Pages

Friday, June 29, 2012

... पुन्हा भेटूच!


('प्रहार' वृत्तपत्रामध्ये मागील वर्षभर लिहिलेल्या 'आडवाटांचे देणे' या स्तंभातील शेवटचा लेख - )
 

दर्‍याखोर्‍यांतली भटकंती हे एक व्यसन आहे. जुने आवडते चित्रपट पुन्हा पुन्हा पाहणे, जुन्या डायर्‍या पुन्हा पुन्हा चाळणे आणि जुने किल्ले पुन्हा पुन्हा भटकणे यामधली मजा काही औरच आहे. गंधाळलेल्या वार्‍याचं, कोसळणार्‍या पावसाचं आणि भिरभिरणार्‍या वयाचं एक बरं असतं - जिथं जातील तिथे चैतन्य फुलवतात.. आणि हे तिघेही हमखास एकत्र भेटण्याची जागा म्हणजे या सह्याद्रीच्या राकट पण राजस अंगाखांद्यावरचे किल्ले! आणि सोबतीला असणारी अत्यंत अभिमानास्पद इतिहासाची अदृश्य सावली!

जुन्या ट्रेकच्या आठवणी जागवताना, 'आपण किती वेळा वाटा चुकलो होतो' हे आठवून आता हसूही येतं आणि उगाच वाटा चुकलो, असंही वाटतं. खरंतर भटकतांना मानसिकतेचा कस पाहणारी, नवीन शिकवणारी अशी ही एक विशिष्ट वेळ असते. ती तेवढ्यापुरती येते आणि निघूनही जाते.

भटकंती करताना वाट चुकल्यामुळे बरेचदा वेळ वाढतो, शक्ती अधिक खर्च होते, प्लॅनिंग कोलमडतं, लवकरात लवकर योग्य वाट न सापडल्यास मनोधैर्यावरही परिणाम होऊ शकतो. कुठल्याही भटकंतीला निघाल्यावर वाटा माहित असणे हे उत्तम प्लॅनिंगचं लक्षण आहे. पण तरीही, वाट चुकण्यातही मजा असते आणि ती आपली आपण शोधण्यात त्याहून अधिक मजा असते. वाटा शोधणे हा भटकंतीचा खराखुरा प्राण आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

भटकंती सुरू केल्यापासून माझं आणि वाट चुकण्याचं एक अतूट नातं जुळलंय. अगदी पहिल्या ट्रेकमध्येही विचित्र प्रकारे वाट चुकल्याचं स्पष्ट आठवतंय. २००० सालच्या एप्रिल महिन्यात राजगडला निघालो होतो. वाजेघर एसटीत बसूनही मित्राच्या सांगण्यावरून मार्गासनी फाट्यानंतरच्या पहिल्या आंब्याजवळ उतरलो आणि तिथून समोर दिसणार्‍या राजगडाकडे चार टेकड्या ओलांडून गेलो होतो. उतरतांनाही, चोर दरवाजातून उतरूनही वाजेघर गावात पोचलो होतो...

एके वर्षी तोरणा ते रायगड भटकंती करत असतांना निवीहून मोहरीकडे जाणारी वाट मध्येच हरवली (म्हणजे आम्ही हरवलो) आणि हारपूडमध्ये शिरण्याऐवजी डोंगरमाथ्यावरच्या धनगरवाडीत पोचलो. मग एक रात्र गोठ्यामध्ये घालवली आणि धनगरबाबांचा उत्तम पाहुणचार घेऊन दुसर्‍या दिवशी मोहरीकडे निघालो.

बागलाण प्रांतातल्या भटकंतीदरम्यानची मुल्हेरगडावरची संध्याकाळ स्वच्छपणे आठवते. मुल्हेर बालेकिल्ल्यावरून मोरागडाकडे जाणारी पायर्‍यांची वाट सापडलीच नाही आणि कातरवेळी, सूर्य जवळजवळ बुडाला असतांना पूर्ण मुल्हेर बालेकिल्ला ओलांडून माचीवरच्या अंधारातून सोमेश्वर मंदिर गाठले होते.

रायगडाचा वाघ दरवाजाचंही असंच! होळीच्या माळावरून निघालं की न चुकता वाघ दरवाजापर्यंत जाऊन पोचलो, असं दरवेळी माझ्यासोबत होत नाही! गडाच्या कुशीत दरीच्या मुखाशी असलेला वाघ दरवाजा हा खरोखर एक चोर दरवाजा असल्याची ग्वाही देतो.

ढाकच्या बहिरीवरून जवळच्या वाटेने सांडशी गावामध्ये उतरण्यासाठी असंच एकदा अर्धा-पाऊण तास खुणेचा आंबा शोधत फिरत होतो. अखेर दिशांचा अंदाज घेऊन, स्टॅमिनाची पुरेशी परीक्षा पाहून झाल्यावर 'त्या' आंब्याने दर्शन दिले आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.

वार्‍यावर स्वार होऊन कुठेही भरकटत जाणार्‍या वयामध्येच डोंगरदर्‍यांत रमायची सवय लागली हे फार बरं झालं असं आता वाटतं! पाठीवर सॅक टाकून एकदा का पाऊलभर आडवाटांमध्ये पाय ठेवला की पुढचं सगळं त्या सह्याद्रीच्या हवाली! कितीही वाट चुकलो, हरवलो, पाणी संपलं तरी "तो" आहे ही सह्याद्रीबद्दलची खात्री उत्तरोत्तर वाढत गेली. अनेक धोपटवाटा हरवत गेल्या, आडवाटा गवसत गेल्या.

प्रिय वाचकहो, हा स्तंभ म्हणजे, गेल्या दहा-अकरा वर्षांत आडवाटांनी दिलेलं हे देणं आपल्यासोबत वाटून घेण्याचा हा एक प्रयत्न होता! कधी वाट चुकल्यामुळे अडचणीत आलो, तर कधी वाट चुकल्यामुळेच धु्क्यातील, पावसातील अनुपम निसर्गाचे साक्षीदार झालो. चुकलेल्या वाटांनी प्रत्येक पावलाला अनुभव दिला, आत्मविश्वास दिला. तो वाचकापर्यंत शेअर करावा एवढाच हेतू होता! यात कसलाही दावा नव्हता, सो कॉल्ड फंडे नव्हते, प्रासंगिक सूचना-सल्ले कदाचित असतीलही पण ते सारे एका भटक्या मित्राचे पक्के सल्ले म्हणूनच स्वीकारले असतील अशी खात्री वाटते! हा स्तंभ सुरू झाल्यापासून अनेक वाचकांनी इमेल, फेसबुकवर प्रतिक्रीया दिल्या, त्यांचे मनापासून आभार! या सह्याद्रीच्या आडवाटांवर कधीतरी नक्की भेटू आणि एकमेकांना मिळालेलं हे "आडवाटांचं देणं" एकमेकांसोबत वाटून घेऊ!
 
तोपर्यंत, शुभास्ते पन्थान: सन्तु |

 - नचिकेत जोशी

(http://www.prahaar.in/madhyantar/madventure/65187.html)

No comments: