Pages

Monday, January 31, 2011

सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग ५ (अंतिम)

थोडक्यात पात्रपरिचय: नाव आणि कंसात माबो आयडी
यो : योगेश कानडे (यो रॉक्स)
ज्यो: गिरीश जोशी
अवि: अविनाश मोहिते (अवि_लहु)
रोमा किंवा रो: रोहित निकम (रोहित एक मावळा)
मी: नचिकेत जोशी (आनंदयात्री)

२८ डिसेंबर: मांगी-तुंगी आणि निरोप

पायवाटा आणि पायऱ्या या शब्दांची सुरूवात सेम आणि शेवट वेगळा असला तरी दोन्ही चढून संपल्यावर होणारा आनंद मात्र अगदी सेम असतो. आणि पायऱ्या जर अडीच हजार वगैरे असतील, तर मग तो चढल्यावर आनंद सुळक्यावरून थेट आभाळात पोचतो. आणि या अडीच हजार पायऱ्या जर पाऊण तासात आणि तेही एकदाही न थांबता पार झाल्या तर मग काय सांगावे? सुदैवाने या तिन्ही घटना एकाच दिवशी एकाच ठिकाणी माझ्या बाबतीत घडल्या आणि पाऊणतासात अडीच हजार पायऱ्या चढल्याच्या आनंदापेक्षाही गुडघा एकदाही दुखला नाही अथवा दुखणार असं वाटलं नाही हा आनंद कितीतरी जास्त होता! :)

चार वाजता गजर झाला आणि योला पाच वाजता तयार राहण्याचे वचन दिल्यामुळे बरोबर चार वाजताच उठलो. बरोब्बर पाच वाजता सगळे तयार झालो. खोलीमध्ये चक्क लाईट मिळाल्यामुळे सगळ्यांच्या बॅटऱ्या चार्ज झाल्या होत्या. कॅमेरा, पाण्याच्या बाटल्या आणि थोडेसे खायला यासाठी अविची एकच सॅक घेतली. भिलवडीच्या जैन मंदिरांच्या आवारातूनच पायथ्यापर्यंत जीप असतात. अनेक जैन कुटुंबे अत्यंत भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात. आदल्या दिवशी भिलवडीदर्शन आणि दुसर्‍या दिवशी पहाटे मांगीजी-तुंगीजी दर्शन असा बहुतेकांचा प्रोग्राम असतो. आम्हीही तसेच केले. भिलवडीमधील मंदिरांचे फोटो-












परंतु त्यांपैकी बऱ्याच कुटुंबातील सदस्यसंख्या जीपच्या क्षमतेपलिकडे असल्यामुळे आम्हाला सुरूवातीच्या दोन जीपमध्ये जागा मिळाली नाही. तिसऱ्यावेळी मात्र मुंबईच्या लोकलमध्ये शिरण्याचे कसब वापरून आम्ही जीपमध्ये जागा मिळवली. सुळके अंधारात बुडाले होते. त्याच डोंगरावर आदिनाथांची १०८ फुटी उंच मूर्ती उभारण्याचे काम सुरू आहे. त्या बांधकामाचा लाईट तेवढा सुरू होता.

पायथ्याशी उतरलो तेव्हा साडेपाच वाजले होते. भिलवडीला पोचेपर्यंत पायऱ्यांची संख्या ३५०० आहे असं वाचलं होतं. काल भिलवडीमध्ये एका पुस्तकामध्ये हाच आकडा ४५०० वाचला होता. त्यामुळे नक्की किती पायऱ्या आहेत हे प्रत्यक्षच मोजूया असे अवि आणि रोमाचे मत बनले. (अर्थात वयस्कर आणि गरजूंसाठी डोलीचीही सोय आहे.) हा उत्साह पहिल्या पन्नास पायऱ्यांपर्यंत टिकला. पन्नासाव्या पायरीवर बेंचमार्क दिसल्यावर मग त्यांनी एकदमच हुश्श केले. इथून पुढे नियमीत बेंचमार्क्स असल्यास मोजण्याची आवश्यकता नव्हती. शंभराव्या पायरीच्या आसपास चौघे दम खायला बसले. मी मात्र I think i can go असे म्हणून पुढे निघालो. १००, २००, ५००... १०००... १५००... दम लागला तरी बसण्याची गरज वाटत नव्हती. एकही पायरी स्किप करून चढत नव्हतो. (त्या प्रयत्नात दम जास्त लागतो) आणि गुडघाही All is well सांगत होता. त्यामुळे मग कुठेही न बसता, तोंड बंद ठेऊन, संथ पण एकाच गतीने, अजिबात चुकीचे, अतिरिक्त पाऊल न टाकता चढत राहिलो. आमच्या आधी केवळ २ जीप आल्या असल्यामुळे त्यातून उतरलेले सर्व भाविक हळूहळू मागे पडत गेले. अपवाद फक्त तीन छोटी मुले आणि एका आजीबाईंचा. ती तीन मुले दोन हजाराव्या पायरीलाही अत्यंत उत्साहात होती. फक्त त्यातल्या एककडची पिशवी तो दमल्यामुळे तिथपासून अस्मादिकांनी स्वत:कडे घेतली होती. खरं सांगायचं तर मांगी-तुंगीच्या दर्शनाला जात असलो तरी आम्ही यात्रिक अथवा भाविक नव्हतो, फक्त पर्यटक होतो. त्यामुळे दर्शनासाठी शूचिर्भूत वगैरे होण्याच्या इतरांच्या आणि आमच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या. तरीही वर चढणाऱ्या भक्तांना जमेल तेवढी मदत करावी म्हणून तो पिशवीप्रपंच!

अशा प्रकारे एकाग्रतेने, स्वत:च्या क्षमतेवर चढत मांगीच्या गुहांजवळ पोहोचलो तेव्हा सव्वासहा वाजले होते. माझ्या स्वागताला तिथे फक्त रात्रपाळीचा वॉचमन हजर होता. ;) मुले पाठोपाठ चढून आली. आणि अवघ्या पाच दहा मिनिटात त्या आजीबाईही चढून वर आल्या. मी त्यांच्या या कर्तृत्वामुळे खरोखर थक्क झालो. मीही नुकताच त्याच पायऱ्यांनी चढून आलो असल्यामुळे त्या कर्तृत्त्वाचे मोल जाणत होतो. या वयातही ज्या गतीने त्या चढून आल्या होत्या ती खरंच कौतुकास्पद होती. :) पायवाटांपेक्षा पायऱ्यांनी चढणे सोपे असते असा एक मतप्रवाह मी ऐकला आहे. मला तो व्यक्तिश: पटत नाही. चार मजल्यांच्या जास्तीत जास्त सत्तर पायऱ्या आणि अडीच हजार पायऱ्या यात नक्कीच फरक आहे. एवढ्या पायऱ्या चढायलाही तेवढाच स्टॅमिना, तेवढीच मनाची तयारी लागते. in fact, कधीकधी सरळसोट चढ परवडला पण पायऱ्या नको असे वाटण्याइतका ताण दर पायरीला गुडघ्यांवर येत असतो! आजीबाईंच्या त्या ’करामतीकडे’ बघून श्रद्धा श्रद्धा म्हणतात ती हीच असावी असे क्षणभर वाटून गेले. आणि त्यांच्या या चढाईला सलाम म्हणून मी त्यांना फक्त वाकून नमस्कार केला. त्यांनीही ’बहुत जियो बेटा’ असे तोंडभर आशीर्वाद दिले. :)

कमालीची थंडी होती आणि वाराही सुटला होता. अंधारात मी एकटाच आसमंत पाहत उभा होतो. त्या चढाईमध्ये कुठेतरी माझा उजवा हॅण्डग्लोव्ह पडला आणि त्यामुळे थंडिपासून बचाव करण्यासाठी एका वेळी एकाच हातात ग्लोव्ह घालावा लागला. पंधरा-वीस मिनिटात उरलेले चार ’गडवाले’सुद्धा दाखल झाले आणि सुव्रतनाथांचे दर्शन पटापट उरकून आम्ही सूर्योदय बघायला धावलो. मांगीच्या सुळक्यावर घालवलेला पुढचा जवळजवळ पाऊणतास आयुष्यभर लक्षात राहणार आहे. मांगीच्या "बालेकिल्ल्याला" प्रदक्षिणा घालता येते. त्या वाटेवर तुंगीच्या दिशेने एक माचीवजा सोंड जाते. त्या ठिकाणी जोरदार वारा होता. त्या सोंडेच्या टोकापर्यंत जाऊन आम्ही उड्या मारल्या, फोटो काढले. त्या उड्या आपण इथे पाहिल्या आहेतच. -
http://www.maayboli.com/node/22277
http://www.maayboli.com/node/12975

सूर्योदयाचे हे काही फोटो-






यो महाराज-



उडीमास्तर यो, मग ज्यो, मग रोमा आणि मग अविने बिनधास्त उड्या मारल्या. शेवटी मलाही उड्या मारायचा आग्रह झाला आणि मी त्या सोंडेच्या टोकावरच्या छोट्या जागेमध्ये उभा राहिलो. वारा सुटला होता. मला अशी (प्रामाणिक) भीती वाटत होती की मी उडी मारल्यावर हवेत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर उडून तर जाणार नाही ना? :D :D अखेर योने तू अजिबात उडणार नाहीस अशी खात्री दिल्यावर एक दोन ’पायलट’ उड्या मारून पाहिल्या आणि मग मारली उडी!! :)

आठ वाजत आले होते. आम्ही तुंगीकडे निघालो. मांगी चढताना दोन हजारव्या पायऱ्यीपाशी तुंगीकडे वाट जाते. तिथपर्यंत उतरून आलो.



तुंगी सुळक्यासाठी तिथून पाचशे पायऱ्या आहेत. अशी एकूण तीनहजार शंभर पायऱ्यांची चढाई आहे. तुंगीपर्यंतची वाट लांब आहे. वाटेत एक वृंदावन लागते. - मागे तुंगी.


मांगी-तुंगीवरील मूर्तींचे हे काही फोटॉ-






तुंगी बघून उतरतांना एका डोलीवाल्याने मला माझ्या उजव्या हाताचा सकाळी पडलेला ग्लोव्ह आणून दिला. मला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला. :)
तुंगीवरून मांगी-


(हा माझा एक आवडता फोटो)


मांगी-तुंगी ’फाट्यापाशी’ आलो तेव्हा नऊ वाजले होते. माणसांचे पूर्वज सगळीकडे विहरत होते. ज्यो आणि रोमाने त्यांचे (आणि त्यांच्याबरोबर) फोटो काढण्याची हौस पूर्ण करून घेतली. :D आता ट्रेकमधली शेवटची उतरण - २००० पायऱ्या - नऊ वाजून दहा मिनिटांनी उतरायला सुरूवात केली.








उतरतांना अजून काळजी घ्यावी लागणार होती कारण चढण्यापेक्षा उतरताना गुडघ्यावर जास्त जोर येतो. त्यामुळे योने मला तू तुझ्या स्पीडने उतर, आम्ही तागडाक् तागडाक् करत जातोय असे सांगितले. तागडाक् च्या नादात आणि उत्साहाच्या भरात सुटलेला अवि एका पायरीवर घसरला आणि *** वर आपटला. सुदैवाने किरकोळ दुखापत होती. मग तिथून मी जे सुटलो ते माझ्या पुन्हा एका नियमीत गतीने त्या उरलेल्या दोन हजार पायऱ्या उतरून (अवघ्या) वीस मिनिटात खाली पोचलो. मला ज्ज्ज्ज्जाम आनंद झाला होता. माझा स्वत:वर विश्वासच बसत नव्हता. पण येस्स्स्स!! :)


एकूणात, मागच्या तोरणा-रायगड ट्रेकपेक्षा या ट्रेकमध्ये मी माझ्या चालण्यात आणि चढ-उतारात सुधारणा केली होती आणि त्याचमुळे ६ वेडेवाकड्या वाटांचे आणि कस पाहणाऱ्या पायऱ्यांचे किल्ले चढून-उतरूनही गुडघा ठणठणीत होता. लगेच सर्व ट्रेकमेट्सने मग मला ’पायऱ्या स्पेशालिस्ट’ अशी पदवी बहाल केली. भिलवडीहून मांगीला येताना जीपच्या टपावर बसलेली माणसे पाहिली होती. त्यामुळे परत जाताना (आतमध्ये जागा असूनही) आम्ही टपावरच बसण्याचे ठरवले. जीपवाल्याला सांगून (विचारून नव्हे ;)) टपावर चढलो देखील.





मला मागच्या वर्षी तोरणा-रायगड ट्रेकमध्ये रायगडवाडीपासून महाडपर्यंत वाळूच्या डंपरमध्ये बसून आलो होतो, त्याची आठवण झाली. :)
खोलीची चावी जमा करून एका टमटमने ताहराबादला आलो. लगेच साडेअकराची सटाणा-नाशिक एसटी मिळाली. ती एसटी जुन्या सीबीएसला गेली. चौघांची मुंबईची एसटी महामार्ग स्टॅण्डवरून तर माझी पुणे एसटी जुन्या सीबीएसवरून होती. अशा प्रकारे नवीन सीबीएसच्या बाहेर, ट्रेकपूर्वी कधीही न भेटलेल्या पण त्याची जराही जाणीव न ठेवता एकमेकांच्या साथीत, एकमेकांना सांभाळून घेतलेल्या, आणि ट्रेकच्या शेवटी छान मित्र बनलेल्या पाच मायबोलीकर अट्टल भटक्या ट्रेकमेट्सचा निरोपसमारंभ (उरलेला हिशेब सेटल करून) पार पडला. :) चौघे मुंबईला आठपर्यंत पोहोचले आणि पाचवा मावळा ’गडावर’ सुखरूप पोहोचला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते.
********

बागलाण प्रांतातल्या आमच्या सहा किल्ल्यांच्या आनंदयात्रेची ही कहाणी इथे संपते! माझ्या परीने मी ती अधिक वर्णनात्मक करण्याचा प्रयत्न केला. वाचकाच्या डोळ्यासमोर उभं राहिल अशा शब्दात वर्णन करण्याची धडपड केली. वाचकांपुढे इतकं सगळं विस्तृत लिहून नंतर या ठिकाणी जाणाऱ्यांचा ट्रेकमधला स्वत: वाटा शोधण्याचा निखळ आनंद तर आपण हिरावून घेणार नाही ना, ही भीतीही सतत मनात होती. त्यामुळे काही ठिकाणी जुजबी वर्णन करून तो आनंद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ही लिखित आनंदयात्रा रोमहर्षक होती, रंजक होती, सुखद, थरारक, अप्रतिम, उत्कंठावर्धक की अजून काही, याचा निर्णय सर्वस्वी वाचकमित्र-मैत्रिणींनो, तुमचाच आहे. या चार-पाच दिवसांत आम्ही खूप फिरलो, खूप काही बघितले, निसर्गाच्या अनेक खेळांपैकी काहींचे साक्षीदार झालो. प्रत्येक वेळी निसर्गापुढे आपण खुजे आहोत या भावनेला पुष्टी देणारे प्रसंग, जागा अनेकवेळा पाहिल्या. सालोट्याच्या कड्याखाली उभे राहताना, साल्हेरवरच्या गुहेबाहेरून सहस्रावधी चांदण्यांनी भरलेले आकाश पाहतांना, मुल्हेरवरून सूर्यास्त आणि मांगीवरून सूर्योदय पाहतांना, सालोटा उतरतांना समोर ’आ’ करून ’तयार’ असलेली दरी पाहतांना, मुल्हेरवर अंधारात वाट शोधताना, मांगीच्या सुळक्याखाली उड्या मारतांना त्या खुजेपणाची जाणीव अधिक दृढ होत गेली. अर्थात, निसर्गाच्या अधीन राहूनही, निसर्गाच्या करामतीमध्ये आपली करामत अजरामर करणाऱ्या निर्मीकांच्या खुणाही दिसल्या. साल्हेर-मुल्हेर-मोरा-सालोटा इथल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण होय. तसं पाहायला गेलं तर निसर्गाची कारागिरी पाहण्याच्या हेतूबरोबरच स्वत:ला, स्वत:च्या क्षमतेची वेस शोधण्याचाही हेतू होता. मागल्या ट्रेकपेक्षा आपण किती ’म्हातारे’ झालो आहोत हे शोधण्याचा एक प्रयत्न होता. इतका जवळजवळ प्लॅनप्रमाणेच ट्रेक झाल्यावर अजून काय हवं होतं? आणि धकाधकीच्या जीवनापासून दूर, शांत ठिकाणी ’शब्दांच्या पलिकडले’ जे मिळालं ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणंही अवघड आहे. पण अशा ’अजून’ काहीतरी हवं असल्याच्या मागणीमुळे ह्या आनंदयात्रा अशाच सुरू राहणार आहेत. आणि मागे एकदा म्हटल्याप्रमाणे अशा आनंदयात्रांच्या स्वागताला हा सह्याद्री आडवाटाही सजवून सदैव उभा असणार आहे! :)
(समाप्त)
नचिकेत जोशी




सर्व फोटॉ - यो रॉक्स, रोहित मावळा आणि आनंदयात्री

सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग ४

थोडक्यात पात्रपरिचय: नाव आणि कंसात माबो आयडी
यो : योगेश कानडे (यो रॉक्स)
ज्यो: गिरीश जोशी
अवि: अविनाश मोहिते (अवि_लहु)
रोमा किंवा रो: रोहित निकम (रोहित एक मावळा)
मी: नचिकेत जोशी (आनंदयात्री)

२७ डिसेंबर: मोरागड, उर्वरित मुल्हेर आणि मुक्काम भिलवडी

मुल्हेरमाचीवरच्या सोमेश्वरमंदिरामध्ये लागलेली शांत झोप ही दीर्घकाळ स्मरणात राहील. पहाटे साहा वाजता गजर झाला, आणि उठलो तेव्हा एकदम फ़्रेश वाटत होते. उजाडतानाच निघायचे होते. आजचे पहिले लक्ष्य होते - मोरा. काल रात्री झोपताना यो सोडून बाकी सर्वांचे मत हरगड वगळून थेट मांगी-तुंगीकडे निघावे असे होते, पण रात्रीच्या शांत आणि आरामदायी झोपेमुळे पहाटे पाच वाजता उठलो तेव्हा मी, रोहित आणि ज्यो आम्हा तिघांनाही हरगडही होईल असे वाटायला लागले होते. तीन किल्ल्यांच्या आतापर्यंतच्या अविस्मरणीय ट्रेकमुळे अवि एकदम खुश होता. त्यामुळे त्याला इथून पुढचा ’हर’गड म्हणजे बोनसच वाटत होता.. :)

चहा आधी करायचा की नंतर हे ठरवण्यात तब्बल १० मिनिटे गेली (थोडाफार थंडीची हुडहुडी होतीच), त्यामुळे मोराकडे निघायलाच जवळजवळ साडेसात वाजले. (शेवटी काहीही न खाता निघालो!) आज मोराकडे आम्ही मंदिरासमोरच्याच वाटेने जाणार होतो.. ही वाट सोपी आहे... आणि मुख्य म्हणजे जवळजवळ संपूर्ण वाटभर मागे सोमेश्वरमंदिर दिसत राहते. त्या सुंदर वाटेने धापा टाकत वर पोचायला खरं तर अर्धा तास पुरेसा होता, पण आम्हाला तब्बल ५० एक मिनिटे लागली! वाटेत एका निवडुंगावर आलेली ही फुले -




भिंतीचा हा फोटॉ-


वर भिंतीच्या अलिकडे दोन दरवाजे लागतात. भिंतीवरून सुंदर नजारा दिसतो. झाडीमधले सोमेश्वर मंदिर एखाद्या हिरव्यागर्द हारामध्ये खोवलेल्या शुभ्र गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसते.


हा रोमा-


त्या भिंतीवरून ज्यो, अवि आणि यो कालचा हुकलेला दरवाजा नक्की कसा आणि कुठे आहे हे पहायला मुल्हेरच्या दरवाजाकडे गेले. मी मोराच्या पायऱ्यांकडे गेलो. तर रोमा अस्सल ट्रेकरच्या धर्माला जागून तीन दिवसांत दुसऱ्यांदा दिवसाच्या सुरूवातीच्या चढाईमध्ये पोटाला ’न्याय’ देण्यासाठी मागे थांबला होता. ;)

मुल्हेरकडून मोराकडे भिंतीवरून येणारी वाट एका अत्यंत छोट्या चोर दरवाज्यातून येते. त्या दरवाज्याच्या वरती एक बुरूज आहे आणि त्या बुरूजापर्यंत येण्यासाठी भडंगनाथाच्या मंदिरापासून पुढे मुल्हेरला पूर्वेकडून वळसा मारून नियमित पायवाट आहे! त्या चोरदरवाजाचा हा फोटो-


एवढंच काय, तर काल रोमा ज्या कड्याशी येऊन थांबला होता, तिथून उजव्या हाताला अगदी जरासाच वळसा मारून तो पुढे आला असता तर एका अनियमित पायवाटेपाशी पोचला असता, जिथून तो बुरूज, ती भिंत आणि त्या दरवाजाच्या आतील बाजूकडच्या पायऱ्या स्पष्ट दिसल्या असत्या!! हा हन्त हन्त!!! :( हा एवढा प्रदेश मला मोराच्या पायऱ्यांपासूनही दिसत होता आणि केवळ निराश होण्यापलिकडे मी काहीच करू शकत नव्हतो. कालच्या शेवटच्या २० मिनिटांनी खरंच सगळे बेत बदलवले होते! अखेरीस फोटो काढून ते तिघे मोराकडे आले. मी आणि रोमा आधीच वर जाऊन वारा खात बसलो होतो.
मुल्हेरवरून घेतलेले मोराचे (म्हणजे गडाचे) हे फोटो -






मोरागडावर बघण्यासारखे काहीच नाही. अक्षरश: २ दरवाजे, तीन टाकी आणि गवत, यात गड संपतो. तो बघून २० मिनिटात आम्ही परत दरवाज्याशी आलो. हा दरवाजा अगदी कड्याच्या टोकावर आहे. इथून सालोटाही स्पष्ट दिसतो. (साल्हेर दिसतोच दिसतो).
टाके-


तेच टाके, पण मागे उजवीकडे मांगी-तुंगी सुळके-

हे ओळखा बरं-
<

आता ओळखा -


आतातरी ओळखा!!! -- :)


(जाहीर कबुली - हे काय प्रकरण आहे, याचा अंदाज पहिल्या नजरेतच आल्यामुळे, हे फोटो जेव्हा घेतले गेले तेव्हा मी त्या टाक्याच्या काठाच्या आसपासही नव्हतो! ६ सेकंदात १०० मी हा वेग सालोट्यापासून लक्षात होता! :) )

मोरागडाच्या दरवाजातून हरगड आणि मुल्हेर बालेकिल्ला-



मध्येच ज्यो आणि यो "आभाळाच्या छताखाली मोकळी जागा" (म्हणजे काय ते सूज्ञास सांगणे न लगे! ;) ) शोधायला गेले आणि मी, रोमा आणि अवि गप्पा मारत बसलो. बोलता बोलता राजांचे किल्ल्यांचे धोरण, किल्ल्यांवरील बांधकाम, दरवाजे, संरक्षणाच्या सुविधा, त्यांनी करून घेतलेला सह्याद्रीचा उपयोग, मग हा विषय सुरू झाला की अपरिहार्यपणे होणारी संभाजी-शिवाजी तुलना, संभाजी हा राजांइतकाच शूर होता हा निष्कर्ष, मग छत्रपती परंपरा, पेशवाई, मग पहिल्या बाजीरावाचे ठळकपणे उठून दिसणारे कर्तृत्व,(मस्तानीला आयुष्यात न पाहताही बाजीरावाचा वाटणारा हेवा) असा दीड-दोन शतकांचा प्रवास करून गप्पा बाजीरावाने उभ्या आय़ुष्यात एकही लढाई हरली नाही इथपर्यंत आल्या.
अवि- महाराजांनी जंजिरा जिंकला होता काय रे?
मी -नाही. तो किल्ला त्यांना शेवटपर्यंत जिंकता आला नाही. एवढंच काय, संभाजीराजांनाही तो जिंकता आला नाही.
अवि-हो, म्हणून त्यांनी त्याच्या समोर पद्मदुर्ग बांधला होता ना-
मी -हो.
अवि-बाजीरावाने जिंकलेला काय रे जंजिरा?
मी - माहित नाही रे. वाचलं नाही कुठे.
अवि- हो ना राव! मी ही नाही पाहिलं.
मी - पाहिलं?? कुठे? का?
अवि - अरे मी टेल्कोची फाईल घेऊन पुण्याला गेलो होतो, बॉसचा फोन आला म्हणून. त्यामुळे पाहता नाही आलं.
मी - ??
पुन्हा मीच (कारण रोमाचे हात आणि तोंड चुरमुरे खाण्यात गुंतले होते) - टेल्को मध्येच कुठून आली??
अवि - अरे टेल्को आमची client आहे.
मी - ते ठीक आहे रे. पण टेल्कोचा बाजीरावाशी आणि जंजिऱ्याशी काय संबंध??
अवि - (माझ्याकडे ’याला मगाचपासूनची माझी जीव तोडून केलेली मौलिक बडबड कळली नाही, हा खरंतर कडेलोट करण्याच्या लायकीचा आहे’ या अर्थी कटाक्ष टाकून) अरे, टीव्हीवर बाजीराव-मस्तानी serial लागते ना, त्यात जंजिऱ्याच्या लढाईचा episode बघता नाही आला मला, कारण त्या दिवशी टेल्कोची फाईल घेऊन पुण्याला जावं लागलं (टेल्को आमची client आहे ना!)...
मी - ............
:D :D :D :D
हा खुलासा ऐकून मी आणि रोमा खरंच हसून कोसळायच्या बेताला आलो होतो! तो प्रसंग, ती जागा आणि ती वेळ सगळं जुळून आले होते! संध्याकाळी हा प्रसंग जसाच्या तसा उरलेल्या दोघांना ऐकवला तेव्हा तेही कोसळायचे बाकी होते! ( I am sure, आत्ताही ते चौघे पोट धरून हसत असणार!) पण यानिमित्ताने आमच्या गप्पा चालू शतकामध्ये आल्या आणि वेळेचेही भान आले! अर्थात चूक अविची नव्हती. इतिहासाचे दांडगे वाचन आणि सर्व ऐतिहासिक serials कोळून प्यायलेल्या अविला इतिहास आणि वर्तमान यांच्या मधले smooth transition सहज शक्य होते. त्यामुळे घटकेत खरा बाजीराव कसा होता आणि घटकेत टेल्को कोण आहे हा प्रवास त्याला जमला, आम्हाला कळायला वेळ लागला एवढंच! जाता जाता अवि उर्फ बाजीरावांचा आणखी एक पराक्रम सांगून ठेवतो. यांचा इतिहासावरील वाचनाचा व्यासंग एवढा मोठा आहे, की डॉ. अमोल कोल्हे फेम ’राजा शिवछत्रपती’ मालिका बघताना ह्यांना पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्यामुळे यांच्या वडिलांनी ती मालिकाच बघणे सोडून दिले आहे!!! ;) हे प्रश्न जर अविने नितीन देसाईंना विचारले असते, तर कुणास ठाऊक, त्यांनी मालिका बनवणेही सोडून दिले असते!! :D

वेळेचे भान आल्यावर घाईघाईत खाली उतरलो. ज्यो आणि यो मागून येणार होते. आम्ही खाली जाऊन चहा तरी करू असे म्हणून भराभर खाली आलो. घड्याळ आधीच वेगात पळत होते आणि तब्बल १० वाजलेले दाखवत होते! खाली आल्यावर सर्दीच्या भीतीने मी चुलीजवळ जाण्याचा प्रश्नच नव्हता आणि सगळी लाकडे आदल्या रात्री "चुलीत" घातल्यामुळे आता चहासाठीही लाकडे नव्हती. म्हणून मग नुसतेच आजूबाजूची हिरवाई बघत बसलो. हा टॉर्च-


अगदी खरं सांगायचं तर, ट्रेकचा तिसरा दिवस होता, सालोटा-साल्हेर-मुल्हेर-मोरासारखे मातबर किल्ले झाले होते, मांगी-तुंगी लिस्टवर नक्की होते, त्यामुळे नकळत थोडासा relaxation चा मूड होता. :)

यो परत आल्यावर आम्ही नुसतेच *** टेकवून हवा खात बसलेलो बघून (पुन्हा) ’हे तिघे कडेलोट करायच्या लायकीचे आहेत’ अशा नजरेने बघून त्यानेच मंदिरामागची लाकडे आणली, मग अविने चहा केला, मी आणि अविने गाळला आणि दिवसाचा पहिला चहा घेतला. मॅगी बनवली. (आम्ही ट्रेकमध्ये जेवणही करत होतो हा दाखवणारा एकमेव पुरावा :))


सॅक्स भरल्या. संन्यासीबाबा दीड-दोन किमी वरच्या शंकरमंदिरात ’आस्थापने’साठी निघून गेले. एव्हाना योला मंगळवारीच मुंबईत परत यायचे असल्यामुळे हरगड cancel करून मांगीकडे निघावे असं त्याचं मत बनलं होतं आणि उलट रात्री मस्त झोप मिळाल्यामुळे एवढ्या जवळ येऊन सातवा किल्ला सोडू नये असे आमच्या तिघांचे मत बनले होते. अवि खुश होता! अखेर बराच वेळ खलबतं करून शेवटी आम्ही हरगड वगळायचा निर्णय घेतला. (हा निर्णय चुकला हे आमच्या खूप उशिरा लक्षात आले). मग आता काय? आज सोमवार होता, उद्या दुपारी नाशिकहून परतीची गाडी पकडायची होती. मधल्या वेळात फक्त मांगी-तुंगी बाकी होते. आम्ही उत्साही लोकांनी तर संध्याकाळी मांगी चढून तिथेच गुहेत मुक्काम करू इत्यादी प्लॅन बनवला होता. तात्पर्य, आणखी टाईमपास सुरू झाला आणि मुल्हेरवरून निघायला १२ वाजून गेले.

निघताना मंदिर साफ केले, कचरा गोळा करून घेतला, उरलेला झाडीमध्ये टाकला, फोटो वगैरे काढले आणि निघालो. मुल्हेर उतरायच्या आधी रामेश्वरमंदिर बघायचे होते. रामेश्वरमंदिराची एक वाट गणेशमंदिरावरून जाते. ट्रेकमध्ये मांगी-तुंगीच्या साडेतीन हजार पायऱ्या अजून बाकी असल्यामुळे आणि मागील वर्षीच्या तोरणा ते रायगड ट्रेकमधल्या गुडघेदुखीच्या आठवणीमुळे मी शक्यतो कमी दगदग करण्याचा निर्णय घेतला होता. इतक्या सुंदर ट्रेकचा शेवट मला गुडघेदुखीमध्ये व्हायला नको होता. तात्पर्य, मी रामेश्वरमंदिर बघायला येणार नाही असे जाहीर करून टाकले. उरलेल्या चौघांनी (लगेच खुश होऊन) आपापल्या सॅक्स माझ्याकडे सांभाळायला दिल्या आणि मंदिर बघायला निघून गेले. ती २०-२५ मिनिटे मी गणेशमंदिराबाहेर शांतता ’ऐकण्यात’ घालवली. truely memorable!! . रामेश्वरमंदिरसुद्धा तितकेच प्रेक्षणीय होते हे मला नंतर कळले. त्याबद्दल सविस्तर यो लिहीलच.

मंदिर बघून मुल्हेर उतरू लागलो. रोमा आणि यो-ज्यो ने उतरताना एक सोपा short-cut शोधला आणि आम्ही जेमतेम तासाभरात गड उतरलो. माझ्या आणि अविच्या येताना पक्क्या रस्त्याजवळ तो कालचा बाबाजी भेटला. त्याची ख्यालीखुशाली विचारून मुल्हेर गावाकडे निघालो. येताना मात्र कालसारखी टमटम मिळाली नाही आणि ते २ किमी चे अंतर पायीच चालून आलो. वाटेत एके ठिकाणी सोयाबीनची यंत्रावर झोडपणी चालू होती. आम्हाला रस्त्यावरच उभे राहून ते पाहताना बघून मालकाने आत येण्याचे निमंत्रण दिले आणि यंत्राची माहितीही दिली. आम्हीही माग सराईत आडते असल्यागत सोयाबीन हातात घेऊन ’तपासून’ वगैरे पाहिले. :D त्याचे हे काही फोटो -




मुल्हेर गाव ऐतिहासिक आहे. प्रत्येक घर इतिहासाची साक्ष देते. आम्ही रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांचे बांधकाम निरखत, फोटो घेत चाललो होतो. इतक्यात एका घराच्या ओसरीवर बसलेल्या एका म्हातारशा बाबांनी योला हाक मारली. सुरूवातीची ’चौकशी’ झाल्यावर त्यांनी चक्क स्वत:चे घर पाहण्यासाठी आम्हाला आत बोलावले. लाकडी दणकट दरवाजे, छत, झोपाळा तसेच त्यावरील नक्षी ही कलाकुसर अगदी जवळून पाहायला मिळाली! पार परसदारापर्यंत नेऊन दळायचे जाते, देव्हारा, आड हे सगळे दाखवले. आम्ही खुश! :) आधुनिक काळातही अस्सल ऐतिहासिक वारसा जपून ठेवलेल्या मोजक्या गावांमध्ये मुल्हेरचा उल्लेख करावा लागेल! घरामध्ये फरशी बसवलेली असली तरी घराचे बाकी जुने "घरपण" टिकून आहे. ही बांधकाम शैली मुघलांच्याही आधीची आहे! कारण मुल्हेर गडावरच्या सोमेश्वर-गणेश-रामेश्वरमंदिरांमधले खिळे आणि या घरांमधले खिळे एकमेकांशी जुळणारे होते!










खिळे-


घर पाहून झाल्यावर बाबा बहुतेक गप्पा मारायच्या मूडमध्ये आले (रोमा आणि यो घड्याळात बघत होते!) बाबांनी मग घरातून जुना दस्त ऐवज बाहेर आणला. त्यात मुल्हेरकर देशमुखांची वंशावळ होती. ती नाशिकमध्ये कुठे मिळेल तेही सांगितले. एवढे झाल्यावर मग बाबांच्याबरोबर फोटो वगैरे काढले. बाबांचे नाव पांडुरंग रामचंद्र बागूल!


एवढा इतिहास पाहिल्यानंतर तृप्त होऊन गावातील सुप्रसिद्ध उद्धवस्वामींचा मठ बघायचा पूर्वनियोजित कार्यक्रम मग आम्ही रद्द केला. एक टमटम ठरवली आणि मधल्या खिंडीच्या रस्त्याने मांगी-तुंगीकडे निघालो.
खिंड ओलांडल्यावर झालेले मांगी(डावा सुळका) आणि तुंगीचे(उजवा सुळका) दर्शन-


मांगीजी-तुंगीजी सुळके हे जैन धर्मीयांचे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पायथ्याच्या गावाचे नाव भिलवडी. इथे अनेक (बघायला) मंदिरे आणि (रहायला) धर्मशाळा आहेत. :) जेवणाचीही सोय होते. इथून दोन किमीवर प्रत्यक्ष मांगी-तुंगीचा पायथा आहे. तिथून साडेतीन हजार पायऱ्या चढून सुळक्यांवर जावे लागते. आमच्या प्लॅननुसार आधी मांगी-तुंगी दोन्ही बघून सूर्यास्त बघून खाली भिलवडीमध्ये मुक्कामाला यायचे असे होते. वाटेत कुणाशीतरी बोलताना ’मांगीवरती गुहा आहेत’ असे कळल्यामुळे तर आम्ही मांगी बघून तिथेच मुक्काम करून उद्या तुंगी पाहू असे ठरवले. भिलवडीला पोहोचलो तेव्हा चार वाजले होते. धर्मशाळेच्या कार्यालयामध्ये गेल्यावर असे कळले की वर राहता येत नाही आणि जेवण साडेपाच ते साडेसहा याच वेळात असते. सूर्यास्तानंतर जैन भोजन करत नाहीत, म्हणून असेल. इतकेच नव्हे, तर आवारात शिजवायलाही परवानगी नाही. तसेच, पायथ्यापर्यंत जीपची सोय होऊ शकेल पण चारनंतर जीप बंद असतात. आमच्यापुढचे पर्यात अशा प्रकारे संपले होते. उरलेली संध्याकाळ तिथेच घालवून पहाटे लवकर पहिल्या जीपने मांगीकडे निघणे, लवकरात लवकर दोन्ही सुळके पाहून भिलवडीमध्ये येणे आणि साडेअकराची नाशिक एसटी पकडण्यासाठी ताहराबाद गाठणे हा सर्वोत्तम पर्याय उरला होता. (जल्ला हे आधी माहित असतं तर हरगड नसता का केला?? नाहीतरी संध्याकाळभर टाईमपासच करायचा होता! :( ) धर्मशाळेमध्ये खोली घेऊन आत शिरलो. चक्क गाद्या-उश्या आणि खोलीमध्ये लाईट तसेच नळाला फ़ुल पाणी पाहिल्यावर आमचा ट्रेक all of a sudden ट्रिपमध्ये बदलून गेला! अत्यानंदामध्ये गाद्यांवरती घेतलेल्या उड्या -


लगेच रोमा आणि ज्योने आंघोळ करून घेतली. माझे आणि योचे मात्र ट्रेकमध्ये पाण्याचे नैसर्गिक साठे सोडून इतर ठिकाणी अंघोळ करणे म्हणजे पाप असते यावर एकमत झाले. ;) त्यामुळे आम्ही नुसतेच हातपाय धुतले. फ्रेश झालो. एके घरात चहा (विकत) मिळत होता तिथे चहा घेतला. साडेसहासारख्या ’अवेळी’ जेवण झाल्यावर रात्री ’नेहमीच्या’ वेळी भूक लागली तर काय हा प्रश्न डोक्यात होताच. म्हणून मग मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका घर कम दुकानामध्ये त्या गृहलक्ष्मीला तुमच्याकडे जेवणाची सोय होते का असे विचारून आलो. तिनेही ”मिळेल पण बाजरीची भाकरी आणि शेवभाजी एवढेच मिळेल” असे उत्तर दिले.
"चालेल. तुम्ही कितीपर्यंत जागे असता? (कारण साडेसहानंतर दोन तासात भूक लागणं अवघड आहे! :D )" - मी आणि ज्यो!
’आम्ही साडेदहा-अकरापर्यंत जागे असतो. तुम्ही साडेनऊपर्यंत सांगायला या.’ - इति गृहलक्ष्मी!
आम्ही आनंदाने तिला नक्की सांगतो असे म्हणून निघालो. जेवणाची वेळ होईपर्यंत फोटो काढले. जेवणाची उत्तम सोय तिथल्या भोजनशाळेमध्ये होते. जवळजवळ तीन दिवसांनी तयार, चौरस आहार जेवत होतो. त्यामुळे अर्थात जेवणावर आडवा हात मारत होतो. त्याचा परिणाम असा झाला की तिथला वाढपी नंतर नंतर आमच्याकडे दुर्लक्ष करतो आहे असा आमचा समज व्हायला लागला!! जेवण झाल्यावर मंदिरे बघितली. (त्याचे फोटो पुढील भागात) एका मंदिरात आलेल्या एका जैनधर्मियाबरोबर मी आणि अविने जैन तीर्थंकर, त्यांचे प्रभाव, जैन मायथॉलॉजी, मांगी-तुंगीचे महत्त्व इ. विषयांवर गप्पा मारल्या.

हे सगळं करेपर्यंत नऊ वाजले. जेवलेले अजून जिरले नव्हते. त्यामुळे बाजरीची भाकरीचा आस्वाद पुन्हा केव्हातरी घेऊ असे म्हणून पुन्हा एकदा चहा घेतला. योने केव्हापासून ’उद्या चार वाजता उठायचे आहे’ असा घड्याळाविना गजर सुरू केला होता. ”कुणीही नाही उठलात तर मी एकटा जीपने निघून जाईन” वगैरे (उगाच) धमकी वगैरे दिली. :) अखेर पहाटे पाचच्या पहिल्या जीपने मांगीकडे निघायचे असे ठरवून खोलीवर आलो. आतापर्यंतचा खर्चाचा हिशेब केला, जेव्हा शेवटी कुणालाच तो समजेनासा झाला तेव्हा अस्मादिकांनी (अनुभवाच्या जोरावर) तो सर्वांना समजावून दिला! :D आणि मागच्या तीन रात्रींच्या मुक्कामाच्या तुलनेत अत्यंत अलिशान अशा बिछान्यावर पाठ टेकली. ट्रेकच्या शेवटच्या चढाईसाठी आम्ही पूर्णपणे तयार होतो. गेले तीन दिवस वेड्यावाकड्या वाटांनी सह्याद्रीत भटकल्यावर आता पुस्तकात वाचलेल्या साडेतीन हजार पायर्‍या आम्हाला खुणावत होत्या...

(क्रमश:)

--नचिकेत जोशी



सर्व फोटो- यो रॉक्स, रोहित मावळा आणि आनंदयात्री