Pages

Sunday, January 27, 2008

कमळगड

पायथ्यापासून गड दिसावा, असं कमळगडाच्या बाबतीत होत नाही. समोर दिसणारा डोंगर चढल्यावर मग कमळगडाचा डोंगर दिसतो, हे त्या समोरच्या डोंगरावर गेल्यावरच कळतं. अर्थात, खालच्या डोंगराने चढण्याची सगळी हौस भागवलेली असल्यामुळे कमळगडाचा मुख्य डोंगर मग अगदीच सोप्पा वाटतो, आणि सोपा आहेही.
कमळगडाच्या वाटांबद्दल कोणतीही माहिती नसतांना आम्ही कमळगडच का निवडला, याचं ’वाट चुकल्यावरही न वाटणारी भीती’ हे एकच उत्तर देता येईल. बाकी त्याचा इतिहास भूगोल पाठ होता. त्यावरून ’एवढं सगळं माहित असतांना तू प्रत्यक्ष गड पाहण्य़ाची गरजच काय?’ असा पुणेरी सवालही मित्राने विचारून पाहिला. (आणि मी अर्थातच टाळला.)
यावेळी पाचच जण असल्यामुळे मयूरच्या चारचाकीतून (अजिबात थंडी न वाजता) सकाळी सकाळीच वाई गाठली आणि एवढ्या सकाळी ८ वाजता नाष्टा कुठे मिळेल असं अख्ख्या वाईत शोधायला लागलो. सुदैवाने, महागणपतीच्या मंदिराजवळ एक छोटेसे हॉटेल सापडले. मग पोटोबा झाल्यावर कृष्णेकाठच्या त्या तुंदिलतनू महाकाय ’विठोबाचे’ दर्शन घेतले आणि वासोळे गावाकडे निघालो. धोम धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पांडवगड उजव्या हाताला ठेवून पुढे निघालो.
आमच्या अपेक्षेपेक्षा वासोळे गाव खूप दूर होते. धोम धरणाची भिंत ओलांडून पुढे जात राहायचं. डाव्या हाताला धोम धरणाचा जलाशय आपली साथ न कंटाळता करत राहतो. शेवटी आपल्यालाच कंटाळा येतो! हा अख्खा जलाशय ओलांडून मग खावली गावनंतर वासोळे गावासाठी डाव्या हाताला वळलो. या सबंध रस्त्यावर जलाशयाच्या पलीकडे नवरा-नवरीचे डोंगर आणि मागचे वऱ्हाडाचे सुळके आपलं लक्ष वेधून घेतात. (मी आधी त्या सबंध रांगेलाच कमळगड समजत होतो).
गावात गडावर जायची वाट विचारून घेतली. इथे गावकऱ्यांची मतं विभागलेली होती. काही गावकरी आम्ही मधल्या वाटेने वर जावे या मताचे होते, तर काहींनी ’तिथून वाट सापडणार नाही, तुपेवाडीच्या शाळेवरून पुढे जा, ती वाट सरळ आहे’ असा सल्ला दिला. आम्ही (अर्थातच) मधली वाट पक्की केली. ह्या दीड तासांच्या शॉर्टकट ने पहिला डोंगर पार केला आणि पठारावर पोहोचलो तेव्हा बारा वाजले होते (घड्याळात). ही वाट खरंतर सोपी आहे. फक्त चुकलो तर पुन्हा योग्य वाट गाठायला थेट पायथा गाठावा लागतो, म्हणून गावकऱ्यांनी तुपेवाडीच्या लांबच्या वाटेने जायचा सल्ला दिला असावा. पण या वाटेने बऱ्यापैकी अंतर वाचते.
पठारावर आलो आणि समोर कमळगडाचे पहिले दर्शन झाले. आणि एक गोष्ट ही लगेच जाणवली, की आता पुढची वाट घनदाट झाडीतून आहे, तसंच चढ फारसा नाहीच. माथ्यावरच्या शेवटच्या टप्प्यात दाट झाडी असलेल्या फार थोड्या किल्ल्यांपैकी कमळगड हा एक आहे. पठारावरच्या एका झाडावर थोडावेळ विसावलो आणि तडक कमळगडाकडे निघालो. भर दुपारी बारा वाजताही प्रसन्न सावलीतून साधारण २० मिनिटात माथ्यावर दाखल झालो. गड नजरेच्या एका आवाक्यात संपतो. फिरायला काहीच नाही. अगदी महादेवाचे मंदिरही नाही. फक्त सुमारे ५००-६०० फूट खोल गेरूची (काव) विहीर आहे. विहीरीत तळापर्यंत उतरता येते. खाली विलक्षण गारवा वाटतो.
गडावरून सभोवतालचा परिसर डोळ्यांचे पारणे फिटावे इतका सुंदर आहे. महाबळेश्वर-पाचगणी रांग, धोम धरणाचा जलाशय आणि दूरवर दिसणारी धरणाची भिंत, त्यापलीकडे पांडवगड, त्याच्या डाव्या हाताला मागे मांढरदेवी, रायरेश्वर, केंजळगड.. आणि खुद्द कमळगडाच्या पायथ्याला बिलगलेल्या एका बाजूला कृष्णा आणि दुसऱ्या बाजूला वाळकी नदी! तटबंदीच्या काठाकाठाने चालत, स्वत:चे फोटोग्राफीचे कौशल्य अजमावत आम्ही गड फिरलो. तटबंदीवरून गडाला प्रदक्षिणा घालण्यात मोठं सुख असतं, मजाही असते. पुनश्च गड उतरून पठारावर आलो. तिथल्या घरात राहणाऱ्या तुकारामच्या सल्ल्यावरून परत जाताना तुपेवाडीच्या वाटेने खाली उतरायचे ठरवले - केवळ दोन्ही वाटा माहित होतील म्हणून.
वाटेत गोरक्षनाथाचे मंदिर लागले. सकाळच्या नाष्ट्यानंतर काहीच खाल्लेले नसल्यामुळे त्या मंदिराच्या आवारात पाय (आणि खाद्यपदार्थांच्या पुड्या) मोकळे सोडून बसलो. अस्मादिकांनी स्वत:च्या हाताने बनवलेले पोहे इतरांना (त्यांच्या चेहऱ्याकडे न बघता) कौतुकाने खायला घातले. गोरक्षनाथाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही. कार्तिकस्वामींप्रमाणेच इथेही एखादी पौराणिक कथा असावी.
मंदिरातल्या महाराजांना उतरायची वाट विचारून घेतली आणि उजव्या हाताला दिसणारी अख्खी दरी डोंगराच्या रेघेवरूनच ओलांडून मग सरळ खाली उतरायचे हे लक्षात ठेवले. अर्ध्या वाटेत बहुधा योग्य फाट्याऐवजी आधीच डोंगर उतरायला लागलो. अर्थात एक खाली जाणारी बऱ्यापैकी रूळलेली पायवाट दिसल्यावर तशी समजूत झाली. अखेर त्याच वाटेने उतरत, १-२ वेळा चुकत आणि शेवटी पूर्ण चुकून एकदाचे गावात उतरलो. तुपेवाडीची शाळा सोडाच, पण शाळेसदृश एकही इमारतबांधणी वाटेत लागली नाही, आणि संपूर्ण वेगळी वाट एन्जॉय करत खाली आलो.
गाडीतून परत येताना समोरून येणाऱ्या दोन छोट्या मुलांच्या हातातल्या पेप्सीकोल्याकडे बघून प्रत्येकाला ’बालपणीचा काळ सुखाचा’ आठवला आणि पेप्सीकोले घेण्यासाठी गाडी थांबवली. मग हायवेवर एकदाच चहापानासाठी थांबून साडेआठला पुण्यात पोहोचलो.
सह्याद्रीत मनापासून भटकण्याची आवड असलेल्यांसाठी कमळगड हे ’शूड नॉट मिस’ असे ठिकाण आहे... एका दिवसात सहज पाहून होईल अशी वाईभोवतालच्या दुर्गसाखळीतली कमळगड ही दिवस सार्थ करणारी कडी नक्कीच आहे!

- नचिकेत जोशी (17/1/2008)

No comments: