Pages

Wednesday, January 26, 2011

सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग ३

थोडक्यात पात्रपरिचय: नाव आणि कंसात माबो आयडी
यो : योगेश कानडे (यो रॉक्स)
ज्यो: गिरीश जोशी
अवि: अविनाश मोहिते (अवि_लहु)
रोमा किंवा रो: रोहित निकम (रोहित एक मावळा)
मी: नचिकेत जोशी (आनंदयात्री)

२६ डिसेंबर: उर्वरित साल्हेर, मुल्हेर आणि फक्त मुल्हेर

आज संध्याकाळच्या शेवटच्या २० मिनिटांमध्ये जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे घडले असते, तर मी शीर्षक उर्वरित साल्हेर, मुल्हेर आणि मोरागड असे लिहून याही लेखाचा शेवट We were running as per the schedule असा केला असता! तसं झालं असतं तर प्लॅननुसार सातवा किल्लाही झाला असता... अर्थात ट्रेकमध्ये अशा अनिश्चिततांना सामोरे जावेच लागते.त्याची सविस्तर कहाणी पुढे येईलच.

उंदरांचा धुमाकूळ मध्यरात्रीनंतर केव्हातरी थांबला आणि मला गाढ झोप लागली. पहाटे रोमा आणि अविचे मोबाईल कुठलेतरी भन्नाट सूर आळवू लागले आणि गजर झाला, ५ वाजले असे म्हणून सर्वजण वेळेवर उठलो. तब्बल आठ तास घड्याळी झोप मिळाल्यामुळे थकवा दूर पळाला होता आणि मोठा पल्ला गाठण्यासाठी आम्ही तयार होतो. दिवसाच्या सुरूवातीचा प्लॅन होता- परशुराम मंदिरापासून होणारा सूर्योदय बघणे आणि लवकरात लवकर गड उतरणे!

चुलीत धगधगत असणाऱ्या निखाऱ्यांवर फुंकर मारून गरम पातेल्यात पाणी गरम केले, हातपाय धुतले, चहा बनवून प्यायलो आणि आकाशात उजाडायला थोडा वेळ असतानाच आम्ही निघालो. (मंदिरात जायचे होते ना मग अंघोळ केली नाही का? हा प्रश्न आमच्याप्रमाणेच वाचकहो, तुम्हालाही पडला नसेल ही खात्री आहे मला... ;) )काल अडखळती सुरूवात करणारा रोमा आज पहिल्या पावलापासूनच फुल फॉर्मात होता. गुहेशेजारूनच परशुराम मंदिराकडे वाट जाते. परशुराम मंदिर गुहेपासूनसुद्धा बरीच उंच आहे तसेच उभा चढ आहे. त्या अंधारातसुद्धा रोमा पटापट वाट काढत पुढे गेला आणि पाठोपाठ टॉर्चच्या प्रकाशात आम्हीही मंदिरापाशी दाखल झालो.
वाटाडा रोहित- (मागे मंदिराची टेकडी)


हे मंदिर-


सूर्य उगवायला थोडासाच वेळ बाकी होता. पहाटेच्या रंगांची मनसोक्त उधळण ’त्या’ निर्मिकाने क्षितिजाच्या सीमेवर केली होती. हुडहुडी भरवणारा गार वाराही सुटला होता. साल्हेरच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या एकुलत्या एका चिमुकल्या मंदिराच्या फरसबंदीवर उभे राहून आम्ही सूर्योदयाच्या आणखी एका अनुपम सोहळ्याचे साक्षीदार होत होतो... :)






त्या वेळी मनात आलेले विचार सगळेच्या सगळे तसेच्या तसे शब्दबद्ध करणे खरं तर अवघड आहे... कारण अशावेळी आपणच नि:शब्द होऊन जातो. त्या स्थितीचे वर्णन करायला कुठलेही गाणे, कविता, गझल, सिनेमाचा ड्वायलॉग असं काही काही आठवत नाही... (सगळं सुचतं ते नंतर!)पंचेंद्रियांना होणाऱ्या संवेदना, जाणीवा एवढाच काय तो ते क्षण अनुभवल्याचा पुरावा! मन वगैरे काही मामला असेलच, तर तो अशा वेळी पूर्ण शांत होऊन गेलेला असतो. मला पूर्ण जाणीव आहे की हे असे अनुभव व्यक्तिसापेक्ष असतात, पण ट्रेकमध्ये काय अनुभवायला आवडते याचे माझे उत्तर "ही अशी शांतता" हे नक्कीच असेल. मला नेहमीच अशा दिल को छू जानेवाल्या शांततेत मिसळून जायला आवडते. :)

थोड्य़ाच वेळात मुल्हेरडोंगररांगेच्या उजवीकडून सूर्य वर आला. पुढचा अर्धा-पाऊण तास सर्व प्रकारचे फोटो मनसोक्त काढून घेतले.
हा मी -


हा अवि-


अखेर जवळजवळ पावणेआठ वाजता पाय खाली गुहेच्या दिशेने ओढायला सुरूवात केली. उतरताना एका वेगळ्या पण (त्यातल्या त्यात :) )सोप्या वाटेने उतरलो.
ही ती वाट-


पटापट सॅक्स पॅक केल्या, टाक्यातून पाणी भरून घेतले, अविने भांडी आणि चहा गाळायचा रूमाल धुऊन घेतला. तोपर्यंत आम्ही गुहा साफ केली, सर्व कचरा प्लॅस्टिकबॅगमध्ये भरून घेतला आणि पावणेनऊला साल्हेरवाडीच्या दरवाजाच्या दिशेने निघालो. आधी म्हटल्याप्रमाणे गडाचा विस्तार खूप मोठा आहे. पूर्व-पश्चिम साधारण एक किमी आणि दक्षिणोत्तर अर्धा किमी इतका गडाचा विस्तार असावा.
गडावरून घेतलेले काही फोटॉ-



मंदिरापासून -


परतीच्या वाटेवर गुहेपासून पश्चिमेला बरेच चालून आम्ही दरवाजापाशी आलो. दरवाजावर बाहेरच्या बाजूला नागाची कात पाहिली आणि पायऱ्या उतरू लागलो. पायऱ्या सुंदर आहेत.


एकूण गडाची बांधणीच अप्रतिम आहे. पुरातन काळात साल्हेरचा एक अवघड किल्ला असाच उल्लेख आढळतो. सुरतेच्या लुटीवेळी महाराज साल्हेरमार्गेच गेले/आले होते. साल्हेरची वाट गडाला anticlockwise वळसा घालून उतरते. इतक्या वळसा मारल्यानंतरही सालोटा किल्ला अजिबात दिसत नाही, इतका गडाचा घेरा मोठा आहे!






उतरायला अर्ध्या वाटेपर्यंत पायऱ्या आहेत, त्यावरून हाच गडाचा मुख्य दरवाजा असावा असे वाटते. त्या बऱ्याचशा फुटलेल्या अवस्थेत आहेत आणि दगड-धोंडे वाटेवर पसरलेले आहेत. त्यातून वाट काढत आम्ही मात्र अवघ्या एक तासात गड उरतलो.


साल्हेर गावामध्ये काही तरूणांनी येऊन आमची ’चौकशी’ केली. त्यांच्याशी बोलताना असे कळले, गुजरात सीमा अगदीच जवळ असल्यामुळे देशविघातक शक्तींचे हस्तक त्या भागात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिथली जनता नव्या चेहऱ्यांची खूप चौकशी करत असते. आमची विचारपूस हा त्यातलाच एक भाग होता. आम्हीही त्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. कुठल्याही ट्रेकमध्ये स्थानिक गावकऱ्यांशी आपण होऊन संवाद साधणे हा आमचा अगदी आवडीचा भाग असतो. त्यामुळे त्यांच्या या विचारण्याचे आम्हाला काहीच वेगळे वाटले नाही. ’या प्रदेशात जर स्थानिकांनी चौकशी केली तर नीट उत्तरे द्या, नाहीतर इथले तरूण बदडायलाही कमी करणार नाहीत’असा सूचक सल्ला ऐकून घेऊन आम्ही मुल्हेरकडे जीपने निघालो. :) परत येताना जीप वाघांबेमार्गे मुल्हेरला येते. साल्हेर-वाघांबे अंदाजे ६ किमी आणि मुल्हेर-वाघांबे ८ किमी असेल. मुल्हेर गावात उतरलो तेव्हा अकरा वाजले होते.

गावातून मुल्हेर किल्ला दूर दिसत होता. ते अंतर २ किमी असल्याचे कळले. (त्यावरून दुसरे कुठलेही गाव किल्याच्या पायथ्याशी नाही हे ओळखले.) गावात एका उपहारगृहात नाश्ता केला, चहा घेतला आणि एक टमटम ठरवली. त्याने मुल्हेरच्या पायथ्याजवळ कच्चा रस्ता सुरू होतो तिथपर्यंत पोहोचवले. उतरल्यावर एका म्हातारशा गावकऱ्याने सखोल चौकशी केली आणि तुम्ही हरगड-मुल्हेर-मोरा हे तीनही किल्ले २४ तासात कसे बघाल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ज्योने मधूनच त्याचे वाक्य पूर्ण करायचा प्रयत्न केला की मात्र बाबाजी कसानुसा चेहरा करून म्हणायचा, ’तुमी ऐकून घेता का जरा मी काय बोल्तोय ते?’ :D असे दोन-तीनदा झाल्यावर योने एन्ट्री घेतली. बाबाजीचा प्लॅन आमच्या प्लॅनशी एक गोष्ट सोडून तंतोतंत जुळत होता. ती म्हणजे त्याची इच्छा होती आम्ही तिथून खिंडीच्या वाटेने हरगड आधी करावा. मग मुल्हेरवर जावे, आणि मग निवांत मुल्हेर-मोरा गड बघावेत. आमच्या प्लॅनमध्ये मुल्हेरवर जावे, सॅक्स मंदिरात ठेवून मुल्हेर-मोरा बघावे आणि उद्या सकाळी हरगड करावा असे होते. अखेर वजन मंदिरात ठेवल्यामुळे निवांत फिरता येईल असा विचार करून आम्ही मुल्हेर माचीकडे रस्ता वळवला.


त्या कच्च्या रस्त्यानेही अंदाजे एक किमी चालावे लागते, तेव्हा चढण सुरू होते. मुल्हेरच्या उंचीच्या अर्ध्यामध्ये माची आहे. त्यामुळे आम्हाला खूप कमी अंतर चढावे लागणार होते. चढ अंगावर येणारा असला आणि आम्ही बाराच्या उन्हात चढत असलो, तरी माचीवर पूर्ण झाडी असल्यामुळे आम्ही खूष होतो. वाटेत एके ठिकाणी दोन वाटा फुटल्या होत्या. तिथपर्यंत उत्साहात पुढे निघून आलेला मी दोन वाटा दिसल्यावर मात्र थांबलो. मागून येणाऱ्या रोमाने (लगेच) नकाशे काढून अभ्यास करायला सुरूवात केली, ज्यो आणि अवि उजव्या वाटेने तपासायला निघून गेले. रोमाच्या नकाशानुसार सरळ वाटेने पुढे गेल्यावर एक तोफ दिसणार होती आणि ती वाट पुढे बंद होत होती. आम्ही वाट नाही तर नाही, तोफ दिसेल म्हणून पुढे निघालो. खरंच १०० एक मीटर वर छोट्या झऱ्यामध्ये अडकलेली एक मोठी तोफ सापडली.


तिच्यावरच्या ’ताज्या शिलालेखा’नुसार १९-०९-०६ ही तारीख दिसली. (या तारखेला कुठल्यातरी फुल्या फुल्या माणसाने तिथे येऊन गेल्याची तारीख कोरली असावी!!) कारण दुसरा कुठलाच संदर्भ लागला नाही. असो. रोमाने आणलेल्या नकाशाचा उत्तम उपयोग झाला आणि आमचा कमीत कमी १ तास वाचला. (नकाशा नसता तर तोफ दिसली म्हणजे वाट बरोबर आहे असे समजून आम्ही पुढे गेलोही असतो). मागे आलो आणि त्या फाट्यावरून उजवी वर जाणारी वाट पकडून सावकाश चालत दरवाज्यापाशी आलो. ३ दरवाजांची साखळी ओलांडून बरेच चालून गणेश मंदिरापाशी आलो. एव्हाना २ वाजत आले होते. वेळ वाया गेला नव्हता आणि यानंतरही सूर्य मावळायला चार-साडेचार तास बाकी होते.

गणेशमंदिर अप्रतिम आहे. नऊ खांबांवर बांधले गेलेले पुरातन वास्तूकलेचा नमुना असलेले हे मंदिर त्या काळच्या वैशिष्ट्यांची झलक देते.
हे गणेश मंदिर (मागे हरगड)


ते बघून सव्वादोनपर्यंत सोमेश्वरमंदिरात आलो. समोर मोरा आणि उजव्या हाताला मुल्हेर अशा दोन्ही गडांच्या कुशीत अतिशय शांत परिसरात मंदिर उभे आहे.
हे मंदिर (डाव्या कोपर्‍यात मोरागड)




आजचा मुक्काम या मंदिरात असणार होता. मंदिराच्या मागे एका संन्यासीबाबांचे घर आहे. बाबा सबंध पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहेत. बाबांचे आसपासच्या गावांमध्ये भक्तही असावेत. कारण मुल्हेरगावातून गडावर आलेले लोक त्यांच्याबद्दल श्रद्धेने बोलत होते. बाबांना आम्ही आमची ओळख करून दिली आणि आजचा मुक्काम व जेवण मंदिरात करणार असल्याचे सांगितले. त्यांनी अनुमती दिल्यावर सॅक्स पसरल्या. गावातून दर्शनासाठी आलेल्या दोन तरूणांकडून मुल्हेर-मोरा पुढच्या तीन तासात कसे बघता येतील याबद्दल गप्पा मारल्या.

मुल्हेर आणि मोरागड हे केवळ एका भिंतीने वेगळे केलेले आहेत. किंबहुना मोरा हा बऱ्याच जणांच्या मते मुल्हेरचेच extension आहे. मंदिराच्या मागून माचीला समांतर एक वाट जाते. त्या वाटेने गेल्यास हत्ती टाके आणि मोती टाके अशी दोन टाकी लागतात. त्या टाक्यांच्या मधल्या काठावरून एक वाट वर चढते. कातळात कोरलेल्या मारुतीच्या जवळून ती वाट गडावर जाते. मुल्हेरवरून त्या मधल्या भिंतीवरून मोरागडाकडे एक वाट येते. त्यावाटेने येऊन मोरागड बघावा आणि उतरतांना त्या भिंतीच्या खालून, मुल्हेर आणि मोरा यांच्या मधल्या दरीतून एक वाट थेट सोमेश्वरमंदिराशी येते. आम्ही ह्याच route ने दोन्ही किल्ले बघावेत असा सल्ला त्या दोघांनी दिला. उतरतांना अंधार पडल्यास कातळातील मारूतीच्या वाटेपेक्षा समोरची वाट सोपी आणि फक्त उताराची आहे, तसेच सोमेश्वरमंदिर सतत खाली दिसत राहिल, म्हणून उतरतानाच इथून उतरा असे त्यांचे मत होते. आम्ही त्यानुसार गड बघायला निघालो.

कातळातला मारूती-


अर्ध्या तासात मुल्हेरच्या बालेकिल्यावर पोचलो.
पहिला दरवाजा आणि त्यानंतरच्या गुहा-






उंचीवरून खालच्या अंगाला झाडीत मिसळून गेलेल्या माचीचा सुंदर नजारा दिसतो. आम्ही मंदिरसदृश एक आणि खोलीसदृश एक अशी दोन बांधकामे दिसली. ती खोली म्हणजे रोमाच्या नकाशात दिसणारी राजवाड्याची साईट असावी! बालेकिल्ल्यावर अर्धा-पाऊणकिमी चे अवाढव्य पठार आहे! संपूर्ण गडावर फक्त दोन झाडे आम्हाला दिसली. बाकी सब गवत आणि झाडपत्ती! रोमाच्या नकाशानुसार ठिकाणे बघायला लागलो. राजवाड्याच्या दरवाजाची चौकट वगळता संपूर्ण पडका राजवाडा, ७-८ पाण्याची टाकी, एक चोर दरवाजा, भडंगनाथांचे वडाच्या झाडाखालचे मंदिर आणि मंदिरासमोरील पाण्याचे अतिविशाल टाके एवढ्या एका वाक्यात मुल्हेरच्या बालेकिल्ल्याचे वर्णन संपत असले तरी बालेकिल्ल्यावरून दिसणारा नजारा मात्र शब्दांपलिकडचा आहे. साल्हेरवरून दिसला नव्हता इतका विशाल आणि नजरबंदी करणारा view मुल्हेरवरून दिसतो. सातपुडा आणि सह्याद्रीच्या रांगा, वळ्या पडलेले डोंगर, एकमेकांना चिकटून उभे असावेत असे वाटणारे अनेक लहान-मोठे सुळके... केवळ अप्रतिम!!
नुसतीच चौकट, बाकी सगळं गायब!-


मुल्हेरवरून दिसणारा view -










अतिविशाल टाके-


भडंगनाथांचे मंदिर-

एवढं सगळं बघेपर्यंत आणि कॅमेरात बंद करेपर्यंत सूर्य केव्हा खाली आला ते कळलेच नाही आणि त्याचवेळी ट्रेकमधल्या "त्या" अनिश्चितता नावाच्या घटकाने आमच्या प्लॅनपेक्षा वेगळे स्क्रिप्ट लिहायला सुरूवात केली...


घड्याळात पावणेसहा वाजले होते. प्रकाश भरपूर होता. सूर्यही लालेलाल झाला नव्हता. भडंगनाथांचे मंदिर बघून समोरच दरीपलीकडे दिसणाऱ्या मोरागडाकडे पावले वळवली. मध्ये फक्त एक भिंत होती. ती पार केली आम्ही मोरागडाच्या पायऱ्यांशी पोहोचलो असतो. मोरागडावर पहायला २ दरवाजे, ३ टाके एवढेच अवशेष आहेत. ते पहायला जास्त वेळ लागला नसता. त्या भिंतीकडे जाणारी वाट मात्र काही केल्या सापडेना! सर्वत्र कमरेइतके कोरडे गवत वाढले होते. त्यातून वाट काढत मोराच्या दिशेने गेलो तर थेट कड्याच्या टोकाशी पोहोचलो. रोमा आणि ज्यो दोन वेगवेगळ्या दिशांनी वाटा शोधायला ’सुटले’. प्रश्न एकच होता - वेळेचा! अजून फारतर २० मिनिटात सूर्य मावळला असता. आणि नंतर अजून जास्तीत जास्त १५-२० मिनिटं नुसत्या डोळ्यांना वाट दिसू शकण्याइतका प्रकाश उरला असता. तेवढा वेळ मोरागड पाहण्यासाठी पुरेसा होता. तो प्रकाश असेपर्यंत आम्ही मोरागड उतरायला सुरूवात करणं आवश्यक होतं. मी आणि योने नकाशा पाहून वाट शोधायचा प्रयत्न केला. रोमा कातळ उतरून गवतावरच्या वाटेकडे गेला होता. पण एका कड्याच्या टोकापाशी जाऊन त्याचा शोध संपला. त्या ठिकाणापासून भिंत खालच्या बाजूला अंदाजे १०० फूटांवर होती आणि पलिकडे मोरागड! परंतु मधला कडा उतरणे अशक्य होते. ज्यो तसाच वरच्या अंगाला गवतातून मागे पळत गेला व पुन्हा वळसा घालून वाट दिसते का ते बघू लागला. चुकामूक नको म्हणून मी, यो आणि अवि जागच्या जागी थांबून दोघांचा अंदाज घेत होतो. भराभर वेळ संपत होता. सूर्यही लाल झाला होता, आणि प्रकाश झपाट्याने कमी होत होता.

प्रसंग फारच अटीतटीचा झाला होता. आम्हाला वाट शोधायला सुरूवात करून २० मिनीटे होऊन गेली होती. ज्यो आणि रोमाला वाट सापडत नव्हती. १० मिनिटात सूर्य क्षितीजाच्या आड नव्हे, तर मुल्हेरमागच्या डोंगराआड जाणार होता. त्यानंतर फारतर २० मिनिटे प्रकाश उरला असता. आम्हाला मंदिरात पोहोचायला धावत सुटलो तरी अंदाजे २५ मिनिटे हवी होती. अशा परिस्थितीत आत्ता जरी वाट सापडली असती तरी मोरागड बघेपर्यंतच अंधार पडला असता. बरं, ती दरीची वाट आम्हालाही नवीन असणार होती. अंधारात सोमेश्वरमंदिर दिसण्याची खात्री नव्हती. हे सगळे विचार माझ्या आणि योच्या मनात एकाच वेळी सुरू होते. अजून फारतर ५ मिनीटात निर्णय घ्यायचा होता. नाहीतर आलो त्या वाटेनेसुद्धा उतरायला अंधार झाला असता...

अखेर, सर्व विचार करून मी आणि योने एकाच वेळी दोघांनाही हाक मारून परत फिरायला सांगितले. सव्वासहा वाजत आले होते. सूर्य एव्हाना डोंगररांगेला जवळजवळ टेकला होता. आलो त्या वाटेने उतरण्यासाठी बालेकिल्ल्यावरील पठार संपूर्ण पार करून मग तीन दरवाज्यांची साखळी ओलांडायची होती. अंधारात मोती टाके आणि हत्ती टाके शोधणे अवघड झाले असते. त्या टाक्यांपासून पुढे नियमीत पाऊलवाट होती. त्यामुळे अंधार पडायच्या आत पूर्ण बालेकिल्ला उतरून माचीवरील ती दोन टाकी गाठणे हे प्रथम ध्येय होते.

झाले. पाच जण पठारावरून शक्य तितक्या गतीने चालत (जवळजवळ धावतच) मागे निघालो. पठार पार झाले, बालेकिल्ल्याचा तिसरा दरवाजा, तुटक्या पायऱ्या, दुसरा दरवाजा, रॉकपॅचेस, पहिला दरवाजा, अरूंद ढासळलेल्या पायऱ्या हे भराभर मागे पडत गेले. कातळातला मारुती अंधूक होऊ लागला होता. ठाशीव पण तीव्र उताराच्या पायवाटेवरून मी, अवि आणि यो धावत सुटलो होतो. काही कारणांमुळे रोमा आणि ज्यो मागे राहिले होते. यात किती वेळ गेला होता कोण जाणे! आता ध्येय होते उतार उतरून टाकी गाठणे! मध्येच एके ठिकाणी ज्यो आणि रोमासाठी थांबलो. ती १-२ मिनिटेसुद्धा १० मिनिटांइतकी दीर्घ वाटत होती! लवकरच ते दोघे येऊन मिळाले. आता जवळजवळ काळोख पडायला आला होता. टॉर्च पेटवले आणि पुन्हा ११ नं ची बस सुसाट सोडली. वाटेत डाव्या हाताला खालच्या अंगाला एक पांढरट बांधकाम दिसले. आम्हाला वाटले टाकी आली.. टाक्यांचा रंग जरी आठवत नसला तरी, आकारमानावरून त्या ह्या टाक्या असाव्यात(च) असे म्हणून तिथेच खाली उतरू लागलो. जवळ गेल्यावर असे लक्षात आले की ही टाकी नसून मगाशी वरून पाहिलेले राजवाडासदृश बांधकाम आहे आणि टाकी अजून बरीच पुढे आहेत! प्रकाश... संधिप्रकाश...अंधार... अनोळखी रान... हरवलेल्या वाटा... इतरत्र गवत आणि झाडी... सरपटणाऱ्या ’शक्यता’... आणि शेवटी पूर्ण अंधार पडल्यास तिथेच रानात उघड्यावर रात्र काढायची मानसिक तयारी!! विचार कुठल्याकुठे हेलकावे घेत होते... त्या धावल्यामुळे घामाघूम झालेल्या अवस्थेतही माझ्या अंगावर थंडगार शिरशिरी आली! फक्त धावतानाही पायांनी ग्रिप घेत जात होतो, ही एक समाधानाची गोष्ट होती! तरीही, एके ठिकाणी माझा डावा पाय सटकला आणि कमरेपर्यंत वाटेबाहेरच्या खंदकात गेला. उजव्या पायावर सावरत असतानांच मला घसरलेला बघून मागून येणारा ज्यो इतक्या जोरात ओरडला, की पडल्यापेक्षा त्याच्या आवाजानेच मी दचकलो! बहुधा अजून ५० एक पावले पुढे गेलो असू, डाव्या हाताला खाली, १०० फुटांवर झाडीमध्ये अखेर दोन टाकी रोमाला दिसली. अत्यंत अत्यंत वेळेवर, पायाखालची वाट दिसेनाशी झाली असतांना आम्ही टाक्यांपाशी येऊन पोहोचलो होतो. टाक्यांच्या काठावरचे वडाचे झाड प्राप्त परिस्थितीमध्ये आणखीनच भीती वाढवत होते! तिथून पुढचा रस्ता सोपा होता. ते अंतर पार करून जेव्हा सोमेश्वरमंदिरात परत आलो, तेव्हा सात वाजायला दहा मिनिटे कमी होती!

तसं म्हटलं तर सव्वासहा ते सहा वाजून पन्नास मिनिटे - उण्यापुऱ्या पस्तीस मिनिटांचा कालावधी! पण एका विलक्षण thrilling अनुभवातून आम्ही सगळे गेलो होतो! तेव्हा ज्ज्जाम टेन्शन आले होते तरी त्या एका अनुभवामुळे मला तरी अख्खा ट्रेकच सार्थकी लागला असं वाटायला लागलं होतं... :)

सोमेश्वरमंदिर आणि आजूबाजूचा परिसर मला खूप आवडला. गणेशमंदिर आणि सोमेश्वरमंदिरांची बांधणी सारखीच आहे. बाहेरच्या बाजूला मोतीटाक्यातून संन्यासीबाबांसाठी पाईपाने आणलेले पाणी एका टाक्यामध्ये सोडले आहे. दुपारीही ते पाणी बर्फासारखे थंड होते! मंदिर चहुबाजूंनी झाडीमध्ये लपलेले आहे.








दिवेलागणीच्या वेळी रातकिड्यांनी आतला सूर लावायला सुरूवात केली होती. मंदिर परिसरात विलक्षण शांतता होती. आता मोरागडाची फक्त काळी बॉर्डर दिसत होती.संन्यासीबाबांनीही घराबाहेरची सोलर एनर्जीवर चालणारी ट्युब बंद केल्यावर तर सर्वत्र अंधार पसरला. चढत्या रात्रीने थंडीची चादर पसरायला सुरूवात केली. आम्ही मंदिरात चूल पेटवली, आणि यो-अविने सांबरभात आणि आलू-मटर बनवले (रेडी टू ईट जिंदाबाद!)... मंदिरामागच्या रानातल्या झाडांवरून वानरांचे आवाज ऐकू येऊ लागले आणि आजचीही झोप संकटात येते की काय अशी शंका मनाला चाटून गेली! त्यात रोमाने त्यांना रतनगडाच्या ट्रेकमध्ये ते सूर्योदय बघायला गेलेले असताना माकडांनी गुहेत शिरून खाद्यपदार्थ पळवल्याचा किस्सा सांगितला! जेवण आटोपून carrymats पसरल्या तेव्हा साडेनऊ झाले होते..

ट्रेकमधला अविस्मरणीय दिवस संपला होता. आम्ही scheduleच्या थोडेसे मागे होतो. उद्या सकाळी ९ पर्यंत मोरागडबघून आलो असतो, तरी हरगड बघून मांगी-तुंगीकडे निघणे शक्य झाले असते... एकुणात, मोरा बघायला लागणारा वेळ हाच ६ किल्ले की ७ किल्ले यामधला deciding factor असणार होता. पण त्यापूर्वी आम्हाला झोप खुणावत होती... अविने शेकोटीमध्ये २-३ तास पुरतील एवढी लाकडे टाकली. वानरांचा विचार डोक्यातून काढून टाकला आणि अंथरूणावर अंग टाकले. मोरा-मुल्हेरच्या कुशीत असलेल्या सर्व दु:खांचे हलाहल पचवणाऱ्या भोलेबाबाच्या ऐतिहासिक मंदिरात केव्हा झोप लागली ते कुणालाच कळले नाही.. :)


(क्रमश:)
-- नचिकेत जोशी

सर्व फोटो - यो रॉक्स आणि रोहित

सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग २

थोडक्यात पात्रपरिचय: नाव आणि कंसात माबो आयडी
यो : योगेश कानडे (यो रॉक्स)
ज्यो: गिरीश जोशी
अवि: अविनाश मोहिते (अवि_लहु)
रोमा किंवा रो: रोहित निकम (रोहित एक मावळा)
मी: नचिकेत जोशी (आनंदयात्री)

२५ डिसेंबर: सालोटा आणि मुक्काम साल्हेर

नाशिकला उतरलो तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. कडाक्याची थंडी पडली होती. अर्थात त्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये पारा ४.५ पर्यंत खाली आला होता. त्यामुळे थंडी अपेक्षितच होती. आमचा पुढचा टप्पा होता ताहराबाद! तिथे जायला नाशिक-अक्कलकुवा ही एसटी जुन्या सीबीएस (Central Bus Stand)वरून साडेपाचला होती. महामार्ग स्टॅंडवरच्या कंट्रोलरने आम्हाला जुन्या सीबीएसला जायला सांगितले तसे निघालो. वाटेत आमच्याच एसटीमधून उतरलेल्या एका मुलाला योने (गरज नसताना) पुन्हा ताहराबादची एसटी कुठून मिळेल असे काहीतरी विचारले.

त्याने नवीन सीबीएसवरून सुटेल असे सांगितले. आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. महामार्ग स्थानक-नवीन सीबीएस हे अंतर एक-दीड किमी असेल. तिथे पोचल्यावर कळले की गाडी जुन्या सीबीएसवरूनच सुटते!! अशा प्रकारे पुण्यक्षेत्र नाशिकमध्ये भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीमध्ये तिन्ही बस स्टॅंण्ड्सला अर्ध्या तासात भेट देण्याचे पुण्य पदरात घेऊन आम्ही ५.२५ ला जुन्या सीबीएसमध्ये दाखल झालो.(नवीन सीबीएस आणि जुने सीबीएस जवळजवळ आहेत म्हणून ठीक, नाहीतर योची काही खैर नव्हती :D). अक्कलकुवाची बस उभीच होती आणि बरोब्बर ५.३० ला सुटलीसुद्धा!!

उरलेली झोप मी ह्या प्रवासात पूर्ण केली. रोमा कंडक्टरशी गप्पा मारत बसला होता. (आणि नंतर दिवसभर माझी झोप झाली नाही म्हणून कुरकुरत होता. :P) अवि-ज्यो-यो झोपले असावेत कारण ट्रेकस्टाईल मस्तीचा कुठलाही आवाज मला ऐकू आला नाही. :P मला जाग आली तेव्हा एसटी बागलाण तालुक्यात शिरली होती. उजव्या-डाव्या हाताला डोंगररांगा सुरू झाल्या होत्या. सर्वात उंच किल्ला असलेला साल्हेर कुठुनही दिसेल असे वाटल्यामुळे मी दोन्ही बाजूला उंच डोंगर शोधत होतो. पण साल्हेरच्या उंचीचा किल्ला दिसला नाही. ताहराबादला पोहोचलो तेव्हा पावणेआठ वाजले होते. थंडी चिकार होती. तिथल्या स्टॅण्डवरसुद्धा गाळणी मिळते का याची चौकशी केली. ’आमच्याकडे पूर्वी होती, पण महाग असल्यामुळे कुणी घेत नाही. म्हणून नाही ठेवत आता’ हे एका दुकानदाराचे उत्तर ऐकून त्या थंडीमध्येही माझ्या तोंडातून निराशेची वेगळी वाफ बाहेर पडली!

स्टँडवर अजून एक ट्रेकर्सचा ग्रुप भेटला. ते मुल्हेर-मोरा करून शेवटी साल्हेरला जाणार होते. आम्ही सुरूवात साल्हेरहून करणार होतो. साल्हेरसारखा सर्वात उंच आणि सालोटासारखा अवघड असे दोन किल्ले ट्रेकच्या सुरूवातीलाच करण्यामागे कारण होते. ७ किल्ल्यांच्या या दीर्घ ट्रेकमध्ये सुरूवातीला असणारी एनर्जी अवघड किल्ल्यांसाठी उपयोगी पडेल असा साधा विचार त्यामागे होता. (हा निर्णय अगदी बरोबर होता हे नंतर आम्हाला जाणवले.) ताहराबादहून मानूरची एसटी साडेआठला सुटते. ती मुल्हेर-वाघांबे-साल्हेरमार्गे जाते. पुण्याहूनसुद्धा थेट ताहराबादसाठी एसटी आहे. पुणे-कळवण एसटी मिळाल्यास थेट मुल्हेर अथवा वाघांबे/साल्हेरपर्यंत जाता येते. मानूरची एसटी येईपर्यंत नाश्ता करून घेतला. रोमा आणि योने किल्ल्यांचे नकाशे प्रिंट करून आणले होते. ही पद्धत मला खूपच आवडली. हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. त्या नकाशांमुळे वाटा चुकण्याचे प्रकार एक अपवाद वगळता(ते वर्णन पुढे येईलच) घडलेच नाहीत. ते नकाशे एकदा नजरेखालून घातले. एसटीमध्ये मुल्हेरला बोरे आणि पेरू विकायला जाणारा एक बाबाजी भेटला. त्याच्याकडून बोरे विकत घेतली. आम्ही वाघांबेहून सालोटा-साल्हेर चढणार होतो आणि उद्या पलिकडच्या बाजूने साल्हेरवाडीमध्ये उतरणार होतो. वाघांबेला उतरलो तेव्हा साडेनऊ झाले असावेत. गावातून दोन पोरांना वाटाड्या म्हणून घेतले(बाळू आणि रामू ही त्यांची नावे.) आणि लगेच निघालो. समोर सालोटा आणि साल्हेर दिमाखात उभे होते.


साल्हेर किल्ला गुजरात सीमेच्या अगदीच जवळ आहे. कारण चढतांना उजवीकडच्या एका सुळक्याकडे बोट दाखवून बाळू म्हणाला ’ते गुजरात आहे’. त्यामुळे त्या प्रदेशातल्या गावकऱ्यांची भाषा सुद्धा गुजरातीमिक्स असते. आमचे वाटाडेही त्याला अपवाद नव्हते. त्यांना मराठी फारच कमी समजत असावे. अर्थात मराठी शाळेत जात असल्यामुळे रामूला बऱ्यापैकी मराठी समजत होते. पण तो प्रत्येक प्रश्नाला होहो असेच उत्तर देत असल्यामुळे सुरूवातीला थोडी पंचाईत झाली. पण नंतर ज्यो आणि योने त्यांच्याशी बोलण्याचे कसब दाखवले! मी त्यांना प्रश्न विचारण्याचे अनेक प्रयत्न करून पाहिले पण व्यर्थ! शेवटी शेवटी मी जास्तीत जास्त तीन शब्दांचे प्रश्न करून पाहिले.. पण छे! या पुण्यनगरीच्या सारस्वताची भाषाच त्याला कळत नव्हती! असा सर्व टाईमपास करत चढत होतो. मध्येच रोहितला पित्ताचा त्रास होऊ लागला. आणि त्याच्या पोटामधल्या जिन्नसाने आतमधली घुसमट असह्य झाल्यामुळे तोंडावाटे बाहेर उडी घेतली! सुरूवातीच्या २-३ ओव्हर्स खेळताना अडखळणे हे जसे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूचे लक्षण असते तसे ट्रेकच्या सुरूवातीला त्रास होणे हे जातिवंत अट्टल ट्रेकरचे मुख्य लक्षण असते हे मी कुठेतरी वाचल्याचे आठवले आणि आपण कसलेल्या लोकांबरोबर ट्रेक करायला आलो आहोत या आनंदात समोरची वाट सोडून मी थेट चढण स्वीकारली.

आम्ही तिघे रामूला घेऊन थोडे पुढे आलो होतो आणि रोमा आणि योला घेऊन बाळू मागून येत होता. इतक्यात एका कातळाजवळ ज्यो आणि अविला एक साप दिसला. "धामणी अहे" - इति रामू. म्हणजे विषारी की बिनविषारी हे मी रामूला विचारेपर्यंत (आणि त्याला प्रश्न समजून तो उत्तर देईपर्यंत) हे दोन बहाद्दर तिच्या दिशेने पळाले सुद्धा. अर्थात त्यांची चाहूल लागल्यामुळे ती धामण केव्हाच कातळाखालच्या बिळात घुसली आणि पुढचा scene हुकला.

थोडे पुढे आलो आणि सालोट्याच्या पोटामध्ये एका गुहेजवळ पाण्याचे टाके दिसले. अवि आणि बाळूने तिथून पाण्याच्या बाटल्या भरून आणल्या. येथपर्यंत रोमा एकदम ठीक झाला होता आणि संध्याकाळी साल्हेरवर मुक्कामाला जाईपर्यंतची मोठी इनिंग खेळायला सज्ज झाला होता!
नवीन बाजीराव अविचा तिथल्याच कातळावरचा हा एक फोटॉ -

साल्हेर आणि सालोटा हे एका खिंडीने जोडले गेले आहेत. आमचा पहिला टप्पा होता ती खिंड गाठणे, तिथे सामान टाकणे आणि सालोट्याकडे निघणे. त्या खिंडीत पोचेपर्यंत बारा वाजले!(घड्याळात). खिंडीत सॅक्स ठेवल्या. रामू तिथेच बसणार होता आणि बाळू आम्हाला वाट दाखवत सालोट्यावर येणार होता.

४९८६ फ़ूट (१४९६ मी) उंचीचा सालोटा किल्ला जबरदस्त आहे. आणि खरं सांगायचं तर चढायला (आणि अर्थातच उतरायलाही) साल्हेरपेक्षा अवघड आहे. त्या खिंडीतून सालोट्याला पायथ्याशी वळसा मारून बाळू आम्हाला नेऊ लागला. ह्याला स्वत:लाही वाट नीटशी माहित नाही हे लवकरच आमच्या लक्षात आले! अर्थात वाट म्हणजे मान वर केल्यावर अंगावर येणाऱ्या सालोट्याला बिलगून डोंगराला समांतर आडवी पाऊलवाट होय! रॉकपॅचेस पार करत स्वत:च वाट शोधत (नेतृत्व - रोमा आणि यो) आम्ही वर चढू लागलो. अशा प्रकारे तासभर त्या डोंगराशी खेळल्यानंतर रोमा , अवि आणि ज्यो पायऱ्यांशी जाऊन पोहोचले. मी आणि यो बाळूच्याचा वाटेने लांबचा वळसा मारून पोहोचलो! सालोट्याच्या पायऱ्या म्हणजे सह्याद्रीतल्या बांधकामाचा एक सुंदर नमुना आहे. एकाच शब्दात वर्णन करायचं झालं तर "रांगडा" यामध्ये ते संपेल.



पटाईत आणि अनुभवी ट्रेकरसुद्धा साल्हेर-सालोट्यावर अतिशय काळजीपूर्वक चढतात हे मी खूप आधी कुठेतरी वाचलं होतं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज घेत होतो. अतिशय मोकळ्या पायऱ्या (म्हणजे धरायला फारसं काहिच नाही, पाय सटकला तर खाली घसरगुंडी थेट द री त...) ती सगळी कसरत करून रोमा, ज्यो, अवि पटापट वर पोहोचले सुद्धा! मी (जीवाला जपत इ.) सर्वात शेवटी वर गेलो. आणि मागे वळून पहिले तर हा सुंदर view दिसला--


समोर साल्हेरचा बुलंद किल्ला मान ताठ करून उभा होता! beautiful!! त्याच्या पहाडामधल्या पायर्‍या केवळ Class!!!





सालोट्याचा दरवाजा छोटाच पण देखणा आहे. पहिल्या दरवाज्याच्या मागे असंख्य शिळा आडव्यातिडव्या पडल्या आहेत. एखादी दरड ढासळल्यामुळे असेल कदाचित.


तिथून सरळ पायवाट बालेकिल्ल्याकडे जाते. वाटेत अजून एक दरवाजा आणि कातळामधल्या ३-४ गुहा लागतात. पावसाळ्यात त्यांत पाणी झिरपत असणार. सालोट्याचा हा दुसरा दरवाजा-


तोच दरवाजा पण आतून -




आम्ही तिथे जेवणाच्या पुड्या सोडल्या. तुझ्या घरी कोण कोण असतं? आणि शेतामध्ये काय लावलं आहे? हे दोन प्रश्न मी बाळूला विचारून पाहिले आणि (हताश वगैरे होऊन) उत्तरे घेण्याची जबाबदारी रोमा आणि योवर सोपवली. तेच प्रश्न, तसेच, त्यांनी विचारल्यावर पठ्ठ्याला बरोबर कळले!! (यावर मी मनात काहीतरी म्हटलं, पण ते आठवत नाही आता! :D)

जेवण संपवून आम्ही गड फिरायला निघालो. गडावर बघण्यासारखं असं विशेष काही नाहीये. एक मारूती आणि २-३ टाके एवढंच आहे ही आमची समजूत एका नागाने दर्शन दिल्यावर लगेच दूर झाली! गवतातून चालताना तो (बिचारा) नाग रोहितच्या पायाखाली येता येता वाचला.


तीन तासाच्या आत दुसऱ्यांदा अहिकुलातील एका सदस्याने बराच वेळ दर्शन दिले होते! नागाचा वेग ६ सेकंदात १०० मी असतो असली (ऐकीव) माहिती पुरवून अविने कुठेही जा, नाग पायाखाली येऊ शकतो असा गर्भित इशाराच दिला! कुठल्याशा वाघांच्या अभयरण्यामधल्या फलकावर वाघाच्या तोंडी लिहिलेला "तुम्ही मला पाहिलं नसेल पण मी तुम्हाला पाहिलं आहे" हा संदेश आठवला! तो बालेकिल्ला उतरेपर्यंत मग मी शक्य तितक्या जोरात पाय़ आपटत पावले टाकीत होतो!

बालेकिल्ला १५ मिनिटात बघितला, आणि रात्रीच्या जेवणासाठी आणि शेकोटीसाठी लाकडे गोळा करत सालोटा उतरलो. उतरतांना तर आणखी थरार होता. कारण चढतांना जी दरी पाठीमागे होती ती आता समोर "आ" करून पसरली होती. वरून पाहताना हे असे दिसते - फोटोत रामू दिसतोय-


हा अजून एक -


पायऱ्यांचा पॅच फक्त जरासा अवघड आहे. बाकी सर्व क्षेम!


येताना रोमाच्या वाटेने खाली आलो. आणि पाहतो तर काय! आमचा दुसरा वाटाड्या रामू त्या अडिचच्या उन्हात एका कातळावर तोंडावर फडके घेऊन स्वस्थ झोपला होता!! लाकडांची मोळी बांधली, थोडी विश्रांती घेतली आणि बरोब्बर तीन वाजता साल्हेरकडे निघालो.

पाचपर्यंत वर पोचायचे ध्येय ठेवले होते, पण अवघ्या चाळीस मिनिटात मी साल्हेरच्या पहिल्या दरवाजामध्ये थंड हवा खात बसलो होतो! पाठोपाठ १५-२० मिनिटात उरलेले चार + दोन ’गडवाले’सुद्धा आले. तिथून सालोट्याचे फोटू घेतले -






साल्हेरचा पहिला दरवाजा -


तो पार करून आम्ही साल्हेरच्या कड्याच्या पोटातली वाट चालू लागलो.




महाराष्ट्रातील सर्वात उंच असा हा साल्हेर किल्ला (उंची ५१४० फूट, १५४३ मी) मनोरम, सुंदर, देखणा आहे. या किल्ल्याला शिवरायांचा इतिहास आहेच, पण त्याही ५-६ शतके आधीचा वारसा आहे. शिवरायांच्या इतिहासातली मराठ्यांनी मुघलांना मैदानात समोरासमोर पहिल्यांदा मात दिलेली लढाई झाली, ती इथेच साल्हेरच्या मैदानात! किल्ल्याला वेढा दिलेल्या ६० हजार मुघलांवर हल्ला करण्यासाठी राजांनी मोरोपंत पिंगळे आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या हाताखालचे ४० हजार मराठी सैन्य फत्ते झाले तेव्हा मराठे केवळ गनिमी काव्यातच नाही तर समोरासमोरसुद्धा वजिरे-आझम औरंगजेबाच्या सैन्याला हरवू शकतात हा आत्मविश्वास संपूर्ण दख्खनभर पसरला होता. त्या इतिहासाच्या नुसत्या स्मरणानेच जिथे अंगावर रोमांच उभे राहते, ती जागा केवळ अंदाजानेच आज आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो! ती लढाई नक्की कुठे झाली असेल हा विचार दुसऱ्या दिवशी साल्हेर उतरतानाही आमच्या डोक्यात होता. कारण साल्हेरचा घेरा इतका मोठा आहे, की याला वेढा दिलेल्या मुघलांवर कसा आणि कुठून हल्ला झाला असेल याचा विस्मय वाटत होता.


कड्याच्या पोटातली देखणी वाट चालून आम्ही माचीवर गेलो. तिथला विस्तीर्ण माळ बघून हरिश्चंद्रगडाची आठवण झाली. त्यातून चालत पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांना ओलांडून गुहेमध्ये गेलो. सकाळी ताहराबादला भेटलेला ग्रुप आमच्या आधीच तिथे पोचला होता. एका गुहेमध्ये सॅक्स ठेवून ते परशुराम मंदिर बघायला गेले होते. बाजूच्या गुहेत आम्ही आमचा संसार थाटला.


गुहेसमोर खालच्या अंगाला असलेले हे तळे - (पिण्याच्या पाण्याचे नव्हे)


रामू-बाळूला आता निरोप द्यायची वेळ झाली होती. गरम चहा आणि मानधन घेऊन ते सव्वापाचला निघून गेले आणि आम्ही रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. सूर्यास्त बघायला कोण कोण जाणार यावरुन बराच खल झाला. मी उद्या मुल्हेरवरून सूर्यास्त बघणार आहे हे आधीच जाहीर करून टाकले आणि स्वयंपाकाच्या दिशेने वळलो. शेवटी बरीच चर्चा होऊन ज्यो आणि रोमा सूर्यास्त बघायला गेले आणि आम्ही तिघे खिचडीच्या उद्योगाला लागलो. आणि सर्वात पहिल्यांदा माझ्या असं लक्षात आले की फोडणीसाठी गोडे तेल आपण आणलेलेच नाही! पण कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगण्याच्या ट्रेकरच्या गुणधर्माला जागून सॅकमधली खोबरेल तेलाची बाटली काढली आणि त्या तेलामध्ये (लज्जतदार, चविष्ट इ.) खिचडी बनवली. ऐनवेळी गुडघा दुखला तर मालीश करायला आणखी एक औषधी तेलही माझ्याकडे होते. पण खिचडीसाठी खोबरेल तेलाला पहिली पसंती मिळाली. पण चूल पेटवतांना झालेल्या गुहाभर धूराने ५ सेकंदात मला सर्दी झाली आणि दुर्दैवाने पुढच्या २ दिवसांच्या सर्व स्वयंपाककामामधून मी वगळलो गेलो. ती सर्दी फारच भयानक होती.

ज्यो आणि रोमा जवळजवळ धावतच सूर्यास्त बघून आले आणि जेवणाची पंगत मांडली. खिचडी-लोणचे-पापड असा लज्जतदार मेनू होता. जेवून यो-रोमा-ज्यो भांडी घासायला टाक्यावर निघून गेले. अवि चुलीची शेकोटी करून बसला आणि मी मोकळ्या हवेसाठी गुहेबाहेर आलो. बाजूच्या गुहेत मुक्कामाला असणाऱ्यांमध्ये एकाला आकाशातल्या ताऱ्यांचे ज्ञान असावे. कारण त्याने आकाशात धनुष्य-बाण घेतलेल्या शिकाऱ्याचा आकार दाखवला. बैलाच्या शिंगांच्या आकाराची वृषभ रास दाखवली. मी मात्र एक आकाशगंगा नुसत्या डोळ्यांनी बघायला मिळाल्यामुळे ज्जाम खूष झालो. बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या पहिल्या ट्रेकमध्ये राजगडावर पहाटे आय़ुष्यात पहिल्यांदा आकाशगंगा पहिली होती. साल्हेरवरून रात्री सव्वाआठच्या सुमारासही आकाश ताऱ्यांनी नुसते झगमगत होते. हजारो चांदण्या नुसत्या डोळ्यांनी दिसत होत्या. ट्रेकमध्ये काय पहायला आवडते असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचे ’साहित्यामध्ये नुसताच वाचलेला आणि इथे नुसत्या डोळ्यांनी पाहता येणारा नक्षत्रांचा सडा’ हे एक उत्तर असेल. बाकी मला फुलां-पानां-पक्ष्यांइतकेच ताऱ्यांमधले कळते. जसं गडाच्या उंचीवरून उडणारा प्रत्येक पक्षी मला ससाणा किंवा गरूडच वाटतो, तसं मृग रास आणि सप्तर्षी मला सारखेच वाटतात. म्हणूनच मी अशावेळी केवळ अबोल रसिकाची भूमिका घेतो. आकाशात डोळ्यांना दिसणारे "नक्षत्रांचे देणे" किंवा आभाळात पंख पसरवून उडणाऱ्या पक्ष्याचा डौल हे केवळ अनुभवण्यासाठी असते.. अर्थात माहितगार माणूस सोबत असेल तर हा अनुभव अधिक समृद्ध होतो. त्याअर्थाने या ट्रेकमध्ये मायबोलीच्या दिनेशदांना आम्ही miss केलं. त्यांच्याइतकी पाना-फुला-वनस्पतींची माहिती असणारा कुणी बरोबर असता तर कदाचित आम्ही लाकडांऐवजी विशिष्ट पानांवरच चूल पेटवली असती असा गमतीदार विचार मनाला चाटून गेला :)

यो-ज्यो-रोमा भांडी घासून आले आणि आम्ही पथाऱ्या पसरल्या. हद्द म्हणजे ज्योचे एक आणि माझे दोन carry-matsएवढंच अंगाखाली घ्यायला होते. त्यांची कशीतरी arrangement करून आम्ही साडेआठाला झोपलो. रात्रभर गुहेमध्ये उंदरांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे मी जवळजवळ १-२ पर्यंत जागाच होतो. जशीजशी बाहेर थंडी वाढू लागली तसतसा उंदरांचा आवाज कमी होत गेला. त्याच आसपास केव्हातरी मला अखेर झोप लागली.

आजचा हिशेब: एक अवघड किल्ला बघून महाराष्ट्रातल्या सर्वात उंच किल्ल्यामध्ये आम्ही मुक्कामाला पोहोचलो होतो. We were running as per the schedule. उद्याच्या लिस्टवर होती-महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या शिखराची - परशुराम मंदिराची भेट आणि मुल्हेरकडे प्रस्थान!


(क्रमश:)

नचिकेत जोशी

सर्व फोटो - यो रॉक्स आणि रोहित-एक मावळा

सालोटा ते तुंगी - बागलाण प्रांतातली मुशाफिरी : भाग १

मी या सर्व लेखांमध्ये नावांचे शॉर्टफॉर्म्स वापरणार आहे. त्यामुळे आधी पात्र-परिचय करून देतो-

यो : योगेश कानडे, मुंबई. या ट्रेकचा एक मुख्य planner. मायबोलीवर ’यो रॉक्स’ या नावाने छापतो म्हणून यो, दगड, खडक इ नावांनी प्रसिद्ध आहे.

ज्यो: गिरीश जोशी, मुंबई. योचा कलिग. मायबोलीकर नसावा, कारण याआधी तिथे पाहिल्याचे आठवत नाही. :)
(या यो आणि ज्यो अशा समान उच्चार असणाऱ्या नावांनी सुरूवातीला माझा ज्जाम गोंधळ उडवला होता. नक्की कोणाला हाक मारली गेली आहे, हेच कळायचे नाही!)

अवि: अविनाश मोहिते, मुंबई. नवीन मायबोलीकर. याचा विशेष परिचय करून द्यावा लागेल. हे बाजीराव एकदा मराठी गाण्यांसाठी नेटसर्फिंग करत असतांना ह्यांना गूगलमध्ये मायबोलीची लिंक मिळाली. तिच्यावर टिचकी मारून आत प्रवेश करते झाले. तिथे ह्यांना ट्रेकसंबंधी एक दुवा मिळाला. तिथले (बहुतेक)सर्व लेख वाचून यांनी ठरवले, की आपणही ट्रेक करायचा. मग पुढे यथासांग योचा नंबर मिळवून यांनी या ट्रेकबद्दल सर्व माहिती मिळवली आणि एनसीसी मधल्या कॅम्पचा अनुभव वगळता ट्रेकींगचा फारच कमी अनुभव असूनही दादर स्टेशनवर रात्री साडेदहाला आम्हाला येऊन भेटले! अर्थात अननुभवी असल्याची कुठलीच झलक त्याच्या ट्रेकमध्ये दिसली नाही, हे उल्लेखनीय!

रोमा: रोहित निकम, मुंबई. रोहित-एक मावळा या नावाने मायबोलीवर लिहितो म्हणून रो.मा.

आणि शेवटी मी: या ’पात्रा’चा परिचय करून द्यायची गरज आहे असं वाटत नाही, पण ’नैतिक, सामाजिक इ इ जबाबदारी’ म्हणून नचिकेत जोशी, पुणे (मूळ गाव डोंबिवली म्हणजेच जन्माने मुंबईकर :) ) या ट्रेकचा अजून एक planner.
(चरितार्थासाठी प्रत्येक जण स्वत:च्या पायावर उभा आहे. कुणी बॅंकेत, कुणी मास्तरकी तर कुणी संगणक बडवण्याच्या कामात असे प्रत्येकाचे स्वतंत्र रोजगार आहेत).
*******
२४ डिसेंबर: ओळखपरेड आणि दादरहून प्रस्थान:

या ट्रेकची planning जवळजवळ एक महिन्यापासून सुरू होती. पण ठिकाण नक्की ठरत नव्हते. प्रत्येक जण सुट्टी काढून येणार होता. त्यामुळे किती दिवसांची सुट्टी मिळेल त्यावर ठिकाण अवलंबून होते. आमच्यापुढे २ पर्याय होते - बागलाण प्रांत किंवा प्रचितगड-भैरवगड-कंधारडोह. अखेर योशी बोलून आणि इतर सर्व पर्यायांवर विचार करून आम्ही पहिलाच पर्याय नक्की केला. सुरूवातीला आम्ही सात किल्ले ठरवले होते. साल्हेर-मुल्हेर-सालोटा-मोरा-हरगड-मांगी-तुंगी. किल्ल्यांचा क्रम तसेच एसटी बसेसच्या वेळा योने पूर्वानुभवी मायबोलीकरांशी बोलून फायनल केल्या. शेवटी आम्ही पाच जण नक्की झालो. मी, यो, ज्यो, रोमा आणि नवा बाजीराव अवि. गंमत म्हणजे यो-ज्यो-रोमा यांनी आधी एकमेकांबरोबर ट्रेक केला होता. मी या सर्वांबरोबर ट्रेक सोडाच, त्यांच्यापैकी कुणालाही भेटलोही नव्हतो. but, it made no difference! After all, आम्ही अट्टल भटके होतो.. पण या सर्वांबरोबरच्या पहिल्याच ट्रेकमध्ये मलाही खूप गोष्टी बघायला, शिकायला मिळाल्या हे आवर्जून लिहावेसे वाटते.

मोठी सुट्टी काढलेली असल्यामुळे मुंबईत नातेवाईकांकडेही जाता येईल व तिथूनच ट्रेकला जाऊ असा विचार करून पुणे-नाशिक अशी सोयीची एसटी असतानाही मी २१ तारखेलाच डोंबिवलीला पोहोचलो आणि मग ट्रेकसाठी थोडिफार खरेदी (तांदूळ-डाळ-पोहे वगैरे) २४ तारखेला ९.४७ च्या फास्ट लोकलने दादरला गेलो.

ठरवल्याप्रमाणे सगळेजण रात्री साडेदहाला दादर वेस्टर्नच्या प्लॅटफॉर्म नं १ च्या मेन इंडिकेटरखाली भेटलो. योने बहुधा प्लॅटफॉर्मवर आधीच मला कुठेतरी पाहिले असावे आणि माझ्या अवतारावरून ओळखले असावे. कारण मेन इंडिकेटर कुठे आहे असा प्रश्न मी तिथल्या पोलिसाला विचारत असताना हे महाशय शांतपणे मागे उभे राहून माझा आणि पोलिसाचा संवाद ऐकत होते. मी पोलिसाशी बोलून मागे फिरलो आणि मागे देव आनंद किंवा दिलीपकुमारच्या स्टाईलमध्ये माझ्याकडे बघत असलेला यो दिसला. दहा मिनिटात अवि आला आणि येरझाऱ्या घातल्यासारखा पुढे जाऊन ज्यो पुन्हा मागे आला. रोमा ठाण्याहून फ़ास्ट लोकल ऐवजी स्लो लोकलने येत असल्यामुळे ’दहा मिनिटे उशीराने अपेक्षित’ होता. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या सगळ्या मुंबईकर ट्रेकमेट्समध्ये मीच काय तो (योच्या भाषेत ’बाटलेला’) पुणेकर होतो. उगाच उशीर झाला तर सुरूवातीलाच पुण्याचा उद्धार नको म्हणून मी अगदी वेळेवर पोहोचलो. :P योने डोंबिवलीहून ९.४७ची फास्ट लोकल दादरला साडेदहापर्यंत पोचेल असं वाटत नाही असं म्हणून आधीच त्या उद्धाराचे संकेत दिले होते. माझा मात्र मुंबईच्या रेल्वेवर पूर्ण भरवसा होता. असो. तर मुद्दा हा, की सगळे जमायला पावणेअकरा झाले.

तेवढ्यात रोमा आणि योच्या लक्षात आले की चहाचे गाळणे कुणीच घेतलेले नाही. झाले! मी आणि ज्यो तेवढ्या रात्री दादर स्टेशनच्या बाहेर कुठे गाळणी मिळते का ते पहायला निघालो. अर्थात, एवढ्या रात्री गाळणीचे दुकान उघडे असणे शक्यच नव्हते (मुंबई असली म्हणून काय झालं? ;) ) शेवटी तर आम्ही एक-दोन हॉटेलमध्येसुद्धा स्पेअर गाळणी आहे का असेही विचारून आलो!! :D अखेर नाशिकची एसटी चुकायला नको म्हणून आम्ही गाळणीला वगळूनच निघालो. सव्वा अकरा वाजता शिर्डी एसटीने मार्गस्थ झालो. रात्री कसारा घाटाच्या अलिकडे छोट्या पुलावर (बहुधा खर्डीचा असावा) नेहमीचा ट्राफिक जाम लागला. बाकी सर्व ठीक घडले असावे, कारण मध्ये एका ढाब्यावर गाडी थांबली तेव्हा फक्त जाग आली होती. त्यानंतर थेट नाशिकला महामार्ग स्थानकावरच जाग आली. अर्थात झोप बसल्याबसल्या जेवढी होते तेवढीच झाली होती...

(क्रमश:)

- नचिकेत जोशी

Tuesday, January 25, 2011

स्वरभास्कराचा अस्त...

काल पंडितजी गेले...
१० वर्षांपूर्वी पु.ल. गेले तेव्हा आत काहीतरी हललं होतं... काल exactly तेच feeling होतं... दिवसभर ofc च्या गडबडीत असल्यामुळे खूप इच्छा असूनही कलाश्रीवर जाता आलं नाही. त्यामुळे माझ्या एका पंडितजींच्या अत्यंत निस्सिम भक्त असलेल्या मित्राला फोन केला. तो फोनवर रडतच होता.. परवाच एका छोट्या मैफलीत भेटला तेव्हा तो म्हणाला होता की मला पाच रागांच्या नावाने पाच अत्तराचे frangrance तयार करायचे आहेत.. पंडितजींच्या सगळ्या दुर्मिळ रेकॉर्ड्स त्याच्याकडे आहेत.. इतकं वेड्यासारखं प्रेम करणार्‍या त्याच्यासारख्याची ही अशी अवस्था पाहून माझ्या आतलं हललेलं अजूनच खोल खोल जाऊ लागलं होतं.

रात्री घरी गेल्यावर news channels लावून बसलो. सुदैवाने, रात्री १० ते साडेअकरामध्ये दूरदर्शनने गुलजारसाहेबांनी पंडितजींवर काढलेला लघुपट दाखवला. मला जsssरा बरं वाटलं... पंडितजींनी त्यांचा जीवनप्रवास त्या मुलाखतीमध्ये उलगडला.. जुन्या मैफलींची क्षणचित्रे, त्यांच्याकडचे अंदाजे १०० वर्षे जुने असलेले उ.अब्दुल करीम खाँसाहेबांचे तानपुरे आणि नवीन पिढीतल्या कोणत्या शिष्यांकडून अपेक्षा आहेत या प्रश्नाला "आनंद भाटे" हे पंडितजींनी दिलेले उत्तर (आनंद भाटे हे COEP चे माजी विद्यार्थी, डिसेंबर ०९ मध्ये एका कार्यक्रमात मी निवेदक होतो आणि आनंदजींनी गायलेल्या "केतकी गुलाब जूही.." ने सभागृह भारून गेलं होतं, ते अनुभवायला मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो, ते काल आठवलं), त्यांचा कार चालवण्याचा शौक, त्यांच्या गुरुबंधूनी - उ अमजद अली खाँ साहेबांनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी या सगळ्यांनी ती मुलाखत काल रंगली...
आज मटाने सुंदर लेख दिले आहेत, सकाळनेही त्यांचा प्रवास छान मांडला आहे..

आता फक्त आठवणीच उरल्या आहेत...

हिमालयाएवढं कर्तृत्त्व असलेली ही एक एक माणसं आपलं हे जग सोडून चालली आहेत. पु.ल. गेले, भटसाहेब गेले, बिस्मिल्लाह खाँसाहेब गेले, विंदा गेले, अजून किती तरी... अशा वेळी आतमध्ये कातरत राहते..
भटसाहेब म्हणतात तसं "विजा घेऊन येणार्‍या पिढ्यांशी बोलतो आम्ही" हे कितपत खरं आहे? काल मुलाखतीमध्ये सुद्धा पंडितजींनी "माझं नाव गुरूस्थानी लावणारे बरेच आहेत, पण आशादायी गाणारे फार कमी" असं विधान का केलं असावं?

काही दिवसांपूर्वी सारेगमामध्ये कल्याणजी आले होते. स्पर्धक गात असतांना हे उस्ताद कानाला काही हेडफोन वगैरे न लावता चेहर्‍यावर एक प्रकारचा टवटवीतपणा घेऊन गाण्यांचा आनंद घेत होते. आणि तरीही सुरांचं परीक्षण अगदी बरोब्बर करत होते. मला खूप कौतूक वाटलं... हे त्यांनी कुठून कमवलं? किती साधना केली असेल? किती वर्षं लागली असतील? निष्ठा, एकाग्रता, पैसा, पोट कसं balance केलं असेल?

दोन दिवसांपूर्वी डॉ. अरूणा ढेरे एक अनौपचारिक गप्पांच्या वेळी सहज बोलून गेल्या - की हल्ली केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेले बरेच जण दिसतात, पण संशोधनाच्या, निर्मितीच्या क्षेत्रात अफाट कर्तृत्त्व असणारे फार फार कमी उरले आहेत..

तेवढी उंची गाठायला एक एक आयुष्य खर्ची घालावं लागतं हे आम्हाला कधी कळणार?? मला कधीकधी असंही वाटतं, की ह्या आभळाएवढी तपस्या आणि हिमालयाएवढं कर्तृत्त्व असलेल्या माणसांनंतर पुन्हा तशीच माणसं "तयार" होईपर्यंतच्या मधल्या काळात आदर्श कोण असणार?

ही सुद्धा एक प्रकारची "generation gap"च नाहीये का?

नचिकेत जोशी (२५/१/२०११)