Pages

Tuesday, January 9, 2018

ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २

ह्या ट्रेकचं एक वैशिष्ट्य म्हणजे, जिथे चाललोय ते ठिकाण जिथून सुरुवात करतोय त्या ठिकाणापासून मुळीच दिसत नाही. उदाहरणार्थ, ढवळे गावातून चंद्रगड दिसत नाही. चंद्रगडावरून ढवळे घाटवाट दिसत नाही. ढवळे घाटातून घुमटी दिसत नाही. घुमटीपासून जोरचे पाणी दिसत नाही. जोरच्या पाण्यापासून आर्थरसीट पॉईंट दिसत नाही. (आणि ह्या जंगलात हरवलं, तर कुणीच कुणाला दिसत नाही). जिथे चाललोय तिथे ते आहे, ह्या एकमेव भरोशावर करायचा हा ट्रेक आहे.

ढवळ्यात पोचलो, तेव्हा चिकार वारं सुटलं होतं. 'ओखी' वादळामुळे सह्याद्री माथ्यावर आणि कोकणात 'येत्या ४८ तासात पावसाची शक्यता' नेमकी आदल्याच दिवशी प्रसारित झाली होती. 'येवढं वारं पावसाळ्यातही नव्हतं इथं' - इति गाईड रवी मोरे. मग काय! उद्या संध्याकाळी महाड-पुणे एसटीत बसेपर्यंत पाऊस पडू नये किंवा अगदी दाभिळ गावात पोचेपर्यंत पाऊस नको अशी प्रार्थना करण्यापलिकडे हाती काहीच नव्हतं. सह्याद्रीत, त्यातही जावळीत असताना पाऊस लागला तर काय हाल होतात, हे इतिहासालासुद्धा माहित आहे. तिथे आमची काय कथा!

स्थानिक गावकरी कम ढवळे घाटाचा एकमेव गाईड रवीदादा मोरेंकडे चहा नाष्टा झाला. ढवळ्यातून चंद्रगडावर पोचायला दीड एक तासांची चढाई होती. गडावर पाणी आहे. पण, त्यानंतर मात्र थेट बहिरीच्या घुमटीजवळच पाणी आहे. म्हणजे एकदा चंद्रगड सोडला, की पुढचे कमीत कमी पाच तास कुठेही पाणी नाही. त्यामुळे प्रत्येकाकडे कमीत कमी तीन लिटर पाणी घेऊनच मग निघायचं ठरलं. (मी सवयीप्रमाणे चार लिटर घेतलं. मग सॅक व्हायची ती जड झालीच, त्याला इलाज नाही.)

ढवळे गावातून निघायला साडेसात वाजले. आमच्यासोबत रवीदादांचे वडील कोंडिरामबाबा (वय सत्तर) बहिरीच्या घुमटीपर्यंत वाट दाखवायला येणार होते. मला तर ह्या ट्रेकसाठी जी माहिती मिळाली होती, त्यावरून गाईड अजिबात घेऊ नये असंच वाटत होतं. वापरात असलेला, एकाच पायवाटेने घनदाट जंगलातून एकाच पायवाटेने वळणं घेत घेत जाणारा घाट म्हणजे ढवळे घाट! फक्त एक दोन वळणं लक्षात ठेवली आणि आजूबाजूचे डोंगर लक्षात ठेवले की झालं, असं जवळजवळ प्रत्येकाने सांगितलं होतं. त्यामुळे गिरीशी बोलताना एक-दोनवेळा "जाउ रे आपलं आपण, सगळे चालणारे, वाटा शोधण्यात तरबेज आहेत" असे प्रस्ताव मांडले होते. त्याने सुदैवाने ते मनावर घेतले नाहीत. 'बघू, तिकडे गेल्यावर ठरवू' असं म्हणून त्याने प्रत्येक वेळी वेळ मारून नेली.

आम्ही प्लॅनपेक्षा अर्धा ते एक तास उशीरा निघालो होतो. पाठीवर दहा-एक किलोचं ओझं घेऊन चालताना सपाट वाटेवरही दम लागत होता. ढवळे गावापासून दहा मिनिटांवर धनगरवस्ती आहे. त्या गावात चक्क संडास बांधलेले पाहून माझा दम लागल्यामुळे आधीच फुलून आलेला उर अभिमानानेही भरून आला! उशीरापर्यंत टिकलेल्या पावसामुळे झाडोरा चिकार होता. वाटा लपलेल्या होत्या. धनगरवाडीपासून सहज दिसणारी पायाखालची वाट सोडून म्हातारबाबांनी झाडीतली न दिसणारी वाट पकडली आणि 'गाईड का घेतला' ह्याचं पहिलं उत्तर मिळालं. उशीरा संपलेल्या पावसामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला गवत छातीच्या उंचीपर्यंत होतं, आणि वाट त्यात लपलेली होती. ती वाट पकडली आणि लगेचच अंगावर येणारी चढाई सुरू झाली. चंद्रगडाचा चढ खरोखरीचा छातीवर येतो. अक्षरशः कमी वेळात आपण जवळजवळ पन्नास-एक फूट चढून जातो.

वाट चालताना म्हातारबाबांशी ओळख होत गेली. गडावर उघड्या चौकोनी खड्ड्यात दगडात कोरलेलं शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे. म्हातारबाबा गेली ३६ वर्ष दरवर्षी महाशिवरात्रीला नेमाने पूजेसाठी जातात. त्यादिवशी गडावर मोठी यात्रा भरते. ढवळे आणि आसपासच्या गावातलेच नव्हे, तर गावातून कामानिमित्त मुंबईला वगैरे गेलेलेही त्या दिवशी आवर्जून गावाकडे येतात. म्हातारबाबांचं उभं आयुष्य ढवळे खोरं आणि त्या भागातल्या जंगलात गेलं आहे. आमचा प्लॅन ऐकल्यापासून ते सांगू लागले, "ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं. सामान देवळात ठेवायचं आणि फक्त एक छोटी बॅग घेऊन चंद्रगड करायचा. दिवेलागणीपर्यंत खाली उतरायचं, आणि झोपून जायचं. दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता ढवळे घाटाला लागायचं. ११ वाजेपर्यंत घुमटी, आणि उशीरात उशीरा २ पर्यंत आर्थरसीट पॉईंट!" ही वाक्यं पुढे दिवसभरात त्यांनी कमीत कमी दहा वेळा ऐकवली.

चंद्रगडावर पोचायला सव्वानऊ वाजले.  गडावर त्या दिवशी भन्नाट वारं सुटलं होतं. गडावरून आसमंत सुरेख दिसतो. कोळेश्वर, रायरेश्वरचे विस्तीर्ण डोंगर, मंगळगड, प्रतापगड हे विविध दिशांना दिसतात. पश्चिमेला ढवळे खोरं, त्यापलिकडे महादेव मुर्‍हा (मुर्‍हा म्हणजे विस्तीर्ण पठार) दिसतात. आर्थरसीट पॉईंटकडे जाताना लागणारी सापळखिंड, घुमटीचा डोंगर हे गडावरून खुणेने दाखवता येतात. चंद्रगड हा भोवतालच्या डोंगरांच्या तुलनेत अगदीच खुजा आहे. (हे घुमटीपाशी किंवा ढवळे घाटाच्या शेवटच्या टप्प्यात गेल्यावर प्रकर्षाने जाणवतं) गडाच्या उत्तर टोकाच्या कड्याच्या पोटात थंड पाण्याचं टाकं आहे. गडफेरी झाली.चंद्रगड चढताना रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा भरून घेतल्या. कारण आता वाटेत पाणी कुठेही मिळणार नव्हतं.

चंद्रगडाची उंची साधारण २३०० फूट. ढवळे घाटाची वाट ढवळे गावापासून सुरू होते आणि चंद्रगडाला उत्तरेकडून पायथ्यातून वळसा घालून उजवीकडे वळते. चंद्रगडावरून ढवळे घाटाच्या वाटेला लागायचं असेल तर पुन्हा ढवळे गावापर्यंत यायची गरज नाही. चंद्रगडाच्या अंतिम टप्प्यातली कातळांतून चढणारी वाट जिथे सुरू होते, तिथेच उजवीकडे गडाला थोडा वळसा घालून खिंडीच्या दिशेने एक वाट जाते. त्या खिंडीतून एक वाट जवळजवळ पन्नास-साठ अंशात सलग खाली उतरत ढवळे घाटाच्या वाटेला जाऊन मिळते. आम्ही ह्या वाटेने उतरलो. ह्या वाटेबद्दल नेटवर वाचलं होतं. पण त्यात जे वर्णन होतं, तेवढी खतरनाक वगैरे नाही वाटली. गायदरा घाट, गुहेरीचं दार वगैरे केलेल्यांसाठी ही वाट सोपी आहे. पण ह्या वाटेला कुठेही सपाटी नाही. सतत खालीच उतरत जाणारी ही वाट संपवायला आम्हाला दीड तास लागला. डावीकडून उजवीकडे जाणार्‍या ढवळे घाटाच्या वाटेला एका बेलाच्या झाडापाशी ही वाट छेदून सरळ जाते. (म्हणजे तिठा नाहीये!) जर ढवळे घाटाची वाट क्रॉस करून पुढे गेलो, तर वाट नेईल तिकडे जावं लागतं. (गाईड का घेतला ह्याचं दुसरं उत्तर!) आम्ही त्या बेलापाशी पोचलो, तेव्हा (घड्याळात) बारा वाजले होते. ही जागा बहुधा ढवळे गावाच्याच उंचीवर किंवा त्याहून किंचित अधिक उंचीवर असावी. म्हणजे आर्थरसीट पॉईंटपर्यंत आता पुन्हा चार हजार फुटांची चढाई करावी लागणार होती. ढोबळमानाने, दोन टप्प्यात हा ट्रेक समजता येतो. ढवळे ते सह्याद्रीच्या सरासरी उंचीवरची बहिरीची घुमटी हा पहिला टप्पा आणि घुमटी ते आर्थरसीट पॉईंट हा दुसरा टप्पा. बेलाच्या झाडाजवळची वेळ - दुपारी बारा! इथून बहिरीच्या घुमटीपर्यंत पोचायला चार तास लागतील - इति म्हातारबा! "म्हणून मी काय सांगत होतो, ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं.... आणि उशीरात उशीरा २ पर्यंत आर्थरसीट पॉईंट! (इच्छुकांनी गाळलेल्या जागा ह्याच लेखातून इतरत्र शोधून भरून घ्याव्यात)"

इथून पुढच्या घुमटीपर्यंतच्या वाटेने व्यक्तिशः माझा पार दम काढला. गच्च झाडीतून, काट्या-फांद्यातून कमालीच्या संथ चढाची ही वाट अक्षरशः जीव काढते (माझा काढला). कमालीचा संथ चढ, माती, अनियमित उंचीचे दगड हे सगळं एकत्र म्हणजे कसोटीच! हा भाग म्हणजे जावळीचा ऐन गाभा म्हटलं तरी चालेल. दोन्ही बाजूंना जंगल. आणि जंगल कसलं? तर रानडुकरं, बिबट्यांचा वावर असलेलं. म्हातारबाबांनी परतीला सोबत म्हणून आपल्या एका चुलत्यालाही सोबत घेतलं होतं. ह्या वाटेच्या उजवीकडे सलग सापळखिंडीची डोंगर-रांग आहे, पण ती जाणवतही नाही, इतकी झाडी आहे.  ह्याच वाटेवर एक सुखद आश्चर्य आमची वाट पाहत होतं. (नाही नाही, बिबट्या वगैरे नव्हता वाटेत).

बेलाच्या झाडापासून ढवळे घाटाच्या वाटेवर अंदाजे पंधरा मिनिटांवर एके ठिकाणी पाणी मिळालं. डिसेंबरचा पहिला आठवडा असल्यामुळे आणि पाऊस उशीरापर्यंत लांबल्यामुळे नदीला पाणी होतं. तिथे जवळजवळ पाऊण तास काढला. हे पाणी जर मिळालं नसतं, तर घुमटीशिवाय अधेमधे कुठेही पाणी नव्हतं. आमच्याकडे शिल्लक असलेल्या पाण्यावर घुमटीपर्यंत पोचणं फारच अवघड झालं असतं असं मागाहून वाटलं. जंगलात, ट्रेकमध्ये सर्वात जास्त आनंद ज्या ज्या गोष्टींमुळे मिळतो, त्यातली एक वरच्या क्रमांकाची गोष्ट म्हणजे पाणी सापडणे. पाणी पिऊन, भरून घेतलं. घुमटीला पोचल्यावरच जेवायचं असं ठरल्यामुळे खजूर-चिक्की-भेळ-वड्यांचा नाष्टा करून घेतला. आणि निघायला एक वाजला.

बेलाच्या झाडापासूनच आमच्या गृपमध्ये 'फाटाफूट' व्हायला सुरूवात झाली होती. अनि, कुशल, पवन सातत्याने आघाडीवर होते. मी, संजय कटाक्षाने मधल्या फळीत होतो. विराग कधी आमच्यासोबत तर कधी आघाडीवर असायचा. गिरी सातत्याने मागे राहायला लागला होता. त्याच्यासोबत अशा बिकट परिस्थितीत 'आपली जबाबदारी' ओळखून सतीश, इंद्रा, यो, रोमा (हे मुलाचं नाव आहे. 'रोहित मावळा'चा शॉर्टफॉर्म) गिरीसोबत राहत होते. गिरीने म्हणे कधीतरी 'माझ्याच्याने होत नाही, मी माघारी चाललो' असे उद्गार काढले असं ऐकलं. पण त्या पाण्यापासून पुढे निघणारं प्रत्येक पाऊल माघारीची शक्यता संपवत होतं. डोंगररांगांमधल्या भटक्यांमध्येही किल्ले आवडणारे, घाटवाटा आवडणारे, सुळके आवडणारे असे प्रकार असतात हे मला हल्लीच कळू लागलं आहे. सतीश हा कातळ-कपार्‍यांत रमणारा. सरळसोट सुळक्यावर चढणे हा त्याचा आवडता छंद. ह्याच्यामुळेच आणि कुशल, सुनिल सारख्या मातबर लोकांमुळे आमची लिंगाणा मोहिम सुखरूप होऊ शकली होती. ढवळे घाटातून सरळ घुमटीवर नेणारा एखादा सुळका असता तर आम्ही पायवाटेने वर पोचायच्या आत सतीश तिथे सुळक्यावरून पोचला असता, असं मला वाटत राहिलं.

इथून पुढे घुमटीपर्यंत पोचणार्‍या वाटेबद्दल लिहिण्यासारखं फारसं काहीच नाही. घनदाट जंगल, घसरवणारी माती, पायात येणारी झाडांची मुळं-खोडं, त्यातून सतत संथपणे वर चढत जाणारी वाट. पाठीवर ओझं नसतं तर कदाचित हा चढ सुसह्य झालाही असता. ह्या वाटेवरच्या एका स्वानुभवावरून गझलेचा एक मतला सुचला, तेवढा लिहून ठेवतो फक्त -

'खोडाने  घसरवले होते
फांदीने सावरले होते'

ह्यावर अजूनतरी पुढे काही सुचलेलं नाही.

सापळखिंडीच्या शंभर-एक फूट अलिकडे वाट झपकन डावीकडे वळते. ढवळे घाटाची वाट वाटते तितकी सोप्या सरळ भूभागातून जात नाही. आता सरळ जायचं असं वाटत असतानाच वळण येतं. डावीकडची सोंड चढायची हे माहित असतं, पण त्या सोडेंच्या सुरूवातीपाशी पोचेपर्यंतही आणखी एक सोंड असते. ह्या संपूर्ण वाटेवरून घुमटी किंवा जोरचं पाणी अजिबात दिसत नाही. उंच डोंगराच्या धारेवर कुठेतरी अंदाजाने समजतं, की तिकडे घुमटी आहे. आर्थरसीट पॉईंट तर कुठूनच दिसत नाही. त्याचं दर्शन जोरच्या पाण्याच्याहीवर वीस-एक मिनिटं चढून गेल्यावर होतं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, चंद्रगड सोडल्यापासून उरलेला अख्खा दिवस आम्हाला सूर्यदर्शनही झालं नाही. उजेड भरपूर होता, पण पूर्ण वाट एकतर घनदाट सावलीतून तरी आहे किंवा मग नुसत्या नैसर्गिक उजेडात तरी. वाचायला गंमत वाटेल, पण चंद्रगडानंतर थेट दुसर्‍या दिवशी दाभिळ टोकावरून उतरतानाच आम्ही सूर्य पाहिला. (अपवाद एकचः जेवणं झाल्यावर घुमटीपासून अस्ताला जाणारा आणि आमच्या उर्वरित ट्रेकसाठी आशीर्वाद देणारा सूर्य दिसला.)

ढवळे घाटातल्या किर्र जंगलात सोबत्यांकडून गझल ऐकवण्याची फर्माईश झाली. काही क्षण त्यानिमित्ताने पाठीला विसावा मिळाला.

'दूरवर कोठेतरी असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की' 

त्यानंतर आणखी एक गझल सादर केली. दोस्तांनी रेकॉर्ड करून घेतली.

एव्हाना आमच्यातले काही जण खूप मागे पडले होते. ट्रेकमध्ये आपल्या मागून येणारं कुणीतरी आहे, ही भावना कधीकधी खूपच हुरूप आणते. ती अशाअर्थी, की त्यांच्या निमित्ताने आपल्यालाही हवा असेल तेव्हा दम खाता येतो. ह्या ट्रेकला मी ती संधी अनेकदा साधून घेतली (पेशल थॅंक्स टू गिरी). सगळेच जण झपाझपा चालणारे असते, तर माझ्यामुळे त्यांना उशीरच झाला असता.

घुमटीच्या अलिकडच्या सोंडेवर म्हातारबाबांनी आमचा निरोप घेतला.  "बाबांनु! नीट जावा. मला गुरं पाजायला जायचं हाये. आता न्हाय निघालो तर घरी पोचायला लै उशीर होईल. पण लक्षात ठेवा. ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं....".  म्हातारबा खरंच छान होते. उभं आयुष्य ज्या जंगलात गेलं, तिथली प्रत्येक वाट त्यांच्या माहितीची होती. खरंतर ते घुमटीपर्यंत येणार होते. पण एव्हाना चार वाजून गेले होते. त्यांना माघारी ढवळ्यात पोचायला तीन तास तरी लागले असते. वाट किर्र जंगलातून होतीच, पण वन्य श्वापदांचीही चाहूल त्या रानात होती. (रात्री फोन केल्यावर कळलं, की त्यांना घरी पोचायला पावणे आठ वाजले.)

त्या सोंडेपासून त्यांनी वाट दाखवून दिली. पुढची वाट थोडी सोपी होती. एका बाजूला कडा, दुसर्‍या बाजूला दरी. मुख्य म्हणजे चढ नव्हता. तो ट्रॅव्हर्स थेट घुमटीलाच वर चढला. आम्ही जे पाच-सहा जण पुढे होतो, त्यांना घुमटीला पोचायला साडेचार वाजले. इथे पोचेपर्यंत वैयक्तिकरित्या मी प्रचंड दमून गेलो होतो. घुमटीच्या अलिकडे डोंगराची एक सोंड अख्खीच्या अख्खी चढून यावं लागतं. ह्या सोंडेमध्ये एके ठिकाणी कातळात कोरलेला एक हनुमान आहे. ह्या सोंडेने माझा सगळा दम काढला. ही सोंड संपतच नव्हती! मागून येणारे पाच-सव्वापाच पर्यंत आले.

घुमटीपासून दहा एक मिनिटं चालल्यावर पाण्याचं एक टाकं आहे. इथून जोर गावाकडे जाण्यासाठी एक वाट जाते, म्हणून हे जोरचं पाणी. संपूर्ण ढवळे घाटातला हा एकमेव पाण्यचा स्रोत हे आधी सांगितलंच आहे. त्यामुळे सगळे वन्यप्राणीही इथेच पाण्याला येतात. आमची जेवणं झाली आणि सूर्यास्त होण्याची वेळ जवळ येत चालली. सगळेच दमले होते. इथून आर्थरसीट पॉईंट दिसत नव्हता, तरी आणखी दोन तासांची चाल बाकी होती. कुणाच्या तरी डोक्यात घुमटीपाशीच मुक्काम करण्याची कल्पना आली आणि मी जागीच गोठलो. प्राण्यांच्या भीतीमुळे नव्हे तर थंडीच्या भीतीमुळे. साडेपाच वाजताही घुमटीपाशी मला गारठा जाणवत होता. डिसेंबर महिन्यात उघड्यावर (स्लिपिंग बॅग असली तरी काय झालं) झोपण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. त्यापेक्षा कितीही वाजले तरी आर्थरसीट गाठणं मी पत्करलं असतं. नेटवर जी माहिती वाचली होती, त्यानुसार जोरच्या पाण्यापासून आर्थरसीट पॉईंट पर्यंत दोन माणसं एकावेळी बाजूबाजूने जाऊ शकतील एवढी प्रशस्त वाट आहे. आणि बरीचशी वाट उघड्यावरून आहे. दत्तजयंतीचा आदला दिवस असल्यामुळे रात्री अंधार पडला तरी त्यावाटेवर भरपूर चंद्रप्रकाश मिळाला असता असं वाटत होतं. म्हणूनच इथून निघूया असं हळूहळू सगळ्यांचंच मत बनत गेलं आणि मी मनातल्या मनात सुटकेचा नि:श्वास टाकला.

पाणी भरून घेतलं आणि निघालो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. आता आकाशातच काळसर निळा प्रकाश शिल्लक होता. बाकी सगळीकडे कातरवेळेची छाया दाटायला सुरूवात झाली होती. जोरच्या पाण्यापासून वाट जंगलात शिरते आणि पुन्हा एक जीव खाणारा चढ चढून सपाटीवर जाते. ह्या चढावर माझ्यातली होती नव्हती ती सगळी ताकद संपली. 'i cannot do it anymore' मी मागून येणार्‍या कुशल आणि विरागला म्हणालो. 'हा बरोबर चालतोयस... चल. छोटी पावलं टाक' - हे त्यांचं उत्तर. ही वाट अगदीच अरुंद होती. त्यात चढ आणि घसरवणारी माती. जंगलभागात असल्यामुळे जवळजवळ शून्य उजेड. पुढे चढणार्‍यातला कोणी घसरला तर ट्राफिक जॅम. अशावेळी असमान पातळीवर थांबून राहायचं. त्यामुळे पायात क्रँप सुरू झाले. जोरचे पाणी ते सपाटीच्या ह्या चढाने माझातरी उत्साह पारच घालवून टाकला. कसातरी तो चढ संपवून सपाटीवर पोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते. सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता आणि उजेडही जवळजवळ नाहीसा झाला होता. सर्व गोष्टींना काळा रंग आला होता. अशात लांबवर कुठेतरी आर्थरसीट पॉईंटची काळी किनार दिसली. तिथे जायचं होतं! ट्रेकमधला सर्वात रमणीय टप्पा अखेर अंधारात पार करावा लागणार होता.

ह्या सपाटीपासून मी 'दोन माणसं एकाच वेळी चालू शकतील' अशा ऐसपैस वाटेच्या शोधात होतो. सकाळपासूनच्या नुसत्या चढाने पायही दुखत होते आणि पाठही. आता बराच वेळ सपाटी लागेल ह्या आशेने त्या अंधारातच बघायला लागलो तर असं काहीही दिसलं नाही. दुर्दैवाने एकावेळी एकच माणूस चालू शकेल अशी पायवाट लागली. पायवाटेशेजारी छातीपर्यंत वाढलेलं गवत! आणि थोड्याच वेळात ती वाट रानात शिरलीसुद्धा. इतकंच नव्हे, तर पुन्हा चढ-उतार सुरू झाले. माझा तर फारच मूड ऑफ झाला! मूड बदलायला एक कारण मिळालं ते म्हणजे मध्येच एका ठिकाणी पुन्हा गझल म्हणण्याची फर्माईश झाली. वातावरण तर अफलातूनच होतं. जिथे उभे होतो तिथून जेमतेम पाच-एक पावलांवर थेट चार-एक हजार फूट खोल दरी, आकाशात उजळलेला 'चौदहवीका चाँद', मंद सुटलेलं वारं, लांबवर आर्थरसीट पॉईंटची किनार आणि सोबत सह्याद्रीतले आनंदयात्री!

'तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर
तसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर

जरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया
कधी होणार अपुली भेट ह्या गर्दीत शिरल्यावर'

काही क्षण ती शांतताही अनुभवली. मग निघालो. ह्या संपूर्ण वाटेवर दोन्ही बाजूला अक्षरशः खोल दर्‍या आहेत. उघड्या डोळ्यांनी ते बघायची आमची संधी मात्र पूर्ण हुकली. सह्याद्रीचं एक अतिविलक्षण सौंदर्य ह्या वाटेवरून पाहायला मिळत असणार, ह्याबद्दल माझी खात्री आहे. दोनएक तास ती वाट तुडवत अखेर आर्थरसीट पॉईंटच्या खालच्या शेवटच्या कातळपॅचशी आलो तेव्हा जे काही वाटलं, ते 'सुटलो एकदाचे' ह्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. कातळटप्पा चढून सुप्रसिद्ध अशा 'खिडकी'पाशी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते. सकाळी साडेसातला ढवळ्यातून निघाल्यापासून तेरा तासांनी आम्ही डेस्टिनेशनला पोचलो होतो. एकाच दिवसात वेळेच्या हिशेबाने सर्वाधिक लांबीचा हा माझा दुसर्‍या क्रमांकाचा ट्रेक. (पहिला नंबर - रतनवाडी ते डेहेणे व्हाया गुहेरीचे दार - चौदा तास. वर्णन 'anandyatra' ब्लॉगवर वाचू शकाल.).

नेटवर वाचलेलं वर्णन आणि आम्ही घेतलेला अनुभव ह्यात एवढा फरक कसा पडला ह्याचा विचार करण्यात ती वाट संपली. स्पेशली घुमटी ते आर्थरसीट वाटेचं नेटवर वाचलेलं वर्णन आणि आम्ही गवतातून, टेकाडावरून तुडवलेली वाट ह्यातला फरक तेव्हा अनाकलनीयच वाटत होता. मी विचारांती ह्या निष्कर्षावर आलो आहे, की सह्याद्रीमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये वाटांना नवं रूप मिळतं. ज्या भटक्यांनी हा ट्रेक केला आणि त्यावर ब्लॉग लिहिले, त्यांच्या लिखाणात त्यांना त्या त्या ऋतूमध्ये दिसलेली वाट उतरली. आम्ही डिसेंबरमध्ये केल्यामुळे गवत टिकून असेल. पार ढवळे गावापासून संपूर्ण ढवळे घाट, घुमटी ते जोरचं पाणी, जोरचं पाणी ते सपाटी, सपाटी ते आर्थरसीट - सगळीकडे गवत, झाडी आणि एकावेळी एकच माणूस चालेल एवढीच पायवाट. (किंवा मग आम्ही हा ट्रेक करावा म्हणून 'पुरी कायनात' एक झाली असेल आणि असं वर्णन वाचायला मिळालं असेल) पण काहीही असो. आम्ही हा शेवटचा टप्पा अंधारात केल्यामुळे वाटेची स्पष्टता अजिबातच आली नाही आणि आसमंत डोळे भरून बघायचा राहून गेला. माझीतरी घुमटी ते आर्थर हा टप्पा दिवसाउजेडी करायची फार इच्छा आहे.  (नेटवर ब्लॉग्जमध्ये ह्या वाटेचं सुखद आणि मोहक वर्णन केलेल्यांनी मला न्यावं अशी जाहीर विनंती आहे) त्या वाटेत कुछ खास जरूर है!

'खिडकी'पासून पलिकडच्या बाजूला कोसळलेल्या कड्यांची तीव्रता चांदोबाच्या कृपेने रात्रीच्या वेळीही समजत होती. दिवसा बघायला केवढी मजा आली असती! तर ते असो. आर्थरसीट ते महाबळेश्वर प्रवासासाठी आम्ही एक टेम्पो ठरवला होता. तो टेंपोवाला बिचारा साडेपाचपासूनच येऊन बसला होता. घुमटीनंतरच्या सपाटीवरून त्याला फोन लावून थांबण्याची विनंती केली होती. आर्थरसीटवर पोचलो तेव्हा तिथे चिटपाखरूही नव्हतं. पूर्ण अंधार, आणि कमालीची शांतता. 'दिवसभरच्या गलक्यातून मोकळा झालेला आर्थरसीट पॉईंट विसावा घेत आहे' अशी कविकल्पना मी तेवढ्यात करून पाहिली. आर्थरसीट पॉइंट ते आर्थरसीट गाडीतळ हे अंतर चालणे म्हणजे शुद्ध वैताग होता. कारण - पायर्‍या! अशातच गाडीतळाकडे जाण्याऐवजी टायगरपॉइंटकडे वळलो. वीसएक पायर्‍या उतरून गेल्यावर टायगरपॉईंटचा बोर्ड दिसला. वाट चुकलोच की! ह्याचं मुख्य कारण सह्याद्रीतल्या डोंगरांमध्ये मनमुराद भटकणारे आम्ही महाबळेश्वरातून आर्थरसीटला कधीच आलो नव्हतो. मग स्वतःला शिव्या घालत त्या उतरलेल्या पायर्‍या पुन्हा चढून इप्सितस्थळी कसेतरी पोचलो. घड्याळात वाजले होते रात्रीचे नऊ!

टेंपोवाला गाडीमध्ये खाली डोकं करून लपल्यागत झोपला होता. आर्थरसीट पॉईंटला संध्याकाळी पाचनंतर जायला बंदी आहे. जे आधी गेले असतील त्यांनाही संध्याकाळी सातच्याआत तिथून निघावे लागते. ह्याचे कारण म्हणजे, आजही आर्थरसीटच्या भागात असलेलं वन्य प्राण्यांचं अस्तित्त्व! आम्ही सगळे टेंपोत बसलो. टेंपोला स्टार्टर मारला आणि टेंपोच्या हेडलाईटच्या प्रकाशात अवघ्या पन्नास मीटरवर दिसला - एक गवा! त्याच्या जवळून थोडे पुढे जातोय, तर आणखी दोन गवे दिसले. हेच गवे जर आर्थरसीट पॉईंट उतरून थोडं खाली खिडकीपाशी आले असते, तर आम्ही काय केलं असतं, ह्या विचाराने नाही म्हटलं तरी धडकी भरलीच.

विलक्षण दमलेल्या, पण तरी एका जबरदस्त काहीतरी केल्याच्या भावनेने ताजेतवाने झालेल्या चौदा भटक्यांना घेऊन टेंपो त्या आर्थरसीट पासून दूर दूर चालला होता. आज जेवढं चढून आलो होतो तेवढंच उद्या उतरून जायचं होतं. सगळ्यात आधी आज रात्रीचा मुक्काम-जेवण ह्या गोष्टी बघायचा होता. आमच्या प्लॅननुसार आम्ही उशीरात उशीरा रात्री ८ पर्यंत मेटतळ्यात पोहोचणं अपेक्षित होतं. खरं सांगायचं, तर उशीर झाल्याचं दु:ख आता अजिबात वाटत नव्हतं. माझ्या मनात सकाळपासून केलेली पायपीट फ्लॅशबॅकसारखी पुन्हा चालली होती. चंद्रगड, ढवळे घाटात अवचित मिळालेलं पाणी, त्या पाण्यापासूनच हळूहळू येत गेलेला थकवा, म्हातारबाबांचा ह्या वयातही टिकून असलेला स्टॅमिना, घुमटी ते सपाटी ह्या वाटेवर शब्दशः लागलेली वाट, सपाटी ते आर्थरसीट हा अंधारात चालल्यामुळे काहीसा हिरमोड केलेला टप्पा, आणि ह्या वाटेवर दिवसाउजेडी पुन्हा येण्याची उत्तरोत्तर बळावत गेलेली इच्छा - ढवळे ते आर्थरसीट व्हाया चंद्रगड ट्रेकचा सारांश एवढ्याच शब्दांत येत असला, तरी त्या तेरा तासात जे अनुभवायला मिळालं, ते शब्दांत येणं शक्य नाही! त्यासाठी सॅक पाठीवर टाकून हा ट्रेक करायला हवा. फक्त लक्षात ठेवा -  'ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं....' पुढचं आठवत असेलच.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी

महत्त्वाचे: अगदी शेवटची वीस-एकफूट (तीही सोपी) कातळचढाई सोडली, तर ढवळे ते आर्थरसीट ट्रेकमध्ये कुठेही कातळचढाई नाही. तरीही, हा ट्रेक शारीरिक क्षमतेचा कस पाहतो. ह्या ट्रेकला घुमटीपर्यंत तरी गाईड घ्यावाच. प्रश्न वाट शोधण्यातील कौशल्याचा नसून वाट शोधायला जो वेळ जाईल व त्यामुळे आर्थरसीटला पोचायला उशीर होत जाईल त्याचा आहे. जवळजवळ ९०% वाट वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या घनदाट जंगलातून आहे. त्यामुळे अंतर फार पडू न देणे हितकर. ढवळे गाव सोडल्यावर थेट बहिरीच्या घुमटीपर्यंत (जोरचे पाणी) पाणी नाही. त्यामुळे पुरेसा पाणीसाठा हवाच. नेटवरून, जाऊन आलेल्यांकडून कितीही माहिती काढली असली, तरी आपली स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमताच आपल्याला सुखरूप मुक्कामी नेत असते, हे ध्यानी ठेवावे. सह्याद्रीतल्या आनंदयात्रांसाठी भरपूर शुभेच्छा!

7 comments:

उनाड भटकंती said...

नचिकेत दादा
मस्त तंगडतोड ब्लॉग. त्या मामांची सूचना लक्षात राहिली
ह्यावर्षी केलेल्या संकल्पानुसार ह्यावर्षी जावळी खोऱ्यात धुमाकूळ घालायचाय त्यासाठी तुमचा ब्लॉग प्रेरीत करणारा.

Ajay kakade said...

सुंदर लिहिलंय नचिकेत !!!! मस्त पोस्ट

Yogesh Alekari said...

मस्त लेखन.. जिवंत वर्णन 😃

Anonymous said...

कातिल लिहिला आहे 👍🏻

ओखि वादळ,चंद्रगड वारा, काकांचा डायलॉग, जोरचे पाणी, तुझी गझलांची मेहफिल, घुमटीला स्टे चा प्लॅन आणि नंतर तो कॅन्सल करने, पुढे गाढवाचा माळ, रॉक patch चढाई, टेम्पो चालक (मालक) ची अवस्था, गवे

काय सुरेख वर्णन केले आहेस मित्रा

दिल गार्डन गार्डन हो गया

Vinit Date said...

नचिकेत ब्लॉग छान झालाय. पण जोरच्या पाण्यापासून ऑर्थर सीटची चढाई उजेडात झाली असती तर आजूबाजूला जो काही नजरा पाहायला मिळाला असता त्याला तोड नाही. अंधारात चढल्यामुळे तो मिस झाला असेल. पण पुन्हा एकदा म्हातारबा म्हणाले तसं ... 😂

Sidhu Patil said...

अप्रतिम वर्णन केलंय तू या ट्रेकचं .... जबरदस्त !!

प्रमोद खराडे said...

खूप छान उतरलय. तू पुढे चालता चालता बोलतो आहेस आणि मी मागे मागे ऐकत येतो आहे असे वाटले वाचताना एवढा समरस झालो वाचताना.
काही फोटोही आवडले असते पहायला या सोबत. इथे तशी सोय नसावी बहुधा. नाहीतर तू केले असतेस्.
आप लिखते रहो, हम पढते रहे..
तेवढाच घरात बसल्याबसल्या सह्याद्रीला फेरफटका.