Pages

Wednesday, December 3, 2008

घनगड आणि तैलबैला

प्रस्तुत कथेतील किल्ल्यांवर बाईकवरून जाणे ही एक दुरापास्त चूक आहे! आणि त्यातही ’अमुक एखाद्या रस्त्याने जाऊ नका’ हा जाणत्यांचा सल्ला न ऐकता जाणे ही किमान या बाबतीत घोडचूक आहे! पण आम्ही या दोन्ही चुका एकापाठोपाठ केल्या आणि तरीही फारसे काही चुकले नाही हे समाधान अंती पदरात पाडून घेतले!

हे किल्ले गौरवशाली शिवकालीन व तत्सम इतिहासात फारसे परिचित नाहीत. अर्थात सह्याद्रीच्या कलंदर भटक्यांसाठी हे सुपरिचित आहेत, हा भाग निराळा. मुळशी तालुक्यात लोणावळ्य़ाच्या दक्षिणेला किंचित नैऋत्येकडे साधारण २५ किमीवर हे दोन्ही किल्ले उभे आहेत. पुण्याहून तेथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. आम्ही दोन्ही मार्ग ’ट्राय’ केले. तीन बाईक्स वरून मी, मयूर, श्रीकांत, तिखट (ऊर्फ आशिष तिखे) आणि प्रथमच अनिकेत व रोहिणी असे ६ जण बावीस तारखेला सकाळी साडेसहा वाजता ताम्हिणीमार्गे निघालो. पौडमार्गे मुळशी, ताम्हिणीनंतर लोणावळ्याकडे उजवीकडे एक फाटा जातो. इथून लोणावळा ५२ किमी आहे. या रस्त्यावर येकोले गाव (घनगडाचा पायथा) साधारण २५ किमीवर आहे. वास्तविक, या रस्त्याने जाऊ नका असा सल्ला आम्हाला एका अनुभवी मित्राने दिला होता, पण अंतर वाचवण्य़ासाठी दुसऱ्या एका मित्राच्या सल्ल्यावरून लोणावळा मार्गे न जाता आम्ही हाच मार्ग निवडला. क्षणाक्षणाला गचके खाणारी बाईक, ’टायरखालचा रस्ता बरा’ असं वाटायला लावणारे समोरच्या रस्त्याचे दृश्य यामुळे फाट्याला वळल्यापासून काही वेळातच आम्ही ’परत जाताना या रस्त्याने अजिबात यायचे नाही’ हा निर्णय घेऊन टाकला. या वाटेने दिवे, वांद्रे(इथून जवळच कैलासगड आहे, तो आमचा ’प्लॅन बी’ होता), पिंपरी (चिंचवडवाले नव्हे) या गावांवरून खडखडत येकोलेला पोहोचलो तेव्हा साडेअकरा झाले होते. (मधला एक तास मिसळ खाण्यात (ट्रेकमधला अपरिहार्य कार्यक्रम) गेला होता)

घनगड अत्यंत सोपा आहे. गावातूनच एक पायवाट गडाकडे जाते. साधारण अर्ध्या तासात आम्ही गडाच्या अंतिम टप्प्यातल्या गुहेजवळ पोहोचलो. गुहेशेजारी एक प्रचंड शिळा डोंगराला तिरकी टेकून ठेवावी तशी उभी आहे. दोहोंमधल्य़ा घळीत छान गारवा आहे. इथून गडाचे बुरूज अजून वरच्या बाजूला दिसतात. पण तिथे पोहोचण्यासाठी गुहेशेजारून कातळ चढून जावे लागते. ती वाट न सापडल्यामुळे ’आपण वाट चुकलो’ अशी आमची समजूत झाली आणि आम्ही तो कातळ चढण्याचा प्रयत्न केला नाही. गडावरून सभोवतालचे दृश्य मात्र नजर खिळवून ठेवते. घनगडामागे सरळ खोल कोकण आहे. त्या दिवशी वाराही भन्नाट होता. त्यामुळे रोहिणीची टोपी उडाली. मी आणि मयूरने (इतरांच्या अडवणुकीला न जुमानता, स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता, वगैरे वगैरे) ती दोन पावले खाली उतरून काठीच्या मदतीने काढली. साधारणपणे अर्ध्या तासात गड उतरून खाली आलो. आता दूरवर तैलबैलाची जुळी भिंत आम्हाला खुणावत होती.

येकोलेतून ३ किमी वर तैलबैला फाटा आहे. या फाट्यावरून डावीकडे तैलबैला आणि उजवीकडे लोणावळा (२३ किमी) आहे. येकोलेहून आम्ही त्या तसल्याच रस्त्यावरून तैलबैला फाट्यावर आलो आणि हाय रे देवा! - केवळ बुलडोझर किंवा ट्रॅक्टर किंवा तसल्याच राक्षसी टायरसाठी बनवला असावा अस्सा रस्ता समोर पसरला होता! त्या रस्त्यावरून आणखी ३ किमी काटून तैलबैला गावात पोहोचलो तेव्हा जणू निधड्या छातीने गनिमी कावा खेळून सुखरूप परत आलेल्या मावळ्यांचे चेहरे व्हावेत तसे भाव आमच्या चेहऱ्यांवर होते. आता पुढची चढाई या लढाईपुढे काहीच नव्हती. तैलबैलाचीही वाट अत्यंत सोपी आहे. आम्हीच चुकून चुकलो आणि योग्य वाटेऐवजी तैलबैलाला समांतर अशा पायथ्याच्या झाडीमध्ये शिरलो. वरून पाहणाऱ्या एका ग्रुपने मग ओरडून आम्हाला मागे फिरायला लावले.

तैलबैलाची भिंत नजरबंदी करते. एकमेकींना खेटून उभ्या असलेल्या त्या भिंतींमध्ये एक आठ-दहा फूट रूंद खाच आहे. ’त्या’ अज्ञात निर्मीकाची सह्याद्रीतील ही असली कारागिरी केवळ अवर्णनीय आहे. ती भिंत चढण्यासाठी त्या दिवशी तिथे प्रस्तरारोहणाची सर्व आयुधे घेऊन एक ग्रुप आला होता. आम्ही मात्र जणु ती सबंध भिंतच हलवतोय असं वाटावे असे काही फोटो थोडिशी करामत करून काढले आणि अधिक वेळ न घालवता खाचेकडे निघालो. या खाचेत बसणे हे एक सुख आहे. त्या दिवशी हसत्या-खेळत्या प्रस्तरारोहणामुळे तिथे शांतता नव्हती. कुठल्याही ट्रेकमध्ये किमान अर्धा तास फक्त शांतता ऐकायला मिळावी ही माझी मनापासून इच्छा असते. मी एखाद्या झाडाखाली किंवा कातळावर (सावलीत) आडवा झालोय, आजुबाजूला खोल दऱ्या, हलका वारा वाहतोय, पक्षी असतील तर त्यांचा चिवचिवाट- नसतील तरी हरकत नाही, बरोबर कुणी असेल तर उत्तम, नसेल तर अत्युत्तम आणि बाकी सर्वत्र शांतता... मनात कसलेही चिंतन नाही, कसलाही विचार नाही, फक्त शां...त...ता... वा वा!! (तिथे त्यादिवशी नसलेल्या शांततेमध्ये मग मी आणि श्रीकांतने ह्या इच्छेवर पाच मिनीटे नुसतेच बोलून घेतले!) तर ते असो.

त्या खाचेत फरशा घातलेल्या आहेत आणि कपारीत भैरोबा आहे. तिथेच आम्ही पंगत मांडली कारण एव्हाना साडेतीन झाले होते आणि सकाळच्या नाष्ट्यानंतर आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. कपारीतल्या टाक्यातील पाणी गोड आणि थंडगार आहे.

पश्चिमेकडे सुधागड, दूरवर सरसगड, आग्नेयेला मागच्या डोंगराशी एकरूप झालेला घनगड दिसतो. तैलबैलाच्या लगेच पायथ्याला सर्व बाजूंना लांब पठार आहे आणि ते संपलं की लगेच खोल खोल कोकण! सुधागड आणि तैलबैलाचे पठार यामधली (हजार फूट खोल) दरी तर इतकी चिंचोळी आहे की उडी मारून पलीकडे सुधागडावर पोहोचावे असे (लांबून) वाटते. एकंदरीत ’व्ह्यू’ देखणा आहे. मनसोक्त फोटो काढून लगेच परत निघालो, कारण अंधार पडायच्य़ा आत ’तो’ भयानक रस्ता पार करायचा होता. वाटेत एका विहीरीवर ओंजळी-ओंजळीने पाणी प्यायलो आणि तिथल्या आजीबाईंचे ’घरचे वाट पाहत असतील, नीट जा रे बाळांनो’ असे प्रेमळ आशीर्वाद घेऊन गावात परतलो. ’पोरांनो, इथे गेली कित्येक वर्षे याच रस्त्यावर असेच येतोय-जातोय’ हे वाक्य ऐकल्यावर मात्र आम्ही ’त्या’ रस्त्याचा विचारच सोडून दिला.

लोणावळ्याच्या वाटेवर एका धबधब्याजवळ सूर्यास्त पाहायला थांबलो आणि माझी शांतता ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली. समोर खोल दरी, दूरवर दरीत नागमोडी वळणे घेत जाणारी नदी, वातावरणात भरून राहिलेला रानफुलांचा गंध, आणि दिवसभर तेज मुक्तहस्ते वाटून अस्ताला जाणारा तो ’तेजोनिधी लोहगोल’ आणि हे सगळे असेच ’आत’ उतरावे म्हणूनच जणू हाती आलेला चहाचा ’प्याला’! एक परफेक्ट कॅनव्हास जमून आला होता तिथे! वेगवेगळे सूर्यास्त वेगवेगळी आठवण ठेवून जातात. रायगडाच्या टकमक टोकावरून पाहिलेला, राजगडावरून पाहिलेला - तोरण्याच्य़ा पाठीमागे अस्ताला जाणारा, पांडवगडाहून येताना कृष्णेच्या काठी बसून पाहिलेला, वासोट्याहून परत येताना बामणोलीला शिवाजीसागर जलाशयाच्या काठावरून पाहिलेला असे अनेक सूर्यास्त यादगार बनून राहिले आहेत! अशा वातावरणाची किमयाच अशी असते, की कितीही बेफिकीर, अलिप्त राहायचं म्हटलं तरी मनाच्या बंद कप्प्यातून काही आठवणी निसटून आजुबाजूला फेर धरतातच! अशा वेळी फक्त अस्ताचा सूर्य पाहत रहावा - मी तेच केले!

सूर्य ढगाआड अस्ताला गेला आणि तिन्हीसांज धुक्याची फिकट शाल पांघरून आसपास वावरायला लागली. कुठलाही रसिक, शौकीन माणूस रेंगाळेल असेच वातावरण तयार झाले होते. आम्हीही थोडेसे रेंगाळून, फोटो काढून परत निघालो. आंबवणे, शहापूर (कोरईगड फाटा), घुसळखांब (किल्ले तुंग फाटा) मार्गे लोणावळ्य़ात पोहोचलो. वेळेचे गणित बरोब्बर बसले तर एकाच दिवसात घनगड-तैलबैला-कोरईगड असाही ट्रेक करता येतो. येताना हायवेवरून गाडी चालवताना जणू स्वर्गसुखाचा अनुभव घेत (कारण एकच- रस्ता!!) ७०-८० किमी दीडतासात पार करून साडेआठाला पुण्यात पोहोचलो. एकूण प्रवास - १९४ किमी, एकूण पायपीट - अगदीच कमी, फारतर ५ किमी!

दुसऱ्या दिवशी रोहिणीने ’या ट्रेकला १ ते १० च्या स्केल वर किती रेट करशील (१० म्हणजे सर्वोत्तम)’ असा प्रश्न विचारला. कदाचित त्या महाभयानक रस्त्याची आठवण शरीराचे ’काही’ अवयव तेव्हाही वागवत असल्यामुळे मी ’५ किंवा ६’ असले आखडू उत्तर दिलेही, पण घनगडावरून सह्याद्रीचे सरळ खोल घाशीव कडे पाहताना, किंवा तैलबैलाच्या कड्याखाली उभा असताना हा जर प्रश्न मला कुणी विचारला असता तर त्या वेळी १ ते १० ही स्केल फारच तोकडी वाटली असती. अर्थात आपण रेटींग करायचे असते ते आपल्या अनुभवालाच. किल्ल्यांचे रेटिंग तर साडेतीनशे वर्षांपूर्वीच झाले आहे; नाही का?

नचिकेत जोशी (२९/११/२००८)

रोहिडा उर्फ विचित्रगड

ट्रेक हे एक न सुटणारे व्यसन आहे. ते एकदा लागले की मग काळ-वेळ, तिथी-नक्षत्र, सणवार यापैकी कशाचेही भान राहत नाही. खूप दिवसांपासून मनात असलेली दिवाळीत ट्रेकला जायची इच्छा यावर्षी पूर्ण झाली, आणि तीही (नेहमीप्रमाणे) अगदी अवचित!!

’दिवाळी पहाट’ नामक एका गाण्याच्या कार्यक्रमाचे निमित्त आणि नोकरीला (शुद्ध भाषेत रोजंदारीला) मिळालेली सुटी या पार्श्वभूमीवर किल्ले रोहिडाच्या भेटीचा योग जुळून आला. तिकीटे काढल्यामुळे लवकर तसेही उठणारच आहोत, मग एखादा किल्लाच ’करून’ येऊ असा किडा डोक्यात आला आणि गाण्याच्या मैफलीऐवजी मी, सुजय आणि ’हमारा बजाज’ (डिस्कव्हर १३५) सकाळी सकाळी ७.३० वाजता रा.म.४ वरून भोरच्या दिशेने मार्गस्थ झालो. सकाळचे मस्त धुके बघून काही कविकल्पना सुचायच्या आत महामार्गावर पोहोचलो (आणि धुक्यानेही हळूच काढता पाय घेतला!!)

रमतगमत भोर गाठले तेव्हा घड्याळ्यात अवघे साडेआठ झाले होते. तीन किल्ले आणि दोन राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा यानिमित्ताने भोरला ही एकूण पाचवी भेट होती. भोर आणि आसपासचा परिसर मला कायम भुरळ घालतो.(असते एकेकाची आवड!) तालुक्याचे गाव, तरीही बऱ्यापैकी गावपण टिकवून असलेले भोर आणि आजूबाजूच्या डोंगररांगा क्षणात इतिहासात घेऊन जातात. मावळच्या दऱ्याखोऱ्यांनी शिवबाला सुलतानशाही झुगारून टाकण्याची प्रेरणा दिली, या ऐतिहासिक सत्यावर भोर परिसरातील या रांगा पाहिल्यावर माझा लगेच विश्वास बसला होता. बाकी शिवकालीन इतिहासावर विश्वासापेक्षा आपल्याकडे अविश्वासच अधिक दाखवला गेलाय. असो. भोर या शब्दाचा हिंदी की उर्दू भाषेतला अर्थ पहाट असा आहे. मी पहाटेच्या वेळीही भोर पाहिले आहे. आणि तेव्हापासून मला भोर शब्दही आवडू लागला आहे.

तुम्ही जर याआधीची आमच्या ट्रेकची वर्णने वाचली असतील, तर आम्ही किल्ल्यांच्या वाटेबद्दल, ती मुळीच ठाऊक नसली तरी अत्यंत निश्चिंत असतो, हे तुम्हाला एव्हाना माहित झाले असेल. यावेळी किल्ल्याची वाट सोडाच, पायथ्याच्या गावाचे, बाजारवाडीचे, नाव फक्त लक्षात होते. (कारण सगळा बेत अगदी ऐनवेळी ठरला होता.) अर्थात ’दुर्ग संवर्धन समिती’च्या विकासकामामुळे रोहिडा नुकताच प्रकाशात आला आहे. भोर स्टॅण्डवर आणि चौपाटीजवळ एकदा रस्ता विचारून घेतला आणि बाजारवाडीकडे निघालो. रस्ता अगदी सोपा, सरळ (आणि मुख्य म्हणजे खड्डेविरहीत, डांबरी) आहे. मांढरदेवीच्या रस्त्यावर सुमारे ५ किमी वर खानापूर नावाचे गाव आहे. त्या गावात उजव्या हाताच्या कमानीखालून रोहिड्याकडे निघालो. धावडी-बाजारवाडी गावाच्या आणखी एक कमानीने आमचे ’सहर्ष स्वागत’ केले आणि लगेच मानकरवाडीकडे जाणाऱ्या दिशेने रोहिड्याची वाट आहे असा फलक दिसला. काहीही माहिती नसतानाही मराठी वाचू शकणाऱ्याला रोहिड्याचा पायथा गाठणे अजिबात अवघड नाही. जागोजागी मार्गदर्शक फलक आहेत.

गावात एका घरी नेहमीप्रमाणे हेल्मेट आणि जॅकेट ठेवले आणि समोर दिसणारी डोंगराची सोंड धरून निघालो. किल्ला मध्यम उंचीचा आहे, चढायला सोपा आहे, चुकायची शक्यता नाहीच. तासाभरात वर पोहोचलो. सिंहगडासारखेच येथेही एकामागोमाग एक असे तीन दरवाजे आहेत. दुसऱ्या दरवाजानंतर एका भुयारात पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. रोहिड्यावर साप भरपूर आहेत, हे कुठेतरी वाचल्यामुळे त्या थंड भुयाराच्या तोंडावर बसून पाणी काढतानाही मला त्या अहिकुळाच्या जलनिवासी शाखेतील एखाद्या सदस्याच्या तिथे दर्शन देण्य़ाचीच अधिक भीती वाटत होती. पण संपूर्ण ट्रेकमध्ये एकदाही सापाची कातही दिसली नाही. साप दिवाळीनिमित्त दुसऱ्या प्रांतात गेले असावेत!

किल्ला साधारण अर्ध्या तासात पाहून होतो. किल्ल्यावर नुकताच जीर्णोद्धार झालेले महादेवाचे मंदिर (जे बाहेरून बंद असल्यामुळे आम्हाला आतून पाहता आले नाही), तीन बुरूज, पडकी सदर, एक चोर दरवाजा आणि पुष्कळ पाण्याची टाकी आहेत. सभोवतालचा आसमंत नितांतसुंदर आहे. एका बाजूला मांढरदेवी रांग, त्यापलिकडे उजवीकडे पांडवगड, कमळ, केंजळ हे परिचित गड, रायरेश्वर पठार, नीरा नदी, वातावरण अगदी स्वच्छ असेल तर त्यापलीकडे दूरवर राजगड, सिंहगड आणि शेवटी तशाच उजव्या हाताने भोर गाव आणि त्याच्या उजवीकडे पुरंदर (याठिकाणी पाहणाऱ्याची स्वत:भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होते)- एवढा विस्तीर्ण परिसर दिसतो.

सगळा गड आरामात पाहून आणि भरपूर फोटो काढून, गड उतरून खाली आलो तेव्हा घड्याळात फक्त एक वाजत होता. मग ’परतीच्या वाटेवरती’ पुन्हा रमतगमत हायवेवर कुलकर्ण्यांच्या उपहारगृहात (यावेळी) झटपट पाहुणचाराचा आस्वाद घेत तीन वाजता पुण्यात पोहोचलो.

माझ्या दुर्गभ्रमंतीमधला किल्ला क्र. ३० - रोहिडा. कसलीही अविस्मरणीय़ आठवण नाही, कुठलाच थरार नाही, पण तरीही डोंगरदऱ्या पालथ्या घालायची हौस पूर्ण झाल्यामुळे व अगदी आयत्यावेळी ठरूनही मुळात सोपा असल्यामुळे सहज पार पडलेला ट्रेक म्हणून रोहिडा उर्फ विचित्रगड कायम स्मरणात राहील!

नचिकेत जोशी (२९/१०/२००८)

पेब किल्ला

यावेळी ठरवलेला किल्ला होता - "किल्ले पेब उर्फ विकटगड". पुणे - मुंबई लोहमार्गावर नेरळ स्टेशन आहे. त्याच्या पाठीमागे असणाऱ्या माथेरान या सुप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणाला लागून पेब किल्ला आहे. यावेळी ६ जण नक्की झाल्यामुळे सिंहगड एक्सप्रेसने जाण्य़ाचा बेत रद्द करून आयत्यावेळी गौरवच्या कारमधून सकाळी साडेसहा वाजता निघालो. खोपोलीपर्यंत द्रुतगती मार्गाने जाऊन खोपोलीला कर्जतकडे जाणाऱ्या मार्गाला लागलो. खोपोली-कर्जत १५ किमी, व कर्जतला नाष्टा करून पुढे कर्जत-नेरळ १३ किमी असा प्रवास करून नेरळला पोहोचलो, तेव्हा दहा वाजले होते. पेबच्या किल्ल्यावर जायला दोन मार्ग आहेत. पहिला, नेरळमध्ये कार-पार्किंग ची सोय आहे. तिथे गाडी लावायची व पेबच्या किल्ल्याच्या दिशेने चालत जायचे. ह्या वाटेने साधारण अडीच-तीन तास लागतात. दुसरा मार्ग म्हणजे, सरळ माथेरानचा नगरपालिकेचा वाहनतळ गाठायचा, तिथे गाडी पार्क करायची आणि डोंगराच्या धारेवरूनच पेब किल्ल्याकडे जायचे. ’पेब किल्ला लवकर पाहून झाला तर थोडा वेळ माथेरानमध्ये भटकता येईल’ असा विचार करून आम्ही माथेरानच्या वाहनतळाच्या दिशेने गाडी हाकली.

घाट अत्यंत खड्य़ा चढाचा आहे. त्यातच छोट्या घाटरस्त्यावर नेरळ-माथेरान मार्गावरचे सर्व अधिकृत टॅक्सीचालक सराईतपणे गाडी हाणत असतात. तो घाटरस्ताही enjoy करत आम्ही वाहनतळावर पोहोचलो. Weekend साजरा करायला नवी मुंबई आणि आसपासच्या अलिशान भागातलं सुखवस्तू तारूण्य सहकुटुंब आलं होतं. आमचं ' weekend destination' वेगळं आणि जरा ’हटके’ होतं, एवढंच. बाकी सर्वत्र उत्साह दाटला होता.

वाहनतळामधूनच एक पायवाट पॅनोरमा पॉईंटच्य़ा दिशेने जाते. माथेरानकडे जाणाऱ्या त्या निसर्गनिर्मीत चालत्याबोलत्या प्रेक्षणीय़ स्थळांकडे पाठ फिरवून आम्ही या वाटेने चालू लागलो. या वाटेला समांतर असा खालच्या बाजूने नेरळ-माथेरान लोहमार्ग गेला आहे. पेबला जाण्यासाठी हा लोहमार्ग गाठावा लागतो. पण लोहमार्गावर उतरण्य़ासाठी पायवाट सहजपणे सापडलीच नाही आणि आम्ही थेट पॅनोरमा पॉईंटजवळ जाऊन पोहोचलो. मग वाट चुकल्याचा साक्षात्कार होणे, सराईतपणे धबधब्याची वाट पकडणे इत्यादी नेहमीचे अविभाज्य आणि अटळ सोपस्कार यथासांग पार पाडून कसेतरी लोहमार्गावर NM 169 जवळ उतरलो.

मग त्या रूळांवरून उलट दिशेने नेरळकडे चालू लागलो. साधारण दीड-दोन किमी वर NM 158 हा milestone लागतो. तिथे एका कमानीजवळच्या पाटीवर ’किल्ले पेब उर्फ विकटगड रेल्वे कर्मचारी आपले सहर्ष स्वागत’ करतात.

या ठिकाणी रूळ सोडून पेबच्या किल्ल्याच्य़ा दिशेने पायवाट जाते. वाटेत दोन लोखंडी शिड्या, एक गुहेसदृश घळ, आणि बरेच झरे यांना ओलांडून आपण माथेरानचा डोंगर आणि पेब किल्ला यांच्या मधल्या खिंडीत येऊन पोहोचतो. या खिंडीच्या बरोब्बर खूप वर पॅनोरमा पॉईंट आहे. तिथून या खिंडीत उतरायला एकच मार्ग आहे - पाण्यासारखी थेट उडी घेणे. (तात्पर्य, कोणताच मार्ग नाही.)

त्या खिंडीपासून वाट अगदीच सोपी आहे. गडावर पोहोचण्य़ासाठी आणखी दोन - एकावर एक आणि एकमेकांशी कोनात वळवलेल्या - शिड्या आहेत. गडावर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराकडे पाठ करून उभे राहिलो की समोर लगेच खोल १००० फूट दरी, दरीपलीकडे उजव्या हाताला माथेरानचा पॅनोरमा पॉईंट, आणि डाव्या हाताला दूरवर नेरळ गाव दिसते. इथून दिसणारे सह्याद्रीचे सरळसोट कडे आपले नजर खिळवून ठेवतात. मंदिराजवळच पिण्याच्या पाण्याचे टाके आणि पाणी काढायला बादली ठेवलेली आहे.

नेरळ गावाकडून येणारी वाट पेबच्या किल्ल्याला ओलांडून मागच्या बाजूने वर येते. त्या वाटेवर दोन गुहा आहेत. या गुहांत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा मठ आहे. विविध उत्सवांच्या निमित्ताने इथे बऱ्याच भक्तांची गर्दी होते, हे तिथल्या फोटोंवरून कळते. याच गुहांजवळ एक माणूस जाऊ शकेल एवढ्या आकाराचे आणखी एक भगदाड आहे. तिथून आत गेल्यावर एक छोटीशी अंधारी खोलीसदृश जागा आहे. आम्ही सरपटत आत गेलो, आणि अमोनियाच्या उग्र दर्प नाकातोंडात भरून परत आलो. आत फक्त एक वटवाघूळ दिसले. अंधाऱ्या जागेचे प्रयोजन मात्र कळू शकले नाही. या वाटेवर केळीची पाने भरपूर आहेत, आम्ही जेवणासाठी (लगेच) तोडून घेतली.

त्याच वाटेवर पुढे काटकोनात एक लोखंडी शिडी बसवली आहे. नेरळकडून येताना या शिडीवरून चढून येणे हा एकमेव मार्ग आहे. आम्ही माथेरानकडून गेलो असल्यामुळे आम्ही ही शिडी उतरून त्या मठात गेलो.

गडाच्या सर्वोच्च ठिकाणी दोन पादुका व त्याभोवती छोटेखानी फरसबंदी आहे. संपूर्ण गड तासाभरात फिरून होतो. या तासाभराच्या संपूर्ण भटकंतीमध्ये ’भन्नाट रानवारा’ आमच्या बरोबर होता. पावसाची आशा शेवटपर्यंत आशाच राहिली. जेव्हा आम्ही पेबवर होतो, तेव्हा माथेरानच्या डोंगरावर ढग सांडत होते, आणि आम्ही माथेरानवर पोहोचलो, तेव्हा पेब पावसात भिजत होता!

परत येताना Casette rewind करावी तसं तोच रस्ता, त्याच शिड्या, तोच NM 169 milestone अशी सारी माघारी पायपीट करून माथेरानच्या वाहनतळावर परत आलो. इथे माथेरानमध्ये जाण्य़ासाठी तिकीट फाडावे लागते. आणि मुख्य म्हणजे, आत ३०-३५ मिनिटांची पायपीट केल्यावर मुख्य माथेरानची पर्यटनक्षेत्रे लागतात. वेळेअभावी आम्ही माथेरानमधल्या ’सर्व’ प्रेक्षणीय स्थळांकडे पाठ फिरवली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

गार वाऱ्याची झुळूक यावी आणि क्षणभरात ताजंतवानं वाटावं तसं सह्याद्रीतली ही पेबची पटकन संपून गेलेली भटकंती दीर्घकाळ मनाला ताजं ठेवेल यात शंकाच नाही!

नचिकेत जोशी (२९/६/२००८)

केंजळगड

एखादी गोष्ट नेहमी डोळ्यासमोर असावी, पण आपल्या वाट्याला न यावी, तसं काहीसं केंजळगडाच्या बाबतीत होत होतं. एका वर्षापूर्वी जेव्हा रायरेश्वराला पहिल्यांदा गेलो, तेव्हा कोर्ले गावाच्या डाव्या अंगाला दरीला लागून उभ्या असणाऱ्या केंजळगडाशी पहिल्यांदा नजरभेट झाली होती. रायरेश्वरावर दगडू जंगमाकडून केंजळगडाच्या वाटेबद्दल जुजबी माहिती मिळाली होती. त्या दिवशी जवळजवळ दिवसभर केंजळगड डोळ्यासमोर होता, पण जायला जमलं नव्हतं. त्यानंतर मागच्या वर्षभरात पांडवगड, कमळगडला जाताना जुना परंतु न भेटलेला दोस्त असावा तसा केंजळगड लांबूनच दिसत होता, पण जाणं काही होत नव्हतं. अखेर, यंदा सर्व ’कामगारांच्या’ हक्काच्या दिवशी- १ मे ची सुटी धरून केंजळगडाकडे प्रस्थान ठेवले.

३० एप्रिलला, वेळ आणि वाहने यांची आयत्या वेळेपर्यंत ठरवाठरवी करून शेवटी आम्ही ९ जण पाच गाड्यांवर रात्री दहा वाजता निघालो. भारतीय प्रमाणवेळेनुसार निघायला (फक्त) २ तास उशीर झाला होता. भोर पर्यंत सुनसान रस्त्यावरून गाडी चालवण्य़ाचा मनमुराद आनंद घेत भोरमध्ये पोचलो, तेव्हा रात्रीचे साडेअकरा झाले होते. तेवढ्यात सर्वांना चहा नामक ’उत्तेजक पेय’ पिण्याची तल्लफ आली! आणि ती एवढी जोरदार होती की, अगदी आईस्क्रीमच्या दुकानातही चहाची चौकशी करून आलो!! तेव्हा त्या आईस्क्रीमवाल्याचा झालेला चेहरा पाहण्यासारखा होता! शेवटी समस्त उपहारगृहे निद्राधीन असल्याने आम्ही मोर्चा नाईलाजाने वरंधा मार्गावरच्या आंबवडे गावाकडे वळवला. इथून कोर्ले गावाचा फाटा आहे.

एका चौकोनाची जर रायरेश्वर ही एक बाजू असेल, तर, केंजळगड ही लगतची दुसरी बाजू आहे. (क्षेत्रफळ माहित नाही :-) ) दोन्ही डोंगर एकाच धारेने जोडले गेले आहेत. फक्त रायरेश्वर पुणे जिल्ह्यात (भोर तालुका) आहे, आणि केंजळगड सातारा जिल्ह्यात (वाई तालुका) आहे!

यावेळी फक्त केंजळगड हे एकच ठिकाण ठरवलेलं असल्यामुळे कोर्ले गावात गाड्या लावून रायरेश्वराच्याच वाटेने चढून केंजळगडाच्या माचीवरच्या वस्तीजवळ पथाऱ्या टाकायच्या असा बेत होता. बालेकिल्ला चढण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी रामप्रहरी ठेवला होता. हा बेत रायरेश्वराच्या वाटेने चढण्यापर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरळीत पार पडला. आंबवडे ते कोर्ले हा अतिशय खराब रस्ता पार करून कोर्लेमध्ये पोचलो. सुदैवाने गावात दोन तरूण भेटले. त्यांच्य़ा घराजवळ गाड्या लावल्या आणि हेल्मेटही त्यांच्याच घरात ठेवले. रात्री १ वाजता चढायला सुरूवात केली तेव्हा रायरेश्वर आणि केंजळगड अंधारात नाहीसे झाले होते आणि ही मोहीम पाहायला आकाशात फक्त चांदण्य़ा जमल्या होत्या. कृष्णपक्षातली दशमी असल्यामुळे चंद्रराव आमची मोहीम फत्ते होण्याच्या सुमारास हजर राहणार होते!

रायरेश्वराची वाट अत्यंत सोपी आहे. (अवघड भाग आंबवडे ते कोर्ले ह्या खराब रस्त्याने गाडी चालवणे हाच आहे!) निम्म्यापेक्षा जास्त चढून गेलं की, एके ठिकाणी ह्या वाटा वेगळ्य़ा होतात. एक डावीकडे केंजळगडाच्य़ा माचीकडे जाते, आणि एक "यू टर्न" मारून रायरेश्वराकडे जाते. आमची ही वाट चुकली आणि आम्ही थेट रायरेश्वराच्या शिडीजवळच्या सपाटीवर पोचलो. तिथेच मुक्काम करण्यापेक्षा सरळ रायरेश्वराच्या मंदिरात मुक्कामाला जावे, त्यामुळे एकाऐवजी उद्या दोन्ही किल्ले होतील असे ठरवले आणि त्यानुसार शिडी चढू लागलो. मागे सहज वळून पाहिले, तर किल्ले रोहिड्याच्या (विचित्रगड) मागून उगवलेली तांबूस चंद्रकोर दृष्टीस पडली. भोरहून आंबवडेला येताना वाटेत डाव्या हाताला रोहिडा किल्ला दर्शन देतो. आसमंतातली शांतता अनुभवत आणि वाट शोधत रायरेश्वराच्या ऐतिहासिक मंदिरात पोचलो, तेव्हा पहाटेचे साडेतीन झाले होते. विशेष गोष्ट ही होती, की संपूर्ण चढणीत एकदाही रस्ता चुकलो नाही! (केंजळगडाची वाट चुकली हा अपवाद सोडून!)

’सकाळी पाच वाजता उठलो, तर ऊन चढायच्या आत केंजळगड उतरता येईल’ असा (निष्फळ) निष्कर्ष काढून सर्वांनी मंदिराबाहेरच्या चौथऱ्यावर पथाऱ्या टाकल्या. सकाळी सहा वाजता उठल्यावर शंकर जंगम यांच्याकडे चहा घेतला, दगडूचीही भेट झाली. तो आदल्या रात्री खावली गावात लग्नाला गेल्याचे कळले होते, नाहीतर सकाळच्या नाष्ट्याचीही सोय झाली असती. त्यांचा निरोप घेऊन केंजळगडाकडे निघालो. रायरेश्वर ते केंजळगड ही वाट अगदी सोपी आहे. डोंगराच्या धारेवरून चालत गेलं की आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. हा किल्ला थोडा पुरंदरसारखा आहे. म्हणजे खाली माची आणि वर तसाच बालेकिल्ला. माचीवरच्या वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सोपी वाट आहे. आणि आता तर, दोन ट्रक एकावेळी जाऊ-येऊ शकतील एवढा रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. हा रस्ता केंजळगडाला वळसा घालून पलीकडे कमळगडाकडे जाणार असल्याचं कळलं. डेक्कन ओडिसी सारखं एकाच वाटेवर रायरेश्वर, केंजळ, कमळगड दर्शन असा काही बेत असावा!

अर्ध्या तासात माचीवरच्या केंजळवाडीला पोहोचलो, आणि रानातून केंजळगडाच्या शिखराकडे चालायला सुरुवात केली. ही वाट जरा दमवणारी आणि बऱ्यापैकी चढणीची आहे. मे महिना असल्यामुळे रानमेवा झाडाझाडावर दिसत होता. कैऱ्या, थोडी कच्ची करवंदे यांचा भरपूर आस्वाद घेत अर्ध्या तासात वर पोहोचलो. शेवटच्या टप्प्यात एकाच कातळात कोरलेल्या ऐसपैस पायऱ्या आवर्जून पाहण्यासारख्या आहेत.

याही गडावर पाहायला काहीच नाही. अगदी मंदिराचं बांधकाम ही नाही. फक्त एक साठवणीची खोली वाटावी असं एक दगडी बांधकाम आहे. गडाची देवी उघड्यावर स्थानापन्न झाली आहे. तिथेच एक मारूतीरायही आहेत. एक प्रचंड मोठा जात्याचा वाटावा असा दगड उभा करून ठेवलेला सापडला. पण नुसत्या ऐतिहासिक पडक्या बांधकामापलीकडचा निसर्ग इथे भरपूर आहे. सुदैवाने मळभ असल्यामुळे उन्हाचा फारसा त्रास होत नव्हता. केंजळगडावरून वाई-भोर प्रदेशाचा तोच चिरपरिचित आसमंत दिसतो. रायरेश्वर, रोहिडा, कमळगड, नवरा-नवरीचे सुळके, वाळकी नदी, धोम धरण हे जुने ओळखीचे दोस्त्स वेगळ्या angle ने दिसले- नव्याने ओळख व्हावी तसे!

परतताना, ज्या वाटेने रात्री चढलो त्या रायरेश्वराच्या लांब-रूंद रस्त्याकडे न जाता केंजळवाडीतून पायवाटेने दरी उतरून पुन्हा कैऱ्या तोडत थेट कोर्ले गावात उतरलो. एखाद्या ट्रेक किंवा भटकंतीमध्ये निसर्गही हा असा सामील होऊन आणखी धमाल आणतो. ही वाटही सोपी आहे. रात्री आकाशात पुरेसा प्रकाश नसल्यामुळे चुकायची risk नको, म्हणून या वाटेने आलो नाही, एवढंच! मग नेहमीप्रमाणे कोर्ले ते भोर, भोर ते हायवे गाडी चालवत, आणि हायवेवर कुलकर्ण्यांच्या उपहारगृहात निवांत पाहुणचाराचा आस्वाद घेत चार वाजता पुण्यात पोहोचलो.

अगदी ध्यानीमनी नसताना आमच्यापैकी काहीजणांचे या ट्रेकमध्ये रायरेश्वर आणि केंजळ असे एकाऐवजी दोन किल्ले झाले. वाट न चुकता झालेला हा पहिलाच ट्रेक असावा! पण तरीही यावेळी काहीच ’चुकल्यासारखं’ वाटलं नाही! केंजळगड नावाच्या, खूप पूर्वीच मैत्री झालेल्या, पण भेटीचा योग न आलेल्या जुन्या आणि अजाणता दुर्लक्षित मित्राला भेटल्याचा आनंद कदाचित त्यापेक्षा अधिक वाटला असेल...


- नचिकेत (४/५/२००८)

Saturday, February 16, 2008

चेहरा

भावनेशी पार माझ्या खेळून चेहरा गेला
रंगणारा खेळ अर्धा मोडून चेहरा गेला

मैफलीचे श्रेय माझ्या नाही कधी मना आले
भैरवीला नाव माझे गाऊन चेहरा गेला

बोलतो मी साचलेले माझ्या मनी दर्पणाशी
जाणतो तो, कान माझे टोचून चेहरा गेला

सारखे ऐसेच व्हावे, शब्दांवरी विसंबावे
"जोडण्या आलो" म्हणाला, तोडून चेहरा गेला

सावरोनी मी कुठेसा वावराया सिद्ध झालो
घाव वर्मी सांत्वनाचा घालून चेहरा गेला

नचिकेत(१८/३/०७)

सखी

मनास वाटे असेच व्हावे
कुणा सखीच्या मनी भरावे

झळा उन्हाच्या, जिवास तलखी
बनून छाया तिला जपावे

जरी दिसाया नसलो सुंदर
सुन्दर आहे, तिला पटावे

चिडून, "गेला उडत" म्हणावे
मलाच घेउन तिने उडावे

दवात न्हाता पहाट, स्वप्नी-
तिने मला, मी तिला पहावे

कधी उरे जर रिते रितेपण
तिचे तिचेपण भरुन घ्यावे*

कळेल भाषा दिठी-मिठीची
असे रुजावे, असे फुलावे
- नचिकेत(१४/४/०७)
(* सानी मिसऱ्यासाठी विनायकला धन्यवाद..)

हुंदका

हुंदका साधा तुझा सांगून गेला
टाळले तू, मात्र तो बोलून गेला

दाटले आभाळ जे तव पापणीला
कोरलेले भाळ ते दावून गेला

पार होता वेस संगे गाव माझा
लक्तरे वेशीवरी टांगून गेला

भय अखेरी संपले कैसे म्हणावे?
बाहुला काळा घरा रांगून गेला

घसरलो तेव्हा कुठे मज भान होते?
संचिताचा दीप तेजाळून गेला

बोलते झालोच ना? मग पाहताना
दाह का नजरेतला जाळून गेला?

नचिकेत (९/४/२००७)

पाऊलवाट

सगळं कसं बदलत चाललंय!
हे जाणवतंय की, दूर दूर चाललंय...

ओळखीचे शब्दही आता अनोळखीपणे कानावर येऊ लागलेत,
कधीकाळी अंतराच्या पार गेलेले ते आता खरंच अंतरु लागलेत...
काही ओळखीच्या खुणा सापडताहेत का? - मी शोधतोय.
वेगळ्या झालेल्या वाटांना जोडणाऱ्या वाटेची मी वाट पाहतोय
रंगलेल्या मैफली आणि भावस्पर्शी सोहळे आता इतिहासजमा झालेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...

त्यांनी प्रवासाच्या वाटेवरची
माझी पावलंच पाहिली
त्या पावलांचं एकटेपण
त्यांना दिसलंही नाही, जाणवलंही नाही
आता वाटेत काळ्या रात्री भेटतात,
कभिन्न पहाड उभे ठाकतात
वळणावळणाच्या रस्त्याने त्यातून पुढे जाणं चालूच आहे,
नव्या गावांना भेटी देणं चालूच आहे
घाटरस्त्यातल्या गाडीच्या हेडलाईटसारखी मधूनच
त्यांची आठवण उजळते-
तेवढीच चार पावलं लवकर पार होतात
हेडलाईट वळणावर दिसेनासा होतो,
आठवण मात्र गाडीच्या आवाजासारखी साथ देते
ते नाहीशा झालेल्या गाडीसारखे केव्हाच नजरेपार झालेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...

कधीतरी परिचित हाक कानी येते
समजावणीच्या चार शब्दांचं दान
न मागताच माझ्या ओंजळीत टाकून जाते
मग पुढचं सगळं अपरिचित होऊन जातं
परत एकदा माझं मन माझ्यातच मिटून जातं
पावलांचे ठसे मात्र शहाणे होत जातात
प्रवासी पक्ष्यांची क्रमश: कहाणी होत जातात
कहाणीच्या सुखद शेवटाची मी वाट पाहत असतो
खऱ्या होणाऱ्या संकेतस्वप्नांची पहाट पाहत असतो
पण पहाटेच्या धुक्यात सगळे हरवून गेलेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...

पण वळणावळणाच्या अशाच एका वाटेनेही मला समजावलंय
"काही शिक्के स्यमंतकासारखे असतात,
ते पुसण्यासाठी काळच जावा लागतो.
आणि पावलांचं एकटेपण दिसायलाच हवं असं नाही..."

नवं गाव जवळ येत चाललंय
आता परत सगळं कसं बदलत चाललंय!

- नचिकेत(२९/१/०७)

Sunday, February 10, 2008

हाक

धुक्यात जाती हरवून वाटा
चिंब चमकती नवथर पाने
झाकून घे‌ई धरा स्वत:ला
गर्द नव्या हिरव्या गर्दीने

गर्दी नेई अवखळ पाणी
शेते गाती निर्झर गाणी
गंधित सुमने हर्षित सु-मने
वेचित जाती कुणी मैत्रिणी

मैत्रिणी त्या पाहून वाटे
हे तर देवाघरचे नाते
तप्त कोरड्या मार्गावरती
सुखसम शीतल छाया वाटे

या वाटेने चालत असता
आठव येई तुझा निरंतर
ऐक हाक ही तुझ्या मनाची
हट्ट सोड बघ वाढे अंतर

अंतर मिटुनी गवसावी ती
वाट धुक्यातील कुणी अनामी
सहवासाची आस प्रवासा
परतुन ये तू... उभा इथे मी!

नचिकेत (३०/९/२००६)

"Magazine पाहावं काढून" - एक स्मरणयात्रा

२१ एप्रिल २००३, रात्री ११.३०
आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही, कध्धीच नाही! हा दिवस भाग्याचाच! माझं आणि आमच्या साऱ्यांचं लाडकं स्वप्न असलेल्या पहिल्या CD-magazine चं प्रकाशन आज झालं. ज्यासाठी आम्ही गेले ७-८ महिने अविरत, प्रचंड ध्यासाने कष्ट घेतले, एका भव्य, उच्च, स्वप्नासाठी आमचे दिवस दिले, आमच्या रात्री दिल्या, त्या CD-magazine चं उद्‌घाटन आज दुपारी Mechanical Room - 13 मध्ये प्राचार्य घाटोळ सरांच्या हस्ते, टाळ्यांच्या गजरात पार पडलं.
सकाळी stickers मिळाली. magazine team ने सर्वच्या सर्व सीडीज्‌ ना (नेमका आकडा माहीत नाही, पण कमीत कमी ९००) stickers लावण्याचं काम अवघ्या तासाभरात पूर्ण केलं. simply great! दुपारचा मुख्य कार्यक्रम short but sweet झाला. सर्व HODs हजर होते. Mechanical Room - 13 full झाली होती.
कार्यक्रमात magazine ची छोटीशी झलकही दाखवली. प्रचंड टाळ्यांनी magazine चं स्वागत झालं. magazine team तर्फ़े मी ( मराठीत) मनोगत व्यक्त केलं. मनोगत व्यक्त करताना आवाज नव्हे, पण मन भरून आलं होतं.
कार्यक्रम संपल्यावर सावंत सर प्रचंड खुश होते. आम्हा सर्वांचं त्यांनी खूप खूप खूप कौतुक केलं. येताना हॉस्टेल वर चक्कर मारुन आलो. I block च्या जवळ जवळ सगळ्या rooms मध्ये magazine चीच चर्चा होती.
एक प्रकारची जबाबदारी पार पाडल्याची कृतार्थता आज दुपारपासून जाणवतेय.....
सध्या मी खूप दमलोय... मन मात्र ’क्षण - पळ- तास - दिन’ ओलांडून मागेच धावतंय... आता उरल्या आहेत, मागील ७-८ महिन्यातल्या क्षण श्रींमंत केलेल्या आठवणी.....

***********

दि २ ऑगस्ट २००२ रात्री ११.००
.... या वर्षी department चं स्वतंत्र magazine काढायचंय. magazine पुढच्या sem मधे निघेल, पण त्याची तयारी ह्या sem पासून सुरु करायला हवी...... आणि हे मला मनापासून करायचंय...

२५ ऑगस्ट २००२ रात्री ११.००
....department magazine ही काही साधीसुधी गोष्ट नसेल, असं मला वाटायला लागलंय. Actually आतापर्यंत "Comp-ENTC-IT" असं एकच असलेलं आमचं department यावर्षी पासून "ENTC" आणि "Comp-IT" अशा दोन स्वतंत्र Dept. मध्ये विभागलं गेलंय. त्यामुळे यावर्षीचं आम्ही काढत असलेलं magazine,Comp-IT चं पहिलं magazine असेल. आणि नवीनच काहीतरी करतोय तर पारंपारिक पुस्तक magazine च्या ऎवजी html च्या format मध्ये काही करता ये‌ईल का, असा विचार आमच्या मनात सुरु झालाय. पण त्यातही नेमकं कसं, याबाबत काहीच माहिती नाही. Let’s see...... सावंत सर काय म्हणतात ते बघू...

१८ डिसेंबर २००२ दुपारी १२.००
...... यावेळचं आमचं magazine अत्यंत वेगळं असेल. आम्ही CD-Magazine काढतोय. आतापर्यंत पुस्तकरुपातच ओळखीचं वाटणारं magazine आता "CD" वर ये‌ईल.COEP च्या इतिहासात आत्तापर्यंत न घडलेली गोष्ट आम्ही करणार आहोत.(म्हणजे नक्की CD कशी असेल, हे आत्ताच विचारु नका! मलाही माहित नाहीये.)
सध्या फ़क्त स्वप्न पाहिलंय! अर्थात त्यासाठी प्रचंड मेहनत आहे. आज हे सगळं final झालं. आता magazine निघेल, ते CD वरच! खर्चाच्या बाबतीतही पुस्तक magazine पेक्षा अतिशय स्वस्तात जा‌ईल. आणि तंत्रज्ञान शिकतोय ते implement करण्याची उत्तम संधी यातून मिळेल. एक नवा पायंडा पडेल. परमेश्वर आमचा सांगाती होवो!

१ जाने २००३ रात्री १२.००
... दिवसकाळाचं सध्या भानच नाहीये. विचार करायलाही वेळ नाहीये. हां हां म्हणता सुट्टी संपली, उद्यापासुन college सुरु होणार आहे (असं सांगितलं गेलंय!) पण या पूर्ण सुटीत आपण दोनदाच भेटलोय १८ तारखेला आणि आज.
... मी सध्या CD magazine मध्ये पूर्ण busy आहे. गेले ३-४ दिवस सुमेधच्या घरी त्याचं काम सुरु आहे. काल रात्री अणि परवा फ़क्त अर्धा तास झोपलोय! खरोखर रात्रभर जागून काम करतोय. सध्यातरी learning चालू आहे interface try करतोय, software शिकतोय. दर ३-४ दिवसात नवं s/w सापडतं मग ते try करायचं, मग त्यात settle हो‌इपर्यंत वेळ जातो. असो. अर्थात पहाटे ४.३० नंतर फ़ारसं काम होतं नाही. रोज सकाळी घरी येतो. आज सकाळी साडेसहाला घरी आलो. 15km @ 6.30am- आणि गम्मत म्हणजे आज सकाळी यावर्षीच्या थंडीतलं सर्वात कमी temperature होतं! 6.2 oC!! enjoying !!
तर अशा प्रकारे magazine डोक्यात चढतंय - अक्षरश: झोकून दे‌उन काम करतोय. अर्थात ही तर सुरुवात आहे, अजून खूप चालायचंय!
सध्या खूप दमलोय... पुन्हा भेटू कधीतरी!

४/२/०३ रात्री १०.४५
काल फ़िरोदिया शो झाला.... आता पुनश्च: mag!.
articles यायला हळूहळू सुरुवात झाली आहे. काही seniors ला त्यासाठी पर्सनली भेटावं लागेल. Interface वर सुमेध-अन्या-दर्शन ने खरंच खूप मेहनत घेतली आहे. हळूहळू ’समूर्त’ होऊ लागलंय सगळं...

दि. २ मार्च २००३ सकाळी ११.००
काल सेंच्य़ुरियन पार्क वर भारत-पाकिस्तान ची world-cup मॅच झाली. You should believe - we missed it! मी फ़क्त last 5 overs पाहिल्या. दर्शन-सुमेधने ते ही नाही! काल सुमेधच्या घरी magazine चं काम चालू होतं. सोनाली कुलकर्णी चा interview मिळालाय. Actully आमचा senior विनायकने मागच्या वर्षीच्या magazine साठी घे‌उन ठेवला होता. पण Colour pages साठी खर्च वाढत असल्यामुळे त्यांना तो ना‌ईलाजाने वगळावा लागला. (मी त्याला म्हटलं don’t worry! आम्हाला असा Colour pages चा problem च नाही. इथे KB/MBची गणितं आहेत, त्यामुळे जागाही आहे!)

२५ मार्च २००३, रात्री १०.३०
Magazine चं नाव अजूनपर्यंत सुचत नव्हतं, पण आता तो problem solve हो‌ईल. अनिरुद्धने भारी शब्द शोधलाय - "Revista"! याचा अर्थ स्पॅनिश भाषेत magazine! आणि आपलं mag softcopy असेल, तसंच आम्ही ते site वर upload करण्याचा विचार करतोय, So "e-Revista"! बहुदा हेच final हो‌ईल. खरं सांगायचं तर माझ्यामते magazine चं नाव revista असणं, म्हणजे एखाद्या मुलाचं नाव ’मुलगा’ हे ठेवण्या सारखं आहे.
पण तरीही... It’s ok!

magazine आता ’दिसायला’ लागलंय. जवळ जवळ सगळ्या sections चे tabs, त्यांची positions, ‘on-click’ events दिसताहेत.... मला खूप छान वाटतंय hats off to all of us! still to go..!

२ एप्रिल २००३ रात्री ११.००
...आम्ही ३१ मार्च ही deadline ठेवली होती. पण बरेच problems आले.३१ मार्च ची दुपार ते १ एप्रिल ची संध्याकाळ असं almost सलग १९ तास आम्ही दर्शनच्या घरी काम केलंय. This was the peak! एखाद्या गोष्टीचा कळस गाठणं म्हणतात, तसा कष्टांचा कळस झाला होता गेल्या २ दिवसात! अक्षरश: मेहनतीची हद्द झाली! पण still we enjoyed! मित्रांनो actually नेमके problems काय आले ते explain करुन इथे लिहिता येत नाहीये. एवढंच सांगतो, सगळे software problems होते, जवळ जवळ सगळा Data मिळालाय, त्याचं compilation आणि gathering चालू आहे...
आता नवी डेड ला‌ईन आहे - १० एप्रिल!
आता फ़क्त magazine team चं मनोगत लिहायचं बाकी आहे, ते २-३ दिवसांत पूर्ण हो‌ईल.

१० एप्रिल २००३ रात्री १०.३०
आजही deadline पूर्ण झालीच नाही. But we are all ready now! mag covers printing ला द्यायचं बाकी आहे, "magazine पाहावं काढून" हे magazine team तर्फ़े मी लिहीलेलं मनोगत परवा सुमेधला BC वर ऐकवलं.
माझं वाचन संपल्यावर त्याचे भरुन आलेले डोळे खूप काही सांगून गेले...

१९ एप्रिल २००३ रात्री ११.३०
आज संध्याकाळी magazine demo पाहिला.
परवा inaug आहे. त्यासाठी आज एक trial घेतली. Every thing was fine. एकच problem आहे.
CD-stickers! सोमवारी जर सर्वांना CDs(at least all HOD’s, principal) द्यायच्या असतील तर उद्या stickers मिळायलाच हवीत!

We are all waiting now... फ़क्त "त्या" क्षणाची वाट पाहतोय. आम्ही सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे... फ़क्त उत्सुकता आहे आता... सीडी मॅगझीन चं स्वागत कसं हो‌ईल ? सीडी आवडेल का?

**************

२१ एप्रिल २००३ रात्री ११.३०
........ शक्य तिथपर्यन्त एकमेकांना सांभाळून घेत, अनेक अडचणींना तोंड देत, कष्टांची फ़िकीर न करता आम्ही आमचं ध्येय गाठलं. आमच्यापैकी कुणीच ‘inborn ‘ leader, manager नव्हता. जिथून सुरुवात केली ते ठिकाण म्हणजे एक शून्य होतं. सर्वस्वी वेगळ्या प्रवाहाची सुरुवात आम्ही केली. आज magazine चं inaug झाल्या दिवशी मला त्या सर्वांचीच आठवण येते, ज्यांनी ह्या कामात स्वत:च्या परीने १००% योगदान दिलं. थोडी साहित्यिक भाषा वाटेल, पण magazineच्या क्षेत्रात एक नवीन प्रवाह सुरु करण्याचं स्वप्न पाहिलेल्या, आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपापल्या परीने सर्वोत्कृष्ट प्रयत्न केलेल्या माझ्यासारख्याच सामान्य मित्र-मैत्रिणींची ‘e-revista’ ही एक असामान्य आणि कष्टसाध्य कलाकृती आहे.
अगदी article type करुन देण्याचीही classmates नी स्वत:हून तयारी दाखवली. ’sponsorship’ पासून अगदी शेवटच्या क्षणी आलेल्या ‘CD sticker’ चिटकवण्याच्या कामापर्यंत अनेकांनी ‘स्वत:चं’ समजून योगदान दिलं.... पु. लं. च्या शब्दात सांगायचं झालं तर ‘यात्रा संपत आली की आठवणींची ही चित्रं डोक्यात गर्दी करतात’...

"Mission E-Revista" संपलं. आता उरल्या आहेत त्या फक्त आठवणी आणि त्या अविस्मरणीय क्षणांच्या स्मरणयात्रा...!


नचिकेत जोशी
(Chief Co - ordinator, E-Revista 2002-03)

Tuesday, February 5, 2008

साद

सांजवेळी, दूर रानी,
साद घातली मला कुणी?
हिरव्या देठी, चिमण्या ओठी,
शीळ घातली खुळी कुणी? १

नभांगणाच्या हमरस्त्याने
पक्षी चालले माघारी
कि संध्येच्या नयनी रेखिले
काजळ ते आतुर कुणी? २

दिवेलागणी होता उमटे
बालसूर तो श्लोकांचा
गोशाळेतुन जणू किणकिणे
मंजुळशी गोमाय कुणी! ३

कडे-कपारी न्हाऊन निघती
संधिकाली त्या किरणांनी
समर्पणाचे तेज हे दिधले
जाता जाता मला कुणी? ४

मनामनाला करते कातर
वेळ ही हळवी क्षणोक्षणी
की चित्ताला शान्तवाया
निर्मिली ही सांज कुणी? ५

मला न ठावे कोण असे तो
सूत्रधार या खेळाचा
खेळगडी तो असेल माझा
की खेळाचा जनक कुणी? ६

- नचिकेत (२४/६/२००६)

Monday, January 28, 2008

ऋतू

ऋतू येत होते ऋतू जात होते
भरावे स्वताला मला ज्ञात होते

जरी धावलो भूवरी वास्तवाच्या
ठसे पावलांचे खगोलात होते

सले वेदना काळजाशी तरीही
हसू लोचनी, गीत ओठात होते

तमाची तमा मी न केली कधीही
सडे तारकांचे प्रवासात होते

उभा सूर्य झालो नभाच्या उराशी
कुठे सत्य सारे उजेडात होते?

न मी भेटलो कोणत्याही गुरूला
हरी सावळे रूप ध्यानात होते

- नचिकेत (२८/२/०७)

Sunday, January 27, 2008

कमळगड

पायथ्यापासून गड दिसावा, असं कमळगडाच्या बाबतीत होत नाही. समोर दिसणारा डोंगर चढल्यावर मग कमळगडाचा डोंगर दिसतो, हे त्या समोरच्या डोंगरावर गेल्यावरच कळतं. अर्थात, खालच्या डोंगराने चढण्याची सगळी हौस भागवलेली असल्यामुळे कमळगडाचा मुख्य डोंगर मग अगदीच सोप्पा वाटतो, आणि सोपा आहेही.
कमळगडाच्या वाटांबद्दल कोणतीही माहिती नसतांना आम्ही कमळगडच का निवडला, याचं ’वाट चुकल्यावरही न वाटणारी भीती’ हे एकच उत्तर देता येईल. बाकी त्याचा इतिहास भूगोल पाठ होता. त्यावरून ’एवढं सगळं माहित असतांना तू प्रत्यक्ष गड पाहण्य़ाची गरजच काय?’ असा पुणेरी सवालही मित्राने विचारून पाहिला. (आणि मी अर्थातच टाळला.)
यावेळी पाचच जण असल्यामुळे मयूरच्या चारचाकीतून (अजिबात थंडी न वाजता) सकाळी सकाळीच वाई गाठली आणि एवढ्या सकाळी ८ वाजता नाष्टा कुठे मिळेल असं अख्ख्या वाईत शोधायला लागलो. सुदैवाने, महागणपतीच्या मंदिराजवळ एक छोटेसे हॉटेल सापडले. मग पोटोबा झाल्यावर कृष्णेकाठच्या त्या तुंदिलतनू महाकाय ’विठोबाचे’ दर्शन घेतले आणि वासोळे गावाकडे निघालो. धोम धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पांडवगड उजव्या हाताला ठेवून पुढे निघालो.
आमच्या अपेक्षेपेक्षा वासोळे गाव खूप दूर होते. धोम धरणाची भिंत ओलांडून पुढे जात राहायचं. डाव्या हाताला धोम धरणाचा जलाशय आपली साथ न कंटाळता करत राहतो. शेवटी आपल्यालाच कंटाळा येतो! हा अख्खा जलाशय ओलांडून मग खावली गावनंतर वासोळे गावासाठी डाव्या हाताला वळलो. या सबंध रस्त्यावर जलाशयाच्या पलीकडे नवरा-नवरीचे डोंगर आणि मागचे वऱ्हाडाचे सुळके आपलं लक्ष वेधून घेतात. (मी आधी त्या सबंध रांगेलाच कमळगड समजत होतो).
गावात गडावर जायची वाट विचारून घेतली. इथे गावकऱ्यांची मतं विभागलेली होती. काही गावकरी आम्ही मधल्या वाटेने वर जावे या मताचे होते, तर काहींनी ’तिथून वाट सापडणार नाही, तुपेवाडीच्या शाळेवरून पुढे जा, ती वाट सरळ आहे’ असा सल्ला दिला. आम्ही (अर्थातच) मधली वाट पक्की केली. ह्या दीड तासांच्या शॉर्टकट ने पहिला डोंगर पार केला आणि पठारावर पोहोचलो तेव्हा बारा वाजले होते (घड्याळात). ही वाट खरंतर सोपी आहे. फक्त चुकलो तर पुन्हा योग्य वाट गाठायला थेट पायथा गाठावा लागतो, म्हणून गावकऱ्यांनी तुपेवाडीच्या लांबच्या वाटेने जायचा सल्ला दिला असावा. पण या वाटेने बऱ्यापैकी अंतर वाचते.
पठारावर आलो आणि समोर कमळगडाचे पहिले दर्शन झाले. आणि एक गोष्ट ही लगेच जाणवली, की आता पुढची वाट घनदाट झाडीतून आहे, तसंच चढ फारसा नाहीच. माथ्यावरच्या शेवटच्या टप्प्यात दाट झाडी असलेल्या फार थोड्या किल्ल्यांपैकी कमळगड हा एक आहे. पठारावरच्या एका झाडावर थोडावेळ विसावलो आणि तडक कमळगडाकडे निघालो. भर दुपारी बारा वाजताही प्रसन्न सावलीतून साधारण २० मिनिटात माथ्यावर दाखल झालो. गड नजरेच्या एका आवाक्यात संपतो. फिरायला काहीच नाही. अगदी महादेवाचे मंदिरही नाही. फक्त सुमारे ५००-६०० फूट खोल गेरूची (काव) विहीर आहे. विहीरीत तळापर्यंत उतरता येते. खाली विलक्षण गारवा वाटतो.
गडावरून सभोवतालचा परिसर डोळ्यांचे पारणे फिटावे इतका सुंदर आहे. महाबळेश्वर-पाचगणी रांग, धोम धरणाचा जलाशय आणि दूरवर दिसणारी धरणाची भिंत, त्यापलीकडे पांडवगड, त्याच्या डाव्या हाताला मागे मांढरदेवी, रायरेश्वर, केंजळगड.. आणि खुद्द कमळगडाच्या पायथ्याला बिलगलेल्या एका बाजूला कृष्णा आणि दुसऱ्या बाजूला वाळकी नदी! तटबंदीच्या काठाकाठाने चालत, स्वत:चे फोटोग्राफीचे कौशल्य अजमावत आम्ही गड फिरलो. तटबंदीवरून गडाला प्रदक्षिणा घालण्यात मोठं सुख असतं, मजाही असते. पुनश्च गड उतरून पठारावर आलो. तिथल्या घरात राहणाऱ्या तुकारामच्या सल्ल्यावरून परत जाताना तुपेवाडीच्या वाटेने खाली उतरायचे ठरवले - केवळ दोन्ही वाटा माहित होतील म्हणून.
वाटेत गोरक्षनाथाचे मंदिर लागले. सकाळच्या नाष्ट्यानंतर काहीच खाल्लेले नसल्यामुळे त्या मंदिराच्या आवारात पाय (आणि खाद्यपदार्थांच्या पुड्या) मोकळे सोडून बसलो. अस्मादिकांनी स्वत:च्या हाताने बनवलेले पोहे इतरांना (त्यांच्या चेहऱ्याकडे न बघता) कौतुकाने खायला घातले. गोरक्षनाथाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही. कार्तिकस्वामींप्रमाणेच इथेही एखादी पौराणिक कथा असावी.
मंदिरातल्या महाराजांना उतरायची वाट विचारून घेतली आणि उजव्या हाताला दिसणारी अख्खी दरी डोंगराच्या रेघेवरूनच ओलांडून मग सरळ खाली उतरायचे हे लक्षात ठेवले. अर्ध्या वाटेत बहुधा योग्य फाट्याऐवजी आधीच डोंगर उतरायला लागलो. अर्थात एक खाली जाणारी बऱ्यापैकी रूळलेली पायवाट दिसल्यावर तशी समजूत झाली. अखेर त्याच वाटेने उतरत, १-२ वेळा चुकत आणि शेवटी पूर्ण चुकून एकदाचे गावात उतरलो. तुपेवाडीची शाळा सोडाच, पण शाळेसदृश एकही इमारतबांधणी वाटेत लागली नाही, आणि संपूर्ण वेगळी वाट एन्जॉय करत खाली आलो.
गाडीतून परत येताना समोरून येणाऱ्या दोन छोट्या मुलांच्या हातातल्या पेप्सीकोल्याकडे बघून प्रत्येकाला ’बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला आणि पेप्सीकोले घेण्यासाठी गाडी थांबवली. मग हायवेवर एकदाच चहापानासाठी थांबून साडेआठला पुण्यात पोहोचलो.
सह्याद्रीत मनापासून भटकण्याची आवड असलेल्यांसाठी कमळगड हे ’शूड नॉट मिस’ असे ठिकाण आहे... एका दिवसात सहज पाहून होईल अशी वाईभोवतालच्या दुर्गसाखळीतली कमळगड ही दिवस सार्थ करणारी कडी नक्कीच आहे!

- नचिकेत जोशी (17/1/2008)

Sunday, January 20, 2008

पांडवगड

गेल्या ४ महिन्यांत ट्रेक सोडाच, साधी पायपीटसदृश भटकंतीही केली नव्हती. बऱ्याच दिवसांनंतर मोकळा वेळ मिळाला होता. CAT चा एक attempt झाला होता, पुढची परीक्षा गळ्याशी आलेली नव्हती, त्यातच भटक्यांसाठी आदर्श मौसम चालू झालेला! त्यामुळे Trek साठी नवीन किल्ल्याच्या (आणि त्याचबरोबर साथीदारांच्या - किमान ४ तरी हवेतच ना! ) शोधात होतो. आधी केंजळगड नक्की केला होता. पण मायबोली.com मुळे ओळख झालेल्या एका जाणत्या आणि अत्यंत अनुभवी treker चा सल्ला घेतला आणि सर्व बाजूंनी विचार करून पांडवगड नक्की केला. तीन Bike वर आम्ही सहा जण (भल्या पहाटे) साडेसहा वाजता निघालो.
पांडवगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे राष्ट्रीय महामार्ग ४ वर भोर फाट्याला वळून मांढरदेवी मार्गे जाऊन गडाच्या पायथ्याचे गुंडेवाडी गाव गाठायचे. किंवा मग NH 4 हून वाईमार्गे जायचे. आम्ही दुसरा मार्ग निवडला. याचे एक कारण म्हणजे, गाडी चालवण्यासाठी अत्यंत सुंदर असा महामार्ग! प्रशस्त आणि खड्डे विरहित रस्त्यामुळे NH 4 वर गाडी चालवणे हा एक आनंद असतो. जाताना शिरवळला "श्रीराम" चा प्रसिद्ध वडापाव खाल्ला. हाडांत शिरणारी थंडी म्हणजे काय हे तोपर्यंत कळलं होतं. ७०-८० च्या वेगाला स्वेटर आणि त्यावरून जाकीट ही दुहेरी तटबंदी थंडी रोखण्यास पुरेशी नाही हे जाणवलं. त्यामुळे दोनदा चहा हा अपरिहार्य होता. त्या हॉटेलमध्ये आलेल्या बाकीच्या लोकांना कशी थंडी वाजत नाही, याचं उत्तर त्यांच्या बाहेर उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांनी मुक्यानेच दिलं आणि आम्ही खाण्यावर ताव मारायला सुरुवात केली. जवळजवळ पाऊण तास तिथे घालवल्यानंतर मात्र सरळ आधी वाई गाठली.
वाईत शिरतानाच उजव्या हाताला चौकोनी माथ्याचा पाण्डवगड दिसायला लागतो. एका डोंगराच्या मागे पांडवगड आहे, आणि गडावर जाताना हा डोंगर चढून जावं लागणार हेही लगेच कळतं. वाईतून महागणपतीच्या मंदिरावरून धोम धरणाकडे रस्ता जातो. त्या रस्त्यावर वाईपासून साधारण ३-४ किमी वर मेणवली नावाचं गाव आहे. मेणवली हे पेशवाईतील सुप्रसिद्ध साडेतीन शहाण्यांपैकी एक - नाना फडणवीसांचं गाव. गावात कृष्णेकाठी त्यांचा वाडा आहे, तसंच वाड्यापाठीमागील घाटावर चिमाजी अप्पांनी वसईच्या युद्धात जिंकून आणलेली महाकाय घंटाही बांधलेली आहे. याच घाटावर "स्वदेस" चित्रपटातली बरीच दृश्ये चित्रित झालेली आहेत हे तिथे गेल्या गेल्या कळतं. आम्ही मात्र "आधी लगीन पांडवगडाचे" असं म्हणून मेणवली गावातून पांडवगडाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला लागलो. वाटेत धोम धरणाचा कालवा लागतो. तिथून पुढे जाऊन शेवटच्या घराजवळ गाड्या लावल्या. Helmet, जाकीट त्याच घराच्या पडवीत ठेवलं, आणि समोर दिसणाऱ्या पांडवगडाकडे मार्गस्थ झालो. एव्हाना साडेनऊ झाले होते.
चढायला अंदाजे किती वेळ लागेल हा विचार करत असतानाच, गड बराच उंच आहे, हे लक्षात आले. अर्थात, चढणारेही तबियतीचे (म्हणजे "बाळसेदार" नव्हे, तर बऱ्यापैकी अनुभवी आणि तयारीचे) असल्यामुळे त्याचा नंतर विचार केला नाही. या ऋतूमध्ये कोणत्याही गडावर जाणं हा एक सुखद अनुभव असतो. मुख्य कारण म्हणजे पावसाळा नुकताच संपल्यामुळे पाण्याची असलेली उपलब्धता. गडावरही आणि वाटेवरही पाणी उपलब्ध आहे.
डोंगर चढायला सुरूवात केली आणि वाटेवरच्या पिवळ्या गवताने बुटांत शिरून आपल्या अस्तित्वाने टोचायला सुरूवात केली. या बुटाबाहेरच्या गवताचे बुटांत शिरल्यावर काटे होतात. "दुरून डोंगर साजरे" का असतात, याचे मला आणखी एक उत्तर मिळाले.
पांडवगड चढताना लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट म्हणजे, समोर दिसणारी डोंगराची सोंड. या सोंडेवरूनच चालत वर जायचं. मध्येच एके ठिकाणी एक पायवाट गडाच्या उजव्या अंगाला घेऊन जाते. तिथून गेलो, तर गडाला फक्त प्रदक्षिणा होते. पण सुदैवाने खाली उतरणाऱ्या एका group ने आम्हाला योग्य "वाटेला लावलं". कोणत्याही trek मध्ये ’वाट चुकणे’ हा आमचा एक अविभाज्य घटक असतो. संपूर्ण trek भर जर एकदाही वाट चुकलो नाही, तर शेवटी आम्हालाच चुकचुकल्यासारखे होते. वाट चुकण्याशिवाय कोणत्याही भटकंतीला मजा नाही! भेटलेल्या त्या group मुळे आमचा तो भाग थोडक्यात चुकला!
वाटेत एक पठार आलं, चार घरांची एक वस्ती लागली, तिथल्या बाईने वाटेत सोबत म्हणून काठी दिली, कारण त्या उतरणाऱ्या group ने गडावर कुत्री असून ती दिसली तर "असाल तिथून मागे पळत सुटा" असं बजावलं होतं. वास्तविक, ती कुत्री गडावर गेली २० वर्षं वास्तव्यास असणाऱ्या शेर वाडिया यांची आहेत, हे आम्हाला माहीत होतं. पण "ती कुत्री दिसता क्षणी मागे फिरा" ही माहिती नवी होती! शेर वाडियांनी अख्खा गड विकत घेतला असून ते कायम गडावरच अगदी निसर्गाच्या सान्निध्यात राहतात, अगदी क्वचित खाली उतरतात. त्यांना भेटणं हाही आमच्या कार्यक्रमपत्रिकेतला एक भाग होताच. पण तिथे सर्वात शेवटी जाऊ असा विचार करून त्या बाईला आधी बालेकिल्ल्याच्या खालून उजव्या हाताने जाणारी वाट विचारून घेतली.
एकूण गड खड्या चढाचा आहे. त्या वस्तीपासून बालेकिल्लाही बऱ्यापैकी उंच दिसत होता. वाट खड्या चढाची असली, तरी अवघड अजिबात नाही. बालेकिल्ल्याच्या साधारण २०० फूट उंच कातळाखाली आलो. तिथून डाव्या हाताने जाणारी वाट गडाच्या उत्तर टोकाला बांधलेल्या शेर वाडियांच्या बंगल्याकडे जाते. आम्ही कातळाच्या उजव्या बाजूने जाणारी वाट पकडली. दरीच्या काठाकाठाने बालेकिल्ल्याला अर्धीअधिक प्रदक्षिणा घालून व वाटेतली बालेकिल्ल्याच्या कातळाला खालून लटकलेली व माशांनी लगडलेली ३-४ मधाची पोळी भीत भीत बघून आम्ही गडावर दाखल झालो. त्या पोळ्यातल्या माशा जर उठल्या तर आपलं नक्की काय होईल याचा अंदाज न आल्यामुळे शाळेत सरांनी सांगितलेले "मधमाशा उठल्यावर बचावाचे उपाय (म्हणजे कमीत कमी हानीचे उपाय)" मी मनातल्या मनात आठवून घेतले. बराच वेळ दरवाजा न आल्यामुळे व कातळाला अर्धी-अधिक प्रदक्षिणा ही होत आल्यामुळे आता चुकून आपण शेर वाडियांच्या बंगल्यालाच (व मुख्यत: कुत्र्यांना) भेट देणार अशी शंका येत होती. पण तसं काही झालं नाही. व बंगलाही बालेकिल्ल्याच्या खालच्या अंगाला आहे, हे नंतर वरून पाहताना कळलं.
गडावर बघण्यासारखं काहीच नाही. गडावरून बघण्यासारखं मात्र बरंच काही आहे. मांढरदेवी, धोम धरणाची भिंत व जलाशय, पाचगणी, महाबळेश्वराची रांग, वाई गाव, रायरेश्वराचं पठार असा चहुबाजूंनी विस्तीर्ण टापू नजरेत येतो. गड चढून गेल्याचं अगदी सार्थक होतं. एका नजरेच्या आवाक्यात न बसणारा हा सर्व प्रदेश समाधान होईपर्यंत डोळे भरून पाहून घेतला. आल्हाददायक वाऱ्याची झुळूक सगळा थकवा दूर करत होती.
बालेकिल्ल्यावर एक मोठं टाकं आहे, पांडजाई देवीचं देऊळ आहे, आणि एक हनुमान आहे. आम्ही टाक्यातल्या थंडगार पाण्याने ताजेतवाने झालो. बरोबर आणलेलं खाऊन घेतलं आणि दोन वाजता उतरायला सुरूवात केली. उतरतानाही तो झुबक्याप्रमाणे दिसणाऱ्या झाडांचा आणि त्यात टप्पोऱ्या मोत्यासारख्या उठून दिसणाऱ्या वाई-मेणवली गावांचा प्रदेश खिळवून ठेवत होता. आधी list मध्ये असलेला शेर वाडियांना भेटण्याचा कार्यक्रम गड उतरल्यावर मेणवली गावातला वाडाही पहायचा असल्यामुळे रद्द केला. वाटेत आम्हाला वर जाताना सोबत म्हणून दिलेली काठी त्या बाईला काठी परत केली. तिथल्या विहिरीवर पाणी प्यायलो आणि गड निवांतपणे उतरून मेणवली मध्ये आलो. "मेणवलीला कृष्णा नदी मोहक वळण घेते" असं वाचलं होतं. ते मोहक वळण पाहायला घाटावर पाय ठेवला आणि अगदी ओळखीचं काहीतरी पाहतोय असं वाटायला लागलं. "स्वदेस" मधलं "पल पल हे भारी" हे गाणे आणि त्यानंतरचा रावणवध तसंच शेवटची कुस्ती याच घाटावर चित्रित करण्यात आली आहे. "रात्रभर शूटींग चालू होतं, आम्ही प्रेक्षकांत बसलो होतो. शेवटी पहाटे ४ वाजता रावण मेला" - इति एक गावकरी. तसंच, पंचायत आणि "ये तारा, वो तारा" गाणे हे नाना फडणवीसांच्या वाड्याबाहेरील एका प्रचंड वृक्षाजवळ चित्रित झाले आहेत.
घाट मात्र सुंदर आहे आणि गावही गावपण टिकवून आहे. कृष्णेचं पात्र कमालीचं शांत आहे - "संथ वाहते..." ची आठवण करून देणारं. अस्ताला जाणारा सूर्य पाहत कृष्णेच्या पाण्यात पाय सोडून बसलो. सूर्य झाडामागे गेला आणि आम्हीही "आता निघावं" असं म्हणून (फोटो काढायला) निघालो. पुढचे १५-२० मिनिटं मन भरेपर्यंत फोटो काढून घेतले. चहा घेऊन सव्वासहा वाजता वाईतून निघालो.
"परतीच्या वाटेवरती"ही बुटांतल्या काट्यांप्रमाणेच पांडवगड, मेणवलीचा कृष्णेचा घाट, आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या त्या वाई आणि सभोवतालच्या प्रदेशाची संध्याछायेसारखी रेंगाळणारी आठवण मनात रुतून बसली होती. आणखी एक दिवस सार्थकी लागला होता. आणखी एक किल्ला गाठीशी जमा झाला होता. आणखी एक आनंदयात्रा संपवून आम्ही माघारी निघालो होतो. आयुष्यात ह्या "आणखी एक" ला सतत मागणी आहे, म्हणूनच पुढे जाण्यात आनंद आहे, आणि अशा आणखी अनेक आनंदयात्रांच्या स्वागतासाठी हा सह्याद्री आडवाटाही सजवून सदैव उभा आहे!

- नचिकेत जोशी (3/12/2007)