Pages

Monday, March 20, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट

छत्रपतींच्या स्वराज्यात, मोहिमांत कुलंगचा उल्लेख कुठेही येत नाही. अलंग-मदन-कुलंग त्रिकुटावर महाराज कधी येऊन गेले किंवा हे किल्ले स्वराज्यात होते का याबद्दल मी तरी कुठेच वाचलेले नाही. जवळ असलेला पट्टा किल्ला (विश्रामगड) स्वराज्यात होता, इतकेच नव्हे तर शिवाजी महाराज मुक्कामालाही पट्ट्यावर आले होते. पण तसं कुलंगरांगेतल्या किल्ल्यांबद्दल सापडत नाही. आदल्या दिवशी कुलंगवर पाणी आणायला जाताना तिथल्या पायर्‍या बघून हाच विचार मनात येत होता. ह्याचं उत्तर इतिहासालाच माहित!

साडेतीन वाजता संजय आणि सूरज जागे झाले आणि वॉकीची बॅटरी रात्रीच केव्हातरी डाऊन झालेली पाहून चांगलेच काळजीत पडले. सागर कुठपर्यंत आलाय हे कळायला काहीच मार्ग नव्हता. अरूण सरांनी त्यांना खिंडीपर्यंत पाठवून हाका मारून यायला सांगितलं. हाकांना प्रतिसाद आलाच नाही. सागर हा अरूण सरांच्या हाताखाली तयार झालेला गडी असल्यामुळे संपर्क झाला नाही तरी सागर आणि मालतेश सुरक्षित असतील ह्याबद्दल शंका नव्हती. पण communication नसल्यामुळे तो नेमका कुठपर्यंत आलाय हे समजू शकणार नव्हते आणि मुख्य म्हणजे वॉकीची बॅटरी डाऊन झाल्यामुळे हा सगळा घोळ झालाय हे त्याला उद्या सकाळपर्यंत कळू शकणार नव्हते. हा उलगडा सकाळीच झाला आणि मजेदारपणे झाला.  त्याचं झालं असं की सागर आणि मालतेश पहाटे अडीच वाजता कपारींपाशी येऊन पोचले. वॉकीवर प्रयत्न केला पण रिप्लाय आला नाही, मग शिट्ट्या वाजवल्या (व्हिसलब्लो) त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. चुलीजवळ भांड्यांची खुडखुड करून जेवण वाढून घेतलं (तरीही कुणाला जाग आली नाही) आणि आवरून ते दोघे तीन वाजता झोपलेही. माझ्या पलिकडेच त्यांनी स्लिपिंग बॅग अंथरली तरी मलाही जाग आली नाही. आणि मग एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी संजय-सूरजला साडेतीन वाजता जाग आली आणि त्यांनी एक तास सागरच्या शोधात घालवला. सागर वर येऊन पोचलाही असेल ही शक्यता त्यांनी हुकवली हे केवळ दुर्दैवच!

सकाळी स्लिपिंगबॅगमधून डोळे उघडून पाहिले तर आकाशात केशरी रंगाचा एक पट्टा क्षितिजरेषेवर पसरलेला दिसला. मुक्कामाची जागा बरीच उंचावर असल्यामुळे झोपल्या झोपल्याही क्षितिजरेषेवरही आकाशच दिसत होतं. मग यथावकाश सगळे उठले आणि शेफ मंदारने भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेला शिरा समोर ठेवला. आणि सांगितलं की, "आपापल्या प्लेट्स आणा आणि व्हा सुरू!" श्वेताचा पाय दुखत होताच. त्यामुळे मी 'आपण अकरा-साडेअकरापर्यंत निघूयाच म्हणजे झापापाशी पोचायला सहा वाजतील आणि पुढे ड्राईव्ह करत पुण्यात रात्री बारापर्यंत तरी पोचू' असं सुचवलं. हे अरूण सरांनी अर्ध्यातच उडवून लावलं. "छे! चार वाजता निघा, चार तासात खाली जाल.". मला मात्र कुठेतरी आत खात्री होती की आपल्याला खाली पोचायला कमीत कमी पाच ते साडेपाच तास लागणार आहेत. त्यात श्वेताचा पाय दुखत असेल तर वेग आणखी कमी होईल.

अखेर ज्या कामासाठी आलो होतो त्याला सुरूवात झाली. कुठले क्लाइंबिंग शूज कोणी घालायचे ह्यावर सूरज-संजयमध्ये चर्चा झाली. मला तर ड्रेसिंगरूममध्ये क्रिकेटपटू समोर पडलेल्या पाच-सात बॅट्सपैकी आज कुठली न्यायची ह्यावर असंच डिस्कस करत असतील असं वाटून गेलं. मीही मागच्याच महिन्यात नवीन हार्नेस-डिसेन्डर-़कॅरॅबिनर घेतले होते. आमच्या मायबोली ट्रेक ग्रूपच्या लिंगाणा ट्रेकमध्ये त्यांचं उद्घाटनही केलं होतं. पण actual क्लाईंबिंगसाठी त्यांचा उपयोग आज होणार होता. पण आधी लीड क्लाईंबर जाणार, मग सेकंड लीड, मग बाकीचे क्लाईंब करणार असल्यामुळे आम्ही निघायच्या आत मला क्लाईंब करायला मिळेल की नाही याबद्दल मी थोडा साशंक होतो. म्हणून मी काही हार्नेस लगेचच चढवला नाही. हळूहळू क्लाईंबिंगचे सर्व सामान खिंडीत पोचवले गेले. चढाईसाठीचा पहिला बोल्ट अरूण सरांनी मारला, तेव्हा अकरा वाजायला आले होते. पहिली सत्तर-एक फूटांची चढाई अरूण सरांनी केली. आणि ते खाली उतरले. पुढची चढाई सूरज करणार होता आणि संजय बिले देणार होता. आता टीम विभागली गेली. श्वेता आणि मंदार दुपारच्या जेवणाचं बघू लागले. रोहित, रोहन, मालतेश, सागर यादव, मिनेश पाणी आणायला पुन्हा कुलंगवर गेले. मी, सागर आणि मिलिंद खालून चढाई बघू लागलो. हे उत्तम शिक्षण होते. क्लाईंबर्स कसे चढतात हे खाली उभं राहून बघायलाही मजा येते. आपापल्या कुवतीनुसार शिकायला मिळतं. संजय बिले कसा देतोय हे बघायला त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. संजयने 'हेल्मेट घातलं आहेस का' हे नजरेनेच तपासून घेतलं आणि तो बिले देण्यात मग्न झाला. सूरजचं क्लाईंब बघत असतानाच वरून एक दगड सुटला. सूरजचा लाऊड कॉल ऐकताक्षणी डोकं खाली केलं आणि कातळाला चिकटायच्या आधीच तो दगड अस्मादिकांच्या हेल्मेटवर आपटून बाजूला पडता झाला. "हेल्मेट नसतं तर?" एवढाच प्रश्न तेव्हा मनात येऊन गेला, एवढंच!

क्लाईंबिंग हे काळजीपूर्वक आणि म्हणून सावकाश करायचं काम आहे. शंभर एक फूटांवर सूरजला छोटा ओव्हरहँग लागला. म्हणून तिथपर्यंत संजयने वर चढावं आणि तिथून सूरजला बिले द्यावा असं ठरलं. संजय तिथपर्यंत पोचला आणि नंतर सूरज तो ओव्हरहँग चढून वर गेला. हे सगळं होईपर्यंत दोन वाजून गेले. आता आपण खाली उतरायला प्राधान्य द्यायचं असं ठरवून 'क्लाईंबिंग पुढच्या वेळी' असं म्हणून मी मुक्कामाच्या जागी परत आलो.

रोहित पाणी घेऊन अजून आला नव्हता. पण श्वेताला पावले टाकायला वेळ लागत होता त्यामुळे 'आपण पुढे होऊया, रोहित मागून येऊन आपल्याला जॉईन करेल' असे ठरवले. एकूण टीमपैकी तीन जण कमी होणार होतो, त्यामुळे तिघांची equipment खाली न्यायचे ठरले. उरलेल्या टीमला उद्या उरलेले सामान घेऊन खाली उतरायला चिकार कष्ट होणार होते, कारण सामान भरपूरच होते. त्यामुळे जेवढं नेता येईल तेवढे आम्ही खाली नेणार होतो. Equipment (हार्नेस-हेल्मेट) शिवाय चार जादाचे रोप्सही सरांनी आमच्याकडे दिले. आता मला खाली पोचायला पाच ऐवजी सात तास लागणार असे वाटू लागले. आधीच अडीच वाजून गेलेले, त्यात आम्ही फक्त तिघे, त्यात श्वेताचा दुखरा पाय, त्यात उतरताना अंधार पडणार हे नक्की! पण काल सागर आणि मालतेश दोघेच मध्यरात्री चढून आले होते, त्यामुळे (त्यात काय?) आपणही जाऊ शकू असं मनाला समजावलं.

कुठल्या वाटेने उतरावं ह्यावर काल बरीच चर्चा झाली होती. त्यानुसार आम्ही पाणी आणायला गेलो त्या ट्रॅवर्सने जाऊन कुलंगच्या मुख्य पायवाटेला लागणार होतो आणि तिथून प्रचलित वाटेने आंबेवाडीकडे उतरणार होतो. आमच्यासोबत मिलिंदसुद्धा रविवारीच पुण्याला निघणार होते पण क्लाईंबिंग सुरू झाल्यावर त्यांनी 'ज्यासाठी एवढं आलोय ते आता समोर दिसतंय (क्लाईंब). तर आता ते करूनच (क्लाईंब) पुण्याला जाईन' अशी प्रतिज्ञा त्या खिंडींत केली. आता फायनली आम्ही तिघेच उरलो. अरुण सरांनी श्वेतालाही थांबवायचा गमतीत प्रयत्न करून पाहिला, पण तिने काही दाद दिली नाही. मग तिचा दुखरा पाय बघून सरांनीही तिला आणि रोहितला जायची परवानगी दिली. तिला सुखरूप खाली नेऊ शकेल असा एकच पुरूष त्यावेळी पृथ्वीतलावर (आयमीन कुलंगवर) मौजूद होता, तो म्हणजे रोहित. रोहितवर माझी एक्स्ट्रा जबाबदारी पडू नये ह्याची काळजी घेत खाली उतरणे एवढाच काय तो माझा रोल होता. ते दोघे थांबले असते तर मग मलाही थांबावेच लागले असते. इतक्या गहन जंगलातून आणि कातळांवरून एकटाच उतरून अंधारात आंबेवाडीकडे जाण्याइतकी हिरकणीची हिम्मत माझ्यात नव्हती. त्यापेक्षा मी ऑफिसला सुट्टी मारणं पत्करलं असतं. (ती अखेर मारावीच लागली, त्याची गोष्ट पुढे येईलच.)

पाणी-टीमला यायला दोनपेक्षा जास्त तास लागले. त्याचं कारण त्यांनी आल्यावर सांगितलं. कुलंगमाथ्यावर कुण्या आगाऊ मुलांनी आग लावून दिली होती. गवताने पेट घेतला होता. ती आग पसरू नये म्हणून आमच्या पाणी-टीमने भरलेले कॅन तिथे वापरले. (कौतुक म्हणजे त्या मुलांनाही आग विझवायला लावली). मग पुन्हा कॅन भरून ते खाली आले. कालच्यापेक्षा त्यांच्याकडे जादाची अशी ४० लिटरची एक प्लॅस्टिकची पाण्याची बॅग होती. अर्धी निम्मी भरलेली ती बॅग पाठीवर घेऊन रोहित खाली आला आणि त्याला पाहिल्यावर आम्हाला हायसं वाटलं. (आता लगेच निघू शकू! - हाऊ सेल्फिश!) त्या बिचार्‍याने उभ्या उभ्याच जेवून घेतलं आणि फायनली फायनली आम्ही तिघे निघालो.

ट्रॅवर्स न मारता, आलो त्याच वाटेने - नाळ उतरून मदनगडाकडे जाणारा ट्रॅवर्स गाठणे आणि तिथून कुलंगच्या प्रचलित वाटेला लागून झाप गाठणे (exactly ज्या वाटेने चढलो तीच वाट) हे ठरले. श्वेताला सोपं पडावं म्हणून सरांनी खिंडीतून उतरताना नाळेच्या सुरूवातीला रोप लावून दिला. (त्या रोपचा उपयोग करून सर्वात आधी मी उतरलो.) आणि त्या रोपच्या शेवटी लावायला आणखी एक रोप दिला. त्याचसोबत गावात पोचवायला अजून तीन एक्स्ट्रा रोप्स दिले. अखेर आमचे स्वत:चे सामान आणि ते रोप्स घेऊन आमची वरात नाळेत शिरली तेव्हा साडेतीन वाजले होते. आता आमचा लीडर रोहित होता. तो सांगेल तसं उतरायचं हे मी स्वत:ला सांगितलं तरी त्याला अनेक प्रश्न विचारणं काही सोडलं नाही. माझं हे असंच होतं. तर ते असो. सरांनी लावलेला पहिला रोप संपल्यानंतर योग्य अशा झाडाला सरांनी दिलेला दुसरा रोप बांधून रोहित श्वेताला न्यायला पुन्हा वर आला. मी त्या दुसर्‍या रोपवरून फ्री-रॅपल करत खाली उतरलो. मला तसं उतरताना बघून बहुधा रोहितच्या डोक्यात एक आयडीया आली आणि तिने आमचे अंदाजे तीन तास वाचवले.

एव्हाना साडेचार वाजून गेले होते. पूर्ण वाट झाडोर्‍यातून आणि दगडांमधून होती. त्यामुळे खाली मोकळ्या प्रदेशात उजेड रेंगाळणार असला तरी आम्ही नाळेच्या वाटेवर असतानाच काळोख होणार होता. सरांनी आमच्याकडे तीन एक्स्ट्रा रोप्स दिले होते. ते असेही तसेही खालीच न्यायचे होते, मग 'जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत त्यांवरून रॅपल करतच खाली जाऊ' ही ती आयडीया. आणि खरोख्खर यामुळे उतरण्याचा वेग वाढला आणि पूर्ण काळोख पडला तोपर्यंत आम्ही मदनगडाच्या ट्रॅवर्सच्या दिशेने बरेच अंतर जाऊ शकलो. तीन ते चार वेळा रोप्स लावता आला. चौथ्या वेळी वरचा रोप रोहित काढून आणत असताना खाली दुसरा रोप नुसताच हातात धरून उभं राहण्यापेक्षा मी तो अँकर करण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्यासाठी शिकण्याची याहून सुवर्णसंधी दुसरी कुठलीच नव्हती. अँकर जमलाय की नाही हे रोहितने सांगितले असते. आणि अँकर केलेल्या त्या रोपवरून पहिला मीच उतरणार असल्यामुळे पहिला प्रयोग माझ्यावरच झाला असता.  हे मला आधी का नाही सुचले असे वाटून मला विलक्षण म्हणजे विलक्षण खिन्नता आली. पण त्याला काही इलाज नव्हता. 'पुढच्या वेळी अशा गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, शिकण्याच्या अशा संधी हातून सुटतातच कशा?' वगैरे स्वगते मी बोलून घेतली.

श्वेताचा पाय कमालीचा दुखत होता. उजवा पाय फोल्ड करायची सोय नव्हती. उतरताना डावा पाय आधी टाकला तर मागे राहिलेला उजवा पाय फोल्ड होत होताच. त्यामुळे प्रत्येक वेळी उजवाच पाय आधी टाकावा लागत होता. आणि हे अगदी लक्षात ठेवून करावे लागत होते. पहिले काही पॅचेस दगडांतून आणि कातळांवरून होते. पण तीन-चार वेळा रॅपल करून झाल्यावर वाट झाडीत शिरली आणि नेमका तेव्हाच अंधार पडू लागला. मुकाट्याने रोप्स कॉईल केले, सॅकवर टाकले आणि हातात काठ्या घेऊन एकामागोमाग एक निघालो. सर्वात पुढे रोहित, त्यानंतर श्वेता आणि सगळ्यात शेवटी मी हा क्रम पार रान संपवून रात्री मोकळ्यावर आलो तरी सोडला नाही.

कसे कुणास ठाऊक, पण त्या नाळेच्या वाटेने आम्ही इतके सरळ खाली गेलो की थेट एका दरीच्या तोंडाशी जाऊन थांबलो. वाटेत मदनगडाकडे जाणारा ट्रॅवर्स क्रॉस झाला होता. आता घड्याळात आकाशात नुकताच उगवलेला चंद्र, घड्याळात सातवर पोचलेला छोटा काटा आणि अखेर चुकलेली वाट. शप्पथ सांगतो, तेव्हा मला ज्जाम टेंशन आले होते. झाप अजून कितीतरी दूर होता. तो अजूनही त्या डोंगराच्या आडच होता. फरक इतकाच होता, की आम्ही ऑलमोस्ट त्या डोंगराच्या उंचीपर्यंत खाली उतरलो होतो. मोबाईलला रेंज नव्हती. आमच्याकडे पुरेसे पाणी होते असे वाटत होते. आणखी पाणी आता आंबेवाडीशिवाय कुठेही नव्हते. त्यात समोर दरी. कालपासून जो काही इथला भूगोल पाहिला होता, त्यावरून एवढे कळले होते, की हे काम साधेसुधे नाही. सह्याद्री ज्या बेलाग, उत्तुंग कडेकपार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे, त्या इथे मुबलक आहेत. जरा पाय घसरला तर प्रकरण महागात जाणार एवढे नक्की. त्याचे एक जिवंत उदाहरण माझ्या आणि रोहितच्या मधून वाट उतरत होतेच. वाट सापडल्यावर कमीत कमी तीन तास खाली उतरायला लागणार होते. अशी सगळी गुंतागुंत डोक्यात सुरू होती. माझी ह्या भागात पहिलीच खेप असल्यामुळे मला ब्रॉड लेव्हलला दिशांचा अंदाज सोडला तर पायवाटांचे बारकावे अजिबात माहित नव्हते. अखेर शेवटचा अ‍ॅरो दिसला ती जागा फारशी दूर नसल्यामुळे आलो त्याच वाटेने माघारी फिरलो. पाच-सात मिनिटात वाट सापडली आणि काल दुपारी जिथे जेवलो होतो, त्या वाटेवर आलो. खरंतर अवघा पंधरा-वीस मिनिटांत हे सगळं घडलं. पण त्या क्षणी डोक्यात चाललेलं सगळं रामायण आत्ता या क्षणीही ठळकपणे आठवतं.

मोकळी जागा बघून सॅक आणि रोप्स खाली उतरवले आणि थोडं खाऊन घेतलं. रेंज आली म्हणून घरी फोन लावला आणि बायकोला वेळेची कल्पना दिली. 'सुखरूप आहे' हे तिला सांगण्यामागचं कारण तिला माहित नसलं मला नुकतंच पटलं होतं. खाली दूरवर गावातून ढोल आणि टिमक्यांचा आवाज येत होता. आज होळीपौर्णिमा! यंदाची ही होळी माझ्यासाठी अभूतपूर्व असा भटकंतीचं दान घेऊन आली होती. आपण ओंजळ पुढे करायची आणि दान स्वीकारायचं. रोहितने मोबाईलवर गाणी लावली आणि अचानक आम्हा तिघांनाही आजूबाजूचं वातावरण भरून गेल्यासारखं वाटलं. आतापर्यंत भवतालची किर्र शांतता ऐकून झाल्यानंतर हा चेंज खूप सुखद होता. वरून कपारीच्या जागेतून आमचे लोक टॉर्च मारत होते. त्यांना आमचे टॉर्चेस दिसत असल्यामुळे आम्ही कुठे आहोत हे त्यांना समजत होते. असा दूरचा आधार त्या क्षणी महत्त्वाचा वाटत होता. पुन्हा सॅक उचलल्या आणि निघालो. सॅक उचलताना खालून काही चिकटलं नाहीये ना, रोपच्या गुंडाळीत काही शिरलं नाहीये ना हे बघायला विसरलो नाही. जेमतेम वीसएक पावले चाललो असू, आणि फांद्या टाकून वाट बंद केलेली आढळली. तरी माहितगार रोहितने त्या फांद्या ओलांडून पुढे जाऊन वाट तपासली. वाट बरोबर होती. त्या फांद्या कुणी आणि का टाकल्या हे काही कळलं नाही. मग थोड्याच वेळात कुलंगची आंबेवाडीतून येणारी प्रचलित वाट लागली आणि मी मनातल्या मनात हुश्श! केलं.

एव्हाना पूर्ण अंधार पडला होताच आणि वाटही आता झाडीतून चालली होती. आधारासाठी मी हातात काठी घेतली होती. कुलंगचा प्रदेश म्हणजे अनेक प्रकारच्या सरपटणार्‍या जीवांचं निवासस्थान आहे. त्यामुळे 'आधारासाठी आता कुठल्याही झाडाला किंवा फांदीला हात लावायचा नाही' अशी सक्त ताकीद रोहितने देऊन ठेवली होती आणि त्याची तो वारंवार आठवण करून देत होता. श्वेताचं प्रत्येक पाऊल तिच्या इच्छाशक्तीचं दर्शन घडवत होतं. वाटेत काल ज्या पायरीवरून तिचा पाय घसरला आणि जो दगड तिच्या गुडघ्यावर घासला गेला, ती जागा आली. तिथे दोन मिनिटे शांत उभे राहिलो. कालच्या त्या दु:खद क्षणांना श्रद्धांजली व्हायला नव्हे, तर आता हे नीट कसं उतरून जाता येईल ते बघायला. श्वेताची जिद्द आणि हिम्मत यांना मी मनातल्या मनात केव्हाच साष्टांग घातले होते. तो पॅचही उतरून पुढे झालो.  वाटेत एके ठिकाणी मोकळी आणि डोक्यावर उघडी जागा मिळाली, तिथे ब्रेक घेतला. नऊ वाजून गेले होते. ज्या गतीने चालत होतो ते बघता 'झापापाशी पोचायला अजून कमीत कमी तीन तास लागतील' अशी एक मनाशी नोंद करून ठेवली. कपारीमधून अजूनही टॉर्च येत होते. त्यांना प्रतिसादाचा सिग्नल दिला आणि पुढे निघालो.

वाटेत एक कोरडा धबधबा लागला आणि फायनली सर्व मोठे उतार संपले. इथून पुढे अजून बरंच अंतर चालायचं होतं, पण ते मोस्टली सपाटीवरून होतं. झाडी तर होतीच. झाडीचा तो शेवटचा टप्पा संपता संपेना. अखेर पुन्हा 'आपण वाट तर चुकलो नाही ना' अशी भीती वाटायला लागली. दर दहा पावलांना तिघे एकमेकांना विचारत होतो, की 'अजून किती चालायचंय? अजून हा पट्टा संपला कसा नाही? येताना तर अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला नव्हता, मग आत्ता का एवढा वेळ लागतोय?' शेवटी आपला वेगच इतका कमी आहे की त्यामुळे एवढा वेळ लागणारच यावर एकमत झाले. घड्याळात अकरा वाजायला आले होते. आजूबाजूला गर्द झाडी, किर्र रात्र, त्यात पौर्णिमा, त्यात बाराची वेळ... मग माझ्या मनात भलतेसलते विचार यायला लागले. 'मागून कोणी हाक मारली तर?', 'किंवा कसला आवाज आला तर?' आणि काय सांगू? असा विचार येत असतानाच माझ्याच पायाखाली काटकी मोडली आणि आवाज झाला. त्या क्षणी काळजात जे धस्स झालंय त्याला तोड नाही! एवढा दचकलो की जागीच थांबून गेलो. 'भीती ही पूर्ण मानसिक असते' ह्यावर त्या अनुभवाने शिक्काच मारला. मन खंबीर असेल तर हे क्षण सहज झेलले जातात. अखेर चार-पाच तास चाललो असं वाटल्यावर (प्रत्यक्षात अर्धा तास चाललो असू) एकदाचा तो टप्पा संपला. मोकळ्यावर आलो आणि माझ्या पुढे चालत असलेल्या श्वेताला चक्कर आली.

श्वेताच्या शारिरिक कष्टांची सर्व परिसीमा केव्हाच ओलांडली गेली होती. गुडघा तर दुखत होताच, पण आता घोट्यावरही भार येऊन तोही दुखायला लागला होता. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर एखादी व्यक्ती कायकाय करू शकते, त्याचं जिवंत उदाहरण गेल्या काही तासांमध्ये मी बघत होतो. ती जे काही चालत होती, त्यासाठी लागणारी एनर्जी कुठून येत होती हे तिलाच माहित! पण म्हणजे याचा अर्थ असाही होऊ शकतो, की आपण आपल्यावर मर्यादा घालून घेतो आणि जगत असतो. त्या कधीतरी मोडून जगलं की आपलं आपल्यालाही समजू शकतं की आपण किती उंच झेप घेऊ शकतो! एव्हाना माझाही खांदा दुखायला लागला होता. पण श्वेताच्या दुखापतीपुढे इतका वेळ त्याच्याकडे लक्षच गेलं नव्हतं. खरं सांगायचं तर आम्ही तिघेही केवळ एकमेकांसाठी आणि एकमेकांना प्रेरित करत चालत होतो. म्हणून केवळ गरजेपुरतंच थांबत इथपर्यंत येऊ शकलो होतो. आमच्यापैकी एक जण (मग तो कुणीही असो) जरी थांबला असता, किंवा हरला असता तर तिघांचं मनोबल खचलं असतं. सुदैवानं तसं काही झालं नाही.

वाट मोकळ्यावर आली असली तरी झाला तेवढा नाईट-ट्रेक पुरे झाला असं बहुतेक सह्याद्रीदेवाला वाटत नव्हतं. झापाच्या अलिकडे एक कोरडी नदी ओलांडायची होती. ती आम्ही इतकी अलिकडे ओलांडली, की तब्बल एक टेकडी अलिकडच्या शेतात उतरलो (हे तेव्हा कळलं नाही). आता हे वाचताना तुमच्या डोळ्यासमोर येत नसलं तरी माझ्या आत्ताही डोळ्यासमोर येतंय. आम्हाला तर हेही कळत नव्हतं की झाप नेमका कुठल्या दिशेला आहे! सुदैवाने (आणि केवळ सुदैवानेच) पौर्णिमेची रात्र असल्यामुळे चंद्रप्रकाश भरपूर होता आणि त्यामुळे आजूबाजूला थोड्या अंतरावरच्या गोष्टी दिसत होत्या. झाडी संपवून मोकळ्या वावरात आलो होतो हेही एक बरं होतं. कपारीतून दिसणारे टॉर्च अजूनही दिसत होते. बिचारे बारा वाजले तरी आमचे लोक्स जागे होते! कारण आमचे टॉर्च दिसत होते, म्हणजे आम्ही पोचलेलो नाही हे त्यांना समजत होतं. 'झापापासून कपार दिसत नाही. आपल्याला टॉर्च दिसताहेत याचाच अर्थ अजून आपण झापापाशी आलेलो नाही', एवढं कळत होतं. दिशांचा अंदाज आजूबाजूला बघून येत नव्हता मग माझ्या डोक्यात एक आयडीया आली. मी सरळ कुलंगकडे बघितलं. आंबेवाडीकडे पाठ करून झापाजवळ उभं राहिलं की कुलंग उजव्या हाताला extended दिसत होता. आत्ता वावरात उभे राहून कुलंगकडे बघितलं तर कुलंग डावीकडे extended दिसत होता. याचाच अर्थ आम्हाला कुलंगकडे पाठ करून अजून उजवीकडे समांतर चालत जायचं होतं. झापाची तीच दिशा होती. तेव्हा कळलं की आपण एक टेकडी अलिकडे उतरलो आहोत. आता ती टेकडी पार कशी करायची ह्यावर विचार सुरू झाला. आणि नशीबाने हात दिला! टॉर्च इकडे तिकडे मारत असताना एका बोर्डवर गेला. बोर्ड? म्हणजे रस्ता असणार हा! आणि उभे होतो तिथून खरंच शंभर फुटांवर रस्ता जात होता. रात्रीच्या वेळी तो दिसलाच नाही. आंबेवाडीकडून इगतपुरीकडे जाणारा एक शॉर्टकट डांबरी रस्ता बांधला गेलाय, तोच हा रस्ता. डांबरी रस्ता लागल्यावर जे सुटल्याचे फिलींग आले ना, त्याची तुलना पेटार्‍यातून निसटल्याच्या फिलींगशीच होऊ शकेल. त्या रस्त्याने आंबेवाडीच्या दिशेला अंदाजे २ किमी चालल्यावर झापाकडे जाणारा कच्चा रस्ता लागला. त्या रस्त्याने झापापाशी पोचलो तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते! कपारीपासून निघाल्यापासून नऊ तासांनी डेस्टिनेशनला पोचलो होतो! आता ताबडतोब पुण्याकडे निघावं की गाडीतच झोपावं हे ठरत नव्हतं. शेवटी 'आंबेवाडीत भोरूकडे सामान पोचतं करू आणि मग ठरवू' असं ठरवलं. तिथे गेल्यावर सगळंच ठरून गेलं.

आंबेवाडीत भोरूकडे रोहित एकटाच गेला आणि भोरूला घेऊन आला. 'सागर सरांचा फोन आला होता. तुम्हाला पोचायला उशीर होणार म्हणून त्यांनी तुमच्यासाठी जेवण बनवायला सांगितलं आहे. आता चला आणि जेवून घ्या.' हे ऐकून फार भारी वाटलं. ह्याला म्हणतात टीममेट्सची काळजी! आणि आम्ही इतकी तंगडतोड करून आलो होतो, की भुकेची इच्छाही विसरलो होतो. त्यामुळे ही बातमी गिफ्टसारखीच वाटली. (सागरला मनातल्या मनात किती वेळा सॅल्यूट मारला असेल याची गणतीच नाही!) भोरूच्या घरी चुलीच्या खोलीत पानं मांडली. चवदार डाळ-भात, भजी आणि पुरणाची पोळी! होळी अशा प्रकारे साजरी झाली! भोरूच्या गृहलक्ष्मीने डाळीमध्ये कशाची फोडणी घातली असेल याचा काही अंदाज लावू शकता? हां... बोला बोला.... तीन ट्राय! उत्तर आहे - दगडाची! नदीपात्रातल्या दगडाची. i was amazed and shocked! मी आयुष्यात पहिल्यांदा दगडाची फोडणी दिलेली डाळ खाल्ली. पण चवीला छान झाली होती. तर इतकं स्वादिष्ट जेवण झाल्यावर लगेच गाडी काढून पुण्यात येणं अशक्यच होतं. चुलीच्या उबेत पथार्‍या पसरल्या आणि झोपलो. दुसर्‍या दिवशी, सोमवारी सकाळी साडेसहाला स्टार्टर मारला आणि राजूर-कोतूळ-ब्राह्मणवाडा-बोटा रस्ता केवळ दुसर्‍यांदाच उजेडात पाहिला. काही प्रवास अटळ असतात, हेच खरं! पुण्यात पोचायला बारा वाजले. ऑफिसला सुट्टी झाली.

माझ्या पहिल्यावाहिल्या expeditionची ही गोष्ट इथे संपते. सह्याद्रीचं आणि टीमवर्कचं हे आगळंवेगळं रूप ह्या दोन दिवसात बघायला मिळालं. टीममधल्या प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं असतं. ते तसं या मोहिमेतही होतं. उतरण्याचा अनुभव दोन गोष्टींमुळे लक्षात राहिल - पहिली, श्वेताची हिम्मत आणि जिद्द आणि दुसरी - रोहितची कमाल. उतरायला सुरूवात केल्यापासून थोड्याच वेळात नाळेच्या वाटेवर रोहित एके ठिकाणी पायाखालचा दगड सटकल्यामुळे ढुं*** वर जोरदार आपटला होता ही गोष्ट त्याने आम्हाला आम्ही खाली मोकळ्यावर येईपर्यंत सांगितलीच नाही. त्याच्या वेदना त्याने आम्हाला सांगितल्या तर नाहीतच, पण जाणवूही दिल्या नाहीत. श्वेताला सुखरूप खाली आणण्याची मोठी जबाबदारी त्याने अतिशय चोखपणे पार पाडली.

ही भटकंतीची गोष्ट माझ्या चिरकाळ लक्षात राहिलंच, पण साठी ओलांडल्यावर (जिवंत असलो तर) कलत्या उजेडात दिवेलागणीला किंवा रात्री झोपताना माझी नातवंडे (नशिबात असली तर) जेव्हा भोवती चिवचिवाट करतील, तेव्हा त्यांनाही सांगेन आणि हे क्षण पुन्हा जगून घेईन. तर दोस्तहो, पुन्हा भेटूच अशाच कुठल्यातरी कडे-कपार्‍यांमध्ये, कातळवाटेवर किंवा घळीत किंवा घाटवाटेवर. तोपर्यंत, have a safe trekking!
शुभास्ते पन्थानः सन्तु |

(क्रमशः)
- नचिकेत जोशी
टीपः चौथा भाग - फोटो आणि उपसंहार.


8 comments:

उंडगा said...

Kaviraj. Best lihilay.

Sahaj suchala mhanun said...

थरारक

tkothawade@blogspot.com said...

झक्कास! मागे एकदा अलंगवरून रेस्क्यू चालू असताना स्वत:जवळचे पाणी देऊन ( तीच मदत करण्याची शारिरीक आणि मानसिक क्षमता तेव्हा होती) आंबेवाडी गाठताना पाण्यावाचून झालेले हाल नजरेसमोर तरळून गेले.ईथे पाऊल ठेवताना आपण आतूनच मजबूत पाहिजे.

Shraddha Mehta said...

Wow... Kulang, Shweta's courage... Simply superb...

Sanjay amrutkar said...

कादंबरीकार हाेणार भाऊ तु ...छान रे

Rohit Nikam said...

Mast re..lihit raha

Unknown said...

Mast .... Khupach mast....☺☺
Hats off to Shweta....👏👏
Actually to all of u....Hats off...😊😊

Sri Selvalakshmi said...

Excellent Article. Thanks for sharing...Egg Manufacturers in Namakkal