Pages

Monday, July 30, 2012

गुंफण

दु:ख पुरातन
दु:ख चिरंतन
दु:ख जगाच्या
घरचे अंगण

दु:ख मोहवी
दु:ख बोलवी
दु:ख खुळ्या
पायातील पैंजण

दु:ख उराशी
दु:ख उशाशी
दु:ख सोबती
बनून कांकण

दु:ख चिडचिडे
दु:ख तडफडे
दु:ख सनातन
शाश्वत वणवण

दु:ख एकटे
दु:ख धाकटे
दु:ख थोरल्या
सुखास कारण

दु:ख मल्मली
दु:ख भरजरी
दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!

 - नचिकेत जोशी (११/६/२०१२)

Friday, July 20, 2012

वाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली! (अंतिम भाग २)

रात्रभर झोप फारशी लागलीच नाही, पण कोंबड्याने चार वाजता पहिली आरोळी मारली आणि नंतर दहा दहा मिनिटांच्या अंतराने त्याचा 'अलार्म' स्नूझप्रमाणे वाजत होता. साडेसहापर्यंत मी आणि कोंबडा दोघेच बहुधा जागे होतो. दार उघडले आणि बाहेर धुक्याशी भेट झाली -

अखेर पावणेसात वाजता सूरजला उठवले. आजीबाईंच्या मुलाचा पत्ताच नव्हता. आम्हाला लवकरात लवकर तैलबैला गाठायचे होते. म्हणजे मग उरलेल्या दिवसात काहीतरी प्लॅन करता आला असता. अखेर त्याची वाट पाहून आजीबाईंना मानधन दिले आणि निघालो. तर देवळापाशी एक म्हातारबा भेटले. त्यांनी 'कुठे निघालात' वगैरे चौकशी केली आणि 'थांबा गण्याला बोलावतो, तो तुम्हाला घालवून देईल' असे सांगून थांबवले. गण्याऐवजी आजीबाईंचाच मुलगा, रमेश आला आणि आम्ही (एकदाचे) निघालो. सात वाजून तीस मिनिटे!

गावाशेजारच्या आदिवासी वस्तीमधून ओढ्याच्या दिशेने निघालो. वस्तीमधल्या दोन बायकांचा हा 'हृद्य' संवाद - पहिली - "कुटं निघाले हे दोगेच?" दुसरी - "मजा करायला निघाले असतील" पहिली - "पाठीवर बोचकी घेऊन डोंगर चडण्यात कसली मजा?"

मी एवढंच बोलणं ऐकलं. मला तोरणा-रायगड ट्रेकमध्ये कोदापूर एसटीचा कंडक्टर आठवला. 'आयला पैसे देऊन वर जीवाला त्रास' असं आमच्या पाठीवरच्या सॅक्सकडे बघून तो बोलला होता. चालायचंच!

गावामागच्या ओढ्याला पाणी असेल, तर मात्र लेण्यांकडेही आणि वाघजाई घाटाकडेही जाता येत नाही. (इति रमेश!) आमच्या सुदैवाने पाणी फारच कमी होते आणि पाऊसही नव्हता. लेण्या अथवा तैलबैलाकडे हा ओढा ओलांडावाच लागतो.

ठाणाळेतून थेट लेण्यांकडे जाणारी व लेण्या वगळून तैलबैलाकडे जाणारी वाट या दोन वेगळ्या वाटा आहेत. आम्ही लेण्या वगळल्या होत्या. अर्थात वाटेत एका पठारावरून लेण्यांकडे वाट जाते. त्याचे वर्णन पुढे येईलच. ओढा ओलांडून पलिकडच्या काठाने डोंगराला डावीकडून वळसा घालावा लागतो. थोडं चालल्यावर कातळात कोरलेल्या पायर्‍या लागल्या.

जवळच पाण्याची दोन टाकीही दिसली. (पाणी पिण्यायोग्य नाही).

कालच्या तुलनेमध्ये माझी तब्येत बरीच बरी होती. वेग कमी असला तरी न थांबता सलग चढत होतो. पण या टाक्यांशेजारून वाहणारा एक झरा दिसला आणि थोडी पोटपूजा करायला थांबलो. त्या ठिकाणापासून दिसणारी ठाणाळेशेजारची आदिवासी वस्ती -

या टाक्यांच्या बाजूने डावीकडून वाट वर चढते व एका पठारावर येते.

इथून समोरच्या कुडाच्या फुलाशेजारून वाट वाघजाई घाटाकडे जाते आणि उजवीकडची लेण्यांकडे जाते. या झाडाला बारमाही फुले असतात असे कळल्यामुळे लेण्यांच्या वाटेसाठी हे खुणेचे झाड म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही.

हे पठार पार करून आम्ही सरळ पुढच्या टेकाडाला डावा वळसा मारून निघालो. आजूबाजूला दगडधोड्यांच्या राशी दिसल्या.

या टेकाडाच्या डाव्या अंगाला एक धनगरबाईची झोपडी आहे. सर्व धनगरवाडा डोंगराच्या पायथ्याला आहे. डावी वाट झोपडीच्या दिशेने, उजवी वाघजाई घाटाच्या दिशेने -

त्या टेकाडावर आलो आणि गेले पंधरा-सोळा तास जिच्यावाचून जीव तगमगत होता, ती झुळूक एकदाची सुरू झाली. मग पार सवाष्ण घाट सुरू होईपर्यंत वारा सोबत होता. या टेकाडावरून दरीच्या कडेकडेने पायवाट वर चढते.

उजव्या हाताला खाली पठार, त्यापलिकडे काल आम्ही अडकलो होतो तो डोंगर आणि त्यापलीकडे नाडसूर, ठाणाळे गावे दिसतात.

कुडाच्या फुलाकडून लेण्यांकडे येणार्‍या पायवाटेचा टेकाडावरून घेतलेला फोटो -

इतका वेळ डाव्या बाजूने किंवा डावीकडे सुरू असलेली वाटचाल संपवून आम्ही टॉवरच्या दिशेने निघालो. लेण्या आम्ही चढत होतो त्याच डोंगराच्या पोटात होत्या. वाटेत रमेशला अळुची फ़ळे सापडली. आकारावरून आधी मी 'ही न पिकलेली आलुबुखार असावीत' अशी समजूत करून घेतली होती. पण ते आलुबुखार वेगळे हे कळल्यावर केवळ त्या दोघांनी खाल्ली, म्हणून मीही बिंधास्तपणे खाऊन टाकली. (चव बरी होती!)

वाघजाई मंदिराच्या जवळ या पायर्‍या लागतात. वाघजाई मंदिराशेजारूनच एक मोठा धबधबा वाहतो.

मंदिरातली पंच-दैवते -

धबधब्याजवळून दिसणारे विहंगम दृश्य -

त्या संपूर्ण कड्यावरून काही अंतरावरून एकूण दोन धबधबे खाली उड्या घेतात आणि त्यांचाच पुढे ओढा बनून ठाणाळे गावामागून वाहतो. वाघजाई देवीचे छोटेखानी मंदिर खूप शांत आणि रम्य आहे. (वाघजाई घाट नक्की कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे मात्र मला शेवटपर्यंत कळले नाही. प्रचलित नाव आहे, म्हणून वाघजाई घाट म्हणायचे!)

एव्हाना सव्वादहा वाजले होते. आम्ही पावणेतीन तासात वाघजाईपाशी पोचलो होतो. आता अख्खा दिवस हातात होता. त्यामुळे मग तैलबैलाकडे न जाता सुधागडासमोरच्या सवाष्ण घाटाने खाली उतरायचे ठरवले. पुढे पाणी मिळेल न मिळेल असे वाटल्यामुळे इथेच धबधब्यापाशी थोडावेळ थांबून उरलेला ब्रेकफास्ट कम लंच करून घ्यायचे ठरवले. पुढे मग दहा मिनिटात तैलाबैला पठार गाठले.

तैलबैला भिंतींचे झालेले पहिले दर्शन -

झूम करून -

तैलबैलाला पहिल्यांदा आलो होतो ते लोणावळ्याकडून! या वेळी दुसर्‍या बाजूने भेट होत होती! पण काहीही म्हणा, तैलबैलाच्या भिंतींच्या नुसत्या दर्शनानेही माझ्या मनात नेहमीच भीती, आदर, आनंद, सुख अशा अनेक भावना एकाच वेळी येतात..

इथून एक बैलगाडीवाट तैलबैलाकडे जाते. 'त्या वाटेने पुन्हा केव्हातरी' असे म्हणून आम्ही दक्षिण दिशेच्या कड्याकडे निघालो. आता जितके चढून घाटावर आलो होतो, तितकेच पुन्हा उतरून घाटाखाली जायचे होते.

हा दुसरा ओढा कड्यावरून झेप घेऊन लेण्यांशेजारून कोसळतो .

याच ओढ्याशेजारी कड्याजवळ या पायर्‍या दिसतात (या कुठेही उतरत नाहीत, सबब ही आपली वाट नव्हे!)

सवाष्ण घाटाच्या दिशेने निघालो तेव्हा वाटेत हे विस्तीर्ण पठार लागले -

वाटेत दिसलेले हे टिपीकल फोटोजेनिक झाड -

हळदीची रोपे -

सह्याद्री घाटाखालून चढायच्या आणि उतरायच्या असंख्य घाटवाटा आहेत. कुठूनही चढायचा सरासरी वेळ तीन तास आणि उतरायचा दोन तास असे गणित आता तयार झाले आहे!

सवाष्ण घाटाच्या माथ्यावरून दिसणारा सुधागड -

सुधागडला दोन दरवाजे व एक चोर दरवाजा आहे, असे रमेशने सांगितले. त्यापैकी खालील फोटोमधल्या हिरव्या बेचक्यातून एक चोरवाट आहे -

सवाष्ण घाटाच्या 'बारशा'ची कहाणी मनोरंजक आहे. कोण्या काळी (पहिल्या काळात - इति रमेश!) एक सवाष्ण घरातून पळाली आणि डोंगर उतरून जायला या वाटेवर आली. वाट न सापडल्यामुळे कातळातच पायर्‍या खणती झाली, आणि अखेर इथेच दिव्यलोकी प्रयाण करती झाली, म्हणून हा सवाष्ण घाट! मला ते नावच इतके आवडले की आता घाट प्रत्यक्ष कसा असेल हे पाहायला मी अगदी आतूर झालो होतो.

... आणि घाटवाट सुंदरच होती. एका बाजूला सरळ खोल दरी, दुसर्‍या बाजूला डोंगरभिंत, मध्ये तीव्र तिरप्या उताराची पायवाट अशी सुरूवात असलेला घाट सुंदर का असणार नाही? घाटवाटेची ही सुरूवात -

वाटेत कातळात कोरलेल्या या पायर्‍या लागल्या ('त्या' सवाष्णीने खोदलेल्या असाव्यात. इथेच जवळपास तिची समाधीही आहे, तो फोटो हुकला)

पण हे फक्त सुरुवातीच्या थोड्या अंतरापुरतेच! काही वेळातच वाट दाट झाडीत शिरली. चिखलमातीतून पायवाटेने निघालो. पहिल्या पावसाने जमिनीबरोबरच एका दगडालाही शेवाळी शाल पांघरली होती -

वाटेत एक बांधकाम लागले. (स्थानिक लोकांपैकी कुणीतरी वाडा/गोठा बांधला असावा)

तसेच खाली उतरत उतरत तासा-दीडतासाने बहिरमपाडा या गावामध्ये शिरलो. एव्हाना एक वाजला होता. एकूण साडेपाच(च) तासात चढून उतरलो होतो. मागच्या परीक्षेत राहिलेला बॅकलॉग पुढच्या परीक्षेत डिस्टींक्शनने भरुन निघावा असे काहीसे वाटत होते.

बहिरमपाड्यातून एक लाँगशॉट - डावीकडचा डोंगर म्हणजे तैलबैलासमोरील पठार, त्याच्या उजवीकडच्या किनारीवर सवाष्ण घाट. उजवीकडे सुधागड.

उकाडा, दमटपणा, घाम हे त्रास पुन्हा सुरू झाले होते. त्यात बहिरमपाडा ते धोंडसे आणि धोंडसे ते वैतागवाडी (हे गावाचे नाव आहे!) असे दोन-अडीच किमी चालायचे होते. ते चालून वैतागवाडीतून टमटमने पाली, पालीहून खोपोलीला पोचलो तेव्हा तीन वाजले होते.

इथून सूरज खोपोली लोकलने मुंबईला गेला. खोपोली स्टँडात उभी असलेली पुणे एशियाड, गर्दी होती म्हणून सोडली आणि मग बराच वेळ पुण्याकडे जाणारी एसटी आलीच नाही. अखेर एका टेंपोतून लोणावळा गाठले आणि 'जब वी मेट' मधल्या करिना स्टाईलने कर्जत-पुणे शटल प्लॅटफॉर्महून सुटत असताना (सॅकसकट) धावतच पकडली.

पहिल्या दिवशी तब्येत बिघडली नसती तर सुधागडसुद्धा झाला असता खरा, पण जो अनुभव मिळाला, तो मिळाला नसता. आपल्या वाट्याला आलेले हे अनुभवाचे दान बिनतक्रार स्वीकारणे ही भटकंतीमधल्या आनंदाची खरी गंमत आहे!

दोस्तहो, या वाटेने फारसे कुणी गेल्याचे, व गेल्यावर त्याबद्दल लिहिल्याचे माहित नाही. त्यामुळे काही बारकाव्यांसकट ही भ्रमंती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. इतके वर्णन वाचूनही जर तुम्ही या ट्रेकमध्ये वाट चुकलात, तरी हरकत नाही. कारण, 'वाट चुकण्याच्या आणि ती आपली आपण शोधण्याच्या' एका अत्युत्तम आनंदाचा अनुभव तुम्हाला मिळालेला असेल!

जाता जाता - या भागामध्ये उन्हाळ्यात अथवा कोरड्या ऋतुमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. वाघजाई मंदिरापाशी असणार्‍या पाण्याशिवाय, थेट ठाणाळे गावापर्यंत कुठेही पाणी नाही. काही वर्षांपूर्वी या भागात सॅकमध्ये पुरेसे पाणी न घेता आलेल्या एका भटक्याचा तडफडून मृत्यू झाल्याची कथा गावात बर्‍याच जणांनी आम्हाला सांगितली. पावसाळ्यामध्ये सुरू असणारे दोन धबधबे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बंद होतात. तेव्हा भटक्यांनी पुरेसे पाणी सोबत बाळगावे, ही सूचना! पुन्हा भेटूच!

(समाप्त) - नचिकेत जोशी

Tuesday, July 17, 2012

वाघजाई घाटाने वर, सवाष्ण घाटाने खाली! (भाग १)

हा ट्रेक ध्यानीमनीही नसताना अवचित घडला! करायचा होता वेगळाच, आणि झाला वेगळाच! पण सह्याद्रीमधल्या एका सुंदर आडवाटेची ही भ्रमंती आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचे नाही! शनिवार-रविवार मोकळे मिळत आहेत अशी शक्यता दिसायला लागली आणि लगेच सूरजला फोन लावला. अट्टल ट्रेकर्स लोकांना सोबत ट्रेक करायला ओळखी लागत नाहीत, कंफर्ट नावाचा प्रकार लागत नाही.. समान आवड जुळली की निघाले सॅक पाठीवर टाकून!

मागे एकदा मुंबईहून सकाळी इंद्रायणी एक्सप्रेसने पुण्याला येत असताना गर्दीमध्ये (नेहमीप्रमाणे) दरवाजात अंग मुडपून बसलो होतो. मागच्या बाकावरून ढाकला निघालेल्या तीन-चार तरूणांच्या गप्पा ऐकल्या आणि ओळख-बिळख नसतानाही (गरजच काय ओळख असण्याची?) थेट त्यांच्या गप्पांत सामील झालो. मग एकत्र ट्रेक करण्याचे वादे झाले आणि या ट्रेकमध्ये ते पूर्ण झाले!

आधी लोणावळा ते भीमाशंकर (उर्फ सुप्रसिद्ध 'लोभी' ट्रेक) करावा असं ठरवत होतो. पण दोन दिवसात ७० एक किमी ची भ्रमंती झेपणार नाही असे वाटून प्लॅन बदलला. आयत्यावेळी ग्रूप जमवण्यापेक्षा दोघेच एखादा आडवाटेचा ट्रेक करू, असे ठरवले आणि 'मायबोली' वर ठाणाळे ते तैलबैला हा विमुक्तचा लेख आठवला. त्याच्या लेखामध्ये सुदैवाने वाटेचा कुठेही सुस्पष्ट उल्लेख नव्हता, त्यामुळे आमच्यासाठी वाटा शोधण्याचा एक नवीन अनुभव मिळणार होता. 'ठाणाळे ते तैलबैला (व्हाया लेण्या), तैलबैला गावात किंवा भिंतींच्या बेचक्यात मुक्काम करायचा आणि दुसर्‍या दिवशी तैलबैला ते सुधागड असा (फक्त ऐकलेला) ट्रेक करायचा' एवढ्याच प्लॅनवर सॅक बांधून निघालो.

मी शनिवारी, ३० जूनला, पुण्याहून सिंहगड एक्स्प्रेस पकडली आणि सव्वाआठला कर्जतला पोचलो. सूरज (मु.प. जोगेश्वरी, मुंबई पश्चिम रेल्वे) दादरहून समस्त ट्रेकर्स लोकांची नेहमीची दादरला सकाळी ५.५८ येणारी कर्जत लोकल पकडून त्याच सुमारास कर्जतला पोचला. तिथून लोकलने खोपोली स्टेशन आणि मग खोपोली एसटी स्टँड! साडेनवाला पालीसाठी एसटी होती. खोपोलीहून नाडसूरला सकाळी आठ वाजता एसटी आहे.

पालीहून थेट ठाणाळेसाठी सकाळी पावणेआठला पहिली एसटी आहे (अंतर अंदाजे १० किमी). तसेच रात्री आठला ठाणाळे मुक्कामी एसटी आहे. ठाण्याहून सकाळी सहा वाजता ठाणाळेसाठी थेट एसटी आहे.

पालीतून दिसणारा सरसगड - मागच्या पावसाळ्यात चोरवाटेने केलेल्या सरसगडाच्या ट्रेकच्या आठवणी जागवतच पालीहून सव्वाअकराची एसटी पकडली. वाटेत तैलबैलाच्या जुळ्या भिंतींनी पहिल्यांदा दर्शन दिले. शेजारचा डोंगर म्हणजे भोराईचा किल्ला उर्फ सुधागड! स्थानिक लोकांमध्ये सुधागडला भोराईचा किल्ला आणि सरसगडला सुधागड अशी म्हणण्याची पद्धत दिसली. (मी काही लगेच त्यांची चूक दुरूस्त करायला गेलो नाही!) नाडसूर गावात पोचलो तेव्हा बारा वाजले होते. वाटेत निवडुंगाला फुले (मी पहिल्यांदाच) पाहिली - हवेत भयंकर उकाडा आणि दमटपणा होता. नाडसूरपासून ठाणाळे २ किमीवर आहे. वाटेत एका शेताच्या बाजूने वाहणार्‍या पाटाच्या पाण्यात ओंजळ बुडवली, तर पाणीसुद्धा गरम लागले! अखेर तसेच पुढे निघालो. एव्हाना माझ्या नव्या कोर्‍या अ‍ॅक्शन ट्रेकिंग शूजमध्ये पाय मनमुराद सरकत होता, घसरत होता आणि अंगठ्यावर जोर येऊ लागला होता. (बहुधा मी एक नंबर मोठा साईझ घेतला आहे). ठाणाळे गावात एका घराच्या उघड्या अंगणात सॅक टाकली, दोन तांबे पाणी रिचवले आणि बुटांमध्ये रद्दीपेपरचे कुशनिंग घालून घेतले.

लेण्यांमध्ये जाण्यासाठी मुंबईहून आलेले सहा लोक थोड्याच वेळापूर्वी पुढे गेले असल्याची माहिती मिळाली. गृहलक्षुमीला लेण्यांची वाट विचारून घेतली. 'या समोरच्या वाड्यापासूनच वाट हाये. नीट जावा. कुठेही वाट सोडू नका' - इति गृहलक्षुमी. आम्ही होय म्हणून निघालो. का कुणास ठाऊक, इतका थकवा जाणवायला लागला होता की पाय उचलून पुढे जाऊच नये असे वाटत होते. डोके काम न करेनासे होणे, वेळेवर हव्या त्या गोष्टी न सुचणे, काहीही न सुधरणे अशा गोष्टी ट्रेकमध्ये घडतात हे केवळ ऐकले होते. याचा प्रत्यक्ष अनुभव थोड्याच वेळात येणार होता. सूरज मालुसरे हा ताज्या दमाचा ट्रेकर. AMK (अर्थात अलंग-मदन-कुलंग) एका दिवसात करणार्‍या दुर्मिळ लोकांपैकी हा एक. नुकत्याच मदन ते कुलंग दरम्यान शोधल्या गेलेल्या जवळच्या वाटेच्या शोधपथकाचा एक सदस्य. त्या दिवशी वाड्याजवळून डावीकडे निघणारी मळलेली पायवाट सोडून देऊन गडी उजव्या हाताला वळला आणि मी कुठल्यातरी अनामिक शक्तीने अडवून धरल्याप्रमाणे काहीच बोललो नाही. लेण्या नेमक्या कुठल्या दिशेला आहेत याचा नक्की अंदाज दोघांनाही नव्हता. थोडे अंतर चालल्यावर माझी तब्येत ढासळायला लागली. पाय जड झाले, डोळ्यासमोर अंधार येऊ लागला, भयंकर थकवा जाणवू लागला. पुढचे दोन तास मी नक्की कशाप्रकारे चाललो ते मलाही आता आठवत नाही. फक्त अधूनमधून 'पायाखालची ठाणाळेपासून दूर जाणारी वाट सोडून शेजारच्या डोंगराच्या माथ्याकडे नेणारी वाट शोध/तयार कर' एवढेच सूरजला सांगत होतो. कारण लेण्या त्या दिशेला नक्की नाहीयेत एवढेच मला समजत होते. तो मात्र एका दिवसात AMK करण्याच्या वेगाने पुढे निघाला होता. 'हा डोंगर संपला की मग आपल्याला नक्की दिशा कळेल' असे त्याचे मत होते. "पायाखालची वाट सोडू नये" हे त्याचे तत्त्वज्ञान तर "दिशा माहित असेल तर प्रसंगी बिंधास्त वाट सोडून दिशेकडे निघावे" हे माझे सूत्र! अखेर पाय भयंकरच जड झाले आणि सॅक टाकून खाली बसलो. इलेक्ट्रॉल नावाची पूड गरज म्हणून पाण्यातून घेण्याचा इतक्या वर्षातला हा पहिलाच प्रसंग! (हाही अनुभव मोलाचाच!)

त्या डोंगराला पायथ्याशी समांतर झाडोर्‍यातून चालत राहिलो. एक पठारसदृश प्रदेश पार केला. वाटेत डोंगराच्या पोटात एक लेणीसदृश जागा सापडली. त्यात एकच खोली होती. (त्यांना 'महारलेणी' म्हणतात हे दुसर्‍या दिवशी कळले.) अखेर तीनच्या सुमारास सूरजला बळेबळेच डोंगरावर चढाई करण्यास फर्मावले. वास्तविक, हा निर्णय घेतला तेव्हा चढाईसाठी त्या दिशेला अजिबातच वाट नव्हती. केवळ झुडुपांना धरून, दगडांमधून वर सांभाळत चढावे लागणार होते. एरवी अशा वाटेनेही आरामात चढलो असतो. पण निघून चाललेला वेळ आणि बरी नसलेली तब्येत यामुळे नकारात्मक विचार डोक्यात वाढू लागले होते. अगदी 'ट्रेकसंन्यास' पर्यंत मन धावून पुन्हा माघारी आले. त्या नसलेल्या वाटेने कसेतरी स्वतःला ओढत त्या टेकाडाच्या माथ्यावर पोचलो आणि एका झाडाच्या दाट सावलीत विसावलो. जेवणाच्या पुड्या सोडल्या आणि थोडेसे खाऊन घेतले. एव्हाना तैलबैला तर दूरच, पण लेण्यांपर्यंत तरी पोचू की नाही हे माहित नव्हते. ('लो-भी' चा लोभ टाळला हे बरेच झाले म्हणायचे!) लेण्या कुठे गायब झाल्या होत्या ते (नेहमीप्रमाणे) सह्याद्रीलाच ठाऊक होते!

पण कसे कुणास ठाऊक, दोन घास (आणि कदाचित इलेक्ट्रॉलही) पोटात गेल्यावर थोडे बरे वाटू लागले आणि त्या डोंगरमाथ्यावरील सपाट पायवाटेने पुन्हा ठाणाळेच्या दिशेने पाय उचलायला सुरूवात केली. पाच मिनिटात दृश्य खुले झाले आणि समोरच्या डोंगराच्या पोटात लेण्या दिसल्या!
वाट कुठे चुकलो होतो या प्रश्नाचे एका क्षणात उत्तर मिळाले. ते उत्तर होते - गावातून निघताना लागलेल्या पहिल्याच वाड्यापाशी! तिथून डावीकडे निघणारी वाट सोडून उजवीकडे शिरलो होतो आणि पुढचे चार तास भरकटत इथे पोचलो होतो. अंधार पडायच्या आत लेण्यांपर्यंत आजच पोचणे अवघड असले तरीही लेण्या दिसल्यामुळेही अचानक उत्साह आला. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने माझ्या मनस्थितीत झालेला हा बदल खूपच आनंददायी होता. तिथेच उभे राहून उरलेल्या वेळेचा अंदाज घेतला आणि डोंगर उतरून उत्साहाच्या भरात लेण्यांकडे निघून अंधार पडला तरी लेण्या गाठण्यापेक्षा आजची रात्र गावातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. उद्या सकाळी उठल्यावर नव्या उत्साहाने निघणे अधिक श्रेयस्कर वाटले. समोर डोंगरावर पायवाट गेलेली होती. त्या वाटेने निघालो. डावीकडे लांबवर सरसगड ढगात डोके खुपसून उभा होता. पायथ्याच्या गावांमधली चित्रासारखी दिसणारी शेते-खाचरे - पंधरा फुटांचा एक रॉकपॅच उतरण्यातले थ्रिल पुरेपूर अनुभवून गावात आलो तेव्हा फक्त पाच वाजले होते. उतरताना सूरजला एका लांबलचक सर्पाने दर्शन दिले, एवढीच काय ती भीतीची गोष्ट!

गावात आलो आणि पथार्‍या पसरायला मंदिर कुठे आहे ते विचारू लागलो. 'दोन मंदिरे आहेत - एक उघड्यावर आहे आणि दुसर्‍याचे बांधकाम सुरू आहे'! मग शाळेची चौकशी केली. तर शाळा 'जि.प.ची असून कुलुपात बंद आहे व ते उघडायची परवानगी नाही' हे उत्तर मिळाले. तेवढ्यात तिथेच एक आजीबाई भेटल्या व त्यांनी आपणहून स्वतःच्या घरात मुक्कामाला बोलावले. आमचे जणू सगळेच प्रॉब्लेम सुटले असे वाटून आम्ही त्यांच्या घरात गेलो. मग यथावकाश कुटुंब-मुले-उत्पन्नाची साधने-मुले-सुना-मूळ गाव-कुलदैवत-शेती-पाऊस-वाघजाई घाट अशा नानाविध विषयांवर आजीबाईंशी गप्पा झाल्या. चहा पोटात गेल्यावर हुशारीही आली आणि उद्या एकाच दिवसात लेण्या आणि तैलबैला करण्याचा विचार सुरू झाला. पाली एसटी स्थानकामध्ये फोन करून उद्यासाठी पुणे/खोपोलीच्या एसटीच्या वेळांची चौकशी करून घेतली. आषाढीनिमित्त आजीबाईंचा उपवास होता, तरी आमच्यासाठी त्यांनी चुलीवर रस्सा-भात-पापड असा मेनू बनवला. आजीबाईंनी दुसर्‍या दिवशी 'घालवायला' (म्हणजे वाट दाखवायला) माझा मुलगा देतो (देते नव्हे, देतो) असे सांगितले. "तो येईल, तुम्ही कोणालातरी द्यायचीच तर त्याला मजुरी द्या!" आम्हीही तयार झालो. संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, रात्र पडली तरी गार सोडा, साध्याही झुळुकीचा पत्ता नव्हता. या ट्रेकची विशेष गोष्ट कोणती असेल तर अत्यंत दमटपणा आणि त्यामुळे वाहणारा घाम! आजवर कुठल्याही ट्रेकने मला इतका 'घाम गाळायला' लावला नसेल. सॅकमधून कॅरीमॅट आणि चादर काढली आणि आडवे झालो. चिक्कार डास होते. पांघरूण घेतले की घाम सुरू आणि पांघरूण काढले की डासांचे 'गुंगान' सुरू! फरसबंद पडवीत मॅटवर सूरज आणि टोपल्याखाली झाकलेल्या कोंबड्या, मधल्या खोलीत मी आणि स्वयंपाकघरात आजीबाई अशी सोय केली. रात्र कशीतरी चुळबुळत गेली आणि सक्काळी ५.३० ला आजीबाईंच्याही आधी मीच जागा झालो... (क्रमशः)

नचिकेत जोशी