही चुक्कुनही विचारलं नाही!)

साडेआठ - गायदरा पायथा आणि सव्वा नऊ - गायदरा टॉप! कोंडवळ गावात भीमाशंकरची जीप दुपारी चार वाजता येणार होती. त्यामुळे जवळजवळ आठ तास वेळ हातात होता. भट्टीच्या रानातून कोंडवळचे अंतर दोन-अडीच तास होते. वेगात जाणार्‍या बॅचला आवरायचे लीडर्सचे कौशल्य कौतुकास्पदच होते. दुसरी बॅच आमच्याच कालच्या वाटेने सिद्धगडमाचीकडे जाणार होती. त्या बॅचची वाट पाहत वाटेवरच्या काल येताना बसलो त्याच विहीरीपाशी (वेळ काढत) बसायचे असे लीडर्सनी ठरवले.



त्या विहीरीपर्यंत पोचायला फारतर दहा मिनीटे लागली असती आणि आमच्या कालच्या अनुभवावरून दुसरी बॅच एवढ्या लवकर तिथे पोचणे शक्यच नव्हते, म्हणून आम्ही गायदरा टॉपवरच मैफल जमवली. हे एक बरे होते! बॅचमध्ये एक से एक नमुने भरलेले असल्यामुळे, चालताना मुख्यत्वे लांबामुळे आणि थांबल्यावर इतरांमुळे विश्रांतीच्या जागा हसण्या-खिदळण्याने जिवंत व्हायच्या. after all, एखादा ट्रेक म्हणजे नुसतीच वेळेमागे केलेली पायपीट थोडीच असते? डोंगराच्या कुशीत, पायवाटेशेजारी बसून रानफुलांच्या सान्निध्यात ऐकलेली एखादी कविता, एखादं गाणं, एखादा पोट फोडून हसवणारा किस्सा ट्रेकला अविस्मरणीय बनवून जातात! सुदैवाने, असे योग या बॅचच्या नशिबात बर्‍याचदा आले. सतत २४x७ आमचं तोंड सुरू असायचं - दिवसा बोलण्यासाठी आणि त्या 'कष्टां'मुळे रात्री घोरण्यासाठी!

पावणे दहा वाजता ती मैफल थांबवली आणि पाणी पिऊन विहीरीकडे निघालो. विहीरीजवळ यायला फारतर दहा वाजले असतील. येऊन पाहतो, तर तिथे दुसरी बॅच आमच्या आधीच पंधरा-वीस मिनिटे येऊन पोचली होती! हा धक्काच होता! याचा अर्थ, आमच्यापेक्षा पटसंख्येने अधिक असूनही त्यांचा चालण्याचा वेग आमच्याइतकाच होता. तो धक्का नव्हताच हे स्वतःलाच दाखवण्यासाठी मग त्यांनी ढाकोबा कँपवरून आणलेले काही पराठे आम्हीच खाल्ले. थोडावेळ विहीरीपाशी रेंगाळलो. कशावरून निघाला ते माहित नाही, पण विहीरीजवळच्या चर्चासत्राचा विषय होता - 'कुत्रा गाडीच्या चाकात सापडून झालेले अपघात तसेच रेबिज झाल्यास होणारे परिणाम'! सहभागी वक्ते - मी सोडून सगळेच! कारण आजपर्यंत एकही कुत्रा अथवा कुत्री मान अथवा पाय वर करून एकदाही माझ्या अथवा माझ्या बाईकच्या वाट्याला गेलेले नाहीत! (मीही त्यांच्या वाट्याला गेलेलो नाही!) मी त्यांच्या गप्पा ऐकत रिकाम्या आकाशातील कापसासारख्या दिसणार्‍या ढगांचे पडल्या पडल्या फोटो घेण्यात दंग होतो. त्यातच आदल्या दिवशी रात्री आमच्यापैकी एकाने 'त्यांच्या जेवणाची ताटली धुवायच्या आधी, अहुपेपासून आम्हाला सोबत केलेल्या एका कुत्र्याला चाटून साफ करायला दिली होती' हे आठवून सांगितले. एतेन विषय कंटिन्युड!! तात्पर्य, विषयांना तोटा नव्हता.




अखेर, अर्ध्या तासाने बल्लूने मोहीम पुढे नेण्याचा आदेश दिला. लगेच सतरा ट्रेकींग सॅक्स आपापल्या मालकांच्या पाठीवर निवांत बसून पुढे निघाल्या. इथून पुढची वाट अगदीच सपाट, सरळ आहे. इतके दिवस अनवट वाटांनी सह्याद्रीत फिरल्यावर ही वाट म्हणजे राष्ट्रीय महामार्ग असल्याचाच भास होत होता. दमदम्याच्या डोंगरावरून भट्टीच्या रानातून दक्षिणेकडे रमतगमत ही वाट जाते.




(अवांतरः मागच्या आठवड्यात पुण्याला जाताना ट्रेनमध्ये मी फोटो एडिट करत होतो. माझ्या शेजारच्या माणसाने ते पाहून - 'हे अहुप्याचे फोटो ना?' असं विचारलं. मी खूश! मग आमच्या गायदरा, अहुपे, आणि तिकडच्या रानवाटा यावर गप्पा झाल्या. त्याच्या नोकरीचं गाव कोंडवळ फाट्यापासून मंचरच्या दिशेला तीन किमी वर होते. तो म्हणाला - 'भट्टीच्या रानामध्ये बिबट्यांवर लक्ष ठेवायला एका पाण्यापाशी एक टॉवर आहे. मला एक रात्र तिथे मुक्काम करायचाय.' यावर मी त्याला खालील फोटो दाखवला. तो खूश!)


हां, तर भट्टीच्या रानातून सर्वात शेवटी मी, पुण्याच्या विद्याकाकू, माहीम, मुंबई-१६ चे विनायक, आणि नाशिकचे लहू डफळे (यांचं यंदाचं ५ वं की ६ वं सह्यांकन होतं) आरामात गाणी म्हणत येत होतो. आम्हाला वेळेचे अजिबातच बंधन नव्हते. त्यामुळे वाटेतल्या एका पाण्याजवळच्या पुलावर जेवणाची पंगत बसवली. पॅक-लंचमध्ये बटाटा भाजी व पोळी होती. प्लस आमच्याकडे चटणी, जॅम (तीन प्रकारचा बरं का!) आणि तोंडी लावायला भरपूर गप्पा होत्याच! जेवण झाल्यावर पुन्हा तिथे मैफल जमली. सुरूवातीचा विषय होता - 'देव आनंदची गाणी व पृथ्वीराज कपूर यांची ड्वायलॉक फेक'! तिथून तो विषय कुठच्या कुठे गेला हे सांगायला नकोच! 'काकूं'नी येतायेता बनवलेला रानफुलांचा गुच्छ आमच्या दोन प्रेमळ, तत्पर लीडर्सना देण्याचा कार्यक्रमही तिथे पार पडला. एव्हाना, आमचं १९ जणांच एक छोटंसं कुटुंबच तयार झालं होतं ना!


अखेर, पुन्हा तासभर चालून गावंदेवाडीपाशी आलो. तिथे एका गवताच्या गंजीखाली थोडावेळ विश्रांती घेतली. आणि 'पटकन काढता येईल अशी शूलेस कशी बांधावी' यावर लांबाने माझ्या शूजवर प्रात्यक्षिक करून दाखवलं. माझा गाठ न मारता येण्याचा जुना प्रॉब्लेम असल्यामुळे मी ती लेस अजूनही तशीच ठेवली आहे, हा भाग अलाहिदा!


तिथून दीड-दोन किमी चालून कोंडवळला पोचलो. तिथे आमच्यासाठी दोन जीप्स घेऊन विलासदादा (पहिला दिवस - सिंगापूर मुक्काम - पोह्यांचा नाष्टा; आठवला?) आला होता. जीपमधून भीमाशंकरच्या कँपला पोहोचलो तेव्हा फक्त चार वाजले होते.


इथे आमच्या बॅचमधल्या एका मद्रासी (की तेलुगु?) जोडप्याने, आमचा निरोप घेतला. संपूर्ण मोहिमेत सर्वांपासून काहीसे अलग राहिलेले हे दोघेच. बाकी सर्वजण वय, भाषा इ विसरून सहज मिसळून जात असतांना यांनी मात्र आपला स्वतंत्र बाणा कायम ठेवला होता. हिमालयात ट्रेक करतांना वापरतात तशा स्किईंग स्टीक्स घेऊन त्यांनी अख्खा ट्रेक केला. वाट माहित असो वा नसो, ते सतत सर्वांच्या पुढेच असायचे. मग लांबाने त्या स्टीक्समध्ये प्रचंड ताकद आहे असे सांगितले आणि त्या दिवशीच्या भ्रमंतीमध्ये त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाणार्‍या प्रत्येकाला त्या स्टीक्सला नमस्कार करायची आज्ञा केली! (लांबाच तो!) गंमत म्हणजे, त्यातल्या बाईसाहेबांनी, पळू गावात सर्वात पहिल्या ओळखपरेडच्या वेळी, पूर्ण बॅचमध्ये चेहर्‍यावरून वयस्क दिसणार्‍यांनीही स्वतःचं वय सांगितलेले नसताना नावानंतर ताबडतोब वयच जाहीर केलं! (चुकून सांगितलं असेल! दुसरं काय! पण वागायला दोघेही फार मदतशील होते बरं!) असो.

कँपच्या बाहेरच्या पारावर हे सुखी जीव दिसले -


३२५० फूट उंचीवर असलेल्या भीमाशंकर स्थानाची वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाही. भीमाशंकरचा कँप एका मंदिराशेजारच्या भल्यामोठ्या ओसरीवर होता. ओळखपरेड वगैरे झाल्यानंतर 'उरलेला रात्रीपर्यंतचा वेळ कसा घालवायचा' हा प्रश्न पडता पडता सुटला! कँपलीडर पराग आपण भीमाशंकर दर्शन किंवा नागफणीला जाऊ शकतो असं बोलला आणि दर्शनाला येऊ शकत नसल्याबद्दल मी मनातल्या मनात श्रीभीमाशंकराची क्षमा मागून टाकली. दुर्गमोहिमेवर असल्यामुळे मूर्तींपेक्षा कातळांमध्ये देव सापडण्याची शक्यता जास्त होती!

नागफणी!! आम्ही बारा जण, विलासदादा आणि एक गावकरी यांना घेऊन निघालो. वाटेत एक हनुमानाचे मंदिर लागले. (हीच एकमेव वाट आहे, असं नाही)


नागफणी पश्चिमाभिमुख असल्यामुळे सूर्यास्त पाहण्याची गेल्या चार दिवसातली मनोकामना पूर्ण होणार होती. वेळापत्रकाची पुरेशी धास्ती घेतल्यामुळे विलासदादाला आणि लांबाला 'सूर्यास्त झाल्याशिवाय खाली उतरायचं नाही' अशी गयावया करून घेतली. दोघांनीही होकार दिला. (याला म्हणतात अनुभव!) तासाभरात नागफणीवर पोचलो. डाव्या हाताला पदरगड अगदी जवळ दिसत होता. उद्याच्या पदभ्रमणात पदरगड होता. मोहिमेतील शेवटचे खांडस गाव खाली दूरवर दिसत होते. कालचा सिद्धगड उत्तरेकडे उठून दिसत होता. साखरमाचीचा डोंगर, दमदम्या, भट्टीचे पठार डोळे भरून पाहून घेतले.
पदरगडाची पहिली नजरभेट -








मागे पुसटसा सिद्धगड, जिथे आम्ही काल होतो -


आणि (अपेक्षेप्रमाणे) सूर्यास्त व्हायच्या आधीच सर्वांनी खाली उतरायला सुरूवात केली. साडेपाच वाजले होते. सूर्य अजून वीस-पंचवीस मिनिटात बुडणार होता. उतरताना एक झाडीतून जाणारा पट्टा होता आणि मग पठारावरून मोठी वाट कँपकडे जात होती. अखेर लीडर्सलोकांची परवानगी घेऊन झाडीतल्या त्या उतारावरही आणि पुढच्या पठारावरही धावत सुटलो. (गुडघे-बिडघे सह्याद्रीदेवाच्या हवाली!) निवांत बसून सूर्यास्त बघण्यासाठी ही शेवटची संधी होती and I wanted to give my best! ती एकूण वीस-पंचवीस मिनिटांची वाट जेमतेम साडेआठ मिनिटात कापून कँपच्या मागच्या बाजूच्या कड्याच्या टोकाशी पोचलो, तेव्हा सूर्याचा खाली जाता जाता ढगांशी लपाछपीचा खेळ सुरू झाला होता. काही मिनिटांची स्वस्थता मिळवण्यासाठी आधी तुफान धावपळ करावी लागली हा विरोधाभास इथेही सोबत होताच! पण डोळ्यासमोरचा सूर्यास्त पाहत असताना ते सगळे विचार हळूहळू पुसले गेले.











कँपमध्ये परतल्यावर जेवण तयार होईपर्यंत प्रशस्तीपत्रक आणि अभिप्रायाचा एक छोटासा औपचारिक कार्यक्रम आयोजित केला गेला होता. 'सह्यांकन'च्या आयोजनाला तोडच नव्हती. त्यामुळे त्याबाबतीत सर्वच खूश होते. बाकी एक-दोन किरकोळ सुधारणा आमच्याकडून सुचवल्या गेल्या व त्या कँपलीडरने आज्ञाधारकपणे वहीत टिपून ठेवल्या. जाता जाता 'कमी खायला द्या' अशीही उपसूचना कोणीतरी केलीच. त्यानंतर मोहिमेतला शेवटचा खाना म्हणून पेशल 'गाजर का हलवा' होता. (काय अप्रतिम चव होती म्हणून सांगू!!) सोबत पुर्‍या, छोले, कोशिंबीर, पापड, दाल-भात!! जेवल्यावर हात धुवायलाही उठण्याची अंगात ताकद नव्हती!

पुन्हा लांबासमोर पाय पसरून बसलो आणि आज पोटर्‍यांसकट पावलांना मालिश करून घेतले. थंडी चांगलीच होती. झोपण्यासाठी छप्परबंद ओसरीवर किंवा मग समोरच्या मंदिरात सोय होती. आठवलेकाकांच्या सांगण्यावरून मी त्यांच्यासोबत ओसरीवरच झोपायचे ठरवले आणि एक योग्य निर्णय घेतल्याची खात्री दुसर्‍या दिवशी पटली. रात्री मंदिराच्या फरशा प्रचंड गार पडल्या आणि तिथे झोपलेले अजूनच कुडकुडले. आम्ही मात्र एकदम टुणटुणीत होतो.

झोपताना पहिला विचार कुठला आला असेल तर, 'मोहिमेतली ही शेवटची झोप' हाच! हां हां म्हणता चार दिवस संपले होते आणि उद्या एव्हाना आम्ही आपापल्या घरी असणार होतो...

आजचा हिशेबः
२३ डिसेंबर २०११
एकूण चाल - अंदाजे १२ किमी
वैशिष्ट्ये - 'नागफणी' हे सरप्राईज पॅकेज!, एकमेव अप्रतिम सूर्यास्त. मोहिमेमधला शेवटचा मुक्काम. उद्या संपणार हे सर्व...

(क्रमशः)
- नचिकेत जोशी