Pages

Wednesday, December 3, 2008

घनगड आणि तैलबैला

प्रस्तुत कथेतील किल्ल्यांवर बाईकवरून जाणे ही एक दुरापास्त चूक आहे! आणि त्यातही ’अमुक एखाद्या रस्त्याने जाऊ नका’ हा जाणत्यांचा सल्ला न ऐकता जाणे ही किमान या बाबतीत घोडचूक आहे! पण आम्ही या दोन्ही चुका एकापाठोपाठ केल्या आणि तरीही फारसे काही चुकले नाही हे समाधान अंती पदरात पाडून घेतले!

हे किल्ले गौरवशाली शिवकालीन व तत्सम इतिहासात फारसे परिचित नाहीत. अर्थात सह्याद्रीच्या कलंदर भटक्यांसाठी हे सुपरिचित आहेत, हा भाग निराळा. मुळशी तालुक्यात लोणावळ्य़ाच्या दक्षिणेला किंचित नैऋत्येकडे साधारण २५ किमीवर हे दोन्ही किल्ले उभे आहेत. पुण्याहून तेथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. आम्ही दोन्ही मार्ग ’ट्राय’ केले. तीन बाईक्स वरून मी, मयूर, श्रीकांत, तिखट (ऊर्फ आशिष तिखे) आणि प्रथमच अनिकेत व रोहिणी असे ६ जण बावीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता ताम्हिणीमार्गे निघालो. पौडमार्गे मुळशी, ताम्हिणीनंतर लोणावळ्याकडे उजवीकडे एक फाटा जातो. इथून लोणावळा ५२ किमी आहे. या रस्त्यावर येकोले गाव (घनगडाचा पायथा) साधारण २५ किमीवर आहे. वास्तविक, या रस्त्याने जाऊ नका असा सल्ला आम्हाला एका अनुभवी मित्राने दिला होता, पण अंतर वाचवण्य़ासाठी दुसऱ्या एका मित्राच्या सल्ल्यावरून लोणावळा मार्गे न जाता आम्ही हाच मार्ग निवडला. क्षणाक्षणाला गचके खाणारी बाईक, ’टायरखालचा रस्ता बरा’ असं वाटायला लावणारे समोरच्या रस्त्याचे दृश्य यामुळे फाट्याला वळल्यापासून काही वेळातच आम्ही ’परत जाताना या रस्त्याने अजिबात यायचे नाही’ हा निर्णय घेऊन टाकला. या वाटेने दिवे, वांद्रे(इथून जवळच कैलासगड आहे, तो आमचा ’प्लॅन बी’ होता), पिंपरी (चिंचवडवाले नव्हे) या गावांवरून खडखडत येकोलेला पोहोचलो तेव्हा साडेअकरा झाले होते. (मधला एक तास मिसळ खाण्यात (ट्रेकमधला अपरिहार्य कार्यक्रम) गेला होता)

घनगड अत्यंत सोपा आहे. गावातूनच एक पायवाट गडाकडे जाते. साधारण अर्ध्या तासात आम्ही गडाच्या अंतिम टप्प्यातल्या गुहेजवळ पोहोचलो. गुहेशेजारी एक प्रचंड शिळा डोंगराला तिरकी टेकून ठेवावी तशी उभी आहे. दोहोंमधल्य़ा घळीत छान गारवा आहे. इथून गडाचे बुरूज अजून वरच्या बाजूला दिसतात. पण तिथे पोहोचण्यासाठी गुहेशेजारून कातळ चढून जावे लागते. ती वाट न सापडल्यामुळे ’आपण वाट चुकलो’ अशी आमची समजूत झाली आणि आम्ही तो कातळ चढण्याचा प्रयत्न केला नाही. गडावरून सभोवतालचे दृश्य मात्र नजर खिळवून ठेवते. घनगडामागे सरळ खोल कोकण आहे. त्या दिवशी वाराही भन्नाट होता. त्यामुळे रोहिणीची टोपी उडाली. मी आणि मयूरने (इतरांच्या अडवणुकीला न जुमानता, स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता, वगैरे वगैरे) ती दोन पावले खाली उतरून काठीच्या मदतीने काढली. साधारणपणे अर्ध्या तासात गड उतरून खाली आलो. आता दूरवर तैलबैलाची जुळी भिंत आम्हाला खुणावत होती.

येकोलेतून ३ किमी वर तैलबैला फाटा आहे. या फाट्यावरून डावीकडे तैलबैला आणि उजवीकडे लोणावळा (२३ किमी) आहे. येकोलेहून आम्ही त्या तसल्याच रस्त्यावरून तैलबैला फाट्यावर आलो आणि हाय रे देवा! - केवळ बुलडोझर किंवा ट्रॅक्टर किंवा तसल्याच राक्षसी टायरसाठी बनवला असावा अस्सा रस्ता समोर पसरला होता! त्या रस्त्यावरून आणखी ३ किमी काटून तैलबैला गावात पोहोचलो तेव्हा जणू निधड्या छातीने गनिमी कावा खेळून सुखरूप परत आलेल्या मावळ्यांचे चेहरे व्हावेत तसे भाव आमच्या चेहऱ्यांवर होते. आता पुढची चढाई या लढाईपुढे काहीच नव्हती. तैलबैलाचीही वाट अत्यंत सोपी आहे. आम्हीच चुकून चुकलो आणि योग्य वाटेऐवजी तैलबैलाला समांतर अशा पायथ्याच्या झाडीमध्ये शिरलो. वरून पाहणाऱ्या एका ग्रुपने मग ओरडून आम्हाला मागे फिरायला लावले.

तैलबैलाची भिंत नजरबंदी करते. एकमेकींना खेटून उभ्या असलेल्या त्या भिंतींमध्ये एक आठ-दहा फूट रूंद खाच आहे. ’त्या’ अज्ञात निर्मीकाची सह्याद्रीतील ही असली कारागिरी केवळ अवर्णनीय आहे. ती भिंत चढण्यासाठी त्या दिवशी तिथे प्रस्तरारोहणाची सर्व आयुधे घेऊन एक ग्रुप आला होता. आम्ही मात्र जणु ती सबंध भिंतच हलवतोय असं वाटावे असे काही फोटो थोडिशी करामत करून काढले आणि अधिक वेळ न घालवता खाचेकडे निघालो. या खाचेत बसणे हे एक सुख आहे. त्या दिवशी हसत्या-खेळत्या प्रस्तरारोहणामुळे तिथे शांतता नव्हती. कुठल्याही ट्रेकमध्ये किमान अर्धा तास फक्त शांतता ऐकायला मिळावी ही माझी मनापासून इच्छा असते. मी एखाद्या झाडाखाली किंवा कातळावर (सावलीत) आडवा झालोय, आजुबाजूला खोल दऱ्या, हलका वारा वाहतोय, पक्षी असतील तर त्यांचा चिवचिवाट- नसतील तरी हरकत नाही, बरोबर कुणी असेल तर उत्तम, नसेल तर अत्युत्तम आणि बाकी सर्वत्र शांतता... मनात कसलेही चिंतन नाही, कसलाही विचार नाही, फक्त शां...त...ता... वा वा!! (तिथे त्यादिवशी नसलेल्या शांततेमध्ये मग मी आणि श्रीकांतने ह्या इच्छेवर पाच मिनीटे नुसतेच बोलून घेतले!) तर ते असो.

त्या खाचेत फरशा घातलेल्या आहेत आणि कपारीत भैरोबा आहे. तिथेच आम्ही पंगत मांडली कारण एव्हाना साडेतीन झाले होते आणि सकाळच्या नाष्ट्यानंतर आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. कपारीतल्या टाक्यातील पाणी गोड आणि थंडगार आहे.

पश्चिमेकडे सुधागड, दूरवर सरसगड, आग्नेयेला मागच्या डोंगराशी एकरूप झालेला घनगड दिसतो. तैलबैलाच्या लगेच पायथ्याला सर्व बाजूंना लांब पठार आहे आणि ते संपलं की लगेच खोल खोल कोकण! सुधागड आणि तैलबैलाचे पठार यामधली (हजार फूट खोल) दरी तर इतकी चिंचोळी आहे की उडी मारून पलीकडे सुधागडावर पोहोचावे असे (लांबून) वाटते. एकंदरीत ’व्ह्यू’ देखणा आहे. मनसोक्त फोटो काढून लगेच परत निघालो, कारण अंधार पडायच्य़ा आत ’तो’ भयानक रस्ता पार करायचा होता. वाटेत एका विहीरीवर ओंजळी-ओंजळीने पाणी प्यायलो आणि तिथल्या आजीबाईंचे ’घरचे वाट पाहत असतील, नीट जा रे बाळांनो’ असे प्रेमळ आशीर्वाद घेऊन गावात परतलो. ’पोरांनो, इथे गेली कित्येक वर्षे याच रस्त्यावर असेच येतोय-जातोय’ हे वाक्य ऐकल्यावर मात्र आम्ही ’त्या’ रस्त्याचा विचारच सोडून दिला.

लोणावळ्याच्या वाटेवर एका धबधब्याजवळ सूर्यास्त पाहायला थांबलो आणि माझी शांतता ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली. समोर खोल दरी, दूरवर दरीत नागमोडी वळणे घेत जाणारी नदी, वातावरणात भरून राहिलेला रानफुलांचा गंध, आणि दिवसभर तेज मुक्तहस्ते वाटून अस्ताला जाणारा तो ’तेजोनिधी लोहगोल’ आणि हे सगळे असेच ’आत’ उतरावे म्हणूनच जणू हाती आलेला चहाचा ’प्याला’! एक परफेक्ट कॅनव्हास जमून आला होता तिथे! वेगवेगळे सूर्यास्त वेगवेगळी आठवण ठेवून जातात. रायगडाच्या टकमक टोकावरून पाहिलेला, राजगडावरून पाहिलेला - तोरण्याच्य़ा पाठीमागे अस्ताला जाणारा, पांडवगडाहून येताना कृष्णेच्या काठी बसून पाहिलेला, वासोट्याहून परत येताना बामणोलीला शिवाजीसागर जलाशयाच्या काठावरून पाहिलेला असे अनेक सूर्यास्त यादगार बनून राहिले आहेत! अशा वातावरणाची किमयाच अशी असते, की कितीही बेफिकीर, अलिप्त राहायचं म्हटलं तरी मनाच्या बंद कप्प्यातून काही आठवणी निसटून आजुबाजूला फेर धरतातच! अशा वेळी फक्त अस्ताचा सूर्य पाहत रहावा - मी तेच केले!

सूर्य ढगाआड अस्ताला गेला आणि तिन्हीसांज धुक्याची फिकट शाल पांघरून आसपास वावरायला लागली. कुठलाही रसिक, शौकीन माणूस रेंगाळेल असेच वातावरण तयार झाले होते. आम्हीही थोडेसे रेंगाळून, फोटो काढून परत निघालो. आंबवणे, शहापूर (कोरईगड फाटा), घुसळखांब (किल्ले तुंग फाटा) मार्गे लोणावळ्य़ात पोहोचलो. वेळेचे गणित बरोब्बर बसले तर एकाच दिवसात घनगड-तैलबैला-कोरईगड असाही ट्रेक करता येतो. येताना हायवेवरून गाडी चालवताना जणू स्वर्गसुखाचा अनुभव घेत (कारण एकच- रस्ता!!) ७०-८० किमी दीडतासात पार करून साडेआठाला पुण्यात पोहोचलो. एकूण प्रवास - १९४ किमी, एकूण पायपीट - अगदीच कमी, फारतर ५ किमी!

दुसऱ्या दिवशी रोहिणीने ’या ट्रेकला १ ते १० च्या स्केल वर किती रेट करशील (१० म्हणजे सर्वोत्तम)’ असा प्रश्न विचारला. कदाचित त्या महाभयानक रस्त्याची आठवण शरीराचे ’काही’ अवयव तेव्हाही वागवत असल्यामुळे मी ’५ किंवा ६’ असले आखडू उत्तर दिलेही, पण घनगडावरून सह्याद्रीचे सरळ खोल घाशीव कडे पाहताना, किंवा तैलबैलाच्या कड्याखाली उभा असताना हा जर प्रश्न मला कुणी विचारला असता तर त्या वेळी १ ते १० ही स्केल फारच तोकडी वाटली असती. अर्थात आपण रेटींग करायचे असते ते आपल्या अनुभवालाच. किल्ल्यांचे रेटिंग तर साडेतीनशे वर्षांपूर्वीच झाले आहे; नाही का?

नचिकेत जोशी (२९/११/२००८)

रोहिडा उर्फ विचित्रगड

ट्रेक हे एक न सुटणारे व्यसन आहे. ते एकदा लागले की मग काळ-वेळ, तिथी-नक्षत्र, सणवार यापैकी कशाचेही भान राहत नाही. खूप दिवसांपासून मनात असलेली दिवाळीत ट्रेकला जायची इच्छा यावर्षी पूर्ण झाली, आणि तीही (नेहमीप्रमाणे) अगदी अवचित!!

’दिवाळी पहाट’ नामक एका गाण्याच्या कार्यक्रमाचे निमित्त आणि नोकरीला (शुद्ध भाषेत रोजंदारीला) मिळालेली सुटी या पार्श्वभूमीवर किल्ले रोहिडाच्या भेटीचा योग जुळून आला. तिकीटे काढल्यामुळे लवकर तसेही उठणारच आहोत, मग एखादा किल्लाच ’करून’ येऊ असा किडा डोक्यात आला आणि गाण्याच्या मैफलीऐवजी मी, सुजय आणि ’हमारा बजाज’ (डिस्कव्हर १३५) सकाळी सकाळी ७.३० वाजता रा.म.४ वरून भोरच्या दिशेने मार्गस्थ झालो. सकाळचे मस्त धुके बघून काही कविकल्पना सुचायच्या आत महामार्गावर पोहोचलो (आणि धुक्यानेही हळूच काढता पाय घेतला!!)

रमतगमत भोर गाठले तेव्हा घड्याळ्यात अवघे साडेआठ झाले होते. तीन किल्ले आणि दोन राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा यानिमित्ताने भोरला ही एकूण पाचवी भेट होती. भोर आणि आसपासचा परिसर मला कायम भुरळ घालतो.(असते एकेकाची आवड!) तालुक्याचे गाव, तरीही बऱ्यापैकी गावपण टिकवून असलेले भोर आणि आजूबाजूच्या डोंगररांगा क्षणात इतिहासात घेऊन जातात. मावळच्या दऱ्याखोऱ्यांनी शिवबाला सुलतानशाही झुगारून टाकण्याची प्रेरणा दिली, या ऐतिहासिक सत्यावर भोर परिसरातील या रांगा पाहिल्यावर माझा लगेच विश्वास बसला होता. बाकी शिवकालीन इतिहासावर विश्वासापेक्षा आपल्याकडे अविश्वासच अधिक दाखवला गेलाय. असो. भोर या शब्दाचा हिंदी की उर्दू भाषेतला अर्थ पहाट असा आहे. मी पहाटेच्या वेळीही भोर पाहिले आहे. आणि तेव्हापासून मला भोर शब्दही आवडू लागला आहे.

तुम्ही जर याआधीची आमच्या ट्रेकची वर्णने वाचली असतील, तर आम्ही किल्ल्यांच्या वाटेबद्दल, ती मुळीच ठाऊक नसली तरी अत्यंत निश्चिंत असतो, हे तुम्हाला एव्हाना माहित झाले असेल. यावेळी किल्ल्याची वाट सोडाच, पायथ्याच्या गावाचे, बाजारवाडीचे, नाव फक्त लक्षात होते. (कारण सगळा बेत अगदी ऐनवेळी ठरला होता.) अर्थात ’दुर्ग संवर्धन समिती’च्या विकासकामामुळे रोहिडा नुकताच प्रकाशात आला आहे. भोर स्टॅण्डवर आणि चौपाटीजवळ एकदा रस्ता विचारून घेतला आणि बाजारवाडीकडे निघालो. रस्ता अगदी सोपा, सरळ (आणि मुख्य म्हणजे खड्डेविरहीत, डांबरी) आहे. मांढरदेवीच्या रस्त्यावर सुमारे ५ किमी वर खानापूर नावाचे गाव आहे. त्या गावात उजव्या हाताच्या कमानीखालून रोहिड्याकडे निघालो. धावडी-बाजारवाडी गावाच्या आणखी एक कमानीने आमचे ’सहर्ष स्वागत’ केले आणि लगेच मानकरवाडीकडे जाणाऱ्या दिशेने रोहिड्याची वाट आहे असा फलक दिसला. काहीही माहिती नसतानाही मराठी वाचू शकणाऱ्याला रोहिड्याचा पायथा गाठणे अजिबात अवघड नाही. जागोजागी मार्गदर्शक फलक आहेत.

गावात एका घरी नेहमीप्रमाणे हेल्मेट आणि जॅकेट ठेवले आणि समोर दिसणारी डोंगराची सोंड धरून निघालो. किल्ला मध्यम उंचीचा आहे, चढायला सोपा आहे, चुकायची शक्यता नाहीच. तासाभरात वर पोहोचलो. सिंहगडासारखेच येथेही एकामागोमाग एक असे तीन दरवाजे आहेत. दुसऱ्या दरवाजानंतर एका भुयारात पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. रोहिड्यावर साप भरपूर आहेत, हे कुठेतरी वाचल्यामुळे त्या थंड भुयाराच्या तोंडावर बसून पाणी काढतानाही मला त्या अहिकुळाच्या जलनिवासी शाखेतील एखाद्या सदस्याच्या तिथे दर्शन देण्य़ाचीच अधिक भीती वाटत होती. पण संपूर्ण ट्रेकमध्ये एकदाही सापाची कातही दिसली नाही. साप दिवाळीनिमित्त दुसऱ्या प्रांतात गेले असावेत!

किल्ला साधारण अर्ध्या तासात पाहून होतो. किल्ल्यावर नुकताच जीर्णोद्धार झालेले महादेवाचे मंदिर (जे बाहेरून बंद असल्यामुळे आम्हाला आतून पाहता आले नाही), तीन बुरूज, पडकी सदर, एक चोर दरवाजा आणि पुष्कळ पाण्याची टाकी आहेत. सभोवतालचा आसमंत नितांतसुंदर आहे. एका बाजूला मांढरदेवी रांग, त्यापलिकडे उजवीकडे पांडवगड, कमळ, केंजळ हे परिचित गड, रायरेश्वर पठार, नीरा नदी, वातावरण अगदी स्वच्छ असेल तर त्यापलीकडे दूरवर राजगड, सिंहगड आणि शेवटी तशाच उजव्या हाताने भोर गाव आणि त्याच्या उजवीकडे पुरंदर (याठिकाणी पाहणाऱ्याची स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होते)- एवढा विस्तीर्ण परिसर दिसतो.

सगळा गड आरामात पाहून आणि भरपूर फोटो काढून, गड उतरून खाली आलो तेव्हा घड्याळात फक्त एक वाजत होता. मग ’परतीच्या वाटेवरती’ पुन्हा रमतगमत हायवेवर कुलकर्ण्यांच्या उपहारगृहात (यावेळी) झटपट पाहुणचाराचा आस्वाद घेत तीन वाजता पुण्यात पोहोचलो.

माझ्या दुर्गभ्रमंतीमधला किल्ला क्र. ३० - रोहिडा. कसलीही अविस्मरणीय़ आठवण नाही, कुठलाच थरार नाही, पण तरीही डोंगरदऱ्या पालथ्या घालायची हौस पूर्ण झाल्यामुळे व अगदी आयत्यावेळी ठरूनही मुळात सोपा असल्यामुळे सहज पार पडलेला ट्रेक म्हणून रोहिडा उर्फ विचित्रगड कायम स्मरणात राहील!

नचिकेत जोशी (२९/१०/२००८)

पेब किल्ला

यावेळी ठरवलेला किल्ला होता - "किल्ले पेब उर्फ विकटगड". पुणे - मुंबई लोहमार्गावर नेरळ स्टेशन आहे. त्याच्या पाठीमागे असणाऱ्या माथेरान या सुप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणाला लागून पेब किल्ला आहे. यावेळी ६ जण नक्की झाल्यामुळे सिंहगड एक्सप्रेसने जाण्य़ाचा बेत रद्द करून आयत्यावेळी गौरवच्या कारमधून सकाळी साडेसहा वाजता निघालो. खोपोलीपर्यंत द्रुतगती मार्गाने जाऊन खोपोलीला कर्जतकडे जाणाऱ्या मार्गाला लागलो. खोपोली-कर्जत १५ किमी, व कर्जतला नाष्टा करून पुढे कर्जत-नेरळ १३ किमी असा प्रवास करून नेरळला पोहोचलो, तेव्हा दहा वाजले होते. पेबच्या किल्ल्यावर जायला दोन मार्ग आहेत. पहिला, नेरळमध्ये कार-पार्किंग ची सोय आहे. तिथे गाडी लावायची व पेबच्या किल्ल्याच्या दिशेने चालत जायचे. ह्या वाटेने साधारण अडीच-तीन तास लागतात. दुसरा मार्ग म्हणजे, सरळ माथेरानचा नगरपालिकेचा वाहनतळ गाठायचा, तिथे गाडी पार्क करायची आणि डोंगराच्या धारेवरूनच पेब किल्ल्याकडे जायचे. ’पेब किल्ला लवकर पाहून झाला तर थोडा वेळ माथेरानमध्ये भटकता येईल’ असा विचार करून आम्ही माथेरानच्या वाहनतळाच्या दिशेने गाडी हाकली.

घाट अत्यंत खड्य़ा चढाचा आहे. त्यातच छोट्या घाटरस्त्यावर नेरळ-माथेरान मार्गावरचे सर्व अधिकृत टॅक्सीचालक सराईतपणे गाडी हाणत असतात. तो घाटरस्ताही enjoy करत आम्ही वाहनतळावर पोहोचलो. Weekend साजरा करायला नवी मुंबई आणि आसपासच्या अलिशान भागातलं सुखवस्तू तारूण्य सहकुटुंब आलं होतं. आमचं ' weekend destination' वेगळं आणि जरा ’हटके’ होतं, एवढंच. बाकी सर्वत्र उत्साह दाटला होता.

वाहनतळामधूनच एक पायवाट पॅनोरमा पॉईंटच्य़ा दिशेने जाते. माथेरानकडे जाणाऱ्या त्या निसर्गनिर्मीत चालत्याबोलत्या प्रेक्षणीय़ स्थळांकडे पाठ फिरवून आम्ही या वाटेने चालू लागलो. या वाटेला समांतर असा खालच्या बाजूने नेरळ-माथेरान लोहमार्ग गेला आहे. पेबला जाण्यासाठी हा लोहमार्ग गाठावा लागतो. पण लोहमार्गावर उतरण्य़ासाठी पायवाट सहजपणे सापडलीच नाही आणि आम्ही थेट पॅनोरमा पॉईंटजवळ जाऊन पोहोचलो. मग वाट चुकल्याचा साक्षात्कार होणे, सराईतपणे धबधब्याची वाट पकडणे इत्यादी नेहमीचे अविभाज्य आणि अटळ सोपस्कार यथासांग पार पाडून कसेतरी लोहमार्गावर NM 169 जवळ उतरलो.

मग त्या रूळांवरून उलट दिशेने नेरळकडे चालू लागलो. साधारण दीड-दोन किमी वर NM 158 हा milestone लागतो. तिथे एका कमानीजवळच्या पाटीवर ’किल्ले पेब उर्फ विकटगड रेल्वे कर्मचारी आपले सहर्ष स्वागत’ करतात.

या ठिकाणी रूळ सोडून पेबच्या किल्ल्याच्य़ा दिशेने पायवाट जाते. वाटेत दोन लोखंडी शिड्या, एक गुहेसदृश घळ, आणि बरेच झरे यांना ओलांडून आपण माथेरानचा डोंगर आणि पेब किल्ला यांच्या मधल्या खिंडीत येऊन पोहोचतो. या खिंडीच्या बरोब्बर खूप वर पॅनोरमा पॉईंट आहे. तिथून या खिंडीत उतरायला एकच मार्ग आहे - पाण्यासारखी थेट उडी घेणे. (तात्पर्य, कोणताच मार्ग नाही.)

त्या खिंडीपासून वाट अगदीच सोपी आहे. गडावर पोहोचण्य़ासाठी आणखी दोन - एकावर एक आणि एकमेकांशी कोनात वळवलेल्या - शिड्या आहेत. गडावर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराकडे पाठ करून उभे राहिलो की समोर लगेच खोल १००० फूट दरी, दरीपलीकडे उजव्या हाताला माथेरानचा पॅनोरमा पॉईंट, आणि डाव्या हाताला दूरवर नेरळ गाव दिसते. इथून दिसणारे सह्याद्रीचे सरळसोट कडे आपले नजर खिळवून ठेवतात. मंदिराजवळच पिण्याच्या पाण्याचे टाके आणि पाणी काढायला बादली ठेवलेली आहे.

नेरळ गावाकडून येणारी वाट पेबच्या किल्ल्याला ओलांडून मागच्या बाजूने वर येते. त्या वाटेवर दोन गुहा आहेत. या गुहांत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा मठ आहे. विविध उत्सवांच्या निमित्ताने इथे बऱ्याच भक्तांची गर्दी होते, हे तिथल्या फोटोंवरून कळते. याच गुहांजवळ एक माणूस जाऊ शकेल एवढ्या आकाराचे आणखी एक भगदाड आहे. तिथून आत गेल्यावर एक छोटीशी अंधारी खोलीसदृश जागा आहे. आम्ही सरपटत आत गेलो, आणि अमोनियाच्या उग्र दर्प नाकातोंडात भरून परत आलो. आत फक्त एक वटवाघूळ दिसले. अंधाऱ्या जागेचे प्रयोजन मात्र कळू शकले नाही. या वाटेवर केळीची पाने भरपूर आहेत, आम्ही जेवणासाठी (लगेच) तोडून घेतली.

त्याच वाटेवर पुढे काटकोनात एक लोखंडी शिडी बसवली आहे. नेरळकडून येताना या शिडीवरून चढून येणे हा एकमेव मार्ग आहे. आम्ही माथेरानकडून गेलो असल्यामुळे आम्ही ही शिडी उतरून त्या मठात गेलो.

गडाच्या सर्वोच्च ठिकाणी दोन पादुका व त्याभोवती छोटेखानी फरसबंदी आहे. संपूर्ण गड तासाभरात फिरून होतो. या तासाभराच्या संपूर्ण भटकंतीमध्ये ’भन्नाट रानवारा’ आमच्या बरोबर होता. पावसाची आशा शेवटपर्यंत आशाच राहिली. जेव्हा आम्ही पेबवर होतो, तेव्हा माथेरानच्या डोंगरावर ढग सांडत होते, आणि आम्ही माथेरानवर पोहोचलो, तेव्हा पेब पावसात भिजत होता!

परत येताना Casette rewind करावी तसं तोच रस्ता, त्याच शिड्या, तोच NM 169 milestone अशी सारी माघारी पायपीट करून माथेरानच्या वाहनतळावर परत आलो. इथे माथेरानमध्ये जाण्य़ासाठी तिकीट फाडावे लागते. आणि मुख्य म्हणजे, आत ३०-३५ मिनिटांची पायपीट केल्यावर मुख्य माथेरानची पर्यटनक्षेत्रे लागतात. वेळेअभावी आम्ही माथेरानमधल्या ’सर्व’ प्रेक्षणीय स्थळांकडे पाठ फिरवली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

गार वाऱ्याची झुळूक यावी आणि क्षणभरात ताजंतवानं वाटावं तसं सह्याद्रीतली ही पेबची पटकन संपून गेलेली भटकंती दीर्घकाळ मनाला ताजं ठेवेल यात शंकाच नाही!

नचिकेत जोशी (२९/६/२००८)

केंजळगड

एखादी गोष्ट नेहमी डोळ्यासमोर असावी, पण आपल्या वाट्याला न यावी, तसं काहीसं केंजळगडाच्या बाबतीत होत होतं. एका वर्षापूर्वी जेव्हा रायरेश्वराला पहिल्यांदा गेलो, तेव्हा कोर्ले गावाच्या डाव्या अंगाला दरीला लागून उभ्या असणाऱ्या केंजळगडाशी पहिल्यांदा नजरभेट झाली होती. रायरेश्वरावर दगडू जंगमाकडून केंजळगडाच्या वाटेबद्दल जुजबी माहिती मिळाली होती. त्या दिवशी जवळजवळ दिवसभर केंजळगड डोळ्यासमोर होता, पण जायला जमलं नव्हतं. त्यानंतर मागच्या वर्षभरात पांडवगड, कमळगडला जाताना जुना परंतु न भेटलेला दोस्त असावा तसा केंजळगड लांबूनच दिसत होता, पण जाणं काही होत नव्हतं. अखेर, यंदा सर्व ’कामगारांच्या’ हक्काच्या दिवशी- १ मे ची सुटी धरून केंजळगडाकडे प्रस्थान ठेवले.

३० एप्रिलला, वेळ आणि वाहने यांची आयत्या वेळेपर्यंत ठरवाठरवी करून शेवटी आम्ही ९ जण पाच गाड्यांवर रात्री दहा वाजता निघालो. भारतीय प्रमाणवेळेनुसार निघायला (फक्त) २ तास उशीर झाला होता. भोर पर्यंत सुनसान रस्त्यावरून गाडी चालवण्य़ाचा मनमुराद आनंद घेत भोरमध्ये पोचलो, तेव्हा रात्रीचे साडेअकरा झाले होते. तेवढ्यात सर्वांना चहा नामक ’उत्तेजक पेय’ पिण्याची तल्लफ आली! आणि ती एवढी जोरदार होती की, अगदी आईस्क्रीमच्या दुकानातही चहाची चौकशी करून आलो!! तेव्हा त्या आईस्क्रीमवाल्याचा झालेला चेहरा पाहण्यासारखा होता! शेवटी समस्त उपहारगृहे निद्राधीन असल्याने आम्ही मोर्चा नाईलाजाने वरंधा मार्गावरच्या आंबवडे गावाकडे वळवला. इथून कोर्ले गावाचा फाटा आहे.

एका चौकोनाची जर रायरेश्वर ही एक बाजू असेल, तर, केंजळगड ही लगतची दुसरी बाजू आहे. (क्षेत्रफळ माहित नाही :-) ) दोन्ही डोंगर एकाच धारेने जोडले गेले आहेत. फक्त रायरेश्वर पुणे जिल्ह्यात (भोर तालुका) आहे, आणि केंजळगड सातारा जिल्ह्यात (वाई तालुका) आहे!

यावेळी फक्त केंजळगड हे एकच ठिकाण ठरवलेलं असल्यामुळे कोर्ले गावात गाड्या लावून रायरेश्वराच्याच वाटेने चढून केंजळगडाच्या माचीवरच्या वस्तीजवळ पथाऱ्या टाकायच्या असा बेत होता. बालेकिल्ला चढण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी रामप्रहरी ठेवला होता. हा बेत रायरेश्वराच्या वाटेने चढण्यापर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरळीत पार पडला. आंबवडे ते कोर्ले हा अतिशय खराब रस्ता पार करून कोर्लेमध्ये पोचलो. सुदैवाने गावात दोन तरूण भेटले. त्यांच्य़ा घराजवळ गाड्या लावल्या आणि हेल्मेटही त्यांच्याच घरात ठेवले. रात्री १ वाजता चढायला सुरूवात केली तेव्हा रायरेश्वर आणि केंजळगड अंधारात नाहीसे झाले होते आणि ही मोहीम पाहायला आकाशात फक्त चांदण्य़ा जमल्या होत्या. कृष्णपक्षातली दशमी असल्यामुळे चंद्रराव आमची मोहीम फत्ते होण्याच्या सुमारास हजर राहणार होते!

रायरेश्वराची वाट अत्यंत सोपी आहे. (अवघड भाग आंबवडे ते कोर्ले ह्या खराब रस्त्याने गाडी चालवणे हाच आहे!) निम्म्यापेक्षा जास्त चढून गेलं की, एके ठिकाणी ह्या वाटा वेगळ्य़ा होतात. एक डावीकडे केंजळगडाच्य़ा माचीकडे जाते, आणि एक "यू टर्न" मारून रायरेश्वराकडे जाते. आमची ही वाट चुकली आणि आम्ही थेट रायरेश्वराच्या शिडीजवळच्या सपाटीवर पोचलो. तिथेच मुक्काम करण्यापेक्षा सरळ रायरेश्वराच्या मंदिरात मुक्कामाला जावे, त्यामुळे एकाऐवजी उद्या दोन्ही किल्ले होतील असे ठरवले आणि त्यानुसार शिडी चढू लागलो. मागे सहज वळून पाहिले, तर किल्ले रोहिड्याच्या (विचित्रगड) मागून उगवलेली तांबूस चंद्रकोर दृष्टीस पडली. भोरहून आंबवडेला येताना वाटेत डाव्या हाताला रोहिडा किल्ला दर्शन देतो. आसमंतातली शांतता अनुभवत आणि वाट शोधत रायरेश्वराच्या ऐतिहासिक मंदिरात पोचलो, तेव्हा पहाटेचे साडेतीन झाले होते. विशेष गोष्ट ही होती, की संपूर्ण चढणीत एकदाही रस्ता चुकलो नाही! (केंजळगडाची वाट चुकली हा अपवाद सोडून!)

’सकाळी पाच वाजता उठलो, तर ऊन चढायच्या आत केंजळगड उतरता येईल’ असा (निष्फळ) निष्कर्ष काढून सर्वांनी मंदिराबाहेरच्या चौथऱ्यावर पथाऱ्या टाकल्या. सकाळी सहा वाजता उठल्यावर शंकर जंगम यांच्याकडे चहा घेतला, दगडूचीही भेट झाली. तो आदल्या रात्री खावली गावात लग्नाला गेल्याचे कळले होते, नाहीतर सकाळच्या नाष्ट्याचीही सोय झाली असती. त्यांचा निरोप घेऊन केंजळगडाकडे निघालो. रायरेश्वर ते केंजळगड ही वाट अगदी सोपी आहे. डोंगराच्या धारेवरून चालत गेलं की आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. हा किल्ला थोडा पुरंदरसारखा आहे. म्हणजे खाली माची आणि वर तसाच बालेकिल्ला. माचीवरच्या वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सोपी वाट आहे. आणि आता तर, दोन ट्रक एकावेळी जाऊ-येऊ शकतील एवढा रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. हा रस्ता केंजळगडाला वळसा घालून पलीकडे कमळगडाकडे जाणार असल्याचं कळलं. डेक्कन ओडिसी सारखं एकाच वाटेवर रायरेश्वर, केंजळ, कमळगड दर्शन असा काही बेत असावा!

अर्ध्या तासात माचीवरच्या केंजळवाडीला पोहोचलो, आणि रानातून केंजळगडाच्या शिखराकडे चालायला सुरुवात केली. ही वाट जरा दमवणारी आणि बऱ्यापैकी चढणीची आहे. मे महिना असल्यामुळे रानमेवा झाडाझाडावर दिसत होता. कैऱ्या, थोडी कच्ची करवंदे यांचा भरपूर आस्वाद घेत अर्ध्या तासात वर पोहोचलो. शेवटच्या टप्प्यात एकाच कातळात कोरलेल्या ऐसपैस पायऱ्या आवर्जून पाहण्यासारख्या आहेत.

याही गडावर पाहायला काहीच नाही. अगदी मंदिराचं बांधकाम ही नाही. फक्त एक साठवणीची खोली वाटावी असं एक दगडी बांधकाम आहे. गडाची देवी उघड्यावर स्थानापन्न झाली आहे. तिथेच एक मारूतीरायही आहेत. एक प्रचंड मोठा जात्याचा वाटावा असा दगड उभा करून ठेवलेला सापडला. पण नुसत्या ऐतिहासिक पडक्या बांधकामापलीकडचा निसर्ग इथे भरपूर आहे. सुदैवाने मळभ असल्यामुळे उन्हाचा फारसा त्रास होत नव्हता. केंजळगडावरून वाई-भोर प्रदेशाचा तोच चिरपरिचित आसमंत दिसतो. रायरेश्वर, रोहिडा, कमळगड, नवरा-नवरीचे सुळके, वाळकी नदी, धोम धरण हे जुने ओळखीचे दोस्त्स वेगळ्या angle ने दिसले- नव्याने ओळख व्हावी तसे!

परतताना, ज्या वाटेने रात्री चढलो त्या रायरेश्वराच्या लांब-रूंद रस्त्याकडे न जाता केंजळवाडीतून पायवाटेने दरी उतरून पुन्हा कैऱ्या तोडत थेट कोर्ले गावात उतरलो. एखाद्या ट्रेक किंवा भटकंतीमध्ये निसर्गही हा असा सामील होऊन आणखी धमाल आणतो. ही वाटही सोपी आहे. रात्री आकाशात पुरेसा प्रकाश नसल्यामुळे चुकायची risk नको, म्हणून या वाटेने आलो नाही, एवढंच! मग नेहमीप्रमाणे कोर्ले ते भोर, भोर ते हायवे गाडी चालवत, आणि हायवेवर कुलकर्ण्यांच्या उपहारगृहात निवांत पाहुणचाराचा आस्वाद घेत चार वाजता पुण्यात पोहोचलो.

अगदी ध्यानीमनी नसताना आमच्यापैकी काहीजणांचे या ट्रेकमध्ये रायरेश्वर आणि केंजळ असे एकाऐवजी दोन किल्ले झाले. वाट न चुकता झालेला हा पहिलाच ट्रेक असावा! पण तरीही यावेळी काहीच ’चुकल्यासारखं’ वाटलं नाही! केंजळगड नावाच्या, खूप पूर्वीच मैत्री झालेल्या, पण भेटीचा योग न आलेल्या जुन्या आणि अजाणता दुर्लक्षित मित्राला भेटल्याचा आनंद कदाचित त्यापेक्षा अधिक वाटला असेल...


- नचिकेत (४/५/२००८)