Pages

Wednesday, June 11, 2014

आलायस तर खरा!

आलायस तर खरा...
आता थांबणार आहेस की
दडी मारणार आहेस लगेच
हुरहूर लावून?

मनाचं ओसाड माळरान आधीच तापलंय, वैतागलंय...
त्यावर आता पाऊलभर हिरवी शाल पांघरशील,
निष्प्राण पायवाटेत नवी ओढ रुजवशील
आणि नंतर नेहमीच्या लहरीपणाने पाठ फिरवशील!
मग पहिल्याहून अधिक असह्य
दुष्काळ सोसावा लागेल...

हे सगळं व्हायच्या आधीच सांगतोय -
एकतर थांब तरी, किंवा मग जा तरी!

तुझी वाट पाहणं चालूच राहील - 
तू सगळे बहाणे विसरून, तुझा हट्टीपणा सोडून,
आवेगाने, ओढीने आणि तृप्त मनाने
बरसू लागेपर्यंत!

तेवढा उन्हाळा सहन होईल या मनाला...

- नचिकेत जोशी (९/६/२०१४)

No comments: