Pages

Tuesday, January 25, 2011

स्वरभास्कराचा अस्त...

काल पंडितजी गेले...
१० वर्षांपूर्वी पु.ल. गेले तेव्हा आत काहीतरी हललं होतं... काल exactly तेच feeling होतं... दिवसभर ofc च्या गडबडीत असल्यामुळे खूप इच्छा असूनही कलाश्रीवर जाता आलं नाही. त्यामुळे माझ्या एका पंडितजींच्या अत्यंत निस्सिम भक्त असलेल्या मित्राला फोन केला. तो फोनवर रडतच होता.. परवाच एका छोट्या मैफलीत भेटला तेव्हा तो म्हणाला होता की मला पाच रागांच्या नावाने पाच अत्तराचे frangrance तयार करायचे आहेत.. पंडितजींच्या सगळ्या दुर्मिळ रेकॉर्ड्स त्याच्याकडे आहेत.. इतकं वेड्यासारखं प्रेम करणार्‍या त्याच्यासारख्याची ही अशी अवस्था पाहून माझ्या आतलं हललेलं अजूनच खोल खोल जाऊ लागलं होतं.

रात्री घरी गेल्यावर news channels लावून बसलो. सुदैवाने, रात्री १० ते साडेअकरामध्ये दूरदर्शनने गुलजारसाहेबांनी पंडितजींवर काढलेला लघुपट दाखवला. मला जsssरा बरं वाटलं... पंडितजींनी त्यांचा जीवनप्रवास त्या मुलाखतीमध्ये उलगडला.. जुन्या मैफलींची क्षणचित्रे, त्यांच्याकडचे अंदाजे १०० वर्षे जुने असलेले उ.अब्दुल करीम खाँसाहेबांचे तानपुरे आणि नवीन पिढीतल्या कोणत्या शिष्यांकडून अपेक्षा आहेत या प्रश्नाला "आनंद भाटे" हे पंडितजींनी दिलेले उत्तर (आनंद भाटे हे COEP चे माजी विद्यार्थी, डिसेंबर ०९ मध्ये एका कार्यक्रमात मी निवेदक होतो आणि आनंदजींनी गायलेल्या "केतकी गुलाब जूही.." ने सभागृह भारून गेलं होतं, ते अनुभवायला मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो, ते काल आठवलं), त्यांचा कार चालवण्याचा शौक, त्यांच्या गुरुबंधूनी - उ अमजद अली खाँ साहेबांनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी या सगळ्यांनी ती मुलाखत काल रंगली...
आज मटाने सुंदर लेख दिले आहेत, सकाळनेही त्यांचा प्रवास छान मांडला आहे..

आता फक्त आठवणीच उरल्या आहेत...

हिमालयाएवढं कर्तृत्त्व असलेली ही एक एक माणसं आपलं हे जग सोडून चालली आहेत. पु.ल. गेले, भटसाहेब गेले, बिस्मिल्लाह खाँसाहेब गेले, विंदा गेले, अजून किती तरी... अशा वेळी आतमध्ये कातरत राहते..
भटसाहेब म्हणतात तसं "विजा घेऊन येणार्‍या पिढ्यांशी बोलतो आम्ही" हे कितपत खरं आहे? काल मुलाखतीमध्ये सुद्धा पंडितजींनी "माझं नाव गुरूस्थानी लावणारे बरेच आहेत, पण आशादायी गाणारे फार कमी" असं विधान का केलं असावं?

काही दिवसांपूर्वी सारेगमामध्ये कल्याणजी आले होते. स्पर्धक गात असतांना हे उस्ताद कानाला काही हेडफोन वगैरे न लावता चेहर्‍यावर एक प्रकारचा टवटवीतपणा घेऊन गाण्यांचा आनंद घेत होते. आणि तरीही सुरांचं परीक्षण अगदी बरोब्बर करत होते. मला खूप कौतूक वाटलं... हे त्यांनी कुठून कमवलं? किती साधना केली असेल? किती वर्षं लागली असतील? निष्ठा, एकाग्रता, पैसा, पोट कसं balance केलं असेल?

दोन दिवसांपूर्वी डॉ. अरूणा ढेरे एक अनौपचारिक गप्पांच्या वेळी सहज बोलून गेल्या - की हल्ली केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेले बरेच जण दिसतात, पण संशोधनाच्या, निर्मितीच्या क्षेत्रात अफाट कर्तृत्त्व असणारे फार फार कमी उरले आहेत..

तेवढी उंची गाठायला एक एक आयुष्य खर्ची घालावं लागतं हे आम्हाला कधी कळणार?? मला कधीकधी असंही वाटतं, की ह्या आभळाएवढी तपस्या आणि हिमालयाएवढं कर्तृत्त्व असलेल्या माणसांनंतर पुन्हा तशीच माणसं "तयार" होईपर्यंतच्या मधल्या काळात आदर्श कोण असणार?

ही सुद्धा एक प्रकारची "generation gap"च नाहीये का?

नचिकेत जोशी (२५/१/२०११)

3 comments:

Sthiti Chitra said...

sundar! same feelings...

sagarkatdare said...

छान आहे..विचार करायला लावणारं आहे !!

Harsh said...

खरंय... आणि छान लिहिलंय.