Pages

Friday, April 15, 2011

’दुसरे गांधी’

आमच्या पिढीने गांधी पाहिलेलेच नाहीत. आमच्या पिढीने आणीबाणीही पाहिलेली नाही. इतकंच काय, पण देशाने पहिलावाहिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकला तेव्हाही आम्ही एकतर पाळण्यात खेळत होतो, किंवा मग अजून जन्मालाच यायचो होतो. आम्ही फाळणी पाहणं तर सोडाच, त्याचे पडसादही थेट अनुभवलेले नाहीत. "मजबूरी का नाम" असंच ज्यांच्याबद्दल ऐकत आलो ते गांधी आम्हाला कळले असं आम्हाला वाटलं ते दिलीप प्रभावळकरांनी चेहर्‍याला रंग लावला आणि सोनूने गायलेलं ’बंदे मे था दम’ काळजापर्यंत पोहोचलं तेव्हा! जेव्हा अजयने ’लिजंड...’ मध्ये फासामध्ये मान अडकवत डोळे आमच्यावर रोखले तेव्हा भगतसिंग ही काय चीज होती हेही आम्हाला कळलं! ’को‌ई देश पर्फ़ेक्ट नही होता, उसे परफेक्ट बनाना पडता है’ हे आम्ही शिकलो तेही रुपेरी पडद्यावर! आम्ही सर्व हुकुमशहांच्या क्रूर कहाण्या वाचल्या आणि तहांची कलमं लिहिली ती केवळ स्वतःचा नम्बर पदच्च्युत हो‌ऊ नये म्हणून! सत्याग्रह, अहिंसा, उपोषण वगैरे शब्द आम्ही शिकलो ते पुस्तकात! परकीयांपासून कष्टाने मिळवलेलं स्वातंत्र्य आम्ही जन्मापासूनच भोगत आलोय. त्या‌उपर आमच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे आ‌ईबाबांनी सुट्टीत हवं तेवढं हुंदडायची दिलेली परवानगी किंवा फारफार तर घरच्यांचा डोळा चुकवून नदीवर एकट्याने पोहायला जाण्याचा केलेला पराक्रम एवढंच! खर्‍या युद्धाचा अनुभव नसलेले आम्ही क्रिकेटमधला विजय म्हणजे युद्धातला विजय अशी समजूत आजही करून घेत असतो!

अगदी सुखी, आलिशान नसली तरी, मागच्या पिढीने सर्व स्थित्यंतराचे चटके अनुभवल्यामुळे आपो‌आपच त्यातल्या त्यात सुरक्षित वातावरणात वाढलेली ही आमची पिढी! दंगे झाले की एका राजकीय पक्षाच्या धाकामुळे रस्त्यावर पसरणारा सन्नाटा म्हणजे आमच्यासाठी ’दहशत’ होती! बाबरी मशिद पडल्यावर बिल्डिंगमधल्या एका मुसलमान कुटुंबासाठी लपूनछपून केलेली मदत म्हणजे आमच्यासाठी ’सर्वधर्मसमभाव’ होता! गावकुसाबाहेर आयुष्य काढायचं आहे हे आमच्यापैकी काहींना खूप लहानपणीच कळलेलं वास्तव ही त्यांच्यासाठी ’लोकशाहीची’ ओळख होती!

बंद, संप, मागण्यांसाठी लढे हे आम्ही पाहिले ते आपल्याच माणसांचे, आपल्याच माणसांविरुद्ध! by the people, for the people म्हणतात तसं! दहा वर्षं चालणार्‍या खटल्यामध्ये भ्रष्ट मंत्र्यांना शिक्षा झाल्या, दंगलीमधल्या गुन्हेगारांना सजा झाल्या, लाचखोरी, करबुडवेगिरी, स्टिंग ऑपरेशन्स या सगळ्या आणि अशा अनेक प्रकरणांमध्ये आत कुठेतरी ’अरे ही आपलीच माणसे आहेत’ हेही माहित असायचं... नात्यातले नसले, ओळखीचे नसले तरी ’स्वातंत्र्योत्तर काळातले भारतीय म्हणजे आपलेच’ हे कुठेतरी शिक्षणाने मनावर ठसवलेलं होतंच.. त्याचमुळे मग टेबलाखालून, पेटीमधून, फा‌ईलींमधून सरकवले जाणारे गांधींचे फोटो असलेले कागद, सर्व प्रकारचे भ्रष्टाचार, लोकशाहीच्या सर्वात ताकदवान स्तंभांचे - पांढर्‍याशुभ्र कपड्यातील काही गलिच्छ माणसांचे - ताकदीच्या जोरावरचे भलतेच प्रयोग, हे सगळं सगळं स्वीकारत गेलो.. अगदीच असह्य झालं तर मग ’खाल्लेला पैसा पचत नाही’ ही सर्व प्रकारच्या गुन्ह्यांवरची आमची हुकुमी उत्तरे असत!

आणि मग पुढे काही वर्षांनी, ऐन तारुण्यामध्ये, आता काहीतरी करून दाखवू असं म्हणत हात शिवशिवत असताना आणि काय करायचं ते नक्की ठरत नसताना, हे सगळं भ्रष्ट वातावरण आज ना उद्या आपल्यालाही घेरणार असं अचानकच वाटायला लागलं... आणि तेव्हाच अण्णा हजारे नावाच्या एका माणसाने दिल्ली गाठली. अण्णा उपोषणाला बसले काय आणि चोवीस तासांत दुसरे गांधी अशा किताबाला पोहोचले काय! आमची पिढी अवाक! अण्णांचा सगळा इतिहास-भूगोल पुढच्या बहात्तर तासात जगभर पोहोचला आणि पंच्या‌ऐंशीव्या तासाला सरकार त्यांच्या सर्व मागण्या मान्य करतं झालं!!!

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अण्णा आपल्याला नवीन नाहीत. राळेगणसिद्धी हा एकच शद्ब अण्णांची ओळख करून द्यायला पुरेसा आहे. गेली कित्येक वर्षं अण्णा या ना त्या कारणाने उपोषणं करत आहेत, वेळोवेळी आपल्या मागण्या मान्य करून घेत आहेत. तेव्हा कधीच आम्हाला ’हे दुसरे गांधीच की हो!’ असा साक्षात्कार झाला नव्हता! उत्तर उघड आहे, यावेळचे अण्णा हे मीडीयाने मोठे केलेले आमचेच जुने अण्णा होते!

अण्णांच्या मागण्या योग्य होत्या की नव्हत्या, त्या मान्य झाल्यामुळे लोकतंत्रामधले संभाव्य बदल कोणते, लोकपाल विधेयक नक्की काय आहे, त्याची जरूरी आहे की नाही, हा या लेखाचा उद्देशच नाही. युवा पिढी ज्या वेगाने यात सामील झाली, एखाद्या पहाडासारखी अण्णांच्या पाठीशी उभी राहिली त्यामुळे मी चकित झालोय. आनंदी झालोय की नाही ते माहित नाही . मूळच्या विषयाकडे (लोकपाल विधेयक) फारसे लक्ष न देता, त्याच्या सार्थतेची खात्री करून न घेता इतिहासातील अजरामर व्यक्तिरेखेशी साधर्म्य वाटणारा एक माणूस उपाशी बसला हे पाहताच त्याच्या भजनी लागली. नव्या युगामधल्या सर्व तंत्रांचा वापर करून अत्यंत कमी काळात अण्णांचे उपोषण जगभर पोहोचले. हे विस्मयचकित करणारे आहे! भूतकाळातील प्रवास, सध्याचं चित्र आणि भविष्यावर होणारे परिणाम याचा सखोल विचार सोडाच, पण वरवरचाही विचार या तमाम तरूण पिढीने केला असेल असं वाटत नाही. सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेचा अतोनात तिटकारा हे त्यामागचं प्रमुख कारण वाटतं! आणि म्हणूनच अण्णांच्या पास्ट परफॉर्मन्सवर फिदा हो‌ऊन या रिझल्ट ओरि‌एण्टेड तरूणा‌ईने त्यांना पाठिंबा दिला! जवळजवळ सर्व मीडीयाने स्वतंत्र भारतामधला हा सर्वात मोठा लोकशाहीचा विजय आहे असे या घटनाक्रमाचे वर्णनही केले!

त्या दिवशी रात्री मी पाहिलेल्या एका "LIVE" चर्चेमध्ये, अण्णांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत हे सांगताना तो सूत्रसंचालक अक्षरशः एक्सा‌ईट झाला होता! इतरही यत्र तत्र सर्वत्र हीच परिस्थिती होती! कायदेशीर, नैतिक सर्व विरोधांना न जुमानणारे आणि दररोज नवीन भ्रष्टाचारामध्ये अडकत जाणारे सरकार एका नि:शस्त्र माणसाच्या उपोषणापुढे चक्क सर्व मागण्या मान्य करते हे माझ्या तरूण पिढीसाठी खूप मोठे आश्चर्य होते! ओघातच मग ७३ वर्षांच्या अण्णांना अंतिम कागद हातात देण्यासाठी अजून १२ तास ताटकळत ठेवून सरकारने काय साधले हीसुद्धा चर्चा मीडीयाने केली. छोट्या छोट्या घटनांनाही ग्लोरिफाय करत पेश करणाऱ्या मीडीयाने अण्णांच्या कर्तृत्त्वाबद्दल तर अशा प्रभावीपणे बुलेटिन्स आणि बा‌ईट्स दिल्या की खरोखर अण्णांच्या मागण्या मान्य झाल्या म्हणजे भ्रष्टाचार भारतातून कायमचा संपला असे चित्र क्षणभर उभे राहिले होते.

जंतरमंतरवरच्या अलीकडच्या काळातल्या त्या अभूतपूर्व अशा उपोषणानंतर सुरू झाली नुसत्या प्रश्नांची रांग! तरूणा‌ईला नक्की काय हवंय? नेमकं असा कुठला फॅक्टर अण्णांमध्ये होता की ज्यामुळे ही तरूणा‌ई बर्‍याच वर्षांनी स्वकीय व्यवस्थेविरुद्ध इतक्या मोठ्या संख्येने उभी राहिली? सगळ्या मागण्या मान्य करायच्याच होत्या तर मग उपोषणाची वेळ का आली? आधी अण्णांना स्पष्ट विरोध करणारं सरकार मागण्या मान्य केल्यावर "we are also happy to see the response of youth, and we are not on the other side, we are with you, we thank Anna Hajareji" अशा अर्थाची मखलाशी का करू लागलं? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकपाल विधेयक संमत झाले तरी प्रत्यक्ष भ्रष्टाचार नियंत्रणात यायला कधी ना कधी स्वत:लाही यात उतरावं लागणार आहे हे अण्णांना एका क्लिकवर पाठिंबा देणारी आणि कधीही अशा उपोषणांचा अनुभव नसलेली समस्त नेटीझन आणि सिटिझन युवा पिढी लक्षात घे‌ईल का? व्यवस्था पोखरलेली आहे हे मान्यच, पण त्याविरूद्ध लढणार्‍या दुसर्‍या बाजूचं असाधारण उदात्तीकरण करून आपण आपल्याच अपेक्षा वाढवतो नाही आहोत का?

काही प्रश्नांची उत्तरं द्यायला काळ स्वत:चा वेळ घेतो. त्यामुळे लोकपाल विधेयकाच्या निमित्ताने लोकप्रिय झालेले अण्णा हजारे नावाचे मीडीयाच्या भाषेतले ’दुसरे गांधी’ किती काळ तरूणा‌ईवर आपला प्रभाव ठेवू शकतील याचे उत्तर काळच दे‌ईल. पण अगदी वैयक्तिक आयुष्यापर्यंत ये‌ऊन पोहोचलेल्या या भ्रष्टाचार नावाच्या राक्षसावर उपाय म्हणून अण्णांकडे समस्त तरूणा‌ई पाहते आहे हे नक्की! अण्णांवर होणाऱ्या आरोपांकडेही प्रसंगी दुर्लक्ष करायची तिची तयारी दिसते! "गांधी" या नावाचा प्रभाव पन्नास वर्षांनंतरही आजच्या भारताला अत्यंत भावनिक बनवू शकतो हे निर्विवाद!

- नचिकेत जोशी (११/४/२०११)

( वरील लेख e-sakal मध्ये ही प्रकाशित झालेला आहे.)

Sunday, April 3, 2011

या जगण्याचे...

य़ा जगण्याचे आता मजला कौतुक वाटत नाही
चंद्रही तसा पूर्वीइतका सुंदर भासत नाही

कसली किंमत करता तुम्ही माझ्या त्या नात्याची?
ऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही!

छोट्यामोठ्या दु:खांचा संचार भोगतो आहे
एकहि आदिम तेजस्वी पण दु:ख झपाटत नाही

रोज विचारु नका तुम्ही मज तिच्या उत्तराबद्दल
इच्छा मजला उरली नाही, तुमची संपत नाही!

बोलत असतो केवळ आम्ही, नाते अबोल अमुचे
(कारण आम्हा त्याची भाषा बहुधा समजत नाही)

जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही

गमावण्याचे भय सरता माणूस बेफ़िकिर होतो
जे आहे त्याचीही किंमत बहुधा राहत नाही

अजूनही त्या पत्रांमधली थरथर तशीच आहे
(कविता सुचण्यासाठी बाकी काही लागत नाही)

नचिकेत जोशी (३१/३/२०११)