Pages

Wednesday, August 26, 2009

हर शाम...उनके नाम!

काल मैत्रीण भेटली, हट्टून बसली - म्हणे माझ्यावरही एक कविता कर!
मी क्षणभर गोंधळलो, विचारात पडलो -
"चालत्या-बोलत्या कवितेवर कसली कविता करायची?" असं काहीसं साहित्यिक वगैरे पुटपुटलो...
एकवेळ गर्लफ्रेंडची समजूत काढणं सोपे आहे,
हे इतरांच्या अनुभवावरून माहित होतं..
पण हिची समजूत कशी काढायची?
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे -
या मैत्रीला वय नाही, त्यामुळे चढ-उतारांचं भय नाही.
इथे आहे फक्त नितळता आणि निखळता..
ती कशी मोजायची?
पण म्हटलं - ’बघुया शोधून आतमध्ये, काही सापडतंय का?’

मग शिलकीत साठलेलं एक एक सापडायला लागलं...
मग आठवले चहाचे कप, फाटक्या नोटा,
हरवलेलं गिफ़्ट, विसरलेले बर्थडे,
चुकलेले रस्ते, संपलेलं पेट्रोल,
बोलण्यातले हट्ट, अर्धवट गप्पा,
मिस न करताही उगाच मिस कॉल्स,
आणि कुठली स्कीम नसतानाही एका तासातले ६० मेसेजेस्, मग त्यावरून भांडण!
पण नाकावरचा राग नाकावरच रहायचा,
कितीही भांडलो तरी एकमेकांवरच निघायचा...
कदाचित मैत्री व्याख्येच्या बंधनात तेव्हा अडकली नव्हती
"स्वत:ची स्पेस" नावाची पोकळी आयुष्यात तोपर्यंत शिरली नव्हती..
बरेचदा संध्याकाळ अंगावरून मोरपीसासारखी निघून जायची...
खिसे रिकामे पण मनं भरलेली असायची...
हां.. आषाढवयात एकमेकांना एकमेकांबद्दल
कधीतरी काही वेगळं वाटलंही होतं - पण तेवढ्यापुरतंच.
त्या आषाढातलं ते वादळ सहज पेलल्यामुळे
नातं श्रावणासारखं टवटवीत झालं होतं...

आठवल्या मग खूपशा पुसलेल्या रेघा - वहीमधल्या, पाटीवरच्या, वाळुवरच्य़ा...
ती हातावरची रेघ मात्र पुसून हवी तिथे नाही काढता आली कधी...
यालाच नियती म्हणतात हे तेव्हा गावीही नव्हतं...
आणि आता नातं तर व्याख्येपलीकडे पोहोचलेलं.
भाग्याचा स्पर्श, सहवासाचं कोंदण,
ओंजळभर तहान, ढगभरून दान!
अजून काय हवं?

शेवटी आठवला -
तिचं लग्न ठरल्यावर सगळ्यांत आधी मला आलेला फोन.
फोनवर तिच्यापेक्षा मीच जास्त एक्साईट झालो होतो..
आणि फोन ठेवताना दोघांच्या तोंडून एकदम आलेलं वाक्य -
"तो? आजसे हर शाम, उनके नाम, हं?"...

मग खूप वर्षांनंतर काल भेटली ती! आणि हट्टून बसली -
म्हणे, माझ्यावरही एक कविता कर!

नचिकेत (१३/५/२००९)