Pages

Friday, March 17, 2017

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग!

अलंग-मदन-कुलंग हे सह्याद्रीतलं एक वेगळंच प्रकरण आहे. कळसुबाईच्या सान्निध्यातलं हे त्रिकूट तिच्यासारखंच बेलाग, उंच आणि अवघड आहे. कळसूबाईच्या रांगेतली सगळीच शिखरं कमीअधिक तेवढ्याच उंचीची आणि कस पाहणारी आहेत. कळसूबाई हा सपाट प्रदेशातून आकाशात घुसलेला सुळका नसून, सारख्याच उंचीच्या डोंगरसमूहातलं एक सर्वात उंच शिखर आहे. माणसांचंही असंच असतं की! एखाद्या कर्तृत्त्ववान, यशस्वी, कीर्तीमान माणसाच्या संगतीत कमी-अधिक त्यासारखीच माणसे असतात (असावी लागतात). हे माणूस आणि त्याच्याभोवतीची माणसं याबद्दल झालं. पण हे एकाच माणसातील विविध गुणांबद्दलही खरं असू शकतं. म्हणजे एकाच माणसात अनेक उत्तम गुण थोड्याफार समप्रमाणात असतात आणि त्यातलाच एखादा गुण सर्वोत्तम असतो. म्हणजे कसं, की आशाबाईंचा गाणं हा सर्वोत्तम गुण आहे पण स्वैपाककलाही त्यांना उत्तम येते. सुमन कल्याणपूर गायकीसाठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याच बरोबर लोकरीचे विणकाम, स्वयंपाककला असे इतरही अनेक गुण त्यांच्यात आहेत. तर असो. अ‍ॅनॉलॉजी फारच झाली. मुद्दा हा, की जसा माणूस तशी त्याच्याभोवतीची माणसं. जसं कळसूबाई शिखर, तसे अलंग-मदन-कुलंग.

कुलंगची चढाई सह्याद्रीतली सर्वात मोठी चढाई का आहे ह्याचा पुरेपूर अनुभव त्या दिवशी मी घेतला. त्यात आमची वाट पूर्णपणे कुलंगच्या माथ्याकडे जाणारी प्रचलित वाट नव्हती. अर्धा कुलंग आंबेवाडीतून जाणार्‍या प्रचलित वाटेने चढल्यावर एके ठिकाणी दोन वाटा फुटतात. डावीकडे मदनगडाकडे जाणारा ट्रॅवर्स लागतो आणि उजवीकडे कुलंगची वाट आहे. आता आमच्या लोकल गाईडने, चंदरने, आम्ही लहानपणापासून कुलंगच्याच प्रदेशात वाढले असून दर उन्हाळ्याच्या सुटीत कुलंगला वनभोजन करायला जात असू त्यामुळे आम्हाला कुलंगच्या डोंगरावरच्या सगळ्या वाटा तोंडपाठ आहेत अशी समजूत करून घेतली असावी. कारण स्वत:च्याही खांदा-पाठीवर भरपूर ओझं असून हा कधी भराभर चढून सगळ्यांच्या खूप पुढे जात होता तर कधी सगळ्यांच्या मागे राहत होता. आणि थकला की "लई सामान हाय" असं काहीतरी बडबडत होता. त्या वर सांगितलेल्या फाट्यावर साहेब कुलंगच्या वाटेला लागले तेव्हा अरूण सरांना कसलीतरी शंका आली आणि त्याला सरांनी थांबवले. चार-पाच उलट सुलट प्रश्न विचारल्यावर हे कळलं की चंदरला आम्हाला कुठे घेऊन जायचं आहे तेच कळलेलं नाही. आणि मग पुढची पाच-दहा मिनिटे हातातल्या काठीने त्या पाऊलवाटेवरच सरांनी आडव्या उभ्या रेघा मारून आपल्या त्या कुलंग आणि शेजारच्या डोंगराच्या मधल्या खिंडीत जायचं आहे हे समजावून दिलं. मी 'सर बोलतात कसे, काय काय सांगतात' ह्याचं बारकाईनं निरिक्षण करत होतो. सरांनी अगदी बालवाडीतल्या मुलाला समजावून सांगावं तसं त्याला समजावून सांगितलं. आणि हे सांगतानाही त्याला सतत इकडून तिकडून प्रश्न विचारून खात्री करून घेतली की त्याला नेमकं कळलंय कुठल्या खिंडीत जायचंय ते! याला म्हणतात अनुभव. तर मग मागे येऊन पुन्हा मदनगडाच्या दिशेने ट्रॅव्हर्सवरून आम्ही निघालो.

आता इथे घटना सांगितली पाहिजे, जिचा पुढे येणार्‍या गोष्टीशी खूप जवळचा संबंध आहे. ट्रेक-मोहिमांमध्ये दुखापती या नित्याच्या नसल्या तरी त्यांच्या शक्यता गृहीत धराव्याच लागतात. मागून येणार्‍या श्वेताचा पाय एका पायरीवरून घसरला आणि ती जवळपास सहा-एक फूट खाली घसरली. तिच्या मागेच असणार्‍या रोहनने प्रसंगावधान दाखवून तिला आधार दिला (नाहीतर तिच्या मते फॉल नक्की होता!). पण घसरत असताना पायरीतून बाहेर आलेल्या एक मजबूत आणि टोकदार दगडावर तिचा गुडघा घासत खाली गेला. गुडघा फाटला नाही तरी जबरदस्त मुका मार लागला. एवढं घडल्यावर मी असतो, तर चूपचाप कुणाचंही न ऐकता तिथूनच गावात खाली गेलो असतो. पण आपण नक्की कशाचे बनलेलो आहोत हे सिद्ध करणार्‍या काही वेळा नशिबात लिहिलेल्या असतात. श्वेताच्या नशिबात ती वेळ त्या दिवशी लिहिलेली असावी. तिने तरीही वर येण्याचा निर्णय घेतला आणि रोहित आणि रोहन (बिचारे) तिला शेवटपर्यंत वर घेऊन आले.

मदनगडाच्या ट्रॅव्हर्सला लागल्यावर मग लगेचच एका सुकलेल्या धबधब्याच्या पात्रात जेवायला थांबलो. एक वाजून गेला होता. शनिवारच्या दुपारचं जेवण घरूनच आणायला सांगण्यात आलं होतं. जवळजवळ तासभर जेवल्यानंतर मग पलटण पुढे निघाली. या तासाभरात जेवणाव्यतिरिक्त सागरला, जो संध्याकाळी पुण्यातून निघून रात्रीच मुक्कामाला पोचणार होता, त्याला वाटेबद्दल सूचना देऊन झाल्या. जेवणाच्या ठिकाणापासून काही अंतरावर वाट थेट नाळेत शिरली. आणि इथून पुढचे तीनएक तास आम्ही अंदाजे साठ अंशात फक्त चढत होतो. दगड, कातळ, माती, फांद्या, रॉकपॅच, पाय ठेवायला जागा असू दे अथवा नसू दे, एकच ध्येय - वर जाणे! त्यात पाठीवर ओझे! सॅकच्या वरून टाकलेले रोप्स. चढताना गुडघा फोल्ड व्हायचा. त्या रोप्सची वेटोळी कधी उजव्या गुडघ्यात तर कधी डाव्या गुडघ्यात अडकत होती. गुडघा सरळ व्हायच्या आत ती दिसली तर ठीक, नाहीतर मग झटका बसणार. थोडक्यात, एकाग्रतेचा आणि मानसिक खंबीर बनवणारा लाईव्ह कोर्स करत करत ती चढण चढत होतो. अरूण सर, सूरज, संजय खडूने बाण काढत पुढे जात होते. वाट एकच आणि वरच जाणारी होती हे त्यातल्या त्यात बरे होते. खिंड साधारण दोनशे फूट राहिली असेल. आणि एका ठिकाणी अडकलो. बाणवाले डाव्या बाजूने वर गेले होते आणि आम्हालाही 'आमच्याच वाटेने या' असा दम देऊन गेले होते. चंदर आमच्यासोबत होता आणि त्याने उजवी वाट पकडली. आमच्या मनात डावे-उजवे सुरू झाले. तसा मी तरी कुठल्याच बाजूला झुकलेला नसल्यामुळे लीडरची वाट तीच आपली वाट हे ठरवून डाव्या बाजूने वर निघालो. कारवीची झाडे चिक्कार होती आणि त्यांनीच आधार देऊन मला सुखरूप वर पोचवलं असं म्हटलं तरी चालेल. इकडे उजव्यावाटेने निघालेला चंदर पंधरावीस मिनिटात खिंडीत पोचलासुद्धा. आम्ही मात्र अर्ध्यातच अडकलो होतो. 'चंदरला बाणवाल्यांसोबत न राहता मागे रहायला कुणी सांगितलं होतं?' असं मी मनातल्या मनात म्हणालो. (आम्ही कायम मनातच म्हणायचं असं हक्काचं वाक्य आहे ना आमचं!)

अखेर बरीच धडपड आणि रोप्स वगैरे लावून खिंड गाठली तेव्हा साडेचार वाजले होते. सकाळी साडेनवाला सुरूवात करून इप्सित खिंड गाठायला एवढा वेळ लागला होता. ज्या झापापासून सुरूवात केली होती, तो एका डोंगराच्या आड गेला होता, तो डोंगर चांगलाच दूर आणि खालच्या बाजूला दिसत होता, तर झाप आणखी दूर असणार! आंबेवाडी तर कैच्याकै दूरवर दिसत होती. कुलंगचा ट्रेक जनरली आंबेवाडीपासून ट्रेक सुरू होतो. तिथपासून ते कुलंगचा माथा एवढं अंतर ही चढाई मानली तर ही नि:संशय सह्याद्रीतली सर्वात दीर्घ चढाई आहे.

आंबेवाडीच्या बाजूने बघताना कुलंगच्या डाव्या हाताला एक डोंगर आहे. त्याच्या पोटात काही नैसर्गिक कपारी आहेत. ह्या कपारी हीच आमची मुक्कामाची जागा असणार होती. जागा प्रशस्त आणि हवेशीर होती. भरपूर उजेड, खेळतं वारं, समोर अप्रतिम नजारा होता आणि कामाच्या ठिकाणाहून तीन मिनिटाच्या अंतरावर होती - अजून काय हवं असतं निवार्‍यासाठी? श्वेता-रोहित-रोहन-सूरज सोडून सगळे पोचले होते. राहण्याचा प्रश्न सुटला होता. आता पुढचा प्रश्न होता पाण्याचा. पाणी आणणं मस्ट होतं. पाणी मिळण्याची एकच जागा होती - कुलंगच्या माथ्यावरची टाकी. लगेच आम्ही सहा जण तयार झालो. प्रत्येकाने पाण्याचा ५ लिटरचा एक कॅन आणि दोन-तीन बाटल्या एवढं पाणी आणायचं नक्की झालं. तेवढं सगळं मिळून पन्नासएक लिटर पाणी आणता आलं असतं, जे चौदा आणि रात्री येणारे दोघे अशा सोळा जणांना उद्यापर्यंत पुरलं असतं.

पावणेपाच वाजता कपारीपासून सुरूवात केली. सुरूवातीचा टप्पा सोपा होता. कारण खिंडीपासून सरळ कुलंगला ट्रॅवर्स मारून जायचं होतं. झाडी-कातळात लपलेली पण स्पष्ट अशी एक पायवाट पार करून जायला आम्हाला फक्त पंधरा मिनिटे लागली. लागणारच! सकाळपासून पहिल्यांदाच आमच्या खांद्यावर रिकाम्या बॅग्स होत्या, त्यामुळे सगळी एनर्जी चालण्यावर वापरता आली. ट्रॅवर्स पार केला की ती पायवाट कुलंगच्या प्रचलित वाटेला मिळते आणि मग पुढे दोन्ही पायवाटा पायर्‍या चढू लागतात. ह्या ठिकाणापासूनसुद्धा कुलंगचा माथा बराच उंच दिसतो. असं वाटतं की आपण काहीच चढून आलेलो नाही. अजून एवढं उंच जायचंय हे बघितल्यावर माझा जागीच डॉबरमॅन झाला. (डॉबरमॅन होणे - दम लागल्यामुळे जीभ बाहेर येणे). हे कमी होतं म्हणून की काय, कुलंगच्या पायर्‍या एक एक फूट उंच आहेत. आणि ज्या एक फुटापेक्षा कमी उंच आहेत, त्यांच्या एका बाजूला कडा आणि दुसर्‍या बाजूला exposure आणि फॉल आहे. 'उतरताना कसं होणार' हाच विचार करत मी एकदाचा वर पोचलो. आणि काय सांगू महाराजा! सगळा शिणवटा निघून गेला. जोरदार पश्चिमेचं वारं आणि डोळे सुखावणारा आसमंत! कळसूबाईच्या रांगेतला कुलंग हा शेवटचा डोंगर असल्यामुळे कळसूबाई-अलंग बाजू सोडली तर इतर सर्व दिशांना दूरदूरपर्यंत नजारच नजारा आहे! कुलंगवरून बघताना रतनगड तर 'तासाभरात संपवण्यासारखा' डोंगर वाटतो. लांबवरचा आजोबा, घोटी-इगतपुरी बाजू, पट्टा-औंढ्याकडच्या पवनचक्क्या, खुद्द कुलंगचं पठार आणि दिवसभराची ड्यूटी संपवून मावळतीला निघालेले भास्करशेठ! (ड्यूटी आणि शेठ हे जरा ऑड काँम्बो आहे, मान्य आहे!)

'दिवसभराचा घामेजलेला चेहरा, हातपाय सगळं अर्धी-अंघोळ करून धुवून टाकावं' ह्या प्रेरणेमुळे मी कुलंगच्या पायर्‍या चढून वर आलो होतो. तो विचार टाक्यातलं पाणी ओंजळीत घेतल्याबरोब्बर गारठला. पाणी एवढं थंड होतं की विचारता सोय नाही! त्यात सूर्यदेवांनी जाता जाता सुस्कारे म्हणून गार वारे धाडायला सुरूवात केली होती. मला क्षणभर कळेच ना की मार्च आहे की डिसेंबर? पण कुठलाही महिना असला तरी हेच पाणी भरून घ्यायचं होतं आणि खाली उतरायचं होतं. श्वेताला सुखरूप पोचवून रोहित आणि रोहन लगेचच पाणी आणायला कुलंगवर आले. (काय स्टॅमिना बाप रे!) तासभर तिथे घालवल्यावर मग सगळेच उतरायला लागलो. माझा एक विचित्र प्रॉब्लेम आहे - तुम्हाला म्हणून सांगतो, कुणाला सांगू नका. दरी किंवा exposure डाव्या हाताला असलं की मी निर्धास्त असतो. ते उजव्या हाताला आलं की माझी जाम तंतरते. आता उतरताना ते उजव्या हाताला होतं. म्हणून मग मी मागे रूपेशला थांबवून ठेवलं. आणि प्रत्येक पायरीवर स्वामींचं नामस्मरण करत शेवटी त्या पायर्‍या उतरून आलो. ट्रॅवर्स सुरू झाला तेव्हा अंधार पडला होता. शुद्ध पक्षातल्या चतुर्दशीचा चंद्र मोठ्या आत्मविश्वासाने आकाशातली वाट चालायला सज्ज झाला होता. कपारींपाशी आलो तेव्हा पूर्ण काळोख झाला होता. मी चंद्राकडे खूप निरखून पाहिलं पण 'चौदहवी का चांद'ची एक्स्ट्रा खूबसूरती काही मला दिसली नाही. मग मी त्याच्याकडे टक लावून पाहणं थांबवलं. आम्ही पाणी आणायला गेलो तेवढ्या वेळात किचन डिपार्टमेंटच्या लोकांनी पाण्याच्या शोधासाठी सगळ्यांच्या बॅगा उघडल्या होत्या. तेव्हा त्यांना माझ्या बॅगमध्ये सव्वा लिटरची (इमर्जन्सीसाठी लपवून ठेवलेली) बाटली सापडली होती. और उसकी बदौलत हम सबको शेव बटाटा पुरी नसीब हुई. त्यावर ताव मारला आणि मग बॅग आणि झोपण्याची व्यवस्था लावायला गेलो. मास्टरशेफ मंदारने अप्रतिम चवीचा मसालेभात, आणि फ्लॉवर-बटाटा भाजी बनवली. जेवत असताना सागरचा वॉकीवर कॉल आला. तो आणि मालतेश झापापाशी आले होते. त्यांना अरूणसर आणि सूरजने वाट समजावून दिली. फक्त प्रॉब्लेम असा झाला की एकाने झापापासून आणि दुसर्‍याने कपारीपासून सांगितली. त्यामुळे सगळे उजवे-डावे संदर्भ उलट सुलट झाले. शेवटी संजय मध्ये पडला आणि त्याने (सूरजला) थांबवले. वॉकी ऑन ठेवायचे वायदे झाले. 'ओव्हर अँड आऊट' करून सगळे आपापल्या स्लिपिंग बॅग्जमध्ये शिरले. चिक्क्कार थंडी होती. उन्हाळा असेल या समजूतीने फार काही कपडे आणले नव्हते. पण काय ऑप्शन नव्हता. तरी अरूण सरांनी त्यांच्याकडचा एक्स्ट्रा टी-शर्ट मला दिला म्हणून थोडीफार थंडी कमी झाली.

मोहीम सोमवारपर्यंत चालणार असली तरी मला रविवारीच निघणं गरजेचं होतं. माझ्यासोबत श्वेता आणि रोहितही निघणार होते. श्वेताचा पाय चांगलाच ठणकत होता. हा असाच राहिला तर आलो त्याच्यापेक्षा जास्त वेळ उद्या उतरायला लागणार होता. आजच्या दिवसभरात फक्त बेसकॅंप लागला होता. चढाईचा पहिला बोल्टसुद्धा अजून ठोकायचा बाकी होता. सगळी परिस्थिती बघता मला क्लाईंब करायला मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. ध्यानीमनी नसताना कुलंग किल्ला चढून झाला होता. त्यामुळे या मोहिमेतून क्लाईंब नाही तरी 'टेक अवे' मिळालंच होतं. पहिल्यांदाच टीममध्ये सिलेक्ट झालेल्या खेळाडूला मैदानावर फिल्डींग करायचीही संधी मिळण्यासारखंच हे होतं. आणि त्या घडीला दोनच गोष्टी प्राधान्यावर होत्या - उद्या रात्री कितीही उशीर झाला तरी पुण्यात पोचणे आणि श्वेताला सुखरूप खाली पोचवणे. उद्याचं उद्या बघू असं म्हणून जेवण झाल्यावर कॉम्बिफ्लॅम घेऊन टाकली. आणि देवाचं नाव घेऊन स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी



11 comments:

Unknown said...

Chhan 👌👍

उनाड भटकंती said...

दोन्ही भाग वाजताना धम्माल मज्जा आली. इन्ना सोना आणि चौदवी का चांद.... धम्माल मजा आली.
ब्लॉगच्या अखेर एकच फोटो टाकून वाचण्यात गुंतवून ठेवण्याची अफाट कल्पना. त्यामुळे रंगत वाढली. दोन क्रमश नंतर पुढलं भाग हि लवकर पोस्टा हि विनंती

tkothawade@blogspot.com said...

मस्त एकदम! थोडी छायाचित्र आणि नकाशा जोडला तर घरी बसून मोहिम फत्ते होईल भाऊ!

Sanjay amrutkar said...

कडक रे पाेरा ..

Sahaj suchala mhanun said...

धन्य हो तुम ! __/\__

वडस्करांचा संदिप (मी सह्यवेडा दुर्गवेडा) said...

जबऱ्या , सुपर्रर्रर्रर्रभन्नाट !!! पायऱ्या नकोश्या असल्या तरी कुलंगच्या पायर्या चढताना जाम मजा येते. आम्ही अरुण सरांसोबत मदनगड हौद साफसफाईसाठी गेलो असताना निसर्गाने आम्हालाही तीन ऋतुंचं दर्शन एकाच दिवशी दिलं होतं, कळसुबाई रांगेचा हा परिसर हवामानानुसार अनपेक्षित असाच आहे. लिखाण जबरदस्तच झालंय, एखाददोन फोटो असते तर सोनेपे सुहागा झालं असतं !!!

Unknown said...

Marvellous ...eagerly waiting for next part.

Harshad said...

Waiting for next part.

नचिकेत जोशी said...

सर्वांचे मनापासून आभार :)

फोटोज् चौथ्या भागात आहेत. पहिले तीन भाग फक्त शब्दांतूनच उभे करायचा प्रयत्न आहे.

Rohit Nikam said...

Mast lihitoyas ..

Unknown said...

Khup chan 👏👏👌👌