Pages

Wednesday, January 10, 2018

ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग ३

महाबळेश्वरात यायला आणि महाबळेश्वरातून जायला संध्याकाळी सातनंतर एसटी नाही. पसरणी आणि आंबेनळी-पोलादपूर घाटातून रात्री एसटी जात नाहीत. साडेआठला आर्थरसीटला पोचल्यामुळे महाबळेश्वरातून मेटतळ्यात जायचे सर्व शासकीय वाहनांचे पर्याय बंद झाले होते. मग टेंपोवाल्यालाच मेटतळ्यात सोडायला विनवलं. तोही तयार झाला, हे नशिब. जाता जाता सचिनला महाबळेश्वर एसटी स्टँडला सोडलं. त्याला दुसर्‍या दिवशी एका फ्यामिली फंक्शनला जायचं होतं. त्याला बरेचदा सांगून पाहिलं, की 'सांग एसटी नाही मिळणार एवढ्या रात्री आणि म्हणून नाही येवू शकणार. किंवा फोन बंद करून टाक' वगैरे वगैरे. पण तो बधला नाही. (पुढच्या ट्रेकचं भविष्य आपल्याच कर्माने संकटात टाकायला कुठलाही कुटुंबधारी ट्रेकर तयार होत नाही, ह्याचं हे उदाहरण!) महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर राहू देत नाहीत, हे त्याच्यामुळे आम्हाला कळलं. रात्री त्याला म्हणे पोलिसांनी स्टँडवर मुक्काम करू दिला नाही. मग त्याने मुकाट्याने हॉटेलमध्ये मुक्काम केला. (पण पुण्याकडे जायचा निश्चय अजिबात बदलला नाही!)

मेटतळ्यामध्ये पोचायला साडेनऊ झाले. तिथल्या एका हॉटेलमध्ये जेवणाचं आधीच सांगून ठेवलं होतं. तिथेच राहण्याचीही सोय झाली. जेवताना 'उद्याचा प्लॅन' ह्यावर थकलेल्या मेंदूंची चर्चा झाली. विरागच्या MI2 Wrist Band नुसार ढवळे गाव ते आर्थरसीट पॉईंट ह्यात आज आमची ३९००० पावलं चाल झाली होती. अंतरात सांगायचं झालं तर २४.८८ किमी एवढं चालून आलो होतो. (म्हणजे ढवळे गाव ते आर्थरसीट हे २४.८८ किमी आहे, असं नसून, जेवढी पावलं आम्ही चाललो ते सगळं मिळून तेवढे किमी भरलं. ह्यात चंद्रगड चढाई-उतराईसुद्धा आली.) एका जहाल गटाचं म्हणणं होतं, की 'काही रडतोंडी नको आणि दाभिळ नको. हवंतर महाबळेश्वरात फिरू आणि संध्याकाळच्या एसटीसाठी डायरेक्ट महाड गाठू' (रविवारी संध्याकाळची महाड-पुणे आणि महाड-मुंबई एसटी रिझर्व्हेशन्स झालेली होती). तर दुसरा गट मवाळ होता. त्याचं म्हणणं होतं, 'फक्त रडतोंडी घाट करू आणि वाडा कुंभरोशीतून पोलादपूर आणि मग महाड गाठू. दाभिळ स्किप करू'. मी आणि आणखी एक-दोघे तिसर्‍या गटात होतो. 'पूर्ण ट्रेक ठरल्याप्रमाणेच करायचा' हा आमचा हेका. वास्तविक, मी इतका दमलेलो होतो, की उद्या सकाळी किती वाजता उठेन ह्याचीही मला कल्पना नव्हती. पण हातातोंडाशी आलेला जबरदस्त ट्रेक अर्ध्यावर सोडायची मनाची तयारी नव्हती.

त्या रात्रीच्या झोपेने खरोख्खर किमया केली. सकाळी उठलो तेव्हा बरंच फ्रेश वाटत होतं. दुसर्‍या दिवशी सकाळी नाष्ट्याला जमलो तेव्हा तीनही गटांचं प्लॅनमिलन झालं होतं. 'रडतोंडी आणि दाभिळ दोन्ही वाटा करायच्या'.  विरागने काही जणांकडून स्ट्रेचेस करून घेतले. बाकीच्यांनी लांबूनच हात (स्ट्रेच करून) जोडले. मला ह्या शरीर विलक्षण लवचिक असणार्‍या लोकांचं कौतुकच वाटतं. माझे तर दोन्ही हात - एक मानेवरून आणि दुसरा कमरेवरून असे पाठीवर नेले तरी एकमेकांना भेटत नाहीत. ह्या 'स्ट्रेचर' लोकांचे तर सगळे अवयव त्यांच्या मनानुसार वळतात, वाकतात आणि जुळतातसुद्धा! (मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे - समर्थ रामदास)

मेटतळे गावातूनच रडतोंडी घाट सुरू होतो असं ऐकलं/वाचलं होतं. महाबळेश्वर-पोलादपूर हायवेच्या उजव्या बाजूला मेटतळे गाव आहे आणि डाव्या बाजूला दरी. (जिथे दरी नाही, तिथे गावातली घरं-मंदिरंही आहेत) तर अशा मेटतळे गावातून घाट सुरू होतो म्हणजे नक्की कुठून हे कळेना. ओंकारच्या (उर्फ आदरणीय सह्याद्रीगूगल) मते 'समजा मेटतळे नावाचं एखादं घर असेल, तर त्याच्या एखाद्या दरवाजातून घाट सुरू होतो' असं होतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर, काल चिकार चाल झाली होती, आणि आजही नक्की किती उतरून जायचंय हे माहित नव्हतं. पुन्हा पारगाव ते वाडा कुंभरोशी ह्या दहा-बारा किमी अंतरासाठी गाडी मिळालीच नाही, तर ती चाल नक्की होती. म्हणून सुरुवातीलाच वाट चुकायला नको ह्या सद्हेतूने हॉटेलवाल्याकडे चौकशी केली - 'रडतोंडी घाटाची सुरूवात कुठून आहे?'. त्याला हे असं काही घाटाचं नाव आहे हेच माहित नव्हतं! मग 'शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ज्या वाटेने पारमध्ये उतरवलं ती वाट दाखवा' असं सांगितलं. त्याला फक्त 'पार' कळलं आणि त्याने त्याच्या हॉटेलमधल्या एकाला आम्हाला वाट दाखवायला पाठवलं.

मेटतळे गाव संपल्यानंतरच्या (बहुतेक) पहिल्याच वळणावर महाबळेश्वर-पोलादपूर घाटरस्त्याची संरक्षक भिंत फोडलेली आहे. हीच ती इतिहासप्रसिद्ध रडतोंडी घाटाची सध्याच्या काळातली सुरूवात. आमच्या वाटाड्याला आम्ही पुन्हा पुन्हा विचारत होतो की 'हीच बरोबर वाट आहे ना?' त्यावर त्याने दोन-तीन मिनिटे काहीतरी संवाद केला. त्यावरून आम्हाला एवढंच कळलं, की तो एक 'शिवभक्त मावळा' आहे. अखेर आमच्यातही मतभेद व्हायला लागले. अनिरुद्ध तर समोर पायवाटांमधल्या हायवेसारख्या दिसणार्‍या प्रशस्त वाटेने चालायलाही लागला. ती वाट खालीच चालली होती म्हणजे कुठेतरी नक्की पोचली असती. मला मात्र रडतोंडी घाटानेच उतरायचे होते. म्हणून मी रडतोंडी घाटाची खात्री झाल्याशिवाय एक पाऊलही उतरायला तयार नव्हतो. जर अर्ध्या वाटेवर गेल्यावर समजलं असतं की हा रडतोंडी घाट नाहीच, तर केवढी पंचाईत झाली असती? (मग ज्या वाटेने आम्ही गेलो तिलाच रडतोंडी घाट म्हणून ब्लॉगमध्ये लिहावं लागलं असतं, ते वेगळंच!) त्या वाटाड्याला एवढंच माहित होतं की 'ही वाट घोघलवाडीला जाते. थोडं उतरून गेल्यावर मध्येच एक वाट फुटते - ती दुधोशीला जाते. तुम्ही ह्याच वाटेने जावा.' अखेर त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला निरोप दिला आणि त्याच वाटेने निघालो. वाटेत एक गावकरी भेटला. त्यानेही वाटाड्याचीच माहिती दिली. पण त्याच्याकडून आणखी एक माहिती मिळाली की पारसोंड गावात अकरा वाजता एसटी येते. हे तर फारच बरं झालं. कारण एसटीमुळे आमचा पारसोंड (उर्फ पार) ते वाडा कुंभरोशी टप्पा पार पडणार होता. एरवी हे अंतर डांबरी रस्त्याने चालावे लागले असते.

रडतोंडी घाट मात्र अप्रतिम आहे. दोन्ही बाजूला दगडी कुंपण (आता ढासळलं आहे, पण तरी ओळखू येईल इतपत आहे), पायर्‍या आणि छान वळणं घेत जाणारा प्रशस्त घाट. ह्याच वाटेने अफझलखानाला आणि त्याच्या सैन्याला महाराजांनी पारगावापर्यंत आणलं होतं. काहींच्या मते हा घाट थेट महाबळेश्वरातून सुरू होतो. बाँबे पॉईंटकडे जाणार्‍या वाटेपाशी मूळ सुरूवात आहे. हे खरेही असावे. कारण, वाईतून डोंगर चढून महाबळेश्वरला खान आला. पारकडे खाली उतरायची सुरूवात महाबळेश्वरातूनच होणे हे पटण्यासारखेच आहे. पण, तिथून सुरू होणारी वाट मेटतळ्यात हायवेला मिळते आणि पुन्हा डोंगरात उतरते. म्हणून आम्ही मेटतळ्यातून उतरायचं ठरवलं. हा घाट खास खानासाठी महाराजांनी बांधला. आता बराच सोपा वाटत असला तरी त्या काळात तो भयानकच होता. महाबळेश्वर खोर्‍यातली त्यातल्या त्यात बरी दिसणारी एक वाट म्हणजे हा घाट असं म्हणायला हरकत नाही. शेवटच्या टप्प्यात झाडी आहे. अगदी पूर्ण सावली! झाडांझाडांवर दिशादर्शक खुणा म्हणून हिरव्या/भगव्या रिबिनी लावलेल्या आहेत. 'जावळीची आल्हाददायक जंगलशोभा अनुभवायला खानसाहेबांनी सैन्यासह यावे' हा आग्रह खानापाशी महाराजांच्या वकिलांनी धरला होता. त्यामागचा हेतू वेगळा असला, तरी 'आल्हाददायक जंगलशोभा' मात्र ह्या घाटात आहेच, ह्यात शंका नाही.

तो घाट अवघ्या चाळीस मिनिटात उतरून घोघलवाडीत आलो. तिथून डांबरी रस्त्याने कोयनेवरचा शिवकालीन पूल ओलांडून पारगावात पोचलो. रडतोंडी घाटाने उतरलेल्या अफझलखानाला पारगावात जाण्यासाठी वाटेतली कोयना नदी ओलांडता यावी म्हणून कोयनेवरचा तो पूल महाराजांनीच अफझलखानासाठी बांधला असं म्हणतात. (अफझलखानाची भेट आणि एकूणच लढाई हे शिवरायांच्या युद्धतंत्राचा आणि नियोजनाचा एक मास्टरपीस आहे, हे जाता जाता लिहून ठेवतो.) पारगावात रामवरदायिनीचं दर्शन घेऊन एसटीने वाडा कुंभरोशीला उतरलो. तिथून टेंपोने दाभिळ टोक. दाभिळ टोकापासून जावळी खोरं, आर्थरसीट, महाबळेश्वर हा सगळा आसमंत सुरेख दिसतो. खाली लहुळसे गाव दिसतं (आम्ही त्याला दाभिळ समजत होतो). चंद्रराव मोर्‍यांवर हल्ला करण्यासाठी महाराज ज्या वाटेने जावळीत उतरले ती निसणीची वाट तसंच जावळीचं खोरं हेही दिसतं. आर्थरसीट पॉईंट दिसतो. चंद्रगड कुठे असेल, ह्याचा अंदाज करता येतो.

दाभिळ गावात उतरणे हा आमच्या ट्रेकचा शेवटचा टप्पा होता. दाभिळ टोकाखाली दाभिळ गाव आहे. ह्या संपूर्ण वाटेवर पायर्‍या आहेत. पायर्‍या सुस्थितीत नाहीयेत, पण जुन्या काळी ही एक प्रचलित वाट होती हे लगेच कळतं. आजही दाभिळ गावातून डांबरी रस्त्याहूनही कमी वेळात महाबळेश्वरकडे येणारी हीच एक वाट आहे. आम्हाला दाभिळ टोक ते दाभिळ गाव ह्यासाठी अर्धा तास (गावकर्‍यांच्या चालीने २० मिनिटे) पुरतील असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात एका सपाटीवरून ही वाट डावीकडे वळते आणि मग अगदीच संथ उतारांनी, लांबच्या लांब वळसे मारत (एकदाची) दाभिळमध्ये उतरते. ही वाट उतरायला आम्हाला जवळजवळ एक तास लागला. (आदल्या दिवशीच्या थोडाफार थकव्याचा परिणाम असेलही)

दाभिळमध्ये पोचलो तेव्हा एक वाजला होता. दाभिळहून चार वाजता पोलादपूर एसटी होती. एवढा वेळ वाट पाहण्यापेक्षा एक जीप ठरवून कापडा गाठलं. (पोलादपूर-महाबळेश्वर हायवेवरचं कापडा हे गाव). तिथून टमटमने पोलादपूरला पोचलो. चौकातल्याच हॉटेलमध्ये सामिष-निरामिष जेवणाची ऑर्डर दिली. पोलादपूरच्या त्या हॉटेलात सुरमई थाळी ३०० रुपयांना होती. (लोक शहर महागडी असतात म्हणून उगाच शहरांना नावं ठेवतात). बिल आल्यावर ही गोष्ट कळल्यामुळे नाईलाज झाला. महाडमध्ये पाच वाजताच पोचलो. साडेसहाच्या एसटीला तुडुंब गर्दी होती. पुण्यात पोचायला रात्रीचे बारा वाजले.

ढवळे ते आर्थर ते दाभिळ (मार्गे चंद्रगड, रडतोंडी घाट) हा 'सुईदोरा ट्रेक' अशा प्रकारे संपला. मला 'सुईदोरा ट्रेक'चे दोन अर्थ वाटायचे. पहिला, ज्या ट्रेकला सुईदोर्‍यापासून सगळं न्यावं लागतं. आणि दुसरा - अवघड ट्रेकमध्ये भीतीने किंवा चढाई-उतराईमध्ये 'फाटलेली' शिवण्यासाठी सुईदोरा न्यावा लागतो असा ट्रेक म्हणजे सुईदोरा ट्रेक. खरा अर्थ 'सुईतून दोरा ओवताना जसा यू-टर्न मारून दोरा पुन्हा मूळ दिशेने येतो, तशा प्रकारचा मार्ग असलेला ट्रेक' हा आहे. आम्ही ढवळ्यातून (कोकणातून सुरू करून आर्थरसीटपर्यंत जाऊन पुन्हा दुसर्‍या मार्गाने कोकणात उतरलो होतो).

एक विलक्षण ट्रेक संपला. मागे उरल्या त्या आठवणी.  काही वर्षांनी मागचं आठवताना हे उद्योग नक्की आठवावेत, ह्यासाठीच लिहिण्याचा हट्ट. खरं सांगायचं तर आम्हाला वेळेची बंधनं होती (स्पेशली ढवळे-आर्थरसीट ट्रेकसाठी) म्हणून आम्ही जरा काटेकोरपणे वागलो. अन्यथा वाटा चुकाव्यात आणि आपलं आपण शोधत कुठेतरी पोचावं, इतका सुंदर हा जावळी प्रदेश आहे. इथला सह्याद्री एक वेगळीच घनदाट माया करतो. इथे पावलापावलावर सावली आहे. रानाचं भय आहेच पण आपली पावलं जर मुघली आणि आदिलशाही मनसुब्याची नसतील, तर आपल्याला भ्यायचं कारण नाही. पाठपिशवी घ्यायची, मनात उत्साह आणि छातीत इथला भर्राट वारा भरायचा आणि निघायचं - पुढचं सगळं सह्याद्रीबाबाच्या भरोशावर सोडायचं!

************

एकाही फोटोशिवाय नुसत्या शब्दांतून वर्णन केलेलं एवढं सगळं वाचायचं, आणि समजून घ्यायचं ह्यासाठी तिसरा डोळा असावा लागतो. प्रिय वाचकहो, तो तुम्हाला आहे ही माझी खात्री झालेली आहे. ह्या चिकाटीला पुन्हापुन्हा सलाम. हा ट्रेक आयोजित केल्याबद्दल, आणि त्यासाठी घेतलेल्या आवश्यक मेहनतीबद्दल नरेशकाका उर्फ गिरी ह्यांनाही सलाम. (पुढचा ट्रेक लवकर ठरवा ही विनंती).

तर दोस्तहो, भेटूच, पुन्हा असंच कुठेतरी, केव्हातरी, कुठल्यातरी आडवाटेवर.
शुभास्ते पन्थानः सन्तु |

(पुढचा भाग शेवटचा: फक्त फोटो)
- नचिकेत जोशी

Tuesday, January 9, 2018

ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग २

ह्या ट्रेकचं एक वैशिष्ट्य म्हणजे, जिथे चाललोय ते ठिकाण जिथून सुरुवात करतोय त्या ठिकाणापासून मुळीच दिसत नाही. उदाहरणार्थ, ढवळे गावातून चंद्रगड दिसत नाही. चंद्रगडावरून ढवळे घाटवाट दिसत नाही. ढवळे घाटातून घुमटी दिसत नाही. घुमटीपासून जोरचे पाणी दिसत नाही. जोरच्या पाण्यापासून आर्थरसीट पॉईंट दिसत नाही. (आणि ह्या जंगलात हरवलं, तर कुणीच कुणाला दिसत नाही). जिथे चाललोय तिथे ते आहे, ह्या एकमेव भरोशावर करायचा हा ट्रेक आहे.

ढवळ्यात पोचलो, तेव्हा चिकार वारं सुटलं होतं. 'ओखी' वादळामुळे सह्याद्री माथ्यावर आणि कोकणात 'येत्या ४८ तासात पावसाची शक्यता' नेमकी आदल्याच दिवशी प्रसारित झाली होती. 'येवढं वारं पावसाळ्यातही नव्हतं इथं' - इति गाईड रवी मोरे. मग काय! उद्या संध्याकाळी महाड-पुणे एसटीत बसेपर्यंत पाऊस पडू नये किंवा अगदी दाभिळ गावात पोचेपर्यंत पाऊस नको अशी प्रार्थना करण्यापलिकडे हाती काहीच नव्हतं. सह्याद्रीत, त्यातही जावळीत असताना पाऊस लागला तर काय हाल होतात, हे इतिहासालासुद्धा माहित आहे. तिथे आमची काय कथा!

स्थानिक गावकरी कम ढवळे घाटाचा एकमेव गाईड रवीदादा मोरेंकडे चहा नाष्टा झाला. ढवळ्यातून चंद्रगडावर पोचायला दीड एक तासांची चढाई होती. गडावर पाणी आहे. पण, त्यानंतर मात्र थेट बहिरीच्या घुमटीजवळच पाणी आहे. म्हणजे एकदा चंद्रगड सोडला, की पुढचे कमीत कमी पाच तास कुठेही पाणी नाही. त्यामुळे प्रत्येकाकडे कमीत कमी तीन लिटर पाणी घेऊनच मग निघायचं ठरलं. (मी सवयीप्रमाणे चार लिटर घेतलं. मग सॅक व्हायची ती जड झालीच, त्याला इलाज नाही.)

ढवळे गावातून निघायला साडेसात वाजले. आमच्यासोबत रवीदादांचे वडील कोंडिरामबाबा (वय सत्तर) बहिरीच्या घुमटीपर्यंत वाट दाखवायला येणार होते. मला तर ह्या ट्रेकसाठी जी माहिती मिळाली होती, त्यावरून गाईड अजिबात घेऊ नये असंच वाटत होतं. वापरात असलेला, एकाच पायवाटेने घनदाट जंगलातून एकाच पायवाटेने वळणं घेत घेत जाणारा घाट म्हणजे ढवळे घाट! फक्त एक दोन वळणं लक्षात ठेवली आणि आजूबाजूचे डोंगर लक्षात ठेवले की झालं, असं जवळजवळ प्रत्येकाने सांगितलं होतं. त्यामुळे गिरीशी बोलताना एक-दोनवेळा "जाउ रे आपलं आपण, सगळे चालणारे, वाटा शोधण्यात तरबेज आहेत" असे प्रस्ताव मांडले होते. त्याने सुदैवाने ते मनावर घेतले नाहीत. 'बघू, तिकडे गेल्यावर ठरवू' असं म्हणून त्याने प्रत्येक वेळी वेळ मारून नेली.

आम्ही प्लॅनपेक्षा अर्धा ते एक तास उशीरा निघालो होतो. पाठीवर दहा-एक किलोचं ओझं घेऊन चालताना सपाट वाटेवरही दम लागत होता. ढवळे गावापासून दहा मिनिटांवर धनगरवस्ती आहे. त्या गावात चक्क संडास बांधलेले पाहून माझा दम लागल्यामुळे आधीच फुलून आलेला उर अभिमानानेही भरून आला! उशीरापर्यंत टिकलेल्या पावसामुळे झाडोरा चिकार होता. वाटा लपलेल्या होत्या. धनगरवाडीपासून सहज दिसणारी पायाखालची वाट सोडून म्हातारबाबांनी झाडीतली न दिसणारी वाट पकडली आणि 'गाईड का घेतला' ह्याचं पहिलं उत्तर मिळालं. उशीरा संपलेल्या पावसामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला गवत छातीच्या उंचीपर्यंत होतं, आणि वाट त्यात लपलेली होती. ती वाट पकडली आणि लगेचच अंगावर येणारी चढाई सुरू झाली. चंद्रगडाचा चढ खरोखरीचा छातीवर येतो. अक्षरशः कमी वेळात आपण जवळजवळ पन्नास-एक फूट चढून जातो.

वाट चालताना म्हातारबाबांशी ओळख होत गेली. गडावर उघड्या चौकोनी खड्ड्यात दगडात कोरलेलं शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आहे. म्हातारबाबा गेली ३६ वर्ष दरवर्षी महाशिवरात्रीला नेमाने पूजेसाठी जातात. त्यादिवशी गडावर मोठी यात्रा भरते. ढवळे आणि आसपासच्या गावातलेच नव्हे, तर गावातून कामानिमित्त मुंबईला वगैरे गेलेलेही त्या दिवशी आवर्जून गावाकडे येतात. म्हातारबाबांचं उभं आयुष्य ढवळे खोरं आणि त्या भागातल्या जंगलात गेलं आहे. आमचा प्लॅन ऐकल्यापासून ते सांगू लागले, "ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं. सामान देवळात ठेवायचं आणि फक्त एक छोटी बॅग घेऊन चंद्रगड करायचा. दिवेलागणीपर्यंत खाली उतरायचं, आणि झोपून जायचं. दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता ढवळे घाटाला लागायचं. ११ वाजेपर्यंत घुमटी, आणि उशीरात उशीरा २ पर्यंत आर्थरसीट पॉईंट!" ही वाक्यं पुढे दिवसभरात त्यांनी कमीत कमी दहा वेळा ऐकवली.

चंद्रगडावर पोचायला सव्वानऊ वाजले.  गडावर त्या दिवशी भन्नाट वारं सुटलं होतं. गडावरून आसमंत सुरेख दिसतो. कोळेश्वर, रायरेश्वरचे विस्तीर्ण डोंगर, मंगळगड, प्रतापगड हे विविध दिशांना दिसतात. पश्चिमेला ढवळे खोरं, त्यापलिकडे महादेव मुर्‍हा (मुर्‍हा म्हणजे विस्तीर्ण पठार) दिसतात. आर्थरसीट पॉईंटकडे जाताना लागणारी सापळखिंड, घुमटीचा डोंगर हे गडावरून खुणेने दाखवता येतात. चंद्रगड हा भोवतालच्या डोंगरांच्या तुलनेत अगदीच खुजा आहे. (हे घुमटीपाशी किंवा ढवळे घाटाच्या शेवटच्या टप्प्यात गेल्यावर प्रकर्षाने जाणवतं) गडाच्या उत्तर टोकाच्या कड्याच्या पोटात थंड पाण्याचं टाकं आहे. गडफेरी झाली.चंद्रगड चढताना रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा भरून घेतल्या. कारण आता वाटेत पाणी कुठेही मिळणार नव्हतं.

चंद्रगडाची उंची साधारण २३०० फूट. ढवळे घाटाची वाट ढवळे गावापासून सुरू होते आणि चंद्रगडाला उत्तरेकडून पायथ्यातून वळसा घालून उजवीकडे वळते. चंद्रगडावरून ढवळे घाटाच्या वाटेला लागायचं असेल तर पुन्हा ढवळे गावापर्यंत यायची गरज नाही. चंद्रगडाच्या अंतिम टप्प्यातली कातळांतून चढणारी वाट जिथे सुरू होते, तिथेच उजवीकडे गडाला थोडा वळसा घालून खिंडीच्या दिशेने एक वाट जाते. त्या खिंडीतून एक वाट जवळजवळ पन्नास-साठ अंशात सलग खाली उतरत ढवळे घाटाच्या वाटेला जाऊन मिळते. आम्ही ह्या वाटेने उतरलो. ह्या वाटेबद्दल नेटवर वाचलं होतं. पण त्यात जे वर्णन होतं, तेवढी खतरनाक वगैरे नाही वाटली. गायदरा घाट, गुहेरीचं दार वगैरे केलेल्यांसाठी ही वाट सोपी आहे. पण ह्या वाटेला कुठेही सपाटी नाही. सतत खालीच उतरत जाणारी ही वाट संपवायला आम्हाला दीड तास लागला. डावीकडून उजवीकडे जाणार्‍या ढवळे घाटाच्या वाटेला एका बेलाच्या झाडापाशी ही वाट छेदून सरळ जाते. (म्हणजे तिठा नाहीये!) जर ढवळे घाटाची वाट क्रॉस करून पुढे गेलो, तर वाट नेईल तिकडे जावं लागतं. (गाईड का घेतला ह्याचं दुसरं उत्तर!) आम्ही त्या बेलापाशी पोचलो, तेव्हा (घड्याळात) बारा वाजले होते. ही जागा बहुधा ढवळे गावाच्याच उंचीवर किंवा त्याहून किंचित अधिक उंचीवर असावी. म्हणजे आर्थरसीट पॉईंटपर्यंत आता पुन्हा चार हजार फुटांची चढाई करावी लागणार होती. ढोबळमानाने, दोन टप्प्यात हा ट्रेक समजता येतो. ढवळे ते सह्याद्रीच्या सरासरी उंचीवरची बहिरीची घुमटी हा पहिला टप्पा आणि घुमटी ते आर्थरसीट पॉईंट हा दुसरा टप्पा. बेलाच्या झाडाजवळची वेळ - दुपारी बारा! इथून बहिरीच्या घुमटीपर्यंत पोचायला चार तास लागतील - इति म्हातारबा! "म्हणून मी काय सांगत होतो, ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं.... आणि उशीरात उशीरा २ पर्यंत आर्थरसीट पॉईंट! (इच्छुकांनी गाळलेल्या जागा ह्याच लेखातून इतरत्र शोधून भरून घ्याव्यात)"

इथून पुढच्या घुमटीपर्यंतच्या वाटेने व्यक्तिशः माझा पार दम काढला. गच्च झाडीतून, काट्या-फांद्यातून कमालीच्या संथ चढाची ही वाट अक्षरशः जीव काढते (माझा काढला). कमालीचा संथ चढ, माती, अनियमित उंचीचे दगड हे सगळं एकत्र म्हणजे कसोटीच! हा भाग म्हणजे जावळीचा ऐन गाभा म्हटलं तरी चालेल. दोन्ही बाजूंना जंगल. आणि जंगल कसलं? तर रानडुकरं, बिबट्यांचा वावर असलेलं. म्हातारबाबांनी परतीला सोबत म्हणून आपल्या एका चुलत्यालाही सोबत घेतलं होतं. ह्या वाटेच्या उजवीकडे सलग सापळखिंडीची डोंगर-रांग आहे, पण ती जाणवतही नाही, इतकी झाडी आहे.  ह्याच वाटेवर एक सुखद आश्चर्य आमची वाट पाहत होतं. (नाही नाही, बिबट्या वगैरे नव्हता वाटेत).

बेलाच्या झाडापासून ढवळे घाटाच्या वाटेवर अंदाजे पंधरा मिनिटांवर एके ठिकाणी पाणी मिळालं. डिसेंबरचा पहिला आठवडा असल्यामुळे आणि पाऊस उशीरापर्यंत लांबल्यामुळे नदीला पाणी होतं. तिथे जवळजवळ पाऊण तास काढला. हे पाणी जर मिळालं नसतं, तर घुमटीशिवाय अधेमधे कुठेही पाणी नव्हतं. आमच्याकडे शिल्लक असलेल्या पाण्यावर घुमटीपर्यंत पोचणं फारच अवघड झालं असतं असं मागाहून वाटलं. जंगलात, ट्रेकमध्ये सर्वात जास्त आनंद ज्या ज्या गोष्टींमुळे मिळतो, त्यातली एक वरच्या क्रमांकाची गोष्ट म्हणजे पाणी सापडणे. पाणी पिऊन, भरून घेतलं. घुमटीला पोचल्यावरच जेवायचं असं ठरल्यामुळे खजूर-चिक्की-भेळ-वड्यांचा नाष्टा करून घेतला. आणि निघायला एक वाजला.

बेलाच्या झाडापासूनच आमच्या गृपमध्ये 'फाटाफूट' व्हायला सुरूवात झाली होती. अनि, कुशल, पवन सातत्याने आघाडीवर होते. मी, संजय कटाक्षाने मधल्या फळीत होतो. विराग कधी आमच्यासोबत तर कधी आघाडीवर असायचा. गिरी सातत्याने मागे राहायला लागला होता. त्याच्यासोबत अशा बिकट परिस्थितीत 'आपली जबाबदारी' ओळखून सतीश, इंद्रा, यो, रोमा (हे मुलाचं नाव आहे. 'रोहित मावळा'चा शॉर्टफॉर्म) गिरीसोबत राहत होते. गिरीने म्हणे कधीतरी 'माझ्याच्याने होत नाही, मी माघारी चाललो' असे उद्गार काढले असं ऐकलं. पण त्या पाण्यापासून पुढे निघणारं प्रत्येक पाऊल माघारीची शक्यता संपवत होतं. डोंगररांगांमधल्या भटक्यांमध्येही किल्ले आवडणारे, घाटवाटा आवडणारे, सुळके आवडणारे असे प्रकार असतात हे मला हल्लीच कळू लागलं आहे. सतीश हा कातळ-कपार्‍यांत रमणारा. सरळसोट सुळक्यावर चढणे हा त्याचा आवडता छंद. ह्याच्यामुळेच आणि कुशल, सुनिल सारख्या मातबर लोकांमुळे आमची लिंगाणा मोहिम सुखरूप होऊ शकली होती. ढवळे घाटातून सरळ घुमटीवर नेणारा एखादा सुळका असता तर आम्ही पायवाटेने वर पोचायच्या आत सतीश तिथे सुळक्यावरून पोचला असता, असं मला वाटत राहिलं.

इथून पुढे घुमटीपर्यंत पोचणार्‍या वाटेबद्दल लिहिण्यासारखं फारसं काहीच नाही. घनदाट जंगल, घसरवणारी माती, पायात येणारी झाडांची मुळं-खोडं, त्यातून सतत संथपणे वर चढत जाणारी वाट. पाठीवर ओझं नसतं तर कदाचित हा चढ सुसह्य झालाही असता. ह्या वाटेवरच्या एका स्वानुभवावरून गझलेचा एक मतला सुचला, तेवढा लिहून ठेवतो फक्त -

'खोडाने  घसरवले होते
फांदीने सावरले होते'

ह्यावर अजूनतरी पुढे काही सुचलेलं नाही.

सापळखिंडीच्या शंभर-एक फूट अलिकडे वाट झपकन डावीकडे वळते. ढवळे घाटाची वाट वाटते तितकी सोप्या सरळ भूभागातून जात नाही. आता सरळ जायचं असं वाटत असतानाच वळण येतं. डावीकडची सोंड चढायची हे माहित असतं, पण त्या सोडेंच्या सुरूवातीपाशी पोचेपर्यंतही आणखी एक सोंड असते. ह्या संपूर्ण वाटेवरून घुमटी किंवा जोरचं पाणी अजिबात दिसत नाही. उंच डोंगराच्या धारेवर कुठेतरी अंदाजाने समजतं, की तिकडे घुमटी आहे. आर्थरसीट पॉईंट तर कुठूनच दिसत नाही. त्याचं दर्शन जोरच्या पाण्याच्याहीवर वीस-एक मिनिटं चढून गेल्यावर होतं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, चंद्रगड सोडल्यापासून उरलेला अख्खा दिवस आम्हाला सूर्यदर्शनही झालं नाही. उजेड भरपूर होता, पण पूर्ण वाट एकतर घनदाट सावलीतून तरी आहे किंवा मग नुसत्या नैसर्गिक उजेडात तरी. वाचायला गंमत वाटेल, पण चंद्रगडानंतर थेट दुसर्‍या दिवशी दाभिळ टोकावरून उतरतानाच आम्ही सूर्य पाहिला. (अपवाद एकचः जेवणं झाल्यावर घुमटीपासून अस्ताला जाणारा आणि आमच्या उर्वरित ट्रेकसाठी आशीर्वाद देणारा सूर्य दिसला.)

ढवळे घाटातल्या किर्र जंगलात सोबत्यांकडून गझल ऐकवण्याची फर्माईश झाली. काही क्षण त्यानिमित्ताने पाठीला विसावा मिळाला.

'दूरवर कोठेतरी असणार नक्की
एवढा पुरतो मला आधार नक्की

चंद्र एखादा तरी टांगून ठेवा
आवडू लागेल मग अंधार नक्की' 

त्यानंतर आणखी एक गझल सादर केली. दोस्तांनी रेकॉर्ड करून घेतली.

एव्हाना आमच्यातले काही जण खूप मागे पडले होते. ट्रेकमध्ये आपल्या मागून येणारं कुणीतरी आहे, ही भावना कधीकधी खूपच हुरूप आणते. ती अशाअर्थी, की त्यांच्या निमित्ताने आपल्यालाही हवा असेल तेव्हा दम खाता येतो. ह्या ट्रेकला मी ती संधी अनेकदा साधून घेतली (पेशल थॅंक्स टू गिरी). सगळेच जण झपाझपा चालणारे असते, तर माझ्यामुळे त्यांना उशीरच झाला असता.

घुमटीच्या अलिकडच्या सोंडेवर म्हातारबाबांनी आमचा निरोप घेतला.  "बाबांनु! नीट जावा. मला गुरं पाजायला जायचं हाये. आता न्हाय निघालो तर घरी पोचायला लै उशीर होईल. पण लक्षात ठेवा. ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं....".  म्हातारबा खरंच छान होते. उभं आयुष्य ज्या जंगलात गेलं, तिथली प्रत्येक वाट त्यांच्या माहितीची होती. खरंतर ते घुमटीपर्यंत येणार होते. पण एव्हाना चार वाजून गेले होते. त्यांना माघारी ढवळ्यात पोचायला तीन तास तरी लागले असते. वाट किर्र जंगलातून होतीच, पण वन्य श्वापदांचीही चाहूल त्या रानात होती. (रात्री फोन केल्यावर कळलं, की त्यांना घरी पोचायला पावणे आठ वाजले.)

त्या सोंडेपासून त्यांनी वाट दाखवून दिली. पुढची वाट थोडी सोपी होती. एका बाजूला कडा, दुसर्‍या बाजूला दरी. मुख्य म्हणजे चढ नव्हता. तो ट्रॅव्हर्स थेट घुमटीलाच वर चढला. आम्ही जे पाच-सहा जण पुढे होतो, त्यांना घुमटीला पोचायला साडेचार वाजले. इथे पोचेपर्यंत वैयक्तिकरित्या मी प्रचंड दमून गेलो होतो. घुमटीच्या अलिकडे डोंगराची एक सोंड अख्खीच्या अख्खी चढून यावं लागतं. ह्या सोंडेमध्ये एके ठिकाणी कातळात कोरलेला एक हनुमान आहे. ह्या सोंडेने माझा सगळा दम काढला. ही सोंड संपतच नव्हती! मागून येणारे पाच-सव्वापाच पर्यंत आले.

घुमटीपासून दहा एक मिनिटं चालल्यावर पाण्याचं एक टाकं आहे. इथून जोर गावाकडे जाण्यासाठी एक वाट जाते, म्हणून हे जोरचं पाणी. संपूर्ण ढवळे घाटातला हा एकमेव पाण्यचा स्रोत हे आधी सांगितलंच आहे. त्यामुळे सगळे वन्यप्राणीही इथेच पाण्याला येतात. आमची जेवणं झाली आणि सूर्यास्त होण्याची वेळ जवळ येत चालली. सगळेच दमले होते. इथून आर्थरसीट पॉईंट दिसत नव्हता, तरी आणखी दोन तासांची चाल बाकी होती. कुणाच्या तरी डोक्यात घुमटीपाशीच मुक्काम करण्याची कल्पना आली आणि मी जागीच गोठलो. प्राण्यांच्या भीतीमुळे नव्हे तर थंडीच्या भीतीमुळे. साडेपाच वाजताही घुमटीपाशी मला गारठा जाणवत होता. डिसेंबर महिन्यात उघड्यावर (स्लिपिंग बॅग असली तरी काय झालं) झोपण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. त्यापेक्षा कितीही वाजले तरी आर्थरसीट गाठणं मी पत्करलं असतं. नेटवर जी माहिती वाचली होती, त्यानुसार जोरच्या पाण्यापासून आर्थरसीट पॉईंट पर्यंत दोन माणसं एकावेळी बाजूबाजूने जाऊ शकतील एवढी प्रशस्त वाट आहे. आणि बरीचशी वाट उघड्यावरून आहे. दत्तजयंतीचा आदला दिवस असल्यामुळे रात्री अंधार पडला तरी त्यावाटेवर भरपूर चंद्रप्रकाश मिळाला असता असं वाटत होतं. म्हणूनच इथून निघूया असं हळूहळू सगळ्यांचंच मत बनत गेलं आणि मी मनातल्या मनात सुटकेचा नि:श्वास टाकला.

पाणी भरून घेतलं आणि निघालो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. आता आकाशातच काळसर निळा प्रकाश शिल्लक होता. बाकी सगळीकडे कातरवेळेची छाया दाटायला सुरूवात झाली होती. जोरच्या पाण्यापासून वाट जंगलात शिरते आणि पुन्हा एक जीव खाणारा चढ चढून सपाटीवर जाते. ह्या चढावर माझ्यातली होती नव्हती ती सगळी ताकद संपली. 'i cannot do it anymore' मी मागून येणार्‍या कुशल आणि विरागला म्हणालो. 'हा बरोबर चालतोयस... चल. छोटी पावलं टाक' - हे त्यांचं उत्तर. ही वाट अगदीच अरुंद होती. त्यात चढ आणि घसरवणारी माती. जंगलभागात असल्यामुळे जवळजवळ शून्य उजेड. पुढे चढणार्‍यातला कोणी घसरला तर ट्राफिक जॅम. अशावेळी असमान पातळीवर थांबून राहायचं. त्यामुळे पायात क्रँप सुरू झाले. जोरचे पाणी ते सपाटीच्या ह्या चढाने माझातरी उत्साह पारच घालवून टाकला. कसातरी तो चढ संपवून सपाटीवर पोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते. सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता आणि उजेडही जवळजवळ नाहीसा झाला होता. सर्व गोष्टींना काळा रंग आला होता. अशात लांबवर कुठेतरी आर्थरसीट पॉईंटची काळी किनार दिसली. तिथे जायचं होतं! ट्रेकमधला सर्वात रमणीय टप्पा अखेर अंधारात पार करावा लागणार होता.

ह्या सपाटीपासून मी 'दोन माणसं एकाच वेळी चालू शकतील' अशा ऐसपैस वाटेच्या शोधात होतो. सकाळपासूनच्या नुसत्या चढाने पायही दुखत होते आणि पाठही. आता बराच वेळ सपाटी लागेल ह्या आशेने त्या अंधारातच बघायला लागलो तर असं काहीही दिसलं नाही. दुर्दैवाने एकावेळी एकच माणूस चालू शकेल अशी पायवाट लागली. पायवाटेशेजारी छातीपर्यंत वाढलेलं गवत! आणि थोड्याच वेळात ती वाट रानात शिरलीसुद्धा. इतकंच नव्हे, तर पुन्हा चढ-उतार सुरू झाले. माझा तर फारच मूड ऑफ झाला! मूड बदलायला एक कारण मिळालं ते म्हणजे मध्येच एका ठिकाणी पुन्हा गझल म्हणण्याची फर्माईश झाली. वातावरण तर अफलातूनच होतं. जिथे उभे होतो तिथून जेमतेम पाच-एक पावलांवर थेट चार-एक हजार फूट खोल दरी, आकाशात उजळलेला 'चौदहवीका चाँद', मंद सुटलेलं वारं, लांबवर आर्थरसीट पॉईंटची किनार आणि सोबत सह्याद्रीतले आनंदयात्री!

'तुझ्यापाशीच येतो तू कितीही दूर केल्यावर
तसा विश्वासही नाही तुझ्याव्यतिरिक्त कोणावर

जरा रेंगाळूया येथे, ठसे सोडून जाऊया
कधी होणार अपुली भेट ह्या गर्दीत शिरल्यावर'

काही क्षण ती शांतताही अनुभवली. मग निघालो. ह्या संपूर्ण वाटेवर दोन्ही बाजूला अक्षरशः खोल दर्‍या आहेत. उघड्या डोळ्यांनी ते बघायची आमची संधी मात्र पूर्ण हुकली. सह्याद्रीचं एक अतिविलक्षण सौंदर्य ह्या वाटेवरून पाहायला मिळत असणार, ह्याबद्दल माझी खात्री आहे. दोनएक तास ती वाट तुडवत अखेर आर्थरसीट पॉईंटच्या खालच्या शेवटच्या कातळपॅचशी आलो तेव्हा जे काही वाटलं, ते 'सुटलो एकदाचे' ह्यापेक्षा काही वेगळं नव्हतं. कातळटप्पा चढून सुप्रसिद्ध अशा 'खिडकी'पाशी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते. सकाळी साडेसातला ढवळ्यातून निघाल्यापासून तेरा तासांनी आम्ही डेस्टिनेशनला पोचलो होतो. एकाच दिवसात वेळेच्या हिशेबाने सर्वाधिक लांबीचा हा माझा दुसर्‍या क्रमांकाचा ट्रेक. (पहिला नंबर - रतनवाडी ते डेहेणे व्हाया गुहेरीचे दार - चौदा तास. वर्णन 'anandyatra' ब्लॉगवर वाचू शकाल.).

नेटवर वाचलेलं वर्णन आणि आम्ही घेतलेला अनुभव ह्यात एवढा फरक कसा पडला ह्याचा विचार करण्यात ती वाट संपली. स्पेशली घुमटी ते आर्थरसीट वाटेचं नेटवर वाचलेलं वर्णन आणि आम्ही गवतातून, टेकाडावरून तुडवलेली वाट ह्यातला फरक तेव्हा अनाकलनीयच वाटत होता. मी विचारांती ह्या निष्कर्षावर आलो आहे, की सह्याद्रीमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये वाटांना नवं रूप मिळतं. ज्या भटक्यांनी हा ट्रेक केला आणि त्यावर ब्लॉग लिहिले, त्यांच्या लिखाणात त्यांना त्या त्या ऋतूमध्ये दिसलेली वाट उतरली. आम्ही डिसेंबरमध्ये केल्यामुळे गवत टिकून असेल. पार ढवळे गावापासून संपूर्ण ढवळे घाट, घुमटी ते जोरचं पाणी, जोरचं पाणी ते सपाटी, सपाटी ते आर्थरसीट - सगळीकडे गवत, झाडी आणि एकावेळी एकच माणूस चालेल एवढीच पायवाट. (किंवा मग आम्ही हा ट्रेक करावा म्हणून 'पुरी कायनात' एक झाली असेल आणि असं वर्णन वाचायला मिळालं असेल) पण काहीही असो. आम्ही हा शेवटचा टप्पा अंधारात केल्यामुळे वाटेची स्पष्टता अजिबातच आली नाही आणि आसमंत डोळे भरून बघायचा राहून गेला. माझीतरी घुमटी ते आर्थर हा टप्पा दिवसाउजेडी करायची फार इच्छा आहे.  (नेटवर ब्लॉग्जमध्ये ह्या वाटेचं सुखद आणि मोहक वर्णन केलेल्यांनी मला न्यावं अशी जाहीर विनंती आहे) त्या वाटेत कुछ खास जरूर है!

'खिडकी'पासून पलिकडच्या बाजूला कोसळलेल्या कड्यांची तीव्रता चांदोबाच्या कृपेने रात्रीच्या वेळीही समजत होती. दिवसा बघायला केवढी मजा आली असती! तर ते असो. आर्थरसीट ते महाबळेश्वर प्रवासासाठी आम्ही एक टेम्पो ठरवला होता. तो टेंपोवाला बिचारा साडेपाचपासूनच येऊन बसला होता. घुमटीनंतरच्या सपाटीवरून त्याला फोन लावून थांबण्याची विनंती केली होती. आर्थरसीटवर पोचलो तेव्हा तिथे चिटपाखरूही नव्हतं. पूर्ण अंधार, आणि कमालीची शांतता. 'दिवसभरच्या गलक्यातून मोकळा झालेला आर्थरसीट पॉईंट विसावा घेत आहे' अशी कविकल्पना मी तेवढ्यात करून पाहिली. आर्थरसीट पॉइंट ते आर्थरसीट गाडीतळ हे अंतर चालणे म्हणजे शुद्ध वैताग होता. कारण - पायर्‍या! अशातच गाडीतळाकडे जाण्याऐवजी टायगरपॉइंटकडे वळलो. वीसएक पायर्‍या उतरून गेल्यावर टायगरपॉईंटचा बोर्ड दिसला. वाट चुकलोच की! ह्याचं मुख्य कारण सह्याद्रीतल्या डोंगरांमध्ये मनमुराद भटकणारे आम्ही महाबळेश्वरातून आर्थरसीटला कधीच आलो नव्हतो. मग स्वतःला शिव्या घालत त्या उतरलेल्या पायर्‍या पुन्हा चढून इप्सितस्थळी कसेतरी पोचलो. घड्याळात वाजले होते रात्रीचे नऊ!

टेंपोवाला गाडीमध्ये खाली डोकं करून लपल्यागत झोपला होता. आर्थरसीट पॉईंटला संध्याकाळी पाचनंतर जायला बंदी आहे. जे आधी गेले असतील त्यांनाही संध्याकाळी सातच्याआत तिथून निघावे लागते. ह्याचे कारण म्हणजे, आजही आर्थरसीटच्या भागात असलेलं वन्य प्राण्यांचं अस्तित्त्व! आम्ही सगळे टेंपोत बसलो. टेंपोला स्टार्टर मारला आणि टेंपोच्या हेडलाईटच्या प्रकाशात अवघ्या पन्नास मीटरवर दिसला - एक गवा! त्याच्या जवळून थोडे पुढे जातोय, तर आणखी दोन गवे दिसले. हेच गवे जर आर्थरसीट पॉईंट उतरून थोडं खाली खिडकीपाशी आले असते, तर आम्ही काय केलं असतं, ह्या विचाराने नाही म्हटलं तरी धडकी भरलीच.

विलक्षण दमलेल्या, पण तरी एका जबरदस्त काहीतरी केल्याच्या भावनेने ताजेतवाने झालेल्या चौदा भटक्यांना घेऊन टेंपो त्या आर्थरसीट पासून दूर दूर चालला होता. आज जेवढं चढून आलो होतो तेवढंच उद्या उतरून जायचं होतं. सगळ्यात आधी आज रात्रीचा मुक्काम-जेवण ह्या गोष्टी बघायचा होता. आमच्या प्लॅननुसार आम्ही उशीरात उशीरा रात्री ८ पर्यंत मेटतळ्यात पोहोचणं अपेक्षित होतं. खरं सांगायचं, तर उशीर झाल्याचं दु:ख आता अजिबात वाटत नव्हतं. माझ्या मनात सकाळपासून केलेली पायपीट फ्लॅशबॅकसारखी पुन्हा चालली होती. चंद्रगड, ढवळे घाटात अवचित मिळालेलं पाणी, त्या पाण्यापासूनच हळूहळू येत गेलेला थकवा, म्हातारबाबांचा ह्या वयातही टिकून असलेला स्टॅमिना, घुमटी ते सपाटी ह्या वाटेवर शब्दशः लागलेली वाट, सपाटी ते आर्थरसीट हा अंधारात चालल्यामुळे काहीसा हिरमोड केलेला टप्पा, आणि ह्या वाटेवर दिवसाउजेडी पुन्हा येण्याची उत्तरोत्तर बळावत गेलेली इच्छा - ढवळे ते आर्थरसीट व्हाया चंद्रगड ट्रेकचा सारांश एवढ्याच शब्दांत येत असला, तरी त्या तेरा तासात जे अनुभवायला मिळालं, ते शब्दांत येणं शक्य नाही! त्यासाठी सॅक पाठीवर टाकून हा ट्रेक करायला हवा. फक्त लक्षात ठेवा -  'ढवळ्यातून आर्थरसीट पॉईंट करायचा असेल आणि तेही चंद्रगड करुन, तर मग आदल्या दिवशी दुपारी ढवळ्यात यायचं....' पुढचं आठवत असेलच.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी

महत्त्वाचे: अगदी शेवटची वीस-एकफूट (तीही सोपी) कातळचढाई सोडली, तर ढवळे ते आर्थरसीट ट्रेकमध्ये कुठेही कातळचढाई नाही. तरीही, हा ट्रेक शारीरिक क्षमतेचा कस पाहतो. ह्या ट्रेकला घुमटीपर्यंत तरी गाईड घ्यावाच. प्रश्न वाट शोधण्यातील कौशल्याचा नसून वाट शोधायला जो वेळ जाईल व त्यामुळे आर्थरसीटला पोचायला उशीर होत जाईल त्याचा आहे. जवळजवळ ९०% वाट वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या घनदाट जंगलातून आहे. त्यामुळे अंतर फार पडू न देणे हितकर. ढवळे गाव सोडल्यावर थेट बहिरीच्या घुमटीपर्यंत (जोरचे पाणी) पाणी नाही. त्यामुळे पुरेसा पाणीसाठा हवाच. नेटवरून, जाऊन आलेल्यांकडून कितीही माहिती काढली असली, तरी आपली स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमताच आपल्याला सुखरूप मुक्कामी नेत असते, हे ध्यानी ठेवावे. सह्याद्रीतल्या आनंदयात्रांसाठी भरपूर शुभेच्छा!

Monday, January 8, 2018

ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग १


फेब्रुवारी २०१७.
'मायबोली'करांच्या लिंगाणा मोहिमेतली थकलेली संध्याकाळ.  लिंगाण्यावर गुहेपर्यंतच जाऊन आम्ही १८ जण दमून मोहरीत परत आलो होतो. शिवाजी पोटेंकडे रात्रीच्या जेवणाची सोय होती. जेवणाची तयारी होत असतानाच शिवाजीदादांच्या घराच्या कट्ट्यावर सह्याद्रीतल्या घाटवाटांचा एक अस्सल आणि अट्टल भटक्या मनोज आणि सह्याद्रीचा गूगल अर्थात ओंकार ओक ह्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. विषय होता - "महाबळेश्वर भागातल्या घाटवाटा". तसा विषय नक्की कुठला होता ते आठवत नाही. कारण दोघेही डोंगररांगांचा जबरा अनुभव असलेले गडी. त्यामुळे विषय अगदी जव्हार भागातले किल्ले इथूनही सुरू झालेला असेल. पण त्यांच्या त्या गप्पांमध्ये मी ढवळे, जोर, बहिरीची घुमटी, आर्थरसीटचा उल्लेख ऐकला. जणू महाबळेश्वराच्या कड्यावर उभे राहून समोरचा भूगोल दाखवावा असे हातवारे करत त्या कट्ट्यावर ते स्थलवर्णन करत होते. (मध्येच मधुमकरंदगड ते कोळेश्वर हे दोन हात पसरून दोन टोकांना आहेत असं काहीतरी सांगताना ओंकारचा हात माझ्या चेहर्‍याच्या दिशेने आला आणि तो मी चुकवला). तेव्हा त्या गप्पांमध्ये ऐकलेलं ढवळे, चंद्रगड, आर्थरसीट हे सह्याद्रीचं जावळीवैभव प्रत्यक्ष केव्हातरी बघायला मिळू दे अशी मनातल्या मनात प्रार्थना केली होती.
*********************

एप्रिल २०१७. 
सुनिलच्या कृपेने पुणे ट्रेकिंग गृपसोबत मधुमकरंदगड ट्रेकला जायची पहिली आणि शेवटची संधी मिळाली. (शेवटची एवढ्यासाठी, कारण त्यानंतर आजतागायत त्यांनी मला त्यांच्यासोबत नेलं नाहीये. त्या ट्रेकला मी खरंतर खूप चांगला वागलो होतो पण... असो.) त्या ट्रेकमध्ये रात्री जेवण झाल्यावर गप्पांमध्ये पुन्हा एकदा महाबळेश्वर परिसरातल्या घाटवाटांची नावं ऐकली. अफझलखानाला महाराजांनी महाबळेश्वरापासून पार गावापर्यंत ज्या वाटांनी आणलं त्यातल्या वाटा, प्रतापगडाभोवतीच्या ज्या प्रदेशात लढाई झाली तो प्रदेश, त्यावेळची महाराजांची युद्धनीती हा सगळा भूगोल मधुमकरंदगडावरून दिसतो. तेव्हा रडतोंडी घाट, प्रतापगडापलिकडचं दाभिळ खोरं, त्यापलिकडची चंद्रराव मोर्‍यांची राजधानी असलेला चंद्रगड हे पहिल्यांदा सविस्तरपणे ऐकलं. आणि पुन्हा महाबळेश्वराच्या आसपासच्या घाटवाटा करायची इच्छा उफाळून आली.
**************************

शुक्रवार, १ डिसेंबर २०१७. 
रात्री दहाच्या पुणे - महाड गाडीत बसलो, तेव्हा कुठे आपण ढवळे ते आर्थरसीट हे स्वप्न खरोखरच पूर्ण करायला निघालो आहोत, ह्यावर विश्वास बसला. (कुठल्याही ट्रेकला गाडीत चढेपर्यंत मायबोलीकर मित्रांना आणि गाडी पुण्याच्या वेशीबाहेर पडेपर्यंत मला आपण खरोखरच ट्रेकला निघालोय ह्यावर विश्वास बसत नाही. उगाच नंतर हळहळ कशाला?) ऑक्टोबरच्या मध्यात केव्हातरी नरेश परब उर्फ गिरी'काकां'नी गृपवर जाहीर केलं की ढवळे-आर्थरसीट ट्रेक मी प्लॅन करतोय, नावनोंदणी करा. माझा तर विश्वासच बसला नाही. स्वप्नं एवढ्या लवकर पूर्ण केव्हापासून व्हायला लागली?

मी येतोय म्हणून कळवून टाकलं आणि ढवळे-आर्थर-रडतोंडी भागाची माहिती शोधायला सुरूवात केली. घाटवाटांच्या अनेक बादशहांपैकी एक - साईप्रकाश बेलसर्‍यांच्या ब्लॉगची पारायणं केली, सह्याद्रीतील एक मनस्वी आणि विनम्र भटके तुषारदांना माहिती विचारली. मनोजला तर अगदी बारीकसारीक गोष्टी विचारायला फोन केले. त्यानेही फोनवरच ढवळे घाटाचा नकाशा वर्णन करून सांगितला. प्रीतीलाही विचारलं, गूगललाही विचारलं. शेवटी माहिती इतकी मिळाली की 'आता प्रत्यक्ष ट्रेकला जायची गरजच नाही' असा विचार मनात यायला लागला. मग मात्र माहिती काढणं थांबवलं. काहीतरी first-hand बघण्यासाठीही शिल्लक ठेवूया असं वाटायला लागलं. अर्थात ही पूर्वासुरींकडून मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव ह्यात आर्थरसीट आणि ढवळे गाव ह्यांच्या अंतराएवढाच फरक होता, हे आवर्जून सांगावंसं वाटतं.

शेवटी तारीखवारांसकट प्लॅन जाहीर झाला. प्लॅन तर जबरा होता. - "ढवळे गावातून २ डिसेंबरच्या शनिवारी सकाळी लवकर निघायचं, पहिल्यांदा चंद्रगड करायचा. तिथून मधल्या खिंडीच्या उतारवाटेने ढवळे घाटाच्या वाटेला लागायचं. संध्याकाळपर्यंत महाबळेश्वरचा आर्थरसीट पॉईंट गाठायचा. रात्री मेटतळ्यात मुक्काम करून दुसर्‍या दिवशी ३ तारखेला रडतोंडी घाटाने उतरून पारगाव, वरदायिनी मंदिर आणि मग दाभिळ टोकावरून दाभिळ गावात उतरायचं." मला प्लॅन वाचतानाच धाप लागली होती.

ढवळे ते आर्थरसीट हा ट्रेक सह्याद्रीतला निर्विवादपणे एक प्रदीर्घ असा ट्रेक आहे. मी जितकी माहिती गोळा केली होती, त्यात एक समान धागा होता - ह्या ट्रेकला कमीत कमी ६ तास लागतात. आणि ह्या संपूर्ण ट्रेकमध्ये जवळजवळ चार हजार फूट उंचीची चढण  होते. (ढवळे - कोकणातले गाव, आर्थरसीट - सह्याद्रीच्या सरासरी उंचीच्याही वर) त्यात आम्ही चंद्रगडसुद्धा करणार होतो. म्हणजे आणखी ३-४ तास वाढणार होते. आदल्या रात्री झोप अपुरी होणार होती. लाल डब्ब्याने ट्रेक करायची हुक्की आल्यामुळे सगळं सामान पाठीवर घेऊन हा ट्रेक करायचा होता. (मी सुचवून पाहिलं, की खाजगी गाडी करू, आणि फक्त गरजेचंच सामान पाठीवर घेऊन चढू. बाकी झोपण्याचं आणि इतर सामान गाडीतच ठेवून गाडीवाल्याला थेट आर्थरसीटला बोलवू. ह्यावर 'मग ट्रेक कशाला करायचा' असं उत्तर आल्यावर मी गुमान पुण्यातून निघणार्‍या सगळ्यांचं दोन्ही वेळेचं एसटीचं रिझर्वेशन करून टाकलं!)

पुण्याहून सात आणि मुंबईहून सात असे चौदा जण महाडमध्ये भेटणार होते. सगळेच जण एकमेकांना चांगलेच 'ओळखून होते' हे ह्या गृपचं वैशिष्ट्य होतं. काही काही जण तर मॅरेथॉन रनर्स, सायक्लिस्ट, क्लाईंबर्स होते (काही जण ह्या तिन्ही प्रकारात प्रवीण होते - माणसानं अष्टपैलू तरी किती असावं ना?) प्रचंड शारिरीक-मानसिक क्षमता असलेल्या ह्या गृपबरोबर ढवळे-आर्थरसीट करण्याचा विचार करताना एका क्षणी मीच स्वत:ला लिंबूटिंबू वाटायला लागलो होतो.

रात्री दहाची पुणे-महाड गाडी चालकाने आपल्या अतीव कौशल्याच्या जोरावर मध्यरात्री पावणेदोनलाच महाड स्टँडात नेऊन उभी केली (निर्धारित वेळेपेक्षा सव्वातास आधी). मुंबईकरांची गाडी पाच वाजता आली. महाडातून ढवळे गावापर्यंत नेणार्‍या टमटमवाल्याने आयत्यावेळी फोनच उचलला नाही. मग दुसरा टमटमवाला शोधावा लागला. (समोर आलेली चोरवणे बस पकडून वासोटा करण्याची टूमही तेवढ्यात निघाली आणि ती गंमत होती हे मला मागाहून कळलं) अखेर ढवळे गावात पोचलो तेव्हा साडेसहा वाजले होते. (ह्या वेळेला आम्ही चंद्रगडासाठी निघणं अपेक्षित होतं).

नाष्टा झाला, आणि सॅकमध्ये पाणी भरून चौदा गडी आणि एक वाटाड्या सज्ज झाले - एका हौसेने ओढवून घेतलेल्या पराक्रमासाठी - ढवळे ते आर्थरसीट व्हाया चंद्रगड! निर्विवादपणे आयुष्यभर जपून ठेवावं असं काहीतरी आज हाती लागणार होतं.

 (क्रमशः)
- नचिकेत जोशी